🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
! रामायण !
श्रीरामाचा दासानुदास: श्रीशत्रुघ्न
श्रीराम!
वाल्मिकिरामायणात शत्रुघ्नाला सुद्धां भगवान
विष्णूंचाच अंशावतार मानले आहे. शत्रुघ्न हा शांत, मितभाषी, तेजस्वी आणि पराक्रमी होता. ज्याच्या केवळ स्मरणाने शत्रूचा पूर्णपणे विनाश
होतो आणि जो इतका विद्वान आहे की सर्व वेदांचा प्रकाश ज्याच्यात दिसून येतो :
शत्रुघ्न!
जाके सुमरन ते रीपुनासा |
नाम सत्रुहन वेद प्रकासा ||
रामावतारामध्ये दशरथ महाराज हे वेदस्वरूप
आहेत; तर त्यांचे चार पुत्र हे
चार पुरुषार्थ आहेत. लक्ष्मण धर्म, शत्रुघ्न अर्थ, भरत काम तर श्रीराम
साक्षात मोक्ष आहेत.
शत्रुघ्न हा दशरथ आणि सुमित्रेचा
मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणि भरताचा सावत्रभाऊ आणि चार
भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी
आहे.
शत्रुघ्नाचे चरित्र तसे फार प्रचलित झाले
नाही. अर्थ जर जास्त प्रगट झाला तर अनर्थ होतो. त्यामुळे, अर्थस्वरूप शत्रुघ्न हा
मौनी आहे, मौनभावाने सेवेत राहणे
यातच अर्थाची शोभा आणि सार्थकता आहे. श्रीराम सेवेत जसा लक्ष्मण
तसा भरताच्या सेवेत शत्रुघ्न होता. मंथरेमुळे माझ्या
पित्यासमान थोरल्या भावाला वनवासात जावे लागले, हे समजल्यावर शांतवृत्तीचा
शत्रुघ्न क्रोधावतार बनला. मंथरेचे केस धरून तिला फरफटत ओढत बाहेर आणले आणि
लातांच्या प्रहाराने तिला जखमी केले. शेवटी भरताने त्याला शांत केले. रामरायावर
नितांत प्रेम करणाऱ्या शत्रुघ्नाची रामनिष्ठा अशाप्रकारे अनेकदा दिसून आली. लंकाविजयानंतर अयोध्या
शृंगारण्याची व श्रीराम स्वागताची उत्तम व्यवस्था शत्रुघ्नानेंच केली होती. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या
अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्या शत्रुघ्नाकडेच जाते.
लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच
शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे
प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा
करण्यात धन्यता मानली.
कालांतराने लवणासूर राक्षसाचा निःपात
करण्यासाठी भरताला पाठवण्याचा विचार असतांना शत्रुघ्न उठून म्हंटला, "माझ्यासारखा दास असतांना
ह्यांना श्रम करू देता कामा नयें." ते मान्य करून श्रीराम म्हंटले, "बंधो, असेच होवो! तू लवणासूराचा वध केल्यावर
तु तेथे धर्मपूर्वक राज्यशासन चालवावें!" हे ऐकून शत्रुघ्न हळू
आवाजात म्हंटला, तस्यैवं
मे दुरुक्तस्य दुर्गतिः पुरुषर्षभ ॥ "राजन! ज्येष्ठ बंधू भरत असतांना
कनिष्ठाचा राज्याभिषेक मला अधर्म वाटतो. पूजनिय बंधो! मला राज्याभिषेकरूपी
दुर्गती नको आहे!" किती सुंदर त्याग आहे! श्रीरामाच्या वियोगात
राज्यप्राप्तीला तो दुर्गती मानतो. तरी केवळ श्रीरामाची आज्ञा
म्हणून शत्रुघ्न युद्धाला सज्ज
झाला. युद्धात निपुण असणाऱ्या शत्रुघ्नाला रामरायाने स्वतः युद्धनीती सांगितली.
एवं भवतु काकुत्स्थ क्रियतां
मम शासनम् ।
राज्ये त्वामभिषेक्ष्यामि
मधोस्तु नगरे शुभे ।।
चार हजार घोडे, दोन हजार रथ, शंभर हत्ती, दहा लाख सुवर्णमुद्रा अशा
लवाजम्यासह शत्रुघ्नाला श्रीरामाने पाठवले. लवणासूर वधानंतर मधुरापुर
नगरी वसवून राज्य चालवले. त्यानंतर रामरायाने आपल्या
भावाचा राज्याभिषेक करून क्षात्रधर्म आणि प्रजापालन याचे सुंदर उद्बोधन केले.
यमुना नदीच्या काठावर वसवलेल्या या नगरीला'वेद
निर्मिताम्' म्हटले जाते. नगरं
यमुनाजुष्टं तथा जनपदान् शुभान् । हीच नगरी
द्वापारयुगात भगवंताच्या पुढील अवतारामुळे मथुरा म्हणून प्रसिद्ध झाली. रामायणात
मथुरेच्या सुखसमृद्धीचे वर्णन आहे. अर्धचन्द्रप्रतीकाशा
यमुनातीरशोभिता । बारा
वर्षे मथुरेत राज्य करून अयोध्येला परत जातांना शत्रुघ्न वाल्मिकी आश्रमात आला
होता. त्यावेळी कृतकृत्य झालेले वाल्मिकी ऋषी म्हटले, “शत्रुघ्न! माझ्या हृदयातही तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून मी तुझ्या
मस्तकाचे अवघ्राण करीन हीच प्रेमाची पराकाष्ठा आहे.” आणि त्यानंतर मुनींनी
रामचरित्राचे गायन करून शत्रुघ्नाला राममहिमा सांगितला.
शेवटी जेंव्हा श्रीराम परमधामाला जायला
निघाले, त्यावेळी शत्रुघ्न परत
येऊन सद्गदित स्वरात भगवंताला म्हटला, "रघुनाथा! माझ्या दोन्ही पुत्रांना
राज्य सोपवून मी आपल्या बरोबर येण्याचा निश्चय करून आलेलो आहे. आपण आता मला दुसरी कोणतीही
आज्ञा करू नयें!
" भगवान
श्रीरामाने शत्रुघ्नाची विनंती ऐकली व शत्रुघ्न सुद्धां भगवंताबरोबर परमधामाकडे
निघून गेला. उदात्ततेचे प्रतीक श्रीराम, बंधुप्रेमाचा आदर्श
लक्ष्मण, त्यागाचा आदर्श भरत तर
निरपेक्ष आणि नि:स्पृह वृत्तीचे प्रतिक
शत्रुघ्न हा होय! शत्रुघ्नाचे संपूर्ण जीवन
हे समर्पणाचे होते. समर्पण हे शांत असते, ते बोलून दाखवले जात नाही.
अशा निष्काम, निरपेक्ष शांत समर्पणाचा
आदर्श असलेल्या शत्रुघ्नाला आपल्या जीवनाचा आदर्श बनवून तसे आचरण केल्यास
आपल्यातील सर्व विषयविकार या आत्मारामाच्या शत्रूंचा निःपात होऊन आपल्यातील
शत्रुघ्न प्रगट होईल, यात शंकाच नाही!
जानकी जीवन स्मरण जय जय राम
No comments:
Post a Comment