Wednesday, December 13, 2017

"ठोंबे" म्हणजे नेमके काय?

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹

*शंका*- माझे मित्र समर्थोपासक यांच्याकडून खालील शब्द मिळाले ...
"भक्तीविण कवीत्व...
तो जे मानीजे ठोंबे मत !"
"ठोंबे" म्हणजे नेमके काय?

*श्रीराम : ठोंबे म्हणजे दगड!
वरील ओवींत मला तीन शब्द महत्वपूर्ण वाटतात: भक्ती, कवित्व आणि ठोंबे.
भक्तीचा लाक्षणिक अर्थ आवड, प्रेम असा आहे. आणि कवित्व हे एखाद्या गोष्टीची तिव्र आवड असल्याशिवाय शक्यच नाही....
मग समर्थांनी भक्तिविण कवित्व कसं म्हंटलं?
समर्थांनी याठिकाणी भक्तीचा तपशीलातील अर्थ न घेता तात्विक अर्थ घेतला आहे. यांत भक्ती म्हणजे भगवंताचीं आत्यंतिक आवड!
समर्थांना असं म्हणायचं असेल की, भगवंताच्या भक्ती शिवाय जे कवित्व आहे, ते कवित्वच आहे, पण ते ठोंबे म्हणजे मठ्ठ आहे, दगडासारखं!
मुळात, मला असं वाटतं की जगाशी, विषयाशी संबंधीत काव्य हे जसं दगड, तसंच भगवंताच्या भक्तीनें प्रेरीत होऊन केलेलं काव्य देखील दगड.
आणि थोडं आणखी पुढे जाऊन मी म्हणेल की, विषयाशी संबंधीत काव्य करणारा ठोंब्या आहेच, कारण हा समर्थांचा विचार आहे. परंतु, त्याचबरोबर, भगवद्भक्तीचं काव्य रचणारा देखील ठोंब्याच!
कसं ते पहा:
विषयाशी संबंधीत काव्य हे रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले दगडं. परंतु, भगवंताच्या लीलाचरित्राचें यथार्थ वर्णन करणारं काव्य म्हणजे परमात्मतत्वाचं चैतन्य ओतलेला मंदिरातील दगड!
अध्यात्मेतर काव्य हे तात्पुरतं उपयोगी असेल कदाचित. जसं रस्त्यावरील दगड एखादं कुलुप तोडायला मदत करेल.
परंतु, भक्तीरसाचं काव्य विषयविकारांचं कुलुप तोडून भगवद्प्रेमाचं दालन उघडणारा दिव्यतम् दगड!
विषय काव्य हे केवळ बद्धाला आणखी बांधणारं बंधन असतं. परंतु,
*भक्तीकाव्य हे मुमुक्षुसाठी अंजन, साधकासाठी साधन तर सिद्धासाठी समाधीसुख असतं!*
अशाप्रकारे, जगातील बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या चार प्रकारच्या लोकांसाठी दोन दगडं आहेत.
*जिसकी जैसी उपज है । वैसा बने बनाव ।*
तेंव्हा, समर्थांची क्षमा मागून "कोणतंही काव्य म्हणजे दगडच" असं म्हणण्याचं धारिष्ट्य करतो!
आता पुन्हा एकदां समर्थांची क्षमा मागून म्हणतो की, प्रत्येक कवी हा ठोंब्याच!
चित्रपटांसाठी निरर्थक काव्य रचणारा कवी हा ठोंब्या, आणि रामायणासारखं अद्भुत दिव्य महाकाव्य रचणारासुद्धां ठोंब्याच!
पण, या ठोंब्यांमध्ये
*दोन्ही दिसती सारखी सारखी ।*
*वर्म जाणे तो पारखी ।।*
जेव्हा तुम्ही विकारांच्या, कामाच्या आहारी जाता तेंव्हा तुम्ही सामान्य दगड!
आणि तुम्ही भजनम् नाम रसनम् च्या आहारी जाता तेंव्हा नामप्रेमाचं चैतन्य ओतलेल्या मंदिरातील मुर्तीरुपी दगड!
असो!
तर, विषय कवी आणि भक्तकवी हे बाह्यांगाने कवीच. पण,
*ताकही पांढरे दूधही पांढरे ।*
*चवीं जेवणारें जाणीजे ते ।*
असं समर्थ म्हणतात!
विषय काव्य करणारा कवी भगवद्प्रेमाच्या बाबतीत मठ्ठ म्हणजे ठोंब्या असतो. एखादं डुक्कर गटारात बसलेलं असतं तसं! त्याला त्या डुंबण्यात कोण आनंद मिळत असतो!
परंतु, भक्ती-प्रेमाचं शब्दांत प्रगटीकरण करणारा कवी हा खऱ्या अर्थानें आनंदाचें डोही तन, मन, जीव, प्राण एकत्र करून डुंबत असतो.
मग तो ठोंब्या कसा?
तर भक्त कवी हा भगवंताच्या लीलाचरित्रांत आकंठ बुडालेला असल्यानें विषयविकारांच्या बाबतीत तो पूर्ण उदासिन बनतो. उदासिन म्हणजे मठ्ठ म्हणजेच विषयसुखाबाबत ठोंब्या!
असा कवी हा सर्व भक्तांचं भूषण असतो, कारण तो विषयाचं खंडण असतो, वैराग्याचं संरक्षण असतो! असा हा मनुष्य देहातील कवी म्हणजे विवेकनिधीचं कोठार, उत्कट, निर्लेप प्रेमाचं भांडार असल्यानें जड जगाच्या दृष्टीने ठोंब्या असतो!
आपल्याला कोणत्या प्रकारचा दगड आणि ठोंब्या बनायचं हे ज्याचं त्यानें ठरवावं!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment