🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : दादा मला
एक प्रश्न आहे की आपण सद्गुरूंना "अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय" म्हणतो. याचं मर्म काय आहे? आणि त्यात योगीराज हा शब्द का नाही वापरत?
➡
श्रीराम!
अनंतकोटी
ब्रम्हांडनायक म्हणत असतांना त्रिभुवनातील सर्वोच्च स्थान आपण सद्गुरूंना देतो.
सद्गुरूंना जर अनंतकोटी ब्रम्हांडाचा नायक म्हणजे स्वामी मानलं असेल तर इतर
सर्वांना कनिष्ठ स्थान आहे असं मानल्यासारखं आहे. या इतर सर्वांमध्ये सर्व
देवीदेवतांबरोबर हे जगसुद्धां आलं. म्हणजे जगातील सर्व वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती
सर्व त्या सद्गुरूंच्या अधीन आहे, असा अर्थ निघतो. या सर्वांत 'मी'सुद्धां
आहे. म्हणजे अनंतकोटी ब्रम्हांडनायक म्हणत असतांना मी सद्गुरूंचा दास आहे ही कबुली
आपण दिली आहे. ही कबुली दिल्यावर मी, दासानें त्या नायकालाच माझा आधार
मानायला हवं, हे
ओघानें आले. परंतु, आपण सद्गुरूंन नायकत्व, स्वामित्व देऊन,
त्यांना सर्वांचा आधार मानून
पुन्हा याला त्याला काहीनाकाही मागत फिरत राहिलो तर याला काय म्हणावं?
अनंतकोटी ब्रम्हांडाचा नायक तुज
आधार ।
उगीच का फिरसी दारोदार ।।
राजा
कुणाला म्हणतात? तर ज्याच्याकडे सर्व प्रकारची सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य आहे त्याला! परंतु, या सर्व
सत्ता, संपत्तीच्या
आहारी न जाता, त्यांचे
गुलाम न होता जो त्यांच्यावर अधिराज्य गाजवतो, त्याला "राजाधिराज" असे
म्हणतात.
आणखी एक
अतिशय महत्त्वाचा आयाम मला यात असा दिसतो की, मन हा इंद्रियांचा राजा आहे. या मनरूपी
राजावर जो अधिराज्य गाजवतो त्याला राजाधिराज असे म्हणावं!
श्रीमहाराज
वरील दोन्ही अंगांनी "राजाधिराज" आहेत!
श्रीमहाराज
म्हणत की, समाधान
ही खरी श्रीमंती आहे, हे खरं ऐश्वर्य आहे. असं ऐश्वर्य तुमच्या आमच्यासारख्या लौकिक
संपत्ती असणाऱ्यांकडे नसून गोंदवले नावाच्या लहानशा गावांत आजन्म समाधान
अनुभवणाऱ्या आणि लाखो लोकांना समाधानाचा राजमार्ग दाखवणाऱ्या राजाधिराज सद्गुरू
श्री ब्रम्हचैतन्य महाराजांकडे आहे! त्यांच्याकडे केवळ अलौकिक, पारमार्थिक
ऐश्वर्य नसून आपल्यादृष्टीनें महत्त्वाचं वाटणारं लौकिक ऐश्वर्य सुद्धां किती आहे, हे आज गोंदवल्यात
जाऊन बघावं! महाराज देहात असतांना तर एखाद्या राजासारखे दिसत होतेच, परंतु आज
देखील तो थाट, तो
रूबाब बघायला मिळतो! आणि हे सर्व ऐश्वर्य तुम्हाआम्हाला देण्यासाठी आहे. किंबहुना, आपल्याजवळचं
सगळं काळजी, चिंता, विकारांचं
दरिद्री गाठोडं तिथे ठेवून द्या असं महाराज प्रत्येकाला सांगत. ज्यानें ते गाठोडं
तिथे ठेवलं त्याची अंतिम इच्छा त्यांनी पूर्ण केली, याची कितीतरी उदाहरणं आहेत.
अष्टही सिद्धी पायी लोळती ऐसा तो
दरबार ।
इच्छामात्रे तुला पाहिजे ते ते तो
देणार ।
उगीच का फिरसी दारोदार ।।
यात
राजाधिराज नंतर "योगीराज" का म्हंटले जात नाही,
असं काहींना वाटतं. मी त्याचं
कारण माझ्या दृष्टीनें असं सांगेन की योगीराज म्हणजे वैराग्याचा कळस, वैराग्यसंपन्न
अधिकारी!
श्रीमहाराज
योगीराज होतेच, परंतु आपण त्यांच्याकडे गेल्यावर वैराग्य, अनासक्ती, योग मागत
नसून भोग मागतो. आपल्याला आपले वडील लाड करतात, खाऊ देतात तेंव्हाच आवडतात; त्यांनी
आपल्याला रागावलं किंवा काही उपदेश देण्यासाठी बोलावलं तर नकोसं वाटतं. तसं काहीसं
आपलं महाराजांकडे गेलो की होत असावं.
एक साधी
गोष्ट बघा: उत्सवांत गोंदवल्याला आपण गेलो की आपल्याला वाटतं, मला छान
खोली मिळावी, खोली
मिळाली की कॉट मिळावा, पांघरून मिळावं, खोली तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर असेल तर लिफ्टची सुविधा
असावी म्हणजे चढण्याउतरण्याचा त्रास नको; प्रसादासाठी रांगेत न लागता सहज प्रवेश
मिळावा... कित्तीतरी सुप्त मागण्या असतात. याचा अर्थ तिथे आपण योग साधण्यासाठी जात
नसून उपभोग भोगण्यासाठी जातो. मग आपल्यासारख्या भोगी माणसाला महाराज योगीराज दिसत
नाही. म्हणून अंतरिचे धावें स्वभावे बाहेरी या सूत्राप्रमाणें आपण महाराजांकडे ते
योगियांचे योगी असुनही 'योगीराज' म्हणून बघत नाही.
अनंतकोटी
ब्रम्हांडनायक राजाधिराज नंतर आपण महाराजांना सच्चिदानंद पदवी देतो. भगवंत हा सच्चिदानंद
परमात्मा आहे. भगवंतानें पृथ्वीवर अवतार कार्य पूर्ण करून स्वधामगमन करतांना आपलं
सच्चिदानंद स्वरूप नामरुपानें मागे ठेवलं. महाराज हे मुळात तेच सच्चिदानंदस्वरूप
म्हणून जन्माला आले. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला आणि जयानें सदा वास नामांतच केला
अशी ही सच्चिदानंद मूर्ती म्हणजे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज!
मला जो सत्, चिद् आनंद
लाभलेला आहे तो इतरांना लाभावा, ही एकमेव तळमळ महाराजांना होती, आजही आहे. आपल्यासारख्या विषयी, दीन
माणसालादेखील तो आनंद देण्याची दया, कणव महाराजांमध्ये आहे. परंतु, तो आनंद
हवा असेल तर 'सोडी
संसाराची आस धरी भक्तीचा हव्यास" ही अट आहे. या अटीची पुर्तता करून जो भक्त
त्यांना शरण जाईल त्याला दीनांचा दयाळू, कनवाळू पोटाशी धरेल. तेंव्हा त्याला सोडून
आपण इतरत्र भटकू नयें!
दीनदयाळू,
अतीकनवाळू सद्गुरूनाथ उदार ।
भक्तीभावे शरण रिघाल्या पोटाशी
धरणार ।
उगीच का फिरसी दारोदार ।।
"सद्गुरू" हा शब्द मला फार फार आधार देणारा वाटतो. आज
पदोपदी आपल्याला लहानमोठ्या कामासाठी कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो, मदत घ्यावी
लागते, मार्गदर्शन
घ्यावें लागते. ते सर्व आपले गुरू आहेत. मला ज्यांनी लिहायला, वाचायला
शिकवलं ते गुरू; ज्यांनी नोकरीला लावलं ते गुरू.... परंतु या गुरूंमध्ये जर सत्
तत्व चैतन्य रूपानें प्रगट झालेलं नसेल तर ते अहंकारानें जगणारे अतीसामान्य जीव
आहेत. मी तुला शिक्षण दिलं, मी तुला नोकरीला लावलं तेंव्हा तु माझा सन्मान करावा, मला आदर्श
मानावं ही अपेक्षा, हा स्वार्थ त्या गुरूला गुरूपदावरून खाली खेचतो. जो
अहंकारशुन्य आहे, निरपेक्ष आहे, निःस्वार्थ आहे आणि सर्वांच्यावर
प्रत्येक मनुष्य सच्चिदानंद पदापर्यंत पोचावा या एकमात्र तळमळीनें जगत्कार्य करतो
तो सद्गुरू!
असे
सद्गुरू आज देहानें समोर नसतील, परंतु त्यांची परमात्मशक्ती, त्यांचं अध्यात्मतेज हे त्रिभुवनाला
पुरून उरेल असं असतं! तो सद्गुरू आज निर्गुणात असुनही आपल्यासाठी सगुणरूपात नटलेला
असतो!
उरला तोचि सद्गुरू माझा सगुणरुपे
नटला ।
श्रीरामी आराम जपे नाम मंगला ।।
अशा
सद्गुरुंना वारंवार विनंती करावी की मी प्रापंचिक दृष्टीनें दीन झालेलो असलो तरी
आता तुझा दास आहे. या दीनदासाला भवरून तारणारा आधार तूच आहेस!
सद्गुरू नाथा, श्रीगुरूराया
विनंती वारंवार ।
दीनदासाची भुवनत्रैया, तोचि एक
आधार ।
उगीच का फिरसी दारोदार ।
अनंतकोटी ब्रम्हांडाचा नायक तुज
आधार ।
उगीच का फिरसी दारोदार ।।
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।
ReplyDelete