Monday, December 18, 2017

"चित्त ब्रम्ह आहे, असं ध्यान करणे" म्हणजे काय?

 🌹🌷🌹*" नामप्रेमचिंतन "* 🌹🌷🌹

*शंका*- खुप मार्गदर्शक सांगितलय गुरुदेवांनी (गुरुदेव रानडे), की, 'चित्त ब्रह्म आहे असे जो ध्यान करतो तो चित्ताच्या ताब्यातील सर्व प्रदेशाचा अधिपती व राजा होतो.' यावर आपण चिंतन मांडून उद्बोधन करावे ही विनंती.

*श्रीराम!* मनुष्याचे जसे स्थुल अवयव आहेत, तसें सुक्ष्म अवयव देखील आहेत. किंबहुना, सुक्ष्म अवयवांच्या दिग्दर्शनानेंच स्थुल अवयव कर्म करत असतात. हे सुक्ष्म अवयव अंतरंगाचे असून त्यात चार स्तर, विभाग किंवा टप्पे आहेत. मन हा सर्वांत वरचा सुक्ष्म स्तर. त्यापेक्षा बुद्धी सुक्ष्म. बुद्धीपेक्षा चित्त सुक्ष्म. आणि चित्तापेक्षा अहंकार सुक्ष्म! अहंकार किंवा मीपणा हा वासनामय असतो. आणि याच वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो यांवर आपण परवाच चिंतन केलं. या वासनेचे तरंग म्हणजे वृत्ती! आणि ही वृती (वासनेचे तरंग) ज्याठिकाणी निर्माण होतात, ती जागा म्हणजे चित्त!
गुरूदेव जेंव्हा 'चित्त ब्रम्ह मानून ध्यान करा" असं सुचवतात, तेंव्हा चित्तात निर्माण होणारी प्रत्येक वृत्ती (प्रत्येक वासनातरंग) ब्रम्हमय करण्याचा संकेत देत असावें! कामाची वासना जाऊन रामाची वासना उरली की नामाची वृत्ती उठतें! यालाच नामस्मरण असं म्हणतात, असं मला वाटतं! *जहॉ राम तहॉ काम नही, जहॉ काम नही राम।।*
पतंजलींच्या योगसूत्रानुसार विषयवासनेतून निर्माण झालेल्या वृत्तींना प्रतिबंध करून चित्त परमात्म्याच्या ठिकाणी स्थीर करणें हा योग आहे, असं म्हंटलं आहे. पतंजलींचा योगमार्ग नेहमी विषयभोग भोगणाऱ्या प्रापंचिकांना साधणे जर कठीण जात असेल तर त्यांनी दुसरा स्वतःला सोयिस्कर मार्ग निवडावा! या दुसऱ्या मार्गात चित्तात जन्मोजन्मीची जी वासनामय घाण साठलेली आहे ती काढता येत नसेल तर त्यात सतत अखंड नाम ओतत रहावें! (हौदाचं उदाहरण आपण बघितलं आहे!)
यासंदर्भात एकनाथ महाराजांनी फार छान सांगितलं आहे. नाथ म्हणतात, आज चित्तात वासनेच्याच वृत्ती आहेत ना! त्यांच्याशी झटापट करतांना चित्ताच्या वरचा स्तर बुद्धी (विवेक) याची मदत घेऊन सदाचरण राखावं! परंतु, त्याचबरोबर चित्तांत भगवंताचं स्मरण सदा राखावं. नाथांनी म्हंटलेलं हे 'चित्तांत भगवंताचं स्मरण राखणें' म्हणजेच *गुरूदेवांनी सांगितलेलं 'चित्त ब्रम्ह असल्याचं ध्यान करणें' म्हणजेच श्रीमहाराजांचं 'जयानें सदा वास नामांत केला'!* सर्वांनी एकच सांगितलं आहे, पद्धत निराळी!
नाथ पुढे म्हणतात, एकदां का चित्तात नाम येऊ लागलं की, चित्तातील नको त्या वृत्तींची निवृत्ती होईल! आणि विषयवृत्तींची निवृत्ती झाली की चित्तांत उठणारी प्रत्येक वृत्ती ही नामाचीच उठेल! आणि शेवटी हे नाम चित्तात पूर्णपणे स्थीर झालं की विषयवृत्तीची जी निवृत्ती झाली आणि नामवृत्ती निर्माण झाली ती सुद्धां जाऊन निर्वृत्ती अवस्था येईल! आणि यालाच अद्वैतावस्था म्हणतात!
*वृत्ती - निवृत्ती - निर्वृत्ती!* शेवटी, 'चित्त ब्रह्म (भगवन्मय) आहे असे जो ध्यान करतो तो चित्ताच्या ताब्यातील सर्व विकारी प्रदेशाचा अधिपती व राजा (समाधानाचा स्वामी) होतो.'
चित्तांत ब्रम्ह धारण करण्यासाठी धारणशक्ती प्राप्त व्हावीं लागतें. ही धारणशक्ती प्राप्त करण्यासाठी अगोदर ग्रहणशक्ती वाढली पाहिजे, नंतर पचनशक्ती वाढली पाहिजे.
*नाम घेणें म्हणजे ग्रहणशक्ती!*
*नामात रमणें म्हणजे पचनशक्ती!*
*चित्तांत नाम स्थीर होणें म्हणजे धारणशक्ती!*
नाथांना कृष्ण जवळचा! तेंव्हा, त्यांच्या चित्तांत कान्हाची वृत्ती स्थीर झाल्यानें त्या अनुभुतीची अभिव्यक्ती नाथांनी ज्या शब्दांत केली, त्या रचना म्हणजे गवळणी! मी मराठी संतवाड़्मयाचा कॉलेजमध्ये अभ्यास करतांना एक आर्या माझ्या अंतःकरणात ठसली :
*अंगवक्र अधरी धरी पावा ।*
*गोपवेश हरी तोचि जपावा ।*
*वामबाहुवरी गालही डावा ।* *तो ठसा स्वह्रदयात ठसावा ।।*
भगवंताचा ठसा असा स्वह्रदयात ठसवणें म्हणजेच पु. गुरूदेव रानडेंना अपेक्षित "चित्त ब्रम्ह आहे, असं ध्यान करणें" असावं!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*
🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

No comments:

Post a Comment