श्रीराम! गेल्या वर्षी सद्गुरू कृपेने साखरखेर्डा येथे झालेल्या "रामदूत वायुसुत" या सवाईवरचे निरूपण -
श्रीराम! ५ मे २०१५ रोजी 'नारद जयंती' ला सद्गुरू कृपेने "नामालय" हा नामस्मरण उपक्रम सुरु झाला. देश विदेशातले अनेक नामसाधक या उपक्रमात सहभागी झाले. याच उपक्रमातून काही पारमार्थिक शंका समाधान "नामप्रेम" या whatsapp ग्रुपद्वारे झाले. ते पुस्तक रूपानेही आकारास आले (Contact 9881400280) इथे या माध्यमातून ते एकत्र करण्यात येत आहे. याबरोबर जी काही चिंतन सेवा गेल्या काही वर्षात झाली आहे, त्याचे एकत्रीकरणही या माध्यमातून केले आहे. यातून नामसाधन वाढीस लागून सर्वांना समाधान मिळावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!
Saturday, March 31, 2018
Sunday, March 25, 2018
श्रीराम चरित्र : सेतू चरित्र






! रामायण !
श्रीराम चरित्र : सेतू चरित्र
श्रीराम!
सज्जनांचे परित्राण, दुर्जनांचा विनाश व
धर्माची स्थापना करण्यासाठी मला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो, असं भगवंतानें स्वतः
म्हंटलं आहे. त्रेतायुगातील सातव्या
अवतारात परब्रम्ह परमात्म्यानें वरील तीन कारणांपेक्षा मानवी जीवनाचा एक अद्वितिय
आदर्श आचरून दाखवण्यावर विशेष भर दिला. या पूर्णावतारी सगुण साकार
परब्रम्हाला आपण म्हणतो,
"श्रीराम"!
भगवंत अवतरीत होण्यापूर्वी या पृथ्वीवर दशानन
रावणाची आसुरी शक्ती दहशत पसरवत होती. साधूसंत, ऋषीमुनी, भगवद्भक्तांना धर्माचरण
करणें अशक्य बनलं होतं.परंतु, अशा अनियंत्रीत परिस्थितीत
सर्व आतंकी असुरांसह रावणासारख्या महापराक्रमी राक्षसाचा निःपात करण्यासाठीच
भगवंतानें रामावतार घेतला, हे पूर्ण सत्य मानता येणार
नाही....
रावणाला संपवणें हा भगवंताच्या मनुष्य
अवताराचा हेतू नव्हता. कारण, रावणाला संपवण्याची क्षमता
असणाऱ्या अनेक शक्ती या भूतलावर अगोदरच अस्तित्वात होत्या.अनेकदा देवासूर संग्रामात
देवांना सहकार्य करून असुरांना नामोहरम करणारे अयोध्याधीश दशरथ महाराज हे
चक्रवर्ती सम्राट त्यावेळी होते. महातपस्वी जन्मानें क्षत्रिय आणि कर्मानें
ब्राम्हण असणारे विश्वामित्र मुनी शास्त्रविद्येबरोबर शस्त्रविद्येत अतुलनीय होते. महर्षीं वसिष्ठमुनींचं
तपोबल संकल्प शक्तीनें रावणाला संपवू शकत होतं.वालीसारख्या पराक्रमी वानरानें रावणाला
आपल्या बगलेत दाबून मरणासन्न अवस्थेत सोडलं. याच वालीनें आपल्या लहान
बालकाला, अंगदला खेळणं म्हणून
रावणाला उलटं लटकवलं होतं. हा वाली रावणाला कधीही
संपवू शकत होता. आपल्या परशुच्या जोरावर
सहस्त्रार्जुनच्या सर्व भूजा कापून मस्तक धडावेगळं करणारं आणि पृथ्वीला २१वेळा
निःक्षत्रिय करणारं भगवद्तत्व परशुराम पृथ्वीवर होतं.
तेंव्हा, रावणाला संपवण्याची क्षमता
असलेले दशरथ महाराज, विश्वामित्र, वसिष्ठमुनी, परशुराम, वाली असें दिग्गज असतांना
देखील भगवंतानें अवतार का घेतला? याचं महत्वाचं कारण म्हणजे वरील दिग्गज मंडळी
पृथ्वीवर होती, परंतु ती एकसंध नव्हती. विश्वामित्र-वसिष्ठ बेबनाव, परशुराम एकीकडे, दशरथ महाराज दुसरीकडे, जनक महाराज वेगळ्या दिशेला! या सर्वांना एकत्र
बांधण्याचं दिव्य कार्य करणारी शक्ती म्हणजे श्रीराम! तेंव्हा, रामाचं चरित्र म्हणजे
सेतूचं चरित्र!
संपूर्ण अवतार कार्यात रामानें जोडण्याचंच
काम केलं आहे. वसिष्ठमुनी-विश्वामित्र यांना रामानें
जोडलं. जनक-दशरथ यांना रामानें जोडलं. एवढंच नाही तर नर-वानर यांना जोडणारा देखील
हाच पुरूषोत्तम आहे! तेंव्हा, रामरायाच्या अवताराचा
मुख्य हेतू म्हणजे विप्र, धेनू, सुर, संत, हित लीन मनुज अवतार ।
वरील वचनाचा एक अर्थ असाही काढल्या जातो की
साधू, गोमाता, देव आणि संताच्या हितासाठी
भगवंतानें अवतार घेतला. म्हणजेच या सर्वांचं अहित
करणाऱ्या रावणाचं अहित करण्यासाठी सुद्धां भगवंताचा अवतार होता. हे मत सर्वथा चुकीचं आहे. रामानें रावणाच्या सुद्धां
हीताचाच विचार केला. आणि हीच गोष्ट रामावताराला
इतर अवतारांपेक्षा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतें!
