





! रामायण !
श्रीराम चरित्र : सेतू चरित्र
श्रीराम!
सज्जनांचे परित्राण, दुर्जनांचा विनाश व
धर्माची स्थापना करण्यासाठी मला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो, असं भगवंतानें स्वतः
म्हंटलं आहे. त्रेतायुगातील सातव्या
अवतारात परब्रम्ह परमात्म्यानें वरील तीन कारणांपेक्षा मानवी जीवनाचा एक अद्वितिय
आदर्श आचरून दाखवण्यावर विशेष भर दिला. या पूर्णावतारी सगुण साकार
परब्रम्हाला आपण म्हणतो,
"श्रीराम"!
भगवंत अवतरीत होण्यापूर्वी या पृथ्वीवर दशानन
रावणाची आसुरी शक्ती दहशत पसरवत होती. साधूसंत, ऋषीमुनी, भगवद्भक्तांना धर्माचरण
करणें अशक्य बनलं होतं.परंतु, अशा अनियंत्रीत परिस्थितीत
सर्व आतंकी असुरांसह रावणासारख्या महापराक्रमी राक्षसाचा निःपात करण्यासाठीच
भगवंतानें रामावतार घेतला, हे पूर्ण सत्य मानता येणार
नाही....
रावणाला संपवणें हा भगवंताच्या मनुष्य
अवताराचा हेतू नव्हता. कारण, रावणाला संपवण्याची क्षमता
असणाऱ्या अनेक शक्ती या भूतलावर अगोदरच अस्तित्वात होत्या.अनेकदा देवासूर संग्रामात
देवांना सहकार्य करून असुरांना नामोहरम करणारे अयोध्याधीश दशरथ महाराज हे
चक्रवर्ती सम्राट त्यावेळी होते. महातपस्वी जन्मानें क्षत्रिय आणि कर्मानें
ब्राम्हण असणारे विश्वामित्र मुनी शास्त्रविद्येबरोबर शस्त्रविद्येत अतुलनीय होते. महर्षीं वसिष्ठमुनींचं
तपोबल संकल्प शक्तीनें रावणाला संपवू शकत होतं.वालीसारख्या पराक्रमी वानरानें रावणाला
आपल्या बगलेत दाबून मरणासन्न अवस्थेत सोडलं. याच वालीनें आपल्या लहान
बालकाला, अंगदला खेळणं म्हणून
रावणाला उलटं लटकवलं होतं. हा वाली रावणाला कधीही
संपवू शकत होता. आपल्या परशुच्या जोरावर
सहस्त्रार्जुनच्या सर्व भूजा कापून मस्तक धडावेगळं करणारं आणि पृथ्वीला २१वेळा
निःक्षत्रिय करणारं भगवद्तत्व परशुराम पृथ्वीवर होतं.
तेंव्हा, रावणाला संपवण्याची क्षमता
असलेले दशरथ महाराज, विश्वामित्र, वसिष्ठमुनी, परशुराम, वाली असें दिग्गज असतांना
देखील भगवंतानें अवतार का घेतला? याचं महत्वाचं कारण म्हणजे वरील दिग्गज मंडळी
पृथ्वीवर होती, परंतु ती एकसंध नव्हती. विश्वामित्र-वसिष्ठ बेबनाव, परशुराम एकीकडे, दशरथ महाराज दुसरीकडे, जनक महाराज वेगळ्या दिशेला! या सर्वांना एकत्र
बांधण्याचं दिव्य कार्य करणारी शक्ती म्हणजे श्रीराम! तेंव्हा, रामाचं चरित्र म्हणजे
सेतूचं चरित्र!
संपूर्ण अवतार कार्यात रामानें जोडण्याचंच
काम केलं आहे. वसिष्ठमुनी-विश्वामित्र यांना रामानें
जोडलं. जनक-दशरथ यांना रामानें जोडलं. एवढंच नाही तर नर-वानर यांना जोडणारा देखील
हाच पुरूषोत्तम आहे! तेंव्हा, रामरायाच्या अवताराचा
मुख्य हेतू म्हणजे विप्र, धेनू, सुर, संत, हित लीन मनुज अवतार ।
वरील वचनाचा एक अर्थ असाही काढल्या जातो की
साधू, गोमाता, देव आणि संताच्या हितासाठी
भगवंतानें अवतार घेतला. म्हणजेच या सर्वांचं अहित
करणाऱ्या रावणाचं अहित करण्यासाठी सुद्धां भगवंताचा अवतार होता. हे मत सर्वथा चुकीचं आहे. रामानें रावणाच्या सुद्धां
हीताचाच विचार केला. आणि हीच गोष्ट रामावताराला
इतर अवतारांपेक्षा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतें!
रामानें रावणाचं हीतच पाहीलं. याचं उदाहरण अंगद शिष्टाई!
जेंव्हा, श्रीराम वानरसेनेसह
लंकेजवळ आले, तेंव्हा अंगद दूत बनून
रावणाकडे गेला होता. त्यावेळी रावणाला काय बोलू
असं अंगदनें रामाला विचारल्यावर रामरायानें सांगितलं, 'काज हमार तासूं हित होई'! ज्यानें साधूसंतांचा छळ
करून अधर्म वाढवला, दशाननी विचारधारेचा प्रभाव
वाढवला आणि आपल्या पत्नीचं अपहरण करून रघुकुलाच्या किर्तीला कलंक लावला अशा
रावणाचंही हित जपणारा अद्वितिय आदर्श पुरूषोत्तम म्हणजे श्रीराम!
अशा रामरायाचं संपूर्ण चरित्र, प्रत्येक प्रसंगाकडे, प्रत्येक जीवाकडे बघण्याचा
दृष्टीकोन आणि 'दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहः ||' ही वृत्ती ज्याला समजली
आणि ज्यानें त्याच आदर्शावर चालण्याचा प्रयत्न केला, त्याच्या अंतःकरणरूपी
अयोध्येत रामजन्म होऊन ती व्यक्ती समाजात खऱ्या अर्थानें रामराज्य प्रस्थापित करू
शकेल! ही अवस्था येण्यासाठी आपण
सर्वांनी सतत नामांत राहून कर्तव्य करावें, रामराया सर्वांचं
कोटकल्याण करेल!
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
No comments:
Post a Comment