





*शंका*- मनाला विवेकाने वागायला सांगणे खूप अवघड आहे. द्वाड कार्ट आहे ते, काय करावं?

*श्रीराम!* मग आपणसुद्धा बदमाशी करावी..... आपल्याच मनाशी.
*ज्याने मन जिंकलं त्यानें जग जिंकलं, असं म्हणतात!*
ग्रीसचा अलेक्झांडर आपल्याला वाचून, ऐकून माहीत आहे. जग जिंकण्याची महत्वाकांक्षा होती त्याची! आणि त्यात जो जवळजवळ यशस्वी सुद्धा झाला. परंतु, जग जिंकण्याची मनिषा बाळगणारा मनाला जिंकू शकला नाही. मन जिंकू शकला नाही म्हणजे त्याचे मन कामवासना आणि अपेयपानच्या अधीन झालेलं होतं! या अलेक्झांडरचा गुरू म्हणजे अॅरिस्टॉटल! अॅरिस्टॉटल हा महान राजकिय विचारवंत आणि विवेकी मनुष्य! अॅरिस्टॉटलचा गुरू प्लेटो हा एक आदर्श विचारसरणी मांडणारा तत्वज्ञ! आणि प्लेटो चा गुरू म्हणजे सॉक्रेटिस!
आपल्याकडे शंकराचार्यांचं जे स्थान आहे, ते स्थान सॉक्रेटिस बद्दल ग्रीक लोकांच्या मनांत आहे! तेंव्हा, अलेक्झांडरला लाभलेली गुरूपरंपरा अतिशय महान होती. असं असुनसुद्घां अलेक्झांडरचा अंत अतिशय वाईट झाला. याचं कारण त्याचं मन तो जिंकू शकला नाही! जसे शरिराचे हात, पाय, कान, नाक हे अवयव आहेत, तसे मनाचे सुद्धा अवयव आहेत. ते नंतर कधीतरी सविस्तर बघुया!
खरंच काय सांगू! नाथांनी म्हंटलंय की या मनाला जिंकलं की चारी मुक्ती त्याच्या दासी होतात! जेंव्हा उर्वरित जग जिंकून भारताच्या दिशेने निघाला तेंव्हा अॅरिस्टॉटलने त्याला न जाण्यास सांगितलं. परंतु, राजाने त्याचं ऐकलं नाही आणि मनाप्रमाणे निघाला आणि शेवटी दुर्दैवी अंत झाला!
*बिनु सतसंग विवेक न होई ।* अलेक्झांडरने सतसंग सोडला, त्यामुळें विवेक गमावला. आणि मनाच्या अधीन झालेल्या एका जगजेत्त्या, ऐश्वर्यसंपन्न, सत्ताधिशाने आत्मघात ओढवून घेतला!
मनाला जिंकण्यासाठी दोन मार्गापैकी ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार योग्य तो मार्ग निवडावा.
१) विचार : वरील अलेक्झांडरच्या उदाहरणात तो मनाच्या अधीन झालेला होता. त्यामुळें, त्याच्या गुरुंनी त्याला योग्य विचार दिला होता. आणि मनाचं ऐकायचं की गुरूविचाराचं हे स्वातंत्र्य त्याला होतं. आणि नेमका तिथेच तो फेल गेल्याने सर्वनाश ओढवला. अलेक्झांडरचा भूतकाळ पापाचरणात गेला हे खरंय. परंतु, संतसंग आणि संतविचार लाभल्यावर त्यानुसार जर तो पुढे वागला असता तर त्याचं पापक्षालन झालं असतं.
याचं एक दुसरं उदाहरण म्हणजे वाल्या कोळी! वाल्या कोळीचादेखील भूतकाळ पापाचरणात गेला होता. परंतु, नारदासारख्या सद्गुरूंचा संतसंग आणि संतविचार लाभल्यावर त्यानुसार तो पुढे वागला आणि त्याचं पापक्षालन तर झालंच, पण संपुर्ण जगताला रामदर्शन घडवण्याचं अलौकिक कार्य या महर्षी वाल्मिकींनी रामायण रचून केलं!
तेंव्हा, जो विवेकविचार अलेक्झांडरला किंवा वाल्या कोळीला लाभला, तो आपल्याला सुद्धा आपले सद्गुरू वेगवेगळ्या माध्यमातून देत असतात. आपल्यासुद्धा जीवनात मोहाचे कितीतरी प्रसंग पदोपदी येतात. आणि मोहाच्या क्षणी विवेक विचार जर मनातील मोहभावनेवर वरचढ ठरला तर मनुष्य तरून जाईल; मात्र मन जर विचारावर वरचढ ठरलं तर मनुष्य बुडून जाईल. आपले मन अलेक्झांडरइतके कामवासना आणि अपेयपानच्या अधीन नसेल कदाचित. परंतु, पैसा, मानाची वासना आणि प्रपंचाची नशा ही काही कमी खतरनाक नाही. मी जर स्वतःला स.भ. किंवा साधक म्हणवत असेल तर मी गुरूविचाराचं माझ्या मनावर कोरायला नको का? माझ्या मनावर माझा ताबा नसेल तर गुरूंच्या विचाराकडे ते सोपवावं. आणि त्यासाठीच दोन दिवसांपुर्वी एक बोधवचन आपल्या सर्वांना पाठवलं होतं की, ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या करू नयें. म्हणजेच त्यावेळी गुरूविचाराचं स्मरण करावें!
तेंव्हा, मन ऐकत नसेल तर त्याला गुरूंच्या विचाराकडे म्हणजे उपदेशाकडे पाठवावं म्हणजे आपलं काम होईल. थोडा वेळ लागेल, पण वाल्याचा वाल्मिकी बनायला थोडा संयम आणि चिकाटी दाखवायला काय हरकत आहे? आणि मन आवरण्यासाठी एक श्रेष्ठ गुरूविचार आपण ध्यानांत ठेवुया: *मन जाता है तो जाने दे । मत जाने दे शरीर ।।*
२) भावना : अनेकदा मन आणि गुरूविचार यात द्वंद्व होत असतं. कारण, गुरूविचार मनांत येत असतांना त्याला वरचढ ठरण्यासाठी दुसऱ्या बाजुने तिव्रपणें मनाचं समर्थन करणारा एक अविचार येतो. आणि या विचार - अविचाराच्या लढाईत भोवताली विषयी वातावरणाचं प्राबल्य आणि आपल्या साधनेचा कमकुवतपणा असेल तर अविचार जिंकतो आणि मनुष्य बुडतो! ही लढाई खेळण्यात जर मी कमजोर असेल तर गनिमी कावा करावा....
गनिमी काव्यात अनेक प्रकारे लढता येतें. एकतर शत्रुचं खच्चिकरण करायचं किंवा त्याला आपल्याला सोयिस्कर जागेत आणून मग हल्ला करायचा किंवा त्याला भिती दाखवायची किंवा त्याचा म्होरक्या ताब्यात घ्यायचा. हे सगळं भावनिक तंत्र असल्यानें इथे भावना विचारापेक्षा बलवान असते! मन जर आपला शत्रु बनत असेल तर आपण भावनेनं ही वरची सगळी बदमाशी करावी!
मनाचं खच्चिकरण करायचं म्हणजे मनांत भगवद्भक्ती खच्चं भरायची! एखाद्या कोकणातील मुलाला बालपणापासून समुद्राचं, पाण्याचं, निसर्गाचं वेड लागलं की मोठेपणी त्याला त्यापासून दूर रहावंसं वाटत नाही. आपल्या मनात भगवंताचं प्रेम रुजवलं तर त्यात भक्तीप्रेमाचा खच पडेल! आणि मग ते मन कामापेक्षा रामांत रमेल!
दुसरा गनिमी कावा म्हणजे शत्रुला आपल्याला सोयिस्कर जागेत आणून मग त्याच्यावर हल्ला करायचा. यांत आपण आपल्या मनाला सोयिस्कर जागेत आणायचं म्हणजेच सत्संगात आणायचं आणि मग त्यावर भावनिक हल्ला करायचा. मनासगट देहाला सत्संगात नेता येत नसेल तर मनांतच सत्संग आणावा. आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे "मानसपुजा"!
तिसरा गनिमी कावा म्हणजे शत्रुला भिती दाखवायची! यांत आपण आपल्या मनाला विषयात रमल्याने काय होतं हे भावनिकरित्या सांगून भिती दाखवायची. मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥ असं सांगत रहावं!
*मना सांग पा रावणा काय झाले ।*
*अकस्मात ते सर्वे राज्ये बुडाले ।*
*म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी ।*
*बळे लागला काळ हा पाठी लागी ।।*
*अकस्मात ते सर्वे राज्ये बुडाले ।*
*म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी ।*
*बळे लागला काळ हा पाठी लागी ।।*
चौथा गनिमी कावा म्हणजे शत्रुचा म्होरक्या ताब्यात घ्यायचा. यांत मनरुपी शत्रुचा म्होरक्या ताब्यात घ्यायचा. मनाचा म्होरक्या म्हणजे इच्छा! त्याला आपण ताब्यात घेऊन भगवंताकडे सुपूर्द करावें. आणि म्होरक्या भगवंताकडे सुपूर्द झाला की मन ससैन्य शरणागती पत्करेल! आणि ही शरणागती म्हणजेच मनेच्छा संपून एकच सत्ता उरेल, रामेच्छा! रामेच्छा ही कल्याणकारी असल्यानें ती सर्वांचं कल्याणच करेल! तेंव्हा, हे कल्याण साधण्यासाठी मनाला विचार किंवा भावनेनं रामचरणी आणावं, रामकृपा सुलभ होईल!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


श्रीराम जयराम जय जय राम
ReplyDelete