Wednesday, December 13, 2017

पुण्यपर्वकाळात गुलाल उधळण्यामागचं कारण काय?

"नामप्रेमचिंतन" 

दादा, गुलाल उधळणे मागील शास्त्रीय किंवा आध्यत्मिक कारण सांगू शकाल काय ?? 🙏🙏
🌹🌿🌹 *"पुण्यपर्वकाळ"* 🌹🌿🌹
श्रीराम!
परब्रम्ह परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. परंतु, जेंव्हा तो आपल्यातून विश्वनिर्मिती करतो, तेंव्हा या विश्वात तो चैतन्यरूपाने वास करतो. त्यामुळे विश्वातील प्रत्येक चेतन वस्तुत तर तो परमात्मा असतोच. पण बाह्यांगाने अचेतन, जड वाटणाऱ्या वस्तूंमध्ये देखील ते ब्रम्हतत्व अशरीरी सुप्तरूपाने वास करत असते. डोंगर, दगड यातील चैतन्य आपल्याला जाणवत नाही. त्यापेक्षा वरच्या पातळीवर वृक्ष, वेली यांच्यातील चैतन्य असते. त्यांच्यापेक्षा वरच्या पातळीवर मनुष्येतर प्राण्यांमधील चेतना आणि या प्राण्यांपेक्षा वरच्या पातळीवर मनुष्यातील चेतना अधिक जागृत असते. चेतन नरदेहात पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, पंच विषय इ. विषमावस्थेत असतात. यांची साम्यावस्था करणे म्हणजे बद्धाचा सिद्ध होणे. त्यातल्या त्यात तामसिक अंगाला म्हणजे पंचविषयाला सात्विक आणि पावित्र्य बनवणे, ही विशेष सिद्धावस्था होय. ही विशेष सिद्धावस्था ज्याने गाठली त्याला संत, सत्पुरुष असे म्हणतात.
बद्ध माणसाचा वाढदिवस श्राद्ध महत्वाचा असतो. भगवंताचा जन्मोत्सव श्रेष्ठ असतो, तर संतांचा पुण्यतिथी उत्सव श्रेष्ठतम असतो. नरदेहाची इतिकर्तव्यता भगवद्प्राप्ती ही नसून भगवद्प्रेमप्राप्ती ही असते. या प्रेमाचा अनुभव हा द्वैतातून अनुभवता येतो. त्यामुळे ज्याला प्रेमरसाची अनुभूती घ्यायची आहे, त्याला नरदेह धारण करून आपल्यातील परमात्मशक्ती जागृत करून निष्काम भक्तीच्या शिखरावर पोचावे लागते. तिथे पोचल्यानंतर हा महात्मा उर्वरित आयुष्य नारदमहर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘प्रेमैव कार्यं, प्रेमैव कार्यं’ म्हणजे प्रेमच करावे, प्रेमच करावे असे जगत असतो. प्रेम हे नामाशी संलग्न असल्याने जिथे नाम आणि प्रेम आहे त्या देहाला परमप्रेमरुपी नामावतार असे म्हणतात. असा प्रेमसागर नामावतारी भगवद्स्वरूप नरोत्तम म्हणजे सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज!
त्यांच्या लौकिक देहकार्य संपवून सर्वव्यापक अलौकिक कार्याला प्रारंभ करण्याचा पर्वकाळ म्हणजे उद्याची पुण्यतिथी! ही पुण्यतिथी आपण गुलालपुष्प उधळून नामाच्या गजरात साजरी करतो!
तुमचा आमचा मृत्यू अकस्मात होत असतो, परंतु, परब्रम्हस्वरूप महात्म्यांना काळ निर्देश अगोदरच मिळत असतो, किंबहुना प्रेमस्वरूप महात्मे स्वेच्छेने काळाला तसा निर्देश करतात. महात्मा पुण्यतिथीला देहाची लौकिक मर्यादा सोडून अलौकिक सर्वव्यापक तत्वाने जगत्कार्य करण्यासाठी सज्ज होतात.
*पुण्यतिथी हे पूर्ण प्रेममय जीवन होण्याचा पर्वकाळ! पूर्णकृपा होण्याचा पावनकाळ म्हणजे पुण्यतिथी!*
*श्रीमहाराजांच्या समग्र नाम-प्रेम उर्जेच्या वर्षावाचा पवित्रतम क्षण म्हणजे पुण्यतिथी!*
या पर्वकाळात आपण गुलालपुष्प उधळतो, ती उधळण आपल्यातील तामसिक वृत्तींना समर्पित करण्यासाठी असते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचतन्मात्रा जेंव्हा पंचमहाभूताशी जोडल्या जातात तेंव्हा तामसिक वृत्ती तयार होते. या तामसिक वृत्तींना इतर वेळी जे विषयाशी जोडले जाते, ते या पुण्यतिथी पावन पर्वकाळात विश्वात्म्याशी जोडण्याचा सुमुहूर्त घेऊन येते. गुलाल रंग आहे, गंध आहे, पुष्प हे रूप आहे, रस आहे, त्याचा स्पर्श जाणवतो. हे सर्व परब्रम्हस्वरूप सद्गुरूंना समर्पित करण्याची नामी संधी म्हणजे पुण्यतिथी!
गुलाल उधळण्याचे दुसरे मर्म म्हणजे गुलालातून पृथ्वी आणि आप तत्वाची तरंग प्रक्षेपित होत असतात. या गुलालाच्या उधळणीतून कारणदेहाच्या सात्विक तरंगांना ग्रहण करण्याची देहाची क्षमता या पर्वकाळात प्रबळ होते. तामसिक वृत्तींना सात्विकतेत परावर्तीत करण्यासाठी पर्वकालातील सद्गुरूंचे परमात्मतेज विशेष सहाय्य करत असते. या पावन समयी, अंतःकरणापासून गुलालपुष्प उधळून आपण आपल्या देहाला सत्वशुद्धीकडे नेण्यासाठी हनुमान उडी मारू शकतो.
गुलालपुष्प उधळण्याचे तिसरे मर्म म्हणजे गुलाल आणि गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. जे सर्वभूतहिते रतः जीवन जगलेले सत्पुरुष आपल्या भक्तीच्या जोरावर प्रेमस्वरूप झालेले असतात, असे सर्वच भगवद्प्रेमी अशरीरी रूपाने भगवंताचे नाम आणि भगवंताचे प्रेम मुक्तहस्ते देण्यासाठी यावेळी सहर्ष सज्ज असतात. आपण गुलाल उधळताना सद्गुरूंना हृदयापासून साद दिली की त्यांच्याकडून प्रतिसाद म्हणून या कृपेचा वर्षाव होत असतो.
श्रीमहाराज समाधी स्वरूप होत असतांना या समाधीसुखापर्यंत ज्यांना ज्यांना पोचायचे आहे, त्यांना या पर्वकाळात समाधीचे साधन हृदयात उतरवण्यास मदत करतात. आणि समाधीसन्मुख होण्याचे हे साधन म्हणजे रामनाम! ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
*समाधीचे साधन | ते रामनाम चिंतन ||*
या रामनामाच्या चिंतनातूनच जन्मोजन्मीची चिंता, दुःख हरले जाते. *ध्यान लागले रामाचे | दुःख हरले जन्माचे |*
आपल्या सद्गुरूंच्या या दिव्यतम आणि कल्याणकारी कृपावर्षावाचा अनुभव घेण्यासाठी सात्विक बुद्धीने या पर्वकाळात आपण सर्वजण श्रीमहाराजांवर गुलालपुष्पांचा वर्षाव करूया. या निमित्ताने आपल्यातील तमोगुणी विचार गुरुचरणी समर्पित करून निष्काम कर्तव्याचा ध्यास आणि अखंड नामाचा अट्टाहास याचा संकल्प करूया, श्रीमहाराज आपल्या सर्वांना भरभरून नामप्रेम देतील!
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment