Tuesday, December 26, 2017

जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा:- सत्ययुग सुरू होते आणि विष्णु चा दुसरा अवतार जन्म होता आणि राम हे 7 व्या अवतार कार्यातले (त्रेतायुगातले ) मग दुसऱ्या अवतारच्या वेळी रामाचा जप महादेवानी कसा केला ?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका- समुद्र-मंथन जेव्हा झाले तेव्हा विष प्राशन करणारे आपले देवाधीदेव होते आणि ऐकण्यात आणि वाचण्यात असे आहे म्हणून सत्य आहे असे वाटते कि महादेव ने रामाचा जप  करून विषाला गळ्यात नियंत्रित केले आणि नीलकंठ झालेत. परंतु प्रश्न असा आहे कि जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा:-
सत्ययुग सुरू होते आणि विष्णु चा दुसरा अवतार जन्म होता आणि राम हे 7 अवतार कार्यतले (त्रेतायुगातले ) मग दुसऱ्या अवतारच्या वेळी रामाचा जप महादेवानी  कसा केला  ?


श्रीराम!

।। राम जपे सदाशिव ।।

श्रीराम! परवा कौस्तुभनें एक मार्मिक शंका उपस्थित केली होती की, रामावतार हा त्रेतायुगांतील आहे. मग त्याअगोदर सत्ययुगात शिवानें हे नाम कसें कंठी धारण केले?

आपलं एक मत तयार झालं आहे की, ज्या राम नामस्मरणानें त्रिविध तापे जळून अखंड सुखाची प्राप्ती होते तो राम शब्द म्हणजे दशरथपुत्र, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून विष्णु भगवंताने घेतलेल्या मर्यादा पुरुषोत्तम अशा अवताराचे नाव!

वरील मत हे चुकीचं नाही, परंतु ते एकांगी आहे. भवसागर पार करून देणारा हा शब्दरुपी मंत्र त्रेतायुगातील विष्णुअवतारानंतर अस्तित्वात आला नसून "राम" हा शब्द अनादि आहे. त्रेतायुगात भगवंताने तो शब्द आपल्या मानवदेहाला जोडल्यानंतर तो मानवाला परिचित झाला इतकंच!

'राम' हा शब्द दशरथनंदन रामाच्या जन्माअगोदरही होता, याचं सर्वांना परिचित एक उदाहरण म्हणजे परशुराम! रामावताराच्या समकालीन परंतु अगोदरच पृथ्वीवर आलेला भगवंताचा आणखी एक अवतार म्हणजे परशुराम!  परशुराम म्हणजे ज्याच्या हातात परशु आहे, तो राम! परशु हे परशुराम नावातील विशेषण आहे, तर राम हे मूळ नाव. म्हणजे अनेक राम नावाच्या व्यक्तींपैकी ज्या रामाच्या हातात परशु आहे, तो परशुराम! यातून एक स्पष्ट संकेत मिळतो की 'राम' हा शब्द दशरथाला पुत्रप्राप्ती होण्याअगोदरचा आहे.

जसं द्वापारयुगातील विष्णुअवतारापूर्वी सुद्धा कृष्ण हा शब्द होताच. परंतु, तो भगवंताशी जोडला गेलेला नव्हता, वेगळ्या अर्थानें वापरला जात होता. त्याचप्रमाणे, राम हा शब्द अगोदर निराळ्या अर्थाने होता.

एक दोहा आपल्याला माहीतच आहे की,
राम राम तो सब कहे ठग ठाकूर और चोर ।
जिस नाम से प्रल्हाद तरे वह नाम कुछ ओर ।।

तसंच मला व्यक्तिशः असं वाटतं की,
राम राम तो सब कहे त्रेता, द्वापार, कली घोर ।
जिस नाम को शिव भजे, वह राम कुछ ओर ।।

शिवशंकर जे रामनाम सतत घेतात, ते वेगळं कसं...

समुद्रमंथन करतांना हलाहल विष पचवण्यासाठी महादेवाने कंठावर अनेक उपचार केले. सापाची त्वचा शीतल असते म्हणून नागाचा वेढा घेतला, भस्म थंड असतो म्हणून त्याचा लेप लावला, चंद्र मस्तकावर धारण केला. तरीही आग, दाह कमी होत नव्हता म्हणून "राम"नामाचे अखंड उच्चारण सुरु केले आणि नीलकंठ प्रचंड शीतल झाले. मग काही लोक अशीही शंका काढू शकतील की, जर राम, कृष्ण हे दोन्ही शब्द जर त्यावेळी अस्तित्वात होते तर शंकराने रामनामच का घेतले, कृष्ण-कृष्ण का नाही? तर इथे खरी मेख आहे.

एक गंमत सांगतो, खरंतर गंमत नाही, रहस्य!
रामनामाचा जप केवळ महेशच करत नसून ब्रम्हदेव व विष्णु देखील या मंत्राचं अखंड स्मरण करत असतात. कारण, विश्वनिर्मितीत तत्वमसि महावाक्याची मुख्य भूमिका होती. तत्वमसि हे अद्वैतसूत्र आहे. अद्वैत हे समाधीसुखाचं द्योतक आहे. समाधिसुख हे सर्व प्रकारच्या तापांना नष्ट करून शीतल समाधानाची अनुभूति देतं. या तत्वमसि चं सुक्ष्म रूप दोन प्रकारे आहे; उपनिषदानुसार ॐ हे एक सूक्ष्म रूप ज्याच्या उच्चारणातून विश्वनिर्मिती झाली. आणि तत्वमसिचे दूसरे रूप म्हणजे तत् असि त्वम्;
तत् साठी 'र', असि साठी आ (ा) आणि त्वम् साठी 'म' म्हणजे र+आ+म = राम!

या 'राम' शब्दाचा उच्चार म्हणजे अद्वैतस्वरूपाचे तत्वमसिचे उच्चारण जे समाधिसुख देणारे, परमशीतलता देणारे आहे. आणि ब्रम्हा, विष्णु व महेश हे सच्चिदानंद रूप आहेत म्हणजे ते सतत या महावाक्याचे स्मरण राखतात. कारण, हे स्मरणच विश्वकार्य सुरळीत ठेवते. आणि म्हणूनच तेच तत्वमसि महावाक्य 'राम'रूपानें कंठी धारण केलं तर हलाहल विषाचं ताप नष्ठ होईल हा विचार भगवान महेशांना सुचला. आणि त्याचा परिणाम म्हणून भजन करी महादेव ।।

या 'राम'नामाचें चार आयाम उद्या बघुया... आजचं आतापर्यंतचं चिंतन अगोदर अंतःकरणात साठवू!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 

No comments:

Post a Comment