Monday, December 18, 2017

विसरू कसा मी गुरुपादुकांला ||... यावर चिंतन

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹

*शंका*- अनंत माझे अपराध कोटी | नाणी मनी घालूनी सर्व पोटी |
प्रबोध करिता श्रम फार झाला | विसरू कसा मी गुरुपादुकांला ||
काही मला सेवनही न झाले | तथापि तेणे मज उद्धरिले |
आता तरी अर्पिन प्राण त्याला | विसरू कसा मी गुरुपादुकांला ||
यावर चिंतन मांडावे ही विनंती!

*श्रीराम!*
अनंत माझे अपराध कोटी । ध्यानीं मनीं घालूनी सर्व पोटी ।
प्रबोध करिता श्रम फार झाला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ।।
अतिशय करूण अवस्था व्यक्त करणारा हा श्लोक आहे. वरील दोन्ही श्लोक वाचतांना मला समर्थांच्या करूणाष्टकांची तिव्र आठवण आली.
आपण एखादं भांडं घासायला तेंव्हाच घेतो, जेंव्हा ते खरकटं किंवा घाण झालं आहे याची जाणीव होते. त्याचप्रमाणें, मनुष्य अंतःकरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न तेंव्हाचं करतो, जेंव्हा माझ्या अंतःकरणात दोष आहेत, याची त्याला जाणीव होते. वरील श्लोकांत ही जाणीव तर प्रगट होतेच, पण त्याच बरोबर साधकाची अगतिकतादेखील व्यक्त होते.
आज अवगुण आणि दोषांनी मी भरलेला असुनही मला दुसऱ्यांचेच दोष दिसतात आणि एवढंच नाही तर स्वतःला निर्दोष व सद्गुणी सिद्ध करण्यासाठी आपण केलेल्या कर्माचं आपण false justification करत राहतो. यामुळें, स्वतःतील इतर दोषांसह अहंकारयुक्त आत्मस्तुती व द्वेषयुक्त परनिंदा या दोन दोषांना विशेष खतपाणी घातलं जातं. आणि हाच साधकाला भगवद्प्राप्तीपासून दूर करणारा सर्वांत मोठा अपराध आहे, असं मला वाटतं!
पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनाअगोदर वारकरी नामदेव पायरीचं दर्शन घेतात! त्याप्रमाणें भगवंताचें दर्शन नंतर; त्याअगोदर स्वदोषदर्शन! किंबहुना, स्वदोषदर्शन झाल्याशिवाय 'स्व'दर्शन म्हणजेच आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान केवळ अशक्य!
स्वदोषदर्शन ही पहिली पायरी. त्यानंतर दोषनिवारण होण्यासाठी ज्या अंतःकरणात दोष आहेत तिथे तळमळ लागून आर्त विनवणी येते.
*विनवणी आहे पायासी । गुरूवरा, सांभाळा मजसी ।।*
वरील श्लोकांत पहिली ओळ स्वदोषदर्शनाची आहे; तर दुसरी ओळ आर्त विनवणीची!
तळमळ हा परमार्थाचा प्राण आहे. या प्राणातूनच साधनेचा जन्म होतो. आणि परमात्मज्ञान होण्यासाठी साधक जे श्रम घेतो, ते देहाला कष्टवणारे नसून अंतःकरणाला सुखावणारे असतात. परमात्मज्ञान म्हणजे प्रबोध होण्यासाठी जे साधनेचे श्रम आहेत, तीच तीसरी पायरी! ही साधनेतील उपांत्य अवस्था वरील श्लोकांत तिसऱ्या ओळीत मांडली आहे! साधनेचे श्रम फलद्रुप झाले याची खूण कोणती? ती खूण म्हणजे
*आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ।*
*भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद।।*
या परमानंदाचा अनुभव मिळणें, हींच आत्मप्रचिती! अशी आत्मप्रचिती, असा ब्रम्हानंदाचा अनुभव मिळण्याचं त्रीभुवनातील एकमेव ठिकाण म्हणजे सद्गुरूचरण! ज्या चरणी पूर्ण समाधान आहे, त्यांना विसरणें केवळ अशक्य! आणि या दृढ निष्ठेतून त्या अनन्य भक्ताला वाटतं, विसरू कसा मी गुरूपादुकांना!!! अशाप्रकारे साधनेचे चार टप्पे वरील श्लोकांत चार ओळीत मांडले आहेत.
*अनंत माझे अपराध कोटी । - स्वदोषदर्शन*
*ध्यानीं मनीं घालूनी सर्व पोटी । - विनवणी*
*प्रबोध करिता श्रम फार झाला । - साधना*
*विसरू कसा मी गुरुपादुकांला ।। - शरणागती*
ही पूर्ण शरणागती आल्यानंतरची साधकाची अवस्था म्हणजे
काही मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरिलें ।
आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ।।
साधनोत्तर अवस्थेत साधक कृतज्ञतेचं जीवन जगत असतो. साधनेचे सर्व श्रम घेऊनही मनांत तिळमात्र अहंकार नसतो. उलट, समर्थांसारखा पोचलेला राम-दास सुद्धां म्हणतो की,
*नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही ।*
*नसे प्रेम हे राम विश्राम नाही ।*
*असा दीन अज्ञान मी दास तुझा ।*
समर्था जनी घेतला भार माझा ।।*
चिंतनातील पहिला श्लोक साधकाच्या मनातील अपराधीपणाची भावना दर्शवतो, तर दुसरा श्लोक सेवन म्हणजे सेवा न केल्याची विषण्णता दर्शवतो!
मी अपात्र असुनही भगवंतानें माझा उद्धार केला. कारण उद्धरून जाण्यासाठीची पात्रता माझ्यासारख्या अपात्र माणसांत आणली ती माझ्या सद्गुरूंनी! जो प्रपंच माझा जीव की प्राण बनला होता, तो प्रपंच आता मी सद्गुरूंना अर्पण करेल. आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरू कसा मी गुरूपादुकांना ।।
याठिकाणी प्राण हा शब्द व्यापक अर्थानें घ्यावा. एखाद्या व्यक्तीसाठी एखादा पदार्थ जीव की प्राण असतो, तर एखाद्यासाठी पैसा किंवा सत्ता किंवा प्रपंच म्हणजे त्याचा प्राण असतो. परंतु, मीपणामुळे त्यातून अखंड समाधान मिळत नाही. म्हणून आपला प्रपंच, नोकरी इ. त्याला अर्पण करावें. हे सर्व सद्गुरूंना अर्पण करणें म्हणजे प्रत्येक कर्माचं कर्तेपण भगवंताकडे देणें. आणि हेच साधण्यासाठी प्रत्येक कर्माला नामाची जोड द्यावी, म्हणजे सर्व सुफल होईल! तेंव्हा, "हातानें काम आणि मुखानें नाम" हेंच वरील दोन्ही श्लोकांचं सार मानून जीवन जगावं, त्यातूनच अंततोगत्वा समाधान मिळेल!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment