Wednesday, December 13, 2017

१३ कोटी मंत्रजप आवर्तनासंबंधी शंका

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹
*शंका*-  एक प्रश्न विचारायचा होता की १३ कोटी जप केला तर भगवंताची प्राप्ती होते... पण जर मंत्र मोठा असेल, जसे की श्रीराम जय राम जय जय राम (तेराक्षरी) किंवा हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (३२ अक्षरी) तर १३ कोटी व्हायला वेळ लागेल. पण जर मंत्र कमी अक्षरांचा असेल जसे की विठ्ठल विठ्ठल किंवा सर्वात सोपा राम राम तर १३ कोटी जपाचे आवर्तन लवकर पूर्ण होईल. कृपया मार्गदर्शन करावे. श्रीराम! 

*श्रीराम!* बाजारात गेल्यावर भाजी कोणती निवडावी, हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. परंतु, नामसाधनेत साध्याप्रत पोचण्यासाठी छोटासा मला सोयिस्कर असा मंत्र निवडणं हे भाजी निवडण्याइतकं स्वाधीन नाही.
*नाम बाजारचा भाजीपाला नाही रे।*
छोटा मंत्र दिला तर माझे जास्तीत जास्त शिष्य कमी कालावधीत १३ कोटी पूर्ण करतील या गणिताचा विचार आपल्या सद्गुरूंच्या मनांत आला नाही. शिष्याचं कल्याण किती अक्षरी मंत्रात आहे, हे सद्गुरूंना शिष्यापेक्षा नक्कीच चांगले कळते! मोठ्या मंत्राचा १३ कोटी नामजप पूर्ण व्हायला फार मोठा कालावधी लागेलच, असं नाही! किंबहुना, १३ कोटी नामजप झाल्यानंतरच भगवंताचं दर्शन होईल, असं नाही. तसेच, १३ कोटी नामजप झाल्यानंतर भगवंताचं दर्शन होईलच असंही नाही!
हा संख्येच्या खेळात संख्येपेक्षा दर्जा महत्त्वाचा आहे. नाम'जपा'पेक्षा नाम'स्मरण' महत्त्वाचं! परंतु, आज मला नाम घेतांना नामीचं स्मरण होत नाही, म्हणून आज मी नामजप वाढवणे जरूर आहे. 'नामालय' उपक्रम प्रत्येकाची व्यक्तिगत जपसंख्या किती वाढली आहे याकडे लक्ष देतो. याचं कारण, जपसंख्या वाढता वाढता त्या नामधारकाच्या अंतःकरणात केंव्हातरी भगवद्प्राप्तीची तळमळ निर्माण व्हावीं! या व्यक्तिगत १३ कोटी नामजपाच्या प्रवासात कुठेतरी एक नाम असं यावं की, रघुराज थक्कित होऊनी पाहे। भगवंताला वाटावं की, "अरे! हे कोण आर्ततेनं नाम घेतंय? मला याच्यावर पूर्ण कृपा करायलाच हवी!" तो कृपा करायलाच बसला आहे, आपण कृपापात्र नाही आहोत. आणि ही पात्रता आपल्यात येण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी आपल्या पात्रात जे नाम दिलं आहे, ते निष्ठेनं, चिकाटीनं आणि प्रेमानं घ्यावं!
खरंच काय सांगू तुम्हाला! नामसाधनेची खरी पराकाष्ठा म्हणजे नाम घेतांना आपल्या डोळ्यांत पाणी यावं. आणि आपल्या डोळ्यांत पाणी आलं की सद्गुरूंच्या सुद्धा डोळ्यांत कृतकृत्यतेनं पाणी आलंच समजा!
तेंव्हा, मला सद्गुरूंकडून मिळालेल्या नामांत किती अक्षरं आहेत, याकडे लक्ष न देता ते नाम घेतांना माझं नामीकडे किती लक्ष आहे, याकडे लक्ष दिलं तर ८४ लक्ष योनीनंतर मिळालेल्या या जीवनाची इतिकर्तव्यता ध्यानांत येईल!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment