





! रामायण !
अतुल्य त्याग, सेवा व पराक्रमाचा संगम: लक्ष्मण
श्रीराम! शेष हा भगवान नारायणाच्या
सोबतच राहणार, या न्यायानें रामावतारांत
शेषाने लक्ष्मण रुपानें रामचंद्राची सेवा हाच मुख्य धर्म आणि हेंच परमध्येय मानलें.
अत्यंत निष्कपट, तेजस्वी, त्यागी आणि पराक्रमी
लक्ष्मण विश्वामित्रांकडे यज्ञरक्षणासाठी आणि वनवासांत रामसीता सेवेसाठीं सदैव
छायेप्रमाणें भगवंताबरोबर राहिला.वास्तविक पितृवचनाची पुर्ती रामालाच बंधनकारक असुनही
लक्ष्मणानें सुद्धां १४ वर्षे ब्रम्हचर्यव्रतानें केवळ रामसीता सेवेंसाठी वनवास भोगला.
वनवासाला निघण्यापुर्वी माता सुमित्रा
लक्ष्मणाला म्हंटली,
"रामालाच
साक्षात पिता दशरथ, सीतेला माझ्याठिकाणी आणि
वनाला अयोध्या समज. त्यांच्या सेवेंत चुकूं
नकोस. आपला ज्येष्ठ बंधू, श्रीराम हीच तुझी परमगती
आहे."
आणि एक महत्वाची सूचना याठिकाणी सुमित्रा मातेनें
लक्ष्मणाला केली,
'हे
बघ! तू क्रोधावतार आहेस. पण या वनवास काळांत तुझ्या
मनांत जागेपणी तर सोड स्वप्नांतसुद्धा मोह, मद, अहंकार इ. विकार येऊ देऊ नकोस!'
यांवर लक्ष्मणानें उत्तर दिलं ते फार बोधप्रद
आहेच पण आचरायला कठीण आहे! तो म्हंटला, 'माते, मी जागेपणी तर मी पूर्ण
काळजी घेईल. पण झोपल्यावर चुकून
स्वप्नात मनामध्यें विकार आले तर तुझा अनादर होईल. परंतु, मी झोपलो तर स्वप्न पडेल
ना!'
असं म्हणून या सेवाधर्मी लक्ष्मणानें १४ वर्ष
जागरणाचा संकल्प केला आणि तो तडीस नेला....
हे केवळ लक्ष्मण आणि लक्ष्मणच करू शकतो. मन हा इंद्रियांचा राजा
आहे. त्या मनांत कोणताही विकार
येऊ नयें म्हणून ज्याचं लक्ष मनांवर आहे, तो लक्ष्मण!
लक्ष्मणाचे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे त्याच्या
मनाला जी गोष्ट खटकत असे, ती तो प्रखर शब्दांत
श्रीरामासमोर मांडत असें. अर्थात वीररसाच्या आवेशात
आणि रामाच्या प्रेमानें विवश होऊन तो असें वागायचा पण श्रीराम त्याला लगेच शांत
करीत.
एकूण अवतारकार्यात लक्ष्मणानें फक्त एकदांच
रामाच्या आज्ञेचें उल्लंघन केले ते म्हणजे सुवर्णमृग प्रसंगी वनदेवतांवर सीतेची
जबाबदारी टाकून तो सीतेच्या कठोर आज्ञेपोटी रामाकडे गेला. त्याचा परिणाम काय झाला हे
आपल्याला ठाऊकच आहे. म्हणूनच अवज्ञा
कदा हो यदर्थी न किजे । मना सज्जनां राघवी वस्ती किजे ।।
सीताहरणानंतर सुग्रिवानें जेंव्हा जंगलात
सापडलेली आभुषणें दाखवली, तेंव्हा लक्ष्मण म्हणाला, "हे बाजुबंद आणि कुंडले
माहीत नाहीत, पण ही पैंजणे मात्र नक्कीच
सीतामातेची आहेत. कारण, नमस्कार करतांना ती नजरेंस
पडत होती!" असें ब्रम्हचर्य व्रत, पुज्यभाव आणि मर्यादा
आजपर्यंतच्या मानव इतिहासात इतर कुठे बघायला मिळेल?
लंकाविजय करून रामराया अयोध्येत परत आल्यावर
एकदां अगस्ती ऋषी रामदरबारात आले होते. अगस्ती ऋषी म्हंटलें, लक्ष्मणासारखा वीरपुरूष
त्रिभुवनांत नाही,रामसुद्धा नाहीं. रामानें कुंभकर्ण, रावणासारख्या महापराक्रमी
राक्षसांना मारलं यांत मोठी विरता आहे. परंतु, इंद्रजीतला मारणं सर्वांत
दुष्कर कार्य होतं. कारण,इंद्रजीतला वरदान होतं की, ज्यानें १४ वर्षांत निद्रा
भोगली नाही, स्त्रीचं मुख पाहिलं नाही
आणि भोजनही केलं नाही, असाच वीर त्याला मारू शकत
होता! असा वीर लक्ष्मणाशिवाय
दुसरा कुणी नव्हता....
१४ वर्ष निद्रा नाही, स्त्रीचा चेहरा बघितला
नाही हे वैराग्य माहीत आहे, परंतु भोजनाचं काय?
तर, वनवासांत लक्ष्मण दररोज जी
फळे तोडून आणत होता, त्याचे तीन भाग करून
रामराया व सीतामाईला दिल्यावर तिसरा भाग तसाच ठेवून देत असे. (शबरीची बोरं न खाण्याचं
कारण इंद्रजीतला संपवणें हे होतं)
चौदा वर्षे लक्ष्मणानें स्वतःच्या वाट्याची
फळे तशीच ठेवून दिली. ती मागवण्यात आली तर
त्यातील फळांत ७ दिवसांची फळे कमी आढळली. त्या सात दिवसांचा हिशोब
लक्ष्मणानें दिला....वनवासांत दशरथ
महाराजांच्या स्वर्गवासाची बातमी समजल्यावर निराहाराचे दिवसांत फळे आणलीच नाही, इंद्रजीतनें नागपाशात
बांधले त्या दिवशी,रावणानें शक्ती मारली त्या
दिवशी आणि रावणवधाच्या आनंदानें आणखी एक दिवस अशाप्रकारे सात दिवस फळे न आणल्यानें
त्या सात दिवसांची फळे कमी भरली!
अतुल्य पराक्रमानें इंद्रजिताचा वध, श्रीराम राज्याभिषेकानंतर
सीतामातेला वनवासात नेऊन सोडण्याच्या ह्रदयविदारक आज्ञेचे पालन आणि शेवटी
प्रत्यक्ष रामरायानें आपलासुध्दां त्याग केल्यावर शरयूत देहत्याग करून
अवतारसमाप्ती! भगवंतानें स्वमुखानें
भक्ताला भक्तीचं तत्वज्ञान सांगावं हे क्वचितच घडतं! आपण मागे एकदां रामरायानें
शबरीला नवविधा भक्तीचं स्तवन केलेलं बघितलं. शबरी व्यतिरिक्त आणखी एका
भक्ताला भगवंताच्या मुखांतून नवविधा भक्तीचं चिंतन श्रवण करण्याचं भाग्य लाभलं! तो भक्त म्हणजे "लक्ष्मण"!
लक्ष्मणाच्या एकूण चरित्रातला प्रत्येक गुण
आजच्या माणसाला आदर्श तर आहेच पण तो आचरणांत आणून जीवन राममय करण्यासाठी बोधप्रद
आहे! या अनुपम चरित्राइतकं नाही
तरी किमान परस्त्री मातेसमान मानून अतिआहार, अतिनिद्रा, अतीबोलणं टाळलं आणि मनाचं
लक्ष नामाकडें ठेवून कर्तव्य केलं तर आपलं जीवन कृतार्थ होईल, यात संशय नाही!
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
No comments:
Post a Comment