रामानें रावणाचं हीतच पाहीलं. याचं उदाहरण अंगद शिष्टाई!
जेंव्हा, श्रीराम वानरसेनेसह
लंकेजवळ आले, तेंव्हा अंगद दूत बनून
रावणाकडे गेला होता. त्यावेळी रावणाला काय बोलू
असं अंगदनें रामाला विचारल्यावर रामरायानें सांगितलं, 'काज हमार तासूं हित होई'! ज्यानें साधूसंतांचा छळ
करून अधर्म वाढवला, दशाननी विचारधारेचा प्रभाव
वाढवला आणि आपल्या पत्नीचं अपहरण करून रघुकुलाच्या किर्तीला कलंक लावला अशा
रावणाचंही हित जपणारा अद्वितिय आदर्श पुरूषोत्तम म्हणजे श्रीराम!
अशा रामरायाचं संपूर्ण चरित्र, प्रत्येक प्रसंगाकडे, प्रत्येक जीवाकडे बघण्याचा
दृष्टीकोन आणि 'दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहः ||' ही वृत्ती ज्याला समजली
आणि ज्यानें त्याच आदर्शावर चालण्याचा प्रयत्न केला, त्याच्या अंतःकरणरूपी
अयोध्येत रामजन्म होऊन ती व्यक्ती समाजात खऱ्या अर्थानें रामराज्य प्रस्थापित करू
शकेल! ही अवस्था येण्यासाठी आपण
सर्वांनी सतत नामांत राहून कर्तव्य करावें, रामराया सर्वांचं
कोटकल्याण करेल!
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
शांती, साहस व असामान्य पातिव्रत्य: सीतामाई






! रामायण !
शांती, साहस व असामान्य
पातिव्रत्य: सीतामाई
श्रीराम!
जेंव्हा जेंव्हा जगत्कार्य करण्यासाठी
भगवंतानें अवतार घेतला, तेंव्हा तेंव्हा
त्याच्यासोबत शक्ती कार्य करत होती. शिव-शक्ती एकत्र आल्याशिवाय
साधुंचे परित्राण व दुर्जनांचा विनाश होत नाही. याच न्यायानें भगवंतानें
त्रेतायुगांत विप्र धेनु सुर संत हित लीन मनुज अवतार । आणि या कार्यात सीता ही शांती
रूपानें अवतरीत झाली...
वैशाख शुद्ध नवमी यादिवशी यज्ञासाठी भूमी
नांगरताना मिथिलानरेश जनकाला जमिनीतून एक मुलगी मिळाली. नांगराच्या फाळाला सीत आणि
सीतने जमिनीवर ओढलेल्या रेघेस सीता म्हणतात. म्हणून जनकाने या मुलीचे
नाव ‘सीता’ ठेवले....
जे शिवधनुष्य रावण, बाणासूर आदी वीर साधे
हलवूही शकत नव्हते, ते शिवधनुष्य सीतेनें
लहानपणी खेळता खेळता उचलले होते. अशा या शक्ती रुपी जगज्जननी सीतेनें
स्त्रीजन्मासाठी पुढे एक आदर्शवत् जीवन जगले. रामराया स्वयंवरासाठी
मिथिलेत आले तो प्रसंग फार विलोभनीय आहे....
विश्वामित्र मुनींसोबतचे दोन महातेजस्वी तरूण
पाहून विरागी, विदेही, निर्गुणोपासक जनक महाराज
सुद्धां राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या रामाच्या प्रेमात पडले! जनकानें विश्वामित्र
मुनींना विचारलें,
'महाराज, हे दोन तरूण नेमके कोण
आहेत? मुनीकुलतिलक की नृपकुलपालक? की ज्याचं वर्णन करतांना
वेदांनी नेति नेति म्हंटलं ते ब्रम्ह युगल अवतारांत आलं?'
विश्वामित्र मुनीं हसून, पण नम्रतेनं म्हंटलें, राजन् तुम्ही कधीही असत्य
बोलू शकत नाही. हे दोन तरूण सर्व ऋषी
मुनींचं रक्षण करण्यासाठी माझ्यासोबत आल्यानें ते मुनीकुलतिलक आहेत. ते दोघं अयोध्यासम्राट
दशरथ महाराजांचे चिरंजीव असल्यानें ते नृपकुलपालक सुद्धां आहेत!
हे ऐकून जनक महाराजांना रामाच्या परब्रम्ह
तत्वाची खात्री पटली!
आता हा विदेही जनक सगुण साकार परब्रम्हाच्या
रुपाला भुलून विचार करू लागला की या रामाशी मला नातं जोडलं पाहिजे. पण कोणतं? जनक मनांत विचार करतो, 'मी याचा पिता बनू शकलो
नाही. परंतु, मी ब्रम्हज्ञानी आहे. मग मी याचा गुरू बनू शकतो
का? पण, वसिष्ठ, विश्वामित्र मुनी याचें
गुरू असल्यानें मी त्याचा गुरू बनलो तर त्यांचा अनादर होईