🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका- रामनाम सर्वव्यापक कसे आहे?
➡
श्रीराम! कालच्या चिंतनात शिव भगवंतानें घेतलेलें 'राम' नाम हे कुछ और होतं हे आपण बघितलं. परंतु, तेच नाम किती व्यापक आहे हे समजण्याचा आपण रामेच्छेनें अल्पसा प्रयत्न करूया....
या 'राम'नामाचें प्रमुख चार आयाम असतील, असं वाटतं. ते चार आयाम म्हणजे
एक राम घट-घट में लेटा ।
एक राम दशरथ का बेटा ।
एक राम का सकल पसारा ।
एक राम है सबसें न्यारा ।।
वरील चौपाईमधील पहिला राम म्हणजे प्रत्येक जीवातील तत्व (तत्वमसि). सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जे चैतन्य प्रत्येक जीवात टाकलं होतं. त्या चैतन्य तत्वाला 'राम' म्हणतात. यालाच घटाकाशातील राम म्हंटलं जातं! हलाहलचा घट प्राशन केल्यावर त्याचा विपरित परिणाम न व्हावा म्हणून शिव भगवंतानें याच घटाकाशातील 'राम'नामाचं स्मरण केलं असावं!
चौपाईमधील दुसरा 'राम' शब्द त्रेतयुगापासून आजतागायत सर्वसामान्य लोकांना परिचित झाला; तो म्हणजे रघुकुलातील दशरथ महाराजांचा ज्येष्ठ पुत्र जो विप्र, धेनू, सूर, संत हितासाठी भगवंतानें घेतलेला अवतार! घटाकाशातील 'राम'तत्व व्यापक होऊन अयोध्येच्या मठात प्रगट झालं. यालाच मठाकाशातील राम म्हंटलं जातं! जे 'राम'तत्व घटघटात लेटा म्हणजे निर्गुण निराकार सुप्त रुपात होतं, ते आता श्रीरामचंद्र रुपानें सगुणसाकार होऊन कौसल्येच्या मांडीवर डोलू लागलं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की, हलाहल प्राशन करतांना शंकरानें जे 'राम'नाम घेतलं ते कोरडं, निराकार तत्वाचं नाम होतं. तेच नाम सकारण होतं. विषप्रभाव नष्ट व्हावा हे कारण होतं. परंतु, त्रेतायुगांत जेंव्हा तेच निर्गुण निराकार 'राम'तत्व एका पुरूषोत्तम अवतारात पाहिलं, तेंव्हा महादेव त्या नामाच्या प्रेमांत आकंठ बुडालें. आणि तेंव्हापासूनचं त्यांचं 'राम'नामस्मरण हे अकारण होतं. कारण त्यात निव्वळ प्रेम होतं! भजन करी महादेव ।।
चौपाईमधील तिसरा सोपान म्हणजे म्हणजे राम हा सकल पसाऱ्यात दिसतो. केवळ चेतन वस्तू (सजिव) मध्येच नाही, तर अचेतन वस्तू (निर्जिव) मध्ये देखील 'राम'तत्व दिसू लागतं. घटाकाशातील 'राम' मठाकाशात येऊन गेल्यामुळे अधिक व्यापक बनला. यालाच अवकाशातील 'राम' म्हंटले जाते! मठाकाशात येऊन गेल्यामुळं व्यापक बनला म्हणजे? याचं कारण काय? घटाकाशातील 'राम'तत्व हे निर्गुण निराकार असल्याने त्याचं स्मरण ब्रम्हा, विष्णू, महेश म्हणजे अद्वैतवादीच करू शकत होते. पृथ्वीवर जीवशिव भेदानें म्हणजे द्वैतभावानें राहणाऱ्या मनुष्याला घटाकाशातील 'राम'तत्व समजणं, पटणं किंवा त्याचं स्मरण करणं कठीण होतं.
खरंतर जे मूळ तत्वमसि म्हणजे 'राम' शिवमध्ये आहे तेंच जीवामध्यें देखील असतंच. परंतु, ते डोळ्यांनी बघता न येणारं सुक्ष्म तत्व होतं. ते सुक्ष्म तत्व प्रत्येक जीवाला (घटाला) कळावं म्हणून त्याला जीवासमोर जीवासारखं प्रगट व्हावं लागलं. त्याला लौकिक दृष्टीकोनातून व्यापक व्हावं लागलं. आणि जेंव्हा ते घटाकाशातील 'राम'तत्व मठाकाशात आलं तेंव्हा त्याला विष्णू भगवंताचं अवतरण श्रीरामचंद्र म्हंटलं जाऊ लागलं! अशाप्रकारे, मठाकाशात येऊन गेल्यामुळे 'राम'तत्व किती व्यापक आहे, हे मानवाला कळलं!
चौपाईमध्यें शेवटी म्हंटलेला 'राम' हा सर्वोच्च कोटीचा आहे. कारण आता 'राम' तत्व घटाकाशात, मठाकाशात किंवा अवकाशात तर दिसतंच, पण ते त्याही पलिकडे अनुभवता येतं. साधनेचं पूर्णत्व तेंव्हाच म्हणता येईल जेंव्हा हाच 'राम' शब्द पृथ्वीच नाही तर अनंत कोटी ब्रम्हांड व्यापून उरेल. यालाच महाकाशातील 'राम' म्हंटले जाते! याला वरील चौपाईमध्यें सबसे न्यारा म्हंटलं आहे!
हे चारही राम जो अंतःकरणात साठवू शकेल त्याला परमसमाधी, परम विश्राम मिळेल! तुलसीदासानें रामरायाचं चरित्र पूर्ण लिहून झाल्यावर म्हंटलं, पायो परमविश्राम! आणि ज्याला असा सर्वांगानें राम मिळाला त्याला आराम मिळाला असं म्हणतात. आ म्हणजे सर्व बाजुनें आ-राम! यालाच वेदांतात समाधीसुख म्हंटले जाते!
या चारही लेव्हलवरून जेंव्हा 'राम'नाम घेतलं जाईल, तेंव्हाच तो जीव शिवपदाला पोचेल! आणि त्या शिवपदी पोचण्याची पहिली पायरी म्हणजे,
चालता बोलता धंदा करिता ।
खाता जेविता सुखी होता ।
नाना उपभोग भोगिता ।
नाम विसरूं नयें ।।
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


No comments:
Post a Comment