Thursday, December 21, 2017

समर्पणभाव म्हणजे काय?

🌹🌹🌹 " नामप्रेमचिंतन "  🌹🌹🌹

शंका - जप-तपे स्मरण रघुराई, यात समर्पणभाव आला पाहिजे ना?


श्रीराम! जपाबरोबर तप आलंच. किंबहुना जप हेच तप!

मौन हे वाणीचं तप आहे, असं आपण मानतो ते योग्य नाही. मौन हे वाणीचं तप नसून मनाचं तप आहे. आणि वाणीचं तप म्हणजे सत्यवचन! आणि त्रिभुवनात एकच सत्य आहे ते म्हणजे भगवंताचें स्मरण! त्या स्मरणाची खूण म्हणजे नाम! म्हणून नामजप हेच सत्यवचन म्हणजेच वाणीचं तप!

मला असं वाटतं की मानवी जीवनाच्या कृतकृत्यतेसाठी तीन तप महत्त्वाचे आहेत.... देहाचं तप : सदाचरण; मनाचं तप : मौनाचरण; वाणीचं तप : सत्यवचन (नामजपन)

क्रोध न छोड़ा झूठ न छोड़ा ।
सत्यवचन क्यों छोड दिया ।
नामजपन क्यो छोड दिया ।।

तप म्हणजे तापवणें! सोन्याची परिक्षा तापवून केली जाते. तापवल्यावर सोनं जसं उजळून निघतं, त्याचप्रमाणें देह, मन आणि वाणी तापवल्यावर तो मनुष्य उज्वल उज्वल बनतो! कालच्या 'कान्हा आन पडी मै तेरे द्वार' या अभंगातील 'माटी करो या स्वर्ण बना लो' या ओळीत समर्पणभाव आहे. सोनं जसं स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करून 'स्व'भाव सिद्ध करतो, त्याचप्रमाणें मनुष्यानें स्वतःला भगवंताच्या स्मरणाच्या अग्नीमध्ये समर्पित व्हावें, जेणेकरून विकार जळून निर्विकार भगवंताचशी एकरूप होता येईल! 'माटी करो या स्वर्ण बना लो' यात भक्तानें फारच छान खुबी दाखवली आहे. मला माती बनवलं किंवा सोनं बनवलं, दोन्हीमध्यें भक्ताच्या जीवनाची सार्थकता आहे.... ती सार्थकता कशी तर माटी आणि स्वर्ण हे दोन्ही दोन महान भगवद्भक्तांचे प्रतिक आहे....

अगोदर स्वर्ण बघुया.... रामावतारात दोन स्वर्ण आहेत: हनुमंत आणि सीतामाई! जशी सीतेची अग्नीपरिक्षा झाली, तशी हनुमंताची सुद्धां अग्नीपरिक्षा झाली. परंतु, दोघेही उजळून निघालें. या दोघांमध्ये हे सामर्थ्य येण्याचं कारण म्हणजे रामरायाच्या प्रती समर्पणभाव!

आणि माटीचं प्रतिक सांगण्यासाठी एक प्रसंग बघुया....
एकदा श्रीकृष्णाचं डोकं दुखत होतं. रुख्मिणीने सगळे उपाय केले. काही केल्या कमी होईना.... मग नारदमुनी आले आणि त्यांनी प्रयत्न केले तरी कमी होईना. मग त्यांनी भगवंताला विचारलं, आता तुम्हीच उपाय सांगा, तो आम्ही करतो! कान्हा म्हणाला, जर एखाद्या भक्ताच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लावली तर डोकं दुखायचं थांबेल! पण ती व्यक्ती मात्र नरकात जाईल! यावर नारदमुनींनी अनेकांना विचारलं, कुणी तयार होईना! यात रुख्मिणीनें सुद्धां नकार दिला. रुख्मिणीनें का नाही लावली स्वतःची चरणधूळ? तर, पत्नी असल्याची मर्यादा! नातं आडवं आलं!

म्हणून नारद मुनी गोकुळात जाऊन कान्हाबद्दल सांगू लागले, तेंव्हा गोपिकांची अवस्था दयनीय झाली. "कान्हा रुख्मिणीचा पती, तसा तो आमचा व आमच्या पतीचाही परमेश्वर आहे. आणि ज्या कान्हाला आपण लोण्यानं भरवलं त्याला आज आपल्या पायाच्या धुळीनं भरवायला आमचं मन होत नाहीये!" या ठिकाणी हे नातं आडवं आलं!

शेवटी, जेंव्हा नारद मुनींनी राधेला हे सांगितलं तेंव्हा तिने प्रश्न केला की कान्हाचं डोकेदुखी तुम्ही पाहीली तेंव्हा त्यावर औषध तिथेच होतं ना, इतके दूर का आलात? मुनी म्हंटले, कान्हाची एकही पत्नी धूळ द्यायला तयार नव्हती. राधा म्हंटली, त्यांच्याकडे जाण्याची गरजच नव्हती. तुम्ही सर्व श्रेष्ठ हरिभक्त आहात, मग तुम्हीच तुमचे चरणरज का नाही लावले? आता नारदाचं गर्वहरण झालं. माझ्यासारखा हरिभक्त कुणीही नाही, हा गर्व होता. माझी चरणरज लावली तर मी नारायणाचा भक्त नाही भगवंत ठरेल, मग आम्ही एकमेकांचे नक्की कोण, हे ठरवता येणार नाही, म्हणून नारदानें ते टाळलं.

प्रत्येकाचं कान्हाशी कोणतं ना कोणतं नातं आडवं आलं त्यामुळे चरणरज मिळेना. त्रिभुवनात एकच व्यक्ती अशी होती की जिचं कान्हाशी कोणतं नातं आहे हे त्या दोघांनासुद्धां सांगता येत नव्हतं! आणि ती व्यक्ती म्हणजे "राधा"! त्यामुळे नात्याची मर्यादा नसल्यानें निःसंकोचपणे राधेने आपली चरणरज दिली आणि कान्हाची लीला पूर्ण झाली! या प्रसंगातून राधा ही भक्त नसून ती स्वतःच भक्ती आहे, हे दिसून येतं!

'माटी करो या स्वर्ण बना लो' मधील माटी म्हणजे "राधा"! 'तन को मेरे चरणोंसें लगालो' हा समर्पणभाव जिथें आहे, तिथे आपल्या देहाची माटी म्हणजे राधा किंवा स्वर्ण म्हणजे हनुमंत किंवा सीता बनणं आहे! 'कान्हा आन पडी मै तेरे द्वार' या अभंगात तुला काय करायचं ते कर असं म्हणणाऱ्या भक्तानें कान्हाला दोनच पर्याय दिले आहेत, 'माटी करो या स्वर्ण बना लो'!

याचा अर्थ जो खरा अनन्य भक्त असतो तो एकीकडे म्हणतो की, भगवंता, तुला काय करायचं ते कर! पण खरं म्हणजे तो भक्त स्वतःला हवं तसंच भगवंताकडून करवून घेतो! आणि म्हणूनच भगवंतानें 'मी भक्ताच्या अधीन आहे' हे मान्य केलं आहे!

आपल्याला या पंगतीत बसायचं असेल तर देहाने सदाचरणाचं तप, मनानें मौनाचं तप तर वाणीनें नामाचं तप करावं! या तीन तपाची परिसिमा म्हणजे भक्त, भक्ती आणि भगवंत ही त्रिपुटी समाप्त होऊन सर्व एकाकार होऊन एकच तत्व उरतं आणि ते म्हणजे "प्रेम"! आपण मनापासून 'नाम' घेऊया, आज ना उद्या ते 'प्रेम' आपल्याला लाभेल!


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment