🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
निर्विकल्प आणि दृढ
भक्तीचा आदर्श: शबरी
श्रीराम!
तुमच्या साधनेनं तुम्हाला आत्मज्ञान होईल, तुमच्या तपश्चर्येनं तुम्हाला भगवंताचं दर्शन
होईल. परंतु, या सर्वांच्याही वर असलेलं भगवंताचं प्रेम जर
हवं असेल तर तुमच्यातसुद्धां तेवढ्या ताकदीचं प्रेम असावं लागतं! आणि तेच
सुदामाजवळ होतं. अशा भक्ताच्या पुढे जगच काय तर जगाचा नियंता
भगवंतसुद्धा दास्यत्व पत्करतो! मै तो भगतनको दास। भगत मेरे मुगुटमणी।।
जसे भगवंताचें अनेक अवतार होऊन गेले तसे भगवंताच्या
प्रेमाचें अनेक अवतार आहेत...
किंबहुना, भगवंतानें एकावेळी एकच अवतार
घेतला, परंतु त्याच्या प्रेमानें एकाच वेळी अनेक अवतार
घेतलेले दिसतात. जो सुदामारुपानें प्रेमाचा अविष्कार झाला आणि
त्या प्रेमाचं प्रतिक मुठभर पोहे बनले, तोच अविष्कार अगोदर
रामावतारात झाला होता. आणि तो म्हणजे "शबरी"!
शबरी अविष्कारात प्रेमाचं प्रतिक मुठभर पोहे नव्हतें, तर उष्टी बोरं होती... शबरी अविष्कारात रामाला प्रेमासाठी चालत यावं
लागलं तर सुदामा अविष्कारात प्रेमाला कान्हाकडे चालत यावं लागलं.... या दोन्ही प्रेमामध्ये त्यागाची बैठक होती, हे विशेषत्वानें बघितलं पाहिजे....
मतंग ऋषींच्या आश्रमापासून कांही कोसांच्या
अंतरावर एका भिल्ल राजाचें राज्य होतें. राज्य लहानसेंच होतें. भिल्लांचा राजा, शबर, जरी रानटी होता, तरी तोहि ऋषींच्या आचरणाने व उपदेशाने थोडा
सुधारला होता. या भिल्ल राजास एक पांचसहा
वर्षांची मुलगी होती, शबरी. उभयतां मातापितरांनी मुलीला आश्रमांत
पाठविण्याचा निश्चय केला. मतंग ऋषींच्या प्रभावानें
आणि अनन्य गुरुसेवेमुळे शबरी सिद्ध तापसी बनली. कालांतराने, ऋषीमुनींच्या संकेतानुसार भगवंताच्या भेटीची
या साध्वीच्या मनात तळमळ आणि उत्कंठा वाढत राहिली. आश्रमात या कधी रे येशील।
रामा रघुनंदना, रामा रघुनंदना॥ यातून तिच्या वाट पाहण्याची आर्तता दिसतें.
श्रीराम आणि लक्ष्मण या तापसीच्या आश्रमांत
आल्यावर तीने प्रेमाश्रुंनी भगवंताचे पादप्रक्षालन केलें. "हे पुरुषोत्तमा! या महापुण्यदायक आश्रमांत तुझें दर्शन
झाल्यानें मी कृतकृत्य झालें आहे. आणि आता मला प्रसादरूप
अक्षयलोक प्राप्त होणार आहे", असें म्हणून शबरीने
भक्तीभावानें रामरायाला व लक्ष्मणाला पंपा तिरावरील बोरे खायला दिली. बोरांवरील व्रण पक्षांच्या चोचीमुळे नाहीत, आपल्यापुढे फक्त गोड फळे ठेवण्यासाठी मी
चाखल्याने पडलेले ते व्रण आहेत, ही बोरे उष्टी नाहीत तर
अभिमंत्रीत आहेत त्यामुळे तू साशंक नजरेने बघू नकोस असंही शबरी सौमित्राला सांगते. परंतु, केवळ श्रीरामच उष्टी
बोरेसुद्धा आवडीने खातो. कारण त्यात प्रेम आहे, निर्लेप भाव आहे. रामचंद्र शबरीच्या आश्रमात आले, तेव्हा रावणाने सीतेचं हरण केलेलं होतं. शबरीने रामाला दक्षिण दिशेला जायला सांगितलं. तिथे सुग्रीव आणि हनुमंताची मदत घेण्याचीही
सूचना केली. रामानेही शबरीचा सल्ला
ऐकला आणि त्यामुळेच पुढे सीतेचा शोध लागला. यावरून शबरीला जंगलाची
किती माहिती होती हे लक्षात येतंच, परंतु प्रभू
रामचंद्रांचाही तिच्यावर किती विश्वास होता, याची जाणीव होते. शबरीचं मोठेपण यातच आहे.
ज्या भगवद्प्रेमासाठी सुदामानें
भुकेनें तडफडत असतांना मिळालेल्या अन्नाचा त्याग केला; त्याच भगवद्प्रेमासाठी शबरी राजकन्या असून तीनें
राजसुखाचा त्याग केला आणि नामप्रेमाने भगवंताला आपलासा करून घेतला! 'प्रेमाला मोल ना जगामाजी' म्हणत असतांना हे प्रेम त्यागमुलक आहे, हे ध्यानांत घ्यावं!
शबरीला शबरीपण उगीच आलं नाही! तिच्यात रामभेटीची तळमळ होती, परंतु त्याचबरोबर प्रयत्नशुन्यता होती! तुम्ही म्हणाल, मग तीचं आश्रम स्वच्छ करून
ठेवणं, फुलांच्या पायघड्या घालणं, निवडून बोरं आणणं हे प्रयत्न नव्हतें का?
तर, ते रामभेटीचे प्रयत्न नव्हतें, ते रामस्मरणाचं प्रेम होतं! ते प्रयत्न असते तर तिला त्या प्रयत्नाचा शीण
आला असता. ती निस्वार्थ प्रेमापोटी ते करत होती. 'तुला जेंव्हा यायचं तेंव्हा ये! मी तयार आहे, तुला बोरं भरवण्यासाठी!' अशी विलक्षण प्रयत्नशुन्यता असल्यामुळें
रामालाच राहवलं नाही आणि तो धावत स्वतः तिच्याकडे आला!
एका वन्य जातीतील स्त्रीने तपश्चर्येनें आणि निर्विकल्प
भक्तीनें केवढा अधिकार प्राप्त करून घेतला होता! तो अधिकार आपल्याला
सद्गुरूंकडून मिळालेल्या सिद्धमंत्राने मिळू शकतो, पण शबरीसारखी दृढ भक्ती
असायला हवी!तेंव्हा, शबरीमातेचा आदर्श ठेवून आपली
तळमळ आणि प्रयत्नशुन्यता वाढवावी आणि देहाने कर्तव्य करत असतांना
मनाने 'नामासाठी नाम' घ्यावें, मग त्या नामांतच राम दिसेल!
("नामप्रेम" पुस्तकातून
साभार)
!!! जानकी जीवन स्मरण
जय जय राम !!! 🙏
No comments:
Post a Comment