





*शंका*- अनन्य भक्ताबद्दल परब्रह्म परमात्म्यालाही कसे तितकेच प्रेम वाटते, हे स्पष्ट करणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या भक्तियोगातील काही गोड ओव्या-
पैं गा भक्तासि माझे कोड| मज तयाचे अनन्यगतीची चाड| कां जे प्रेमळांचे सांकड| आमुचिया घरी||
पैं गा भक्तासि माझे कोड| मज तयाचे अनन्यगतीची चाड| कां जे प्रेमळांचे सांकड| आमुचिया घरी||
- ज्ञानेश्वरी भक्तियोग (अध्याय १२)
श्रीराम. दादा, ज्ञानेश्वरीतील या ओवीवर थोडं बोलावं!
🙏🏻
🙏🏻
🙏🏻




*श्रीराम!* ~ काय सांगू (अर्जुना), भक्ताला माझा जसा लळा असतो, तशीच त्याच्या अनन्यभक्तीची मला आवड असते! कारण काय?- तर, खरोखरीच्या प्रेमळ भक्तांचा आमच्याकडे तुटवडा आहे रे!
भक्तीप्रेमाचा अनुभव हा अनुभवण्यासाठीच असतो, शब्दात अभिव्यक्त करण्यासाठी नाही. तरिसुद्धां भक्ताला भक्तीच्या भक्तीपणाचा प्रथमस्पर्श होण्यासाठी त्या भक्तीप्रेमाला सुरूवातीच्या टप्प्यात शब्दात बद्ध करावं लागतं. जी भक्ती भक्ताला मुक्त करते तिला शब्दात बांधणं हे भक्तीचं अवमुल्यन ठरतं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मुळात भक्ती किंवा प्रेम हे चार स्तरावर असतं.
एक जीवाचं जीवावरचं प्रेम! दुसरं जीवाचं जगावरचं प्रेम! तिसरं जीवाचं जगदात्म्यावरचं प्रेम!
वरील तीनपैकी पहिलं प्रेम हे प्रेम नसून वासना असते. दुसरं प्रेम हे प्रेम नसून आसक्ती असते.
तिसरं प्रेम हे प्रेम नसून भक्ती असते. या तीन्ही प्रेमसदृश भावनेपेक्षा चौथं प्रेम हे खरं प्रेम असतं. हे प्रेम असतं भगवंताचं भक्तावरचं प्रेम!
जीवाचं जीवावर, जीवाचं जगतावरचं प्रेम हे लौकिकातलं आणि ससिम पातळीवरचं असतं. परंतु, जीवाचं जगदात्म्यावरचं आणि जगदात्म्याचं जीवावरचं प्रेम हे अलौकिक आणि असिम पातळीवरचं असतं! आपल्याला वाटेल की, जीव-जीव आणि जीव-जगत प्रेम हे वासना किंवा आसक्तीरूप अाहे, हे बरोबरच. परंतु, भक्ताचं भगवंतावरचं प्रेम हे प्रेम नसून भक्तीच असतं, हे कसं? भक्ती आणि प्रेम हे निराळं का? खरा भक्त भगवंताची जी भक्ती करतो ती अमर्यादच असते. परंतु त्यातही मला भगवंत हवा ही आस असते. किंवा भक्ताला भक्तीचं कारण विचारलं तर तो म्हणेल माझं भगवंतावर प्रेम आहे म्हणून मी भक्ती करतो. याचा अर्थ प्रेमापोटी जो व्यवहार केला जातो ती भक्ती!
एक सुक्ष्म फरक याठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा:
भक्त प्रेमापोटी भगवंताची भक्ती करतो. तर भगवंत भक्तीपोटी भक्तावर प्रेम करतो!
भक्त प्रेमापोटी भगवंताची भक्ती करतो. तर भगवंत भक्तीपोटी भक्तावर प्रेम करतो!
भक्ताच्या भक्तीतून भगवंताचा जन्म होतो! तर, भगवंताच्या प्रेमातून भक्ताचा जन्म होतो!
भक्ताला भक्तीसाठी भगवंताची जरूर नाही, ती भक्ती अभिव्यक्त झाली की भगवंताला जन्म घ्यावा लागतो.
भगवंत हा ज्ञानस्वरूप आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आणि "भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान"! हे वचन सुद्धां सत्य असल्यानें भक्तीतूनच ज्ञानस्वरूप भगवंत जन्मला हे सिद्ध होते! भगवंताच्या आपल्यावर असलेल्या निरपेक्ष प्रेमाची जाणीव झाली की आपण भक्ती करतो. आणि भक्ताची माझ्यावर असलेली भक्ती पाहून भगवंत आपलं सर्व प्रेम त्या अनन्य भक्तावर हातचं न राखता वाहवतो!
यासंदर्भात श्रीकृष्ण भगवंताचा एक प्रसंग या चिंतनाचा समारोप उद्या!
🙏

