Wednesday, December 20, 2017

खरं सावित्री व्रत

" नामप्रेमचिंतन "  🌹🌷🌹

शंका- आपल्या पूर्वीच्या संतमंडळींच्या पत्नीने सुद्धा सावित्री व्रत केले. मग त्या व्रताच्या नियमा प्रमाणे ही संत मंडळी पुन्हा जन्म घेतात का जरी मोक्ष पद मिळाले असले तरी? जरा विचित्र प्रश्न आहे स्पष्ट करून सांगता का?


श्रीराम! मोक्ष म्हणजे मृत्युनंतर पुन्हा जन्म नाही असं नसून मोक्ष म्हणजे जिवंतपणी विषयविकारांवर मिळवलेला विजय! आणि विषयविकारांवर पूर्णपणे विजय मिळवण्यासाठी निर्विषयी, निर्विकार भगवंताचें अखंडानुसंधान जरूर आहे. या अखंडानुसंधानालाच नामस्मरण असं म्हणतात. तेंव्हा, नामस्मरण म्हणजेच मोक्ष!

आणि संतसत्पुरूष हे नामस्मरणाच्या बाबतीत पूर्ण तृप्त कधीच होत नसल्यानें त्यांना जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे। त्यांची ही वासना म्हणजे नामस्मरणाची सद्वासना होय!

तेंव्हा, संतमंडळींच्या जन्माचं कारण त्यांच्या पत्नीनें केलेले सावित्री व्रत यापेक्षा या संतांनी आजन्म पाळलेलं नामप्रेमाचं व्रत हे असावं! मग, त्यांच्या पत्नीच्या सावित्री व्रताचं काही महत्व नाही का? तर आहे!

संतमंडळी वैकुंठगमन सही करण्यासाठी करतात. आणि कपडे बदलून वेगळ्या वेषात पुन्हा नाम आणि प्रेम वाटायला पृथ्वीवर येतात! आणि तसंही खरं वैकुंठ इथेच आहे, कारण नारायणाचं वास्तव्य तुमच्या आमच्या ह्रदयामंदी।

आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी।
जेंव्हा नव्हते चराचर, तेंव्हा होते पंढरपूर।

एखादी विवाहिता जेंव्हा सावित्री व्रत करून हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा, अशी कामना करते तेंव्हा ती कामना सात्विक असते. यांत संशय नाही. परंतु, केवळ कामना सात्विक असणं पुरेसं नाही; त्या पातिव्रत्याचं आचरण जर तिच्याकडून घडलं, तरच मनोकामना पूर्ण होईल! आणि पातिव्रत्याच्या आचरणांत सर्वांत महत्त्वाचं सूत्र म्हणजे पतीला पतनापासून जी वाचवते, ती पत्नी! पतनात् पाती इति पत्नि! हे पतन शारिरिक, मानसिक आणि अध्यात्मिक तिन्ही स्तरावरचं टाळण्याचं आचरण हाच पत्नीचा धर्म आणि हेच खरं सावित्री व्रत!


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

No comments:

Post a Comment