*शंका*- काही साधक मला म्हणाले की नामात असताना अचानक खूप भरून येतं. कारण शोधायला गेलं तर काही सापडत नाही. याचं नेमकं कारण काय असावं यावर थोडं सांगावं ही विनंती!
🏻
➡
श्रीराम! नामांत असतांना भरून येण्याचं कारण शोधायला गेलं तर सापडत नाही, हे अगदी बरोबर आहे! जे नाहीच ते कितीही शोधलं तरी सापडणार नाही. नामानें अंतःकरण भरून येणं ही सहजस्थिती आहे. तो सहजयोग आहे.
आपण एखाद्याला विचारलं, "का झोपलात? थकलात का? की बरं नाही?" यांवर तो म्हणतो, "मी थकलो नाही आणि तब्येत सुद्धां चांगली आहे. सहज पडलोय, काही कारण नाहीये!" हे सहज झोपणं व्यवहारातलं झालं. पण अध्यात्मात जे सहज असतं, केवळ त्यालाच सहजयोग म्हणता येईल. नामांत सहजपणा आला की 'स्व'भाव जागृत होतो. 'स्व' म्हणजे ब्रम्ह! आणि निर्लेप, निराकार आनंद हा 'स्व'चा मूळ भाव आहे. हा आनंद अकारण असतो.
एखादं लहानसं लेकरू पाळण्यात गोड हसत असतं. त्या हसण्याचं काहीच कारण नसतं. हाच अकारण आनंद मोठेपणी केवळ भगवंताच्या स्मरणात व्यक्त होतो. मात्र मोठेपणी या आनंदाचं प्रगटीकरण हसण्यातून होत नसून डोळ्यांतील अश्रूंतून प्रगट होतो.
*कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे ।।*
जिथे कारण आहे, तिथे कारक असणारच. आणि जिथे कारण व कारक दोन्ही आहे, तिथे कर्म असणारच! हा प्रकृतीचा नियम आहे. खरं नामस्मरण या हे अकारण असतं, खऱ्या नामस्मरणांत 'मी कर्ता' हा भाव लोप पावतो म्हणजे कारक उरत नाही. आणि खऱ्या नामस्मरणांत कारण आणि कारक दोन्ही नसल्यानें नामस्मरण हे कर्म म्हणून उरत नाही. अशाप्रकारे नामस्मरण हे कारण, कारक व कर्म अशा प्रकृतीच्या नियमाच्या पलिकडचं असणारं असल्याने त्यातून येणारी अनुभुती (उदा. भरून येणं) ही प्रकृतीच्या पलिकडे म्हणजे परमात्मस्वरूपाशी एकाकार झालेली स्थिती असते. तेंव्हा अकारण परमात्म्याच्या या अनुभुतीचं कारण कसं असणार?
यावर आपण म्हणाल, ही जी अनुभूती आहे, ती जेव्हा नाम अकारण केवळ सद्गुरूंनी सांगितलं आहे म्हणून, त्यांच्या प्रेमाखातर घेतलं जातं तेव्हा येते, मग 'प्रेम' हे कारण नव्हे का? अर्थात निर्हेतुक सद्गुरू प्रेम!
सूर्य प्रकाश देतो असं आपण म्हणतो. पण तो प्रकाश देण्याचं काम करत नाही. तो प्रकाशच आहे. नुसतं असणें हा त्याचा 'स्व'भाव आहे. त्याच्यातून प्रकाशच बाहेर पडतो. त्याच्यातील प्रकाश संपणे म्हणजे त्याचं सूर्यपण म्हणजे अस्तित्व नाहिसं होणे! त्याचप्रमाणें, जो खऱ्या अर्थानें नामाला चिकटला, तो नाम घेतो असं नसून नामस्मरण हा त्याचा 'स्व'भाव बनतो. किंबहुना, त्याच्यातील नामस्मरण थांबणें म्हणजे त्याचं अस्तित्व नाहिसं होणे!
असा मनुष्य हा नामधारक किंवा नामसाधक नसून तो चालतंबोलतं 'नाम' बनतो! कारण त्याच्यातील निर्गुण, निराकार, सुप्त ब्रम्ह चेतन बनून वावरू लागतं. आणि या ब्रम्हाला चेतना आल्यानें त्या देहातील मन आनंदानें भरून येतं! यालाच संतमंडळी समाधीसुख म्हणतात! सतत नामांत राहून आपण या समाधीसुखाच्या जवळ जाण्याचा यत्न करूया, सद्गुरू नक्कीच यश देतील!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
Shri Ram
ReplyDelete