Thursday, December 28, 2017

शंका- श्रवण मननापेक्षाही श्रेष्ठ आहे! कसे?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- श्रवण मननापेक्षाही श्रेष्ठ आहे! कसे?

🌿🌿 !! श्रोते होई सावधान !! 🌿🌿

श्रीराम! ज्या परमसुखाच्या प्राप्तीसाठी दुर्लभम् मानुष देह मिळाला, तिथपर्यंत पोचण्यासाठी अध्यात्मशास्त्रानें नऊ प्रमुख मार्ग सांगितलें आहेत. त्यातील कोणता मार्ग चोखाळावा, हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. परंतु, या नऊ प्रशस्त मार्गांचं समर्थांनी प्रेरणा दिल्यानें आपल्या सर्वांना चिंतन घडत आहेत. त्यापैकी प्रथम सोपान म्हणजे श्रवण भक्ती!

इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला भगवंतानें भाषाशक्ती दिली आहे. याच शक्तीच्या जोरावर आपण अकल्पित प्रगती केली आहे. परंतु, एखादं लहान मूल बोलणं, लिहिणं, वाचणं नंतर शिकतं. अगोदर ते सर्वांचं बोलणं ऐकतं आणि केवळ ऐकत नाही तर समजून घेतं आणि मगच बोलू लागतं. व्यवहारात जसं ऐकणं हे बोलण्याचं, लिहिण्या-वाचण्याचं अधिष्ठान आहे, तसंच परमार्थात श्रवण हे संपूर्ण अध्यात्माचं अधिष्ठान आहे!

कसं बोलावं, कसं खावं, कसं वागावं हे वडिलधारी माणसं सांगतात आणि मूल ते ऐकून तसं जगू लागतं. या श्रवणात ऐकू येणें एवढा संकुचित अर्थ नाही. कानावर अनेक प्रकारचे आवाज, शब्द इ. आदळणें, हे ऐकू येणें झालं! ऐकण्यासाठी कान दिले आहेत. परंतु, जेंव्हा एखादी गोष्ट कानातून मनांत येऊन स्थिरावते, तेंव्हा श्रवण होतंय असं म्हणता येईल. तेंव्हा, ऐकण्यासाठी कान स्थूल अवयव जरूर आहे, परंतु श्रवणासाठी मन हाच सुक्ष्म अवयव जरूर आहे! हनुमंतानें रामरायानें काही न सांगता मनानें 'रामेच्छा' समजून घेऊन अनेकदा कार्य केलं. हे "श्रवण"! 

श्रवणाचा भाव जाणते जाणती ।
तिन्हीही प्रचीती ऐक्यरुप ॥
ऐक्यरुप देव भक्त नामांकित ।
अनन्या अनंत जैसा तैसा ॥
तैसा आहे लाभ श्रवणभक्तीचा ।
जेथे विभक्तीचा ठाव नाही ॥

श्रवण होण्यासाठी मनाला यंत्र बनवून ज्याच्या उपदेशाचं श्रवण करायचं आहे त्याला यंत्री मानणें जरूर आहे. "मी यंत्र, तू यंत्री" या अधिष्ठानावरील आचरण म्हणजे श्रवण! श्रवण कशाचं करावं हे समर्थांनी दासबोधातील श्रवण समासात खुप सविस्तर सांगितलं आहे. भक्ती, कर्म, ज्ञान, योग, उपासना, वेदांत, सिद्धांत, हरिकथा, नाना कला इ. सर्व ऐकावें असं म्हणून शेवटी मात्र समर्थांनी सांगितलं की,  
ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।।
असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ।।

भोजन करणे आणि भोजन पचणें यांत अंतर आहे. अन्न खाल्याचा विधी झाला, पण त्याचं रक्तात रूपांतर झालं नाही तर ते भोजन पचलं नाही. त्याचप्रमाणें, श्रवण करणे आणि श्रवण पचणें यांत अंतर आहे. त्यातही श्रवण पचणें ही अंतिम अवस्था आहे. आणि शेवटपर्यंत पोचण्यातच प्रवासाची सार्थकता आहे! आपण इतर श्रवण बाजुला ठेवून पारमार्थिक दृष्टीनें यांकडे बघुया. 

विषयी माणसांत अनेक पापं असतात, विकार असतात. काही विकार पारमार्थिक श्रवण करू देत नाहीत, काही विकार श्रवण झालं तरी ते कळू देत नाहीत, काही विकार श्रवण केलेलं मनाला पटू देत नाहीत, तर काही विकार पटलेलं आचरणात आणू देत नाहीत. तेंव्हा, श्रवण पचण्यासाठी अगोदर श्रवण करणे, नंतर ते कळणें, नंतर ते पटणे हे अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. श्रवण करण्यासाठी सावधानता हवी, श्रवण कळण्यासाठी शुद्ध बुद्धी हवी, श्रवण पटण्यासाठी श्रद्धा हवी, श्रवण पचण्यासाठी गुरूकृपा हवी!

सावधानता हा श्रवणाचा पाया आहे, असं मला वाटतं. बहुतेक सर्व अध्यात्मिक ग्रंथ, उपदेश, चिंतन इ.मध्ये सावधपणें श्रवण करण्याचं आवाहन करून मगच तो उपदेश दिलेला आहे. Hearing ही सहजक्रिया आहे, Listening ही स्वेच्छाक्रिया आहे. म्हणूनच Listen carefully असं म्हणतात.

सावधानता हा जसा श्रवणाचा पाया आहे, तसं श्रद्धा हे श्रवणाचं बळ आहे. तर 'स्व'ची प्राप्ती हे श्रवणाचं फळ आहे! श्रवणांत सावधानता असेल तर सर्व बोधामृत मिळेल. शिव भगवंताकडून हरिकथा श्रवण करतांना अचानक पार्वतीची सावधानता गेली, तीला झोप लागली. परिणामी, ती हरिकथामृताला मुकली. परंतु, एका पोपटानें पूर्ण सावधनेतेने श्रवण केलं आणि त्या कथामृतानें शुकमुनीच्या अवतारानें हीच भागवतकथा सर्व मानवजातीला श्रवणासाठी उपलब्ध झाली. 

सावधानतेप्रमाणें श्रद्धाबळ अतिशय महत्त्वाचे आहे. श्रवण कसं करावं याचा आदर्श कल्याण स्वामी! समर्थांनी अंबाजीला झाडीची फांदी उलट्या बाजुला बसून तोडायला सांगितली. त्यामुळे, मी विहीरीत पडेल, पोहता येत नसल्यानें बुडून मरेल ही शंका त्याच्या मनांत आली नाही. समर्थांनी सांगितलं ते ऐकणं या श्रद्धेनें वागणारा अंबाजी समर्थांनी "कल्याण" करून टाकला. तेंव्हा, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर श्रद्धा दृढ असावी.

श्रद्धा असेल तर कुठुनही उपदेश मिळेल. तो उपदेश भगवंत एखाद्या संतांच्या मुखातून देईल, एखाद्या सामान्य प्रापंचिक माणसाच्या मुखातून देईल, रावणासारख्या पापाचरण करणाऱ्या दानवाकडून (लक्ष्मणाला) उपदेश येईल, ग्रंथातून किंवा रेड्यासारख्या प्राण्याच्या मुखातून देईल किंवा अगदी अचेतन वस्तू देखील तुम्हाला उपदेश देईल. 

बस्स! श्रवण करण्यासाठी सावधानता आणि तसं वागण्यासाठी श्रद्धा हवी. दाही दिशांतून श्रवण करता येईल!


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 !! जानकी जीवन स्मरण जय जय राम !! 🙏

1 comment: