Friday, December 29, 2017

अनन्यता मज घडो स्वानंद रूपी... या श्लोकावर चिंतन - गोंदवले

श्रीराम! रामरायाच्या इच्छेने आणि सद्गुरूंच्या वरदहस्ताने परमपूज्य रामानंद महाराजांनी रचलेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवरच्या अष्टकातील पहिल्या श्लोकावर नुकतीच १० डिसेंबर २०१७ रोजी गोंदवल्यात चिंतन सेवा घडली. या श्लोकाचा अनुभव आपल्या सर्वांना सद्गुरू कृपेने यावा या हेतूने इथे देत आहे-


नामस्मरण आणि नामजप यांच्या व्याख्या काय?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- रघुवीर, आपल नामस्मरण कसे सुरू ? छान सुरू आहे. जप किती झाला? इतका झाला. नामस्मरण आणि जप यांची तूझ्या मते व्याख्या सांग.


श्रीराम! नामस्मरण ही स्थिती आहे; नामजप ही कृती आहे. 'नामस्मरण' या स्थितीपर्यंत पोचण्यासाठी घेतलेलं नाम म्हणजे 'नामजप'! नामाचं महात्म्य आत्मप्रचितीनें न जाणता घेतलेलं नाम हा नामजप! नाम व नामी अभिन्न आहेत, किंबहुना नामीपेक्षा 'नाम' श्रेष्ठ या दृढ निष्ठेनं आणि प्रेमभावानें घेतलेलं नाम हे नामस्मरण!

आपण घेत असलेल्या नामाची नोंद कोण ठेवतो, यावरून नामजप व नामस्मरण यात फरक दिसून येतो. आपण जी नोंद ठेवतो ती नामजपाची असतें; नामी (भगवंत) जी नोंद ठेवतो ती नामस्मरणाची असतें!

नामजप करावा लागतो; नामस्मरण होत असतं!
नामजपात सुक्ष्म 'मी' असतो; नामस्मरणात तो लय पावतो!

नामजप ही नामस्मरणाची शिडी आहे; तर नामोच्चारण ही त्या शिडीची पहिली पायरी!

"पुढे वैखरी राम आधी वदावा", असं समर्थांनी याकरताच म्हंटलं असावं की वैखरी नामोच्चारण आधी करावें; कारण तो पहिला सोपान आहे! नामजप नामस्मरणात रूपांतरीत झाला तरी नामधारकाला नामजपाची गोडी चाखाविसी वाटतें! "तुका म्हणें झाली अनावर वाचा" यांत तुकोबांनी हेंच दर्शवलं आहे! तुकोबांना जो नामाचा छंद लागला तोच रामानंद नामाच्या छंदानेंच पूर्ण होतो. म्हणूनच, सद्गुरू श्री रामानंदा, लावी मज नामाच्या छंदा । ही विनवणी वारंवार करावी!

एखादा साधक खरा नामाला चिकटला, याची खात्री पटली की भगवंत त्याला म्हणेन, "तु कर्तव्य सांभाळून नुसतं स्मरण ठेव. स्मरण असल्यावर एखाद्या दिवशी जप नाही झाला तर तुझ्यावरचं नाम मी घेईन!" यालाच "राम हमारा जप करें, हम बैठे आराम" असं म्हणतात!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, December 28, 2017

शंका- श्रवण मननापेक्षाही श्रेष्ठ आहे! कसे?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- श्रवण मननापेक्षाही श्रेष्ठ आहे! कसे?

🌿🌿 !! श्रोते होई सावधान !! 🌿🌿

श्रीराम! ज्या परमसुखाच्या प्राप्तीसाठी दुर्लभम् मानुष देह मिळाला, तिथपर्यंत पोचण्यासाठी अध्यात्मशास्त्रानें नऊ प्रमुख मार्ग सांगितलें आहेत. त्यातील कोणता मार्ग चोखाळावा, हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. परंतु, या नऊ प्रशस्त मार्गांचं समर्थांनी प्रेरणा दिल्यानें आपल्या सर्वांना चिंतन घडत आहेत. त्यापैकी प्रथम सोपान म्हणजे श्रवण भक्ती!

इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला भगवंतानें भाषाशक्ती दिली आहे. याच शक्तीच्या जोरावर आपण अकल्पित प्रगती केली आहे. परंतु, एखादं लहान मूल बोलणं, लिहिणं, वाचणं नंतर शिकतं. अगोदर ते सर्वांचं बोलणं ऐकतं आणि केवळ ऐकत नाही तर समजून घेतं आणि मगच बोलू लागतं. व्यवहारात जसं ऐकणं हे बोलण्याचं, लिहिण्या-वाचण्याचं अधिष्ठान आहे, तसंच परमार्थात श्रवण हे संपूर्ण अध्यात्माचं अधिष्ठान आहे!

कसं बोलावं, कसं खावं, कसं वागावं हे वडिलधारी माणसं सांगतात आणि मूल ते ऐकून तसं जगू लागतं. या श्रवणात ऐकू येणें एवढा संकुचित अर्थ नाही. कानावर अनेक प्रकारचे आवाज, शब्द इ. आदळणें, हे ऐकू येणें झालं! ऐकण्यासाठी कान दिले आहेत. परंतु, जेंव्हा एखादी गोष्ट कानातून मनांत येऊन स्थिरावते, तेंव्हा श्रवण होतंय असं म्हणता येईल. तेंव्हा, ऐकण्यासाठी कान स्थूल अवयव जरूर आहे, परंतु श्रवणासाठी मन हाच सुक्ष्म अवयव जरूर आहे! हनुमंतानें रामरायानें काही न सांगता मनानें 'रामेच्छा' समजून घेऊन अनेकदा कार्य केलं. हे "श्रवण"! 

श्रवणाचा भाव जाणते जाणती ।
तिन्हीही प्रचीती ऐक्यरुप ॥
ऐक्यरुप देव भक्त नामांकित ।
अनन्या अनंत जैसा तैसा ॥
तैसा आहे लाभ श्रवणभक्तीचा ।
जेथे विभक्तीचा ठाव नाही ॥

श्रवण होण्यासाठी मनाला यंत्र बनवून ज्याच्या उपदेशाचं श्रवण करायचं आहे त्याला यंत्री मानणें जरूर आहे. "मी यंत्र, तू यंत्री" या अधिष्ठानावरील आचरण म्हणजे श्रवण! श्रवण कशाचं करावं हे समर्थांनी दासबोधातील श्रवण समासात खुप सविस्तर सांगितलं आहे. भक्ती, कर्म, ज्ञान, योग, उपासना, वेदांत, सिद्धांत, हरिकथा, नाना कला इ. सर्व ऐकावें असं म्हणून शेवटी मात्र समर्थांनी सांगितलं की,  
ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।।
असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ।।

भोजन करणे आणि भोजन पचणें यांत अंतर आहे. अन्न खाल्याचा विधी झाला, पण त्याचं रक्तात रूपांतर झालं नाही तर ते भोजन पचलं नाही. त्याचप्रमाणें, श्रवण करणे आणि श्रवण पचणें यांत अंतर आहे. त्यातही श्रवण पचणें ही अंतिम अवस्था आहे. आणि शेवटपर्यंत पोचण्यातच प्रवासाची सार्थकता आहे! आपण इतर श्रवण बाजुला ठेवून पारमार्थिक दृष्टीनें यांकडे बघुया. 

विषयी माणसांत अनेक पापं असतात, विकार असतात. काही विकार पारमार्थिक श्रवण करू देत नाहीत, काही विकार श्रवण झालं तरी ते कळू देत नाहीत, काही विकार श्रवण केलेलं मनाला पटू देत नाहीत, तर काही विकार पटलेलं आचरणात आणू देत नाहीत. तेंव्हा, श्रवण पचण्यासाठी अगोदर श्रवण करणे, नंतर ते कळणें, नंतर ते पटणे हे अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. श्रवण करण्यासाठी सावधानता हवी, श्रवण कळण्यासाठी शुद्ध बुद्धी हवी, श्रवण पटण्यासाठी श्रद्धा हवी, श्रवण पचण्यासाठी गुरूकृपा हवी!

सावधानता हा श्रवणाचा पाया आहे, असं मला वाटतं. बहुतेक सर्व अध्यात्मिक ग्रंथ, उपदेश, चिंतन इ.मध्ये सावधपणें श्रवण करण्याचं आवाहन करून मगच तो उपदेश दिलेला आहे. Hearing ही सहजक्रिया आहे, Listening ही स्वेच्छाक्रिया आहे. म्हणूनच Listen carefully असं म्हणतात.

सावधानता हा जसा श्रवणाचा पाया आहे, तसं श्रद्धा हे श्रवणाचं बळ आहे. तर 'स्व'ची प्राप्ती हे श्रवणाचं फळ आहे! श्रवणांत सावधानता असेल तर सर्व बोधामृत मिळेल. शिव भगवंताकडून हरिकथा श्रवण करतांना अचानक पार्वतीची सावधानता गेली, तीला झोप लागली. परिणामी, ती हरिकथामृताला मुकली. परंतु, एका पोपटानें पूर्ण सावधनेतेने श्रवण केलं आणि त्या कथामृतानें शुकमुनीच्या अवतारानें हीच भागवतकथा सर्व मानवजातीला श्रवणासाठी उपलब्ध झाली. 

सावधानतेप्रमाणें श्रद्धाबळ अतिशय महत्त्वाचे आहे. श्रवण कसं करावं याचा आदर्श कल्याण स्वामी! समर्थांनी अंबाजीला झाडीची फांदी उलट्या बाजुला बसून तोडायला सांगितली. त्यामुळे, मी विहीरीत पडेल, पोहता येत नसल्यानें बुडून मरेल ही शंका त्याच्या मनांत आली नाही. समर्थांनी सांगितलं ते ऐकणं या श्रद्धेनें वागणारा अंबाजी समर्थांनी "कल्याण" करून टाकला. तेंव्हा, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर श्रद्धा दृढ असावी.

श्रद्धा असेल तर कुठुनही उपदेश मिळेल. तो उपदेश भगवंत एखाद्या संतांच्या मुखातून देईल, एखाद्या सामान्य प्रापंचिक माणसाच्या मुखातून देईल, रावणासारख्या पापाचरण करणाऱ्या दानवाकडून (लक्ष्मणाला) उपदेश येईल, ग्रंथातून किंवा रेड्यासारख्या प्राण्याच्या मुखातून देईल किंवा अगदी अचेतन वस्तू देखील तुम्हाला उपदेश देईल. 

