





! रामायण !
शांती, साहस व असामान्य
पातिव्रत्य: सीतामाई
श्रीराम!
जेंव्हा जेंव्हा जगत्कार्य करण्यासाठी
भगवंतानें अवतार घेतला, तेंव्हा तेंव्हा
त्याच्यासोबत शक्ती कार्य करत होती. शिव-शक्ती एकत्र आल्याशिवाय
साधुंचे परित्राण व दुर्जनांचा विनाश होत नाही. याच न्यायानें भगवंतानें
त्रेतायुगांत विप्र धेनु सुर संत हित लीन मनुज अवतार । आणि या कार्यात सीता ही शांती
रूपानें अवतरीत झाली...
वैशाख शुद्ध नवमी यादिवशी यज्ञासाठी भूमी
नांगरताना मिथिलानरेश जनकाला जमिनीतून एक मुलगी मिळाली. नांगराच्या फाळाला सीत आणि
सीतने जमिनीवर ओढलेल्या रेघेस सीता म्हणतात. म्हणून जनकाने या मुलीचे
नाव ‘सीता’ ठेवले....
जे शिवधनुष्य रावण, बाणासूर आदी वीर साधे
हलवूही शकत नव्हते, ते शिवधनुष्य सीतेनें
लहानपणी खेळता खेळता उचलले होते. अशा या शक्ती रुपी जगज्जननी सीतेनें
स्त्रीजन्मासाठी पुढे एक आदर्शवत् जीवन जगले. रामराया स्वयंवरासाठी
मिथिलेत आले तो प्रसंग फार विलोभनीय आहे....
विश्वामित्र मुनींसोबतचे दोन महातेजस्वी तरूण
पाहून विरागी, विदेही, निर्गुणोपासक जनक महाराज
सुद्धां राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या रामाच्या प्रेमात पडले! जनकानें विश्वामित्र
मुनींना विचारलें,
'महाराज, हे दोन तरूण नेमके कोण
आहेत? मुनीकुलतिलक की नृपकुलपालक? की ज्याचं वर्णन करतांना
वेदांनी नेति नेति म्हंटलं ते ब्रम्ह युगल अवतारांत आलं?'
विश्वामित्र मुनीं हसून, पण नम्रतेनं म्हंटलें, राजन् तुम्ही कधीही असत्य
बोलू शकत नाही. हे दोन तरूण सर्व ऋषी
मुनींचं रक्षण करण्यासाठी माझ्यासोबत आल्यानें ते मुनीकुलतिलक आहेत. ते दोघं अयोध्यासम्राट
दशरथ महाराजांचे चिरंजीव असल्यानें ते नृपकुलपालक सुद्धां आहेत!
हे ऐकून जनक महाराजांना रामाच्या परब्रम्ह
तत्वाची खात्री पटली!
आता हा विदेही जनक सगुण साकार परब्रम्हाच्या
रुपाला भुलून विचार करू लागला की या रामाशी मला नातं जोडलं पाहिजे. पण कोणतं? जनक मनांत विचार करतो, 'मी याचा पिता बनू शकलो
नाही. परंतु, मी ब्रम्हज्ञानी आहे. मग मी याचा गुरू बनू शकतो
का? पण, वसिष्ठ, विश्वामित्र मुनी याचें
गुरू असल्यानें मी त्याचा गुरू बनलो तर त्यांचा अनादर होईल! पिता बनू शकलो नाही, गुरू बनू शकत नाही. परंतु, आता जर विधात्यानें कृपा
केली आणि याच्या हातानें शिवधनुष्य भंग झालं तर याला माझा जावई करून याचा सासरा
तरी बनेल, पण काही ना काही नातं
मात्र नक्कीच जोडेल! संधी सोडणार नाही!
कल्पना करा काय मानसिक अवस्थेत जनक महाराज
असतील! यांतून एक महत्वाचा बोध
मिळतो की, ब्रम्हज्ञान प्राप्त
होऊनही, वैराग्यसंपन्न अधिकारी
महात्मा बनुनही जोपर्यंत भगवंताचं सगुण प्रेम मिळत नाही, तोपर्यंत जीवन कृतार्थ
झाल्यासारखं वाटत नाही. आणि हे रामप्रेम प्राप्त
करून घेण्यासाठी रामाशी कोणतं तरी एक नातं जोडलं पाहिजे! माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावें। हाचिं
सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावें ।।
या इच्छापुर्तीसाठी जनकानें मग विश्वामित्र
मुनींना महालात निवासाचा आग्रह केला. आणि रामरायाच्या निवासासाठी
सर्वांत सुंदर सदन जे सीतेचं होतं ते रिकामं केलं.सीतेच्या सदनाचं नावच 'सुंदरसदन' होतं. आणि बरोबरच आहे, भगवंत जे शांतीरूप सुंदर
सदन आहे तिथेंच निवास करतो! आपण आपलं अंतःकरण
नामप्रेमानें सुंदर बनवलं की रामराया तिथेंच वास्तव्य करेल!
याठिकाणी पुढील विलोभनीय प्रसंग अनेक आहेत, पण आता मोह आवरतो आणि पुढे
जातो....
संपूर्ण रामायण हे त्यागाच्या अधिष्ठानावर
आहे. याची प्रचिती येते ती
वनवास वचनाच्या प्रसंगापासून...
रामचंद्र वनवासांत जाण्यासाठी आनंदानें सज्ज
झाले असतांना सीतेनें देखील कैकयी मातेविरुद्ध कोणताही आकांडतांडव न करता
स्वतःदेखील वनवास भोगण्यासाठी सज्ज झाली....
रामानें विरोध केल्यावर ही शांतीमाता म्हंटली, तुम्ही माझे पती आहात आणि
मी तुमची पत्नी आहे म्हणून मी तुमच्या सोबत येण्याचा हट्ट धरला आहे असं नाही, तर तुम्ही रामचंद्र आहात
आणि मी चंद्रिका! चांदणी चंद्रासोबतच राहणार, हा विधीनियम आहे, तो तुम्ही नाकारू शकत नाही. तेंव्हा मला तुमच्यासोबत
येऊ द्या!
शंभू तेथें अंबिका, चंद्र तेथें चंद्रिका। संत
तिथें विवेका, असणे चि की।।
वनगमनाच्या वेळी कैकयीनें सीतेला वल्कले
नेसायला दिल्यावर वसिष्ठांसारख्या तपोनिष्ठ महर्षींनी सुद्धां प्रक्षुब्ध मनानें
कैकयीची निर्भत्सना केली, पण सीतेच्या मनांत आपल्या
सासूबद्दल कोणताही विकार किंवा क्रोध आला नाहीं.
श्रीरामाच्या तोंडून वनवासातील अनेक
प्रकारच्या क्लेशांना ऐकूनही सीता आपल्या निश्चयापासून यत्किंचीतही ढळली नाही. त्यामुळें, पतीसेवेपुढे जगातील सर्व
सुख आणि वैभव तुच्छ मानणाऱ्या सीतेला रामाला सोबत घ्यावें लागले.
सीताराम मला प्राप्त व्हावें ही जशी आपली
इच्छा आहे तशीच इच्छा रावण व शुर्पणखा यांची सुद्धां होती. रावणाला सीता हवी होती तर
त्याच्या बहिणीला राम हवा होता. परंतु, या बहीण-भावांचा हेतू आणि मार्ग
शुद्ध नव्हता!
श्रीराम हा भगवंत आणि सीता ही शांती! शांती सीता समाहिता
आत्मारामो विराजते। असं आद्य शंकराचार्यांनी
वर्णन केलं आहे. शुर्पणखानें शांतीला दूर
करून भगवंत आणि रावणानें भगवंताला दूर करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आणि जो कपटाचरणानें हरण
करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्या रावणाचा शेवट कसा
झाला, हे आपल्याला माहीत आहे!
अशोकवनांत रावणानें आपले वैभव आणि प्रलोभने
दाखवून सीतेचें मन विचलीत करण्याचे काही कमी प्रयत्न केले नव्हतें. परंतु, आपल्या पतिव्रता धर्म आणि
श्रीराम निष्ठेपासून सीतामाई स्वप्नांतसुद्धां ढळली नाहीं. तिन्ही अवस्थेत आणि
कुठल्याही परिस्थितीत मन, बुद्धी, चित्तामध्यें केवळ
पतीपरमेश्वराचेंच ध्यान हे या मातेचें चरित्र आहे.
पुढे रावणवधानंतर अग्नीदेवतेनें जिच्या
पावित्र्याला सिद्ध केलें अशा सतीसाध्वी सीतेला लोकापवादासाठी गर्भिणी अवस्थेत
पुन्हा वनवास भोगून शेवटी पाताळप्रवेश करावा लागला.
प्रेम, ममता आदी भावनेपेक्षा
कर्तव्य श्रेष्ठ असलेल्या रामचंद्राच्या बरोबरीचें किंबहुना काकणभर वरचढ ठरलेल्या
सीतामाईचें साहस, धर्मपरायणता, क्षमा आणि सेवाभाव पूजनीय
आणि अनुकरणीय आहे!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
No comments:
Post a Comment