एक प्रसंग बघून हे कालचं थोडं क्लिष्ट वाटणारं चिंतन थांबवतो. श्रीकृष्ण युधिष्ठीर आणि बलराम दादाच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदरसदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती; त्याचप्रमाणें दुर्योधनानें आपल्या भावाचं, दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, श्रीकृष्णानें ते नाकारलं. शिवाय, युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेंव्हा दुर्योधनानें एक प्रयत्न म्हणून भगवंताला ५६ भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, तेसुद्धां गोविंदानें नाकारलं....
भगवंतानें भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक आहे. गोपाळ म्हंटले, "दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची तीन कारणे असू शकतात!" १) भाव २) अभाव ३) प्रभाव
१) अन्न देणाऱ्याचा प्रेमभाव
२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव
३) भुकेल्याच्या मनांत अन्नदात्याबद्दलचा प्रभाव
२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव
३) भुकेल्याच्या मनांत अन्नदात्याबद्दलचा प्रभाव
मुरारी म्हंटला, "दुर्योधना, तुझा जेवू घालण्यात प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिधा सोबत आणलेला असल्यानें माझ्याकडे अन्नाचा अभाव नाही. आणि तुझ्या दुराचरणामुळें माझ्या मनांत तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाही. मग तुझे हे ५७ भोग मी का स्विकारावें?" लहानपणी घरात भरपूर दुध, दही, लोणी असुनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आतासुद्धां सोबत शिधा असतांना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता.
तेंव्हा, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरूजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतु, दुराचारीचा पक्ष धरल्यानें कान्हानें त्यांचंसुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं! आणि मग भगवंतानें विचार केला की, भूक तर लागलीच आहे. आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत. परंतु, ब्रम्हज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एकजण या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर!
*मन करम वचन छांड चतुराई ।*
*तबहि कृपा करत रघुराई ।।*
*तबहि कृपा करत रघुराई ।।*
मग काय! भगवंत विना आमंत्रण या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतु, दैव म्हणा किंवा प्रारब्ध विदुरकाका बाहेर गेलेले होते. काकू घरी होत्या. आणि ज्या भगवंताची आतापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारांत उभा पाहून त्या मातेचा कंठ दाटून आला आणि रडतरडतच भगवंताला हाताला धरून बसवलं...
विदुराणी भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हंटली, "लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी-साखर काढून ठेवत होते, तू आलाच नाहीस. आता आलास, पण लोणी-साखर तयार नाही?"
आणि मग काय सांगू! या साध्वीनें आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजुला ठेवलेले केळीचे घड घेतले. आणि या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली आणि केळी बाजुला टाकू लागली.
थोड्या वेळानें जेंव्हा विदुर काका आले, तेंव्हा परब्रम्ह परमात्मा स्वतः अचानक घरी आलेली पाहून आता काकांनी अश्रुंनी श्रीचरणी अभिषेक घातला! नंतर त्यांनी भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसंतरी वाटलं. आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली. आणि काकांनी विचारलं, "हे गिरीधर, केळी गोड आहेत ना?"
एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुलनंदन म्हंटला, "काका, केळी फार गोड आहेत. परंतु, काकुच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणीच्या यशोदा मातेनें भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनानें!" आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रुंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान! विदुर काकांचं परमात्मज्ञान, विदुराणीची निर्लेप, निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम! या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं?
भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हे भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम! ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या, भगवंत आपल्या घरी यायला, आपल्या ह्रदयांत साठवायला वेळ नाही लागणार!
*("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*


No comments:
Post a Comment