बस्स! श्रवण करण्यासाठी सावधानता आणि तसं वागण्यासाठी श्रद्धा हवी. दाही दिशांतून श्रवण करता येईल!


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 !! जानकी जीवन स्मरण जय जय राम !! 🙏

Wednesday, December 27, 2017

रामनाम सर्वव्यापक कसे आहे?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- रामनाम सर्वव्यापक कसे आहे?


श्रीराम! कालच्या चिंतनात शिव भगवंतानें घेतलेलें 'राम' नाम हे कुछ और होतं हे आपण बघितलं. परंतु, तेच नाम किती व्यापक आहे हे समजण्याचा आपण रामेच्छेनें अल्पसा प्रयत्न करूया....
या 'राम'नामाचें प्रमुख चार आयाम असतील, असं वाटतं. ते चार आयाम म्हणजे
एक राम घट-घट में लेटा ।
एक राम दशरथ का बेटा ।
एक राम का सकल पसारा ।
एक राम है सबसें न्यारा ।।

वरील चौपाईमधील पहिला राम म्हणजे प्रत्येक जीवातील तत्व (तत्वमसि). सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जे चैतन्य प्रत्येक जीवात टाकलं होतं. त्या चैतन्य तत्वाला 'राम' म्हणतात. यालाच घटाकाशातील राम म्हंटलं जातं!  हलाहलचा घट प्राशन केल्यावर त्याचा विपरित परिणाम न व्हावा म्हणून शिव भगवंतानें याच घटाकाशातील 'राम'नामाचं स्मरण केलं असावं!

चौपाईमधील दुसरा 'राम' शब्द त्रेतयुगापासून आजतागायत सर्वसामान्य लोकांना परिचित झाला; तो म्हणजे रघुकुलातील दशरथ महाराजांचा ज्येष्ठ पुत्र जो विप्र, धेनू, सूर, संत हितासाठी भगवंतानें घेतलेला अवतार! घटाकाशातील 'राम'तत्व व्यापक होऊन अयोध्येच्या मठात प्रगट झालं. यालाच मठाकाशातील राम म्हंटलं जातं! जे 'राम'तत्व घटघटात लेटा म्हणजे निर्गुण निराकार सुप्त रुपात होतं, ते आता श्रीरामचंद्र रुपानें सगुणसाकार होऊन कौसल्येच्या मांडीवर डोलू लागलं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की, हलाहल प्राशन करतांना शंकरानें जे 'राम'नाम घेतलं ते कोरडं, निराकार तत्वाचं नाम होतं. तेच नाम सकारण होतं. विषप्रभाव नष्ट व्हावा हे कारण होतं. परंतु, त्रेतायुगांत जेंव्हा तेच निर्गुण निराकार 'राम'तत्व एका पुरूषोत्तम अवतारात पाहिलं, तेंव्हा महादेव त्या नामाच्या प्रेमांत आकंठ बुडालें. आणि तेंव्हापासूनचं त्यांचं 'राम'नामस्मरण हे अकारण होतं. कारण त्यात निव्वळ प्रेम होतं! भजन करी महादेव ।।

चौपाईमधील तिसरा सोपान म्हणजे  म्हणजे राम हा सकल पसाऱ्यात दिसतो. केवळ चेतन वस्तू (सजिव) मध्येच नाही, तर अचेतन वस्तू (निर्जिव) मध्ये देखील 'राम'तत्व दिसू लागतं. घटाकाशातील 'राम' मठाकाशात येऊन गेल्यामुळे अधिक व्यापक बनला. यालाच अवकाशातील 'राम' म्हंटले जाते! मठाकाशात येऊन गेल्यामुळं व्यापक बनला म्हणजे? याचं कारण काय? घटाकाशातील 'राम'तत्व हे निर्गुण निराकार असल्याने त्याचं स्मरण ब्रम्हा, विष्णू, महेश म्हणजे अद्वैतवादीच करू शकत होते. पृथ्वीवर जीवशिव भेदानें म्हणजे द्वैतभावानें राहणाऱ्या मनुष्याला घटाकाशातील 'राम'तत्व समजणं, पटणं किंवा त्याचं स्मरण करणं कठीण होतं.

खरंतर जे मूळ तत्वमसि म्हणजे 'राम' शिवमध्ये आहे तेंच जीवामध्यें देखील असतंच. परंतु, ते डोळ्यांनी बघता न येणारं सुक्ष्म तत्व होतं. ते सुक्ष्म तत्व प्रत्येक जीवाला (घटाला) कळावं म्हणून त्याला जीवासमोर जीवासारखं प्रगट व्हावं लागलं. त्याला लौकिक दृष्टीकोनातून व्यापक व्हावं लागलं. आणि जेंव्हा ते घटाकाशातील 'राम'तत्व मठाकाशात आलं तेंव्हा त्याला विष्णू भगवंताचं अवतरण श्रीरामचंद्र म्हंटलं जाऊ लागलं! अशाप्रकारे, मठाकाशात येऊन गेल्यामुळे 'राम'तत्व किती व्यापक आहे, हे मानवाला कळलं!

चौपाईमध्यें शेवटी म्हंटलेला 'राम' हा सर्वोच्च कोटीचा आहे. कारण आता 'राम' तत्व घटाकाशात, मठाकाशात किंवा अवकाशात तर दिसतंच, पण ते त्याही पलिकडे अनुभवता येतं. साधनेचं पूर्णत्व तेंव्हाच म्हणता येईल जेंव्हा हाच 'राम' शब्द पृथ्वीच नाही तर अनंत कोटी ब्रम्हांड व्यापून उरेल. यालाच महाकाशातील 'राम' म्हंटले जाते! याला वरील चौपाईमध्यें सबसे न्यारा म्हंटलं आहे!

हे चारही राम जो अंतःकरणात साठवू शकेल त्याला परमसमाधी, परम विश्राम मिळेल! तुलसीदासानें रामरायाचं चरित्र पूर्ण लिहून झाल्यावर म्हंटलं, पायो परमविश्राम! आणि ज्याला असा सर्वांगानें राम मिळाला त्याला आराम मिळाला असं म्हणतात. आ म्हणजे सर्व बाजुनें आ-राम! यालाच वेदांतात समाधीसुख म्हंटले जाते!

या चारही लेव्हलवरून जेंव्हा 'राम'नाम घेतलं जाईल, तेंव्हाच तो जीव शिवपदाला पोचेल! आणि त्या शिवपदी पोचण्याची पहिली पायरी म्हणजे,
चालता बोलता धंदा करिता ।
खाता जेविता सुखी होता ।
नाना उपभोग भोगिता ।
नाम विसरूं नयें ।।

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 

Tuesday, December 26, 2017

जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा:- सत्ययुग सुरू होते आणि विष्णु चा दुसरा अवतार जन्म होता आणि राम हे 7 व्या अवतार कार्यातले (त्रेतायुगातले ) मग दुसऱ्या अवतारच्या वेळी रामाचा जप महादेवानी कसा केला ?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका- समुद्र-मंथन जेव्हा झाले तेव्हा विष प्राशन करणारे आपले देवाधीदेव होते आणि ऐकण्यात आणि वाचण्यात असे आहे म्हणून सत्य आहे असे वाटते कि महादेव ने रामाचा जप  करून विषाला गळ्यात नियंत्रित केले आणि नीलकंठ झालेत. परंतु प्रश्न असा आहे कि जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा:-
सत्ययुग सुरू होते आणि विष्णु चा दुसरा अवतार जन्म होता आणि राम हे 7 अवतार कार्यतले (त्रेतायुगातले ) मग दुसऱ्या अवतारच्या वेळी रामाचा जप महादेवानी  कसा केला  ?


श्रीराम!

।। राम जपे सदाशिव ।।

श्रीराम! परवा कौस्तुभनें एक मार्मिक शंका उपस्थित केली होती की, रामावतार हा त्रेतायुगांतील आहे. मग त्याअगोदर सत्ययुगात शिवानें हे नाम कसें कंठी धारण केले?

आपलं एक मत तयार झालं आहे की, ज्या राम नामस्मरणानें त्रिविध तापे जळून अखंड सुखाची प्राप्ती होते तो राम शब्द म्हणजे दशरथपुत्र, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून विष्णु भगवंताने घेतलेल्या मर्यादा पुरुषोत्तम अशा अवताराचे नाव!

वरील मत हे चुकीचं नाही, परंतु ते एकांगी आहे. भवसागर पार करून देणारा हा शब्दरुपी मंत्र त्रेतायुगातील विष्णुअवतारानंतर अस्तित्वात आला नसून "राम" हा शब्द अनादि आहे. त्रेतायुगात भगवंताने तो शब्द आपल्या मानवदेहाला जोडल्यानंतर तो मानवाला परिचित झाला इतकंच!

'राम' हा शब्द दशरथनंदन रामाच्या जन्माअगोदरही होता, याचं सर्वांना परिचित एक उदाहरण म्हणजे परशुराम! रामावताराच्या समकालीन परंतु अगोदरच पृथ्वीवर आलेला भगवंताचा आणखी एक अवतार म्हणजे परशुराम!  परशुराम म्हणजे ज्याच्या हातात परशु आहे, तो राम! परशु हे परशुराम नावातील विशेषण आहे, तर राम हे मूळ नाव. म्हणजे अनेक राम नावाच्या व्यक्तींपैकी ज्या रामाच्या हातात परशु आहे, तो परशुराम! यातून एक स्पष्ट संकेत मिळतो की 'राम' हा शब्द दशरथाला पुत्रप्राप्ती होण्याअगोदरचा आहे.

जसं द्वापारयुगातील विष्णुअवतारापूर्वी सुद्धा कृष्ण हा शब्द होताच. परंतु, तो भगवंताशी जोडला गेलेला नव्हता, वेगळ्या अर्थानें वापरला जात होता. त्याचप्रमाणे, राम हा शब्द अगोदर निराळ्या अर्थाने होता.

एक दोहा आपल्याला माहीतच आहे की,
राम राम तो सब कहे ठग ठाकूर और चोर ।
जिस नाम से प्रल्हाद तरे वह नाम कुछ ओर ।।

तसंच मला व्यक्तिशः असं वाटतं की,
राम राम तो सब कहे त्रेता, द्वापार, कली घोर ।
जिस नाम को शिव भजे, वह राम कुछ ओर ।।

शिवशंकर जे रामनाम सतत घेतात, ते वेगळं कसं...

समुद्रमंथन करतांना हलाहल विष पचवण्यासाठी महादेवाने कंठावर अनेक उपचार केले. सापाची त्वचा शीतल असते म्हणून नागाचा वेढा घेतला, भस्म थंड असतो म्हणून त्याचा लेप लावला, चंद्र मस्तकावर धारण केला. तरीही आग, दाह कमी होत नव्हता म्हणून "राम"नामाचे अखंड उच्चारण सुरु केले आणि नीलकंठ प्रचंड शीतल झाले. मग काही लोक अशीही शंका काढू शकतील की, जर राम, कृष्ण हे दोन्ही शब्द जर त्यावेळी अस्तित्वात होते तर शंकराने रामनामच का घेतले, कृष्ण-कृष्ण का नाही? तर इथे खरी मेख आहे.

एक गंमत सांगतो, खरंतर गंमत नाही, रहस्य!
रामनामाचा जप केवळ महेशच करत नसून ब्रम्हदेव व विष्णु देखील या मंत्राचं अखंड स्मरण करत असतात. कारण, विश्वनिर्मितीत तत्वमसि महावाक्याची मुख्य भूमिका होती. तत्वमसि हे अद्वैतसूत्र आहे. अद्वैत हे समाधीसुखाचं द्योतक आहे. समाधिसुख हे सर्व प्रकारच्या तापांना नष्ट करून शीतल समाधानाची अनुभूति देतं. या तत्वमसि चं सुक्ष्म रूप दोन प्रकारे आहे; उपनिषदानुसार ॐ हे एक सूक्ष्म रूप ज्याच्या उच्चारणातून विश्वनिर्मिती झाली. आणि तत्वमसिचे दूसरे रूप म्हणजे तत् असि त्वम्;
तत् साठी 'र', असि साठी आ (ा) आणि त्वम् साठी 'म' म्हणजे र+आ+म = राम!

या 'राम' शब्दाचा उच्चार म्हणजे अद्वैतस्वरूपाचे तत्वमसिचे उच्चारण जे समाधिसुख देणारे, परमशीतलता देणारे आहे. आणि ब्रम्हा, विष्णु व महेश हे सच्चिदानंद रूप आहेत म्हणजे ते सतत या महावाक्याचे स्मरण राखतात. कारण, हे स्मरणच विश्वकार्य सुरळीत ठेवते. आणि म्हणूनच तेच तत्वमसि महावाक्य 'राम'रूपानें कंठी धारण केलं तर हलाहल विषाचं ताप नष्ठ होईल हा विचार भगवान महेशांना सुचला. आणि त्याचा परिणाम म्हणून भजन करी महादेव ।।

या 'राम'नामाचें चार आयाम उद्या बघुया... आजचं आतापर्यंतचं चिंतन अगोदर अंतःकरणात साठवू!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 

Monday, December 25, 2017

"जोहार मायबाप जोहार| मी सद्गुरू घरचा महार||" या सवाईवर चिंतनसेवा

श्रीराम! रामरायाच्या इच्छेने आणि सद्गुरूंच्या वरदहस्ताने दर महिन्याला साखरखेर्डा येथे सुरू असलेल्या प्रवचन सेवेत काल महाराजांनी "जोहार मायबाप जोहार, मी सद्गुरू घरचा महार" यावर चिंतन सेवा करवून घेतली.
आपल्यालादेखील तसा महार होता यावं, हा विशुद्ध हेतूने सर्व सद्भक्तांसाठी प्रवचन ऑडिओ पाठवत आहे! श्रीराम समर्थ!!!


"न्या मज झडकरी माहेरासी" यामध्ये 'माहेरी" म्हणजे नेमके कुठे?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷




शंका - 'सद्गुरुनाथा, श्रीप्रल्हादा, हाक कधी ऐकसी, न्या मज झडकरी माहेरासी" यामध्ये 'माहेरी" म्हणजे नेमके कुठे?

श्रीराम!
न्या मज झडकरी माहेरासी!
आज प्रत्येक संसारी मनुष्य मी खरा पूर्ण समाधानी होणार की नाही या संदेहात जगत आहे.
पुढे ब्रम्ह मागे माया, मध्ये संदेहाची काया |
यामध्ये मूळ ब्रम्हस्वरूपापासून आलेला आत्मा कायाप्रवेश करून जेंव्हा या मायिक जगात येतो, तेंव्हा मायेच्या अधीन होऊन तो संदेहयुक्त जीवन जगतो. वरील चरणात ब्रम्ह म्हणजे माहेर; आणि ज्या मायिक जगात आपण येतो, ते सासर!
माहेर म्हंटले की सासरही ओघाने आलेच. याकडे पारमार्थिकदृष्टीने बघितलं तर सासर हे विषयप्रवृत्त करतं; तर माहेर निवृत्ती शिकवतं! माहेरी लहानाची मोठी झालेल्या मुलीला आईवडील सर्वांना जीव लाव, हे शिकवतात; पण हे तुझं घर नाही, ही तुझी माणसं नाहीत असा मार्मिक बोधही देतात. कर्तव्यतत्पर राहूनही आसक्तीपासून निवृत्त रहायला शिकवतं ते माहेर!
प्रवृत्ती सासूर निवृत्ती माहेर |
तेथें निरंतर मन माझे ||
निवृत्तीरुपी माहेरी जी सदाचाराची शिकवण मिळालेली असते, त्या सदाचरणाने सासरी कर्मप्रवृत्त व्हायचं पण मनातून आसक्तीची निवृत्ती करून. अवघाची संसार सुखाचा करीन हे साधावं वाटतं,
म्हणोनिया सदा सावध असावे | विमुख नसावे राघवेसी ||
सासरी म्हणजे संसारात आल्यावर जर एखादी स्त्री विकारांना बळी पडली तर तिचं एकटीचं नुकसान होत नसून त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला बसतो. बालपणी शाळेत अनेक अभ्यासविषयांचं चिंतन, मनन करून एखादा उच्चशिक्षित जर आपलं ज्ञान पैसा, मान, लौकिक यांच्या हव्यासापोटी खर्च करत असेल तर त्याला सुखदुःखाचा सासुरवास आयुष्यभर सोसावा लागेल. तेंव्हा, कर्तव्य बजावताना त्यादरम्यान येणाऱ्या प्रलोभनांपासून निवृत्त होण्याचे स्थान म्हणजे माहेर!

माझ्या परिचयाचे एक मोठे नामवंत कवी अधूनमधून माझ्याशी बोलत असतात. बोलतांना ते एवढी प्रतिभाशक्ती असूनही म्हणावा तेवढा पैसा, प्रसिद्धी मिळत नाही, याबद्दल खंत व्यक्त करीत असतात. अशी माणसं लौकिक ज्ञान मोठ्या प्रमाणात मिळवूनही खऱ्या समाधानाला मुकतात. माझ्या मनात विषयाची आसक्ती असेल तर माझी वाणी विषयाचंच चिंतन करून माझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून विषयच प्रगट होईल. आज बुद्धीचा विकास फार झाला आहे. एखादा लेखक, एखादा कवी आपली प्रतिभाशक्ती वापरून लोकांना कल्पनाविलासात रममाण करतो. “नसे राम ते धाम सोडोनी द्यावे” या संतवचनाप्रमाणे “नसे राम ते काम सोडोनी द्यावे”. ज्या बोलण्यातून, ज्या प्रतिभेतून, ज्या क्रियाशक्तीतून राम प्रगट न होता काम प्रगट होतो, ते वाचन, ते लेखन, ते श्रवण आपल्या विषयओढीचं द्योतक तर असतंच; परंतु, आपल्या लेखनातून जर इतर वाचक, आपल्या सादरीकरणातून इतर प्रेक्षक विषयलोलुप होत असतील तर त्यांच्या मानसिक, भावनिक पापाचरणाचं सगळं खापर त्या लेखक, कवी किंवा कलाकारावर फुटतं. शब्द ज्ञान भरपूर आहे, पण ही शब्दज्ञानाची भक्ती संसारासक्तीच्या अधिष्ठानावर आहे, असा व्यक्ती भक्त नसून विभक्त असतो, असं समर्थांनी स्पष्ट सांगितलं आहे.
शब्दज्ञान भक्ती संसारी आसक्ती | त्या नाव विभक्ती सत्य जाण ||
आणि “विभक्त नव्हे तो भक्त” अशी भक्तीची व्याख्या असल्याने
विचारूनी पाही आसक्ती मनाची |
दुर्दशा ज्ञानाची करू नको ||
असा सावधानतेचा इशारा समर्थ देतात. अशा विषयलोलुप आकर्षणांना न भुलणारं रामानंदात रमणारं स्थान म्हणजे माहेर! या माहेरी मला झडकरी न्या असं हा साधक सद्गुरूंना विनवत आहे.
लौकिक गोष्टींकडे ओढा असलेला मनुष्य विवेकी असू शकत नाही. विवेक गमावून बसलेला मनुष्य माहेरी जाऊ शकत नाही. माहेरी गेल्याशिवाय समाधान मिळू शकत नाही. आणि माहेर म्हणजे लौकिक आसक्तीची पूर्ण निवृत्ती!
वाघिणीचं दुध हे फक्त सोन्याच्याच भांड्यात राहू शकतं; इतर भांड्यांना छिद्र पाडून ते निघून जातं. त्याप्रमाणे, भक्तीप्रेम हे निवृत्तीच्या पात्रातच राहू शकते; विषयप्रवृत्तीच्याभांड्यात ते घेण्याचा प्रयत्न केल्यास मान, लौकिक, स्तुती, निंदा इ. छिद्रातून ते निघून जातं. माहेर म्हणजे हे निवृत्तीचं भांडं! या निवृत्तीच्या माहेरी जाण्याचे प्रयत्न विषयसंगाने साधणार नाहीत;
होत नाही प्रेत्न संतसंगेविण |
रामदास खूण सांगतसे ||

तेंव्हा माहेरचं समाधान अनुभवायचं असेल तर संतांना अपेक्षित विषयनिवृत्त नामाभिमुख आचरण ठेवावं, हा या अभंगाचा हितोपदेश आहे! तो उपदेश आपण अंतःकरणात रुजवून सतत सावधानता ठेवली, तर रामराया आपले कल्याण करेल!

    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 !! जानकी जीवन स्मरण जय जय राम !! 🙏

Sunday, December 24, 2017

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । या माऊलीच्या अभंगातील उपदेश सांगाल का?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- माउलींच्या या अभंगांचा अर्थ व यांतील उपदेश सांगाल का...

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥


श्रीराम! ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर भाष्य करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे.

आपण त्याला फक्त हात जोडू शकतो! तेंव्हा, माझं चिंतन हे हात जोडण्यासारखं समजावं....

आपल्याकडे दहावी झाल्यावर मुले कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखा निवडून त्यात शिक्षण घेतात. आणि मग पुढील ७-८ वर्षाच्या बौद्घिक परिश्रमानंतर एखाद्या विषयात तथाकथित मास्टर ही पदवी मिळवतात! दहावी झालेला विद्यार्थी १६-१७ वर्षाचा असतो. उद्या वयात आजकालची मुलं कला, वाणिज्य की विज्ञान यांत गोंधळलेली असतात, त्याच वयात ७०० वर्षापुर्वी एका कोवळ्या मुलाने जे लेखन केलं त्यात जगातील ज्ञानाच्या सर्व शाखा आहेत. एवढ्या कमी वयात एवढं अकल्पित एवढ्या उच्चकोटीचं तत्वज्ञान मांडणारा मुलगा ज्ञानार्थी नसून ज्ञानाचा अधिपती, ज्ञानेश्वर म्हणून ओळखला जातो. याच समग्र लेखनवृक्षातील एक संजीवन पान म्हणजे वरील अभंग! वरील एकाच अभंगात जीवन जगण्याची कला आहे, यशस्वी वाणिज्य आहे आणि अद्भुत विज्ञान देखील आहे!

माऊलींनी आवाहनपर हा अभंग रचला आहे. यात साधकाने आपली साधनदिशा निर्धारित करण्यासाठी, ती अंततोगत्वा समाधान देणारी बनवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे अतिशय कलात्मक पद्धतीने माऊलींनी या अभंगात सांगितलं आहे. सर्व परिस्थितीत समाधान हे सर्वांचं साध्य आहे. आणि आपली साधना या साध्याप्रत पोचण्यासाठी मानवदेह हे माध्यम आहे. या देहरुपी रथावर आरूढ होऊन जीव शिवाप्रत पोचण्यासाठी प्रयत्न करीत असतो. मार्गातील सर्व अडथळे पार करून रथ योग्य दिशेला सुखरूप जाण्यासाठी सारथी चांगला हवा!

देहाला जर रथ मानलं तर या रथाचा सारथी कोण? तर देहरुपी रथावर वाटेल तिथे नेण्याची क्षमता असलेला हा सारथी म्हणजे "मन"! तर देहरुपी रथाला वाटेल तिथे नेण्याची क्षमता असलेला हा सारथी म्हणजे "मन"! त्यामुळें, माऊलींनी आवाहनपर हा अभंग रचतांना मनरुपी सारथीला आवाहन केलं आहे. अध्यात्माचं गुढ तत्वज्ञान सुंदर परंतु दैनंदिन उपमा वापरून लडिवाळपणे मांडणे हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्थायीभाव आहे. हा लडिवाळपणा जपतांनाच माऊलींनी या अभंगात मनाला भ्रमराची उपमा दिली आहे. माऊलींचं काव्य काही ठिकाणी जड वाटतं, अगम्य वाटतं. परंतु, त्यातील महत्वाचा शब्द स्पष्ट झाला की संपुर्ण अभंग किंवा ओवी सहजपणे उलगडते.

तेंव्हा, या अभंगातील महत्वाचा शब्द म्हणजे "भ्रमर"! आणि या अभंगात मनाला भ्रमराची उपमा दिली आहे, हे समदलं की अर्ध काम झालं! आपल्याला मनाचा स्वभाव माहीत आहे. सतत इकडून तिकडे, तिकडून इकडे भ्रमण करते ते मन! आणि म्हणूनच मनाला सतत रुणुझुणु रुणुझुणु करणाऱ्या भ्रमराची उपमा दिली आहे. जोपर्यंत मन एका ठिकाणी स्थीर होत नाही, तोपर्यंत जीवाला समाधान नाही. अकारण नको तिथे भ्रमण करणे हा मनरुपी भ्रमराचा सर्वांत मोठा अवगुण आहे. हा अवगुण सोडण्याचं आवाहन करतांना माऊली म्हणते:
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तुं अवगुणु रे भ्रमरा ।।

एखादा खोडकर मुलगा असेल तर त्याला हे करू नको, ते करू नको असं सतत सांगावं लागतं. मग तो मुलगा म्हणतो, हे करू नको, ते करू नको, मग करू तरी काय? या मनरुपी भ्रमराची तीच अवस्था झाली आहे. क्रोधाकडे जाऊ नको, कामाकडे जाऊ नको, लोभाकडे जाऊ नको, मत्सराकडे जाऊ नको, मग जाऊ तरी कुठे? तर माऊली त्या भ्रमराला म्हणते, तु ज्या ५-६ ठिकाणी जातोस, ते गटार आहे, तिथे समाधानाचा सुगंध नसून विषयभोगाची दुर्गंधी आहे. तुला खरा सुगंध जे पूर्ण समाधानी आहेत त्या कमळात मिळेल!

माऊलींनी जसं भ्रमर म्हणजे मन म्हंटले आहे, तसे कमळ कुणाला म्हंटलं आहे? तर संतांना! या संतरूपी कमळाच्या चरणी गेल्यावरच मनरुपी भ्रमराला खरं निश्चल, अखंडीत समाधान भोगायला मिळेल!
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळू रे भ्रमरा ।।

जसं भ्रमराची भ्रमंती कमळाच्या कुशीत गेल्यावर कायमची थांबते, त्याप्रमाणें संत सद्गुरूंच्या चरणरजाचा विषयी माणसाच्या मस्तकावर अभिषेक झाला की वासनेचं बीज जळून वासनेकडचं भ्रमण कायमचं थांबतं!

संतचरणरज लागता सहज ।
वासनेचं बीज जळूनी जाय ।।
तुलसीदासानें मनाला मुकुर म्हणजे आरसा म्हंटलं आणि तो स्वच्छ करण्यासाठी श्रीगुरूचरण सरोजरज, निजमन मुकुर सुधारी। सांगितलं! यांत माऊलींनी जसं संतांना कमळाची उपमा देतांना चरणकमळदळू म्हंटलं, त्याप्रमाणें तुलसीदासानें सद्गुरूंना सरोज म्हणजे कमळाची उपमा देतांना श्रीगुरूचरण सरोजरज म्हंटलं!

या ओवीत भोगी तूं निश्चळू म्हणतांना भगवंतानें गीतेमध्ये 'स्थीरधी' हा जो गुण सांगितला आहे, तोच माऊलींनी या ठिकाणी मांडला आहे! जो भ्रमर अगोदर घाणीत फिरल्यानें घाणेरडा, दुर्गंधी बनला होता, तोच जेंव्हा कमळात विसावतो तेंव्हा सुगंधानें न्हाऊन निघतो. त्याचप्रमाणे विषयाच्या, विकारांच्या घाणीत फिरल्यानें जे मन दूषित झालं होतं, तेच मन गुरूचरणी लागल्यावर 'सुमन' बनतं आणि त्यातून भक्तीप्रेमाचा सुगंध येऊ लागतो.
सुमनसुगंधु रे भ्रमरा ।।
सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे चांगले मन! कमळाच्या सहवासानें भ्रमराला कमळाचा सुगंध लागतो, त्याचप्रमाणे संतांच्या सहवासानें साधकाला संतांचा भक्तीप्रेमाचा सुगंध लागतो. तो सुगंध, तो परिमल विद्गदु म्हणजे साधकाला सद्गदित करून परमानंदाचा अधिकारी बनवतो. मनाची ही अवस्था येण्यासाठीच माऊली म्हणते,
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ।।
विद्गदु चा व्यावहारिक अर्थ आहे पसरवणे! जो भक्तीप्रेमाचा परिमळ मला संतरूपी कमळाच्या सहवासानें लाभला तो मी पसरवला पाहिजे! श्रीमहाराजांचं "नाम सदा बोलावें, गावे भावे, जनांसि सांगावें" हे 'परिमळु विद्गदु'च्या समकक्ष वाटतं! मनरुपी भ्रमराने कमळाच्या सहवासात जाणें म्हणजे 'चरणकमळदळू रे भ्रमरा' म्हणजेच 'नाम सदा बोलावें'! कमळाच्या सहवासात राहून सुगंध घेणे म्हणजेच 'सुमनसुगंधु रे भ्रमरा' म्हणजेच"भावे गावे!" आणि
भ्रमराला मिळालेला सुमनसुगंधु त्यानें इतरांना देणे म्हणजेच 'परिमळु विद्गदु' म्हणजेच 'जनांसि सांगावें'! मला जो नामाचा सुगंध लाभला, तो मी तर घ्यावाच, पण मी त्यात न्हाऊन निघतांना इतरांना त्यात खेचणें हे साधकाच्या जीवनाचं ध्येय असावं, असं माझं मत आहे.
नामालय चा जन्म याच 'परिमळु विद्गदु'च्या ध्यासानें झाला आहे! विद्गदु चा व्यावहारिक अर्थ आहे पसरवणे!
जो भक्तीप्रेमाचा परिमळ मला संतरूपी कमळाच्या सहवासानें लाभला तो मी पसरवला पाहिजे!
अशा रितीनें मनरुपी भ्रमर जेंव्हा अंतर्बाह्य भक्तीप्रेमाचा सुगंध बनतो, तेंव्हा त्याचं भगवंताशी नातं बदलून
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ।। असं होतं!
ही अवस्था सांगतांना माऊली म्हणते, हे भ्रमरा हा संतरूपी कमळाचा सुगंध हेच तुझं सौंदर्य, हेच तुझं सौभाग्य!
आणि सद्गुरूंना सौभाग्य मानून सद्गुरूंनी ज्याची भक्ती केली त्या भगवंताला मायबाप मान!
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ।।
फुलांचा अर्क काढून अत्तर बनवतात. तसं या अभंगाचा अर्क म्हणजे सौभाग्य! आणि हे सौभाग्य, हे अत्तर म्हणजेच सद्गुरूंनी सिद्ध करून दिलेलं भगवंताचं नाम! हे नामांचं सौभाग्य ज्याच्याकडे आहे, तो खरा भाग्यवान! आणि तो जिथे जाईल तिथे हे नामरुपी अत्तर वातावरण सुगंधीसुंदर बनवेल!  तेंव्हा हे अत्तर केवळ वरवर न लावता अंतःकरणात ठसवावं! तो ठसा स्वह्रदयात ठसावा! बस्स! लाभ नाही यापरता!
।। ज्ञानेश्वर माऊली की जय ।। 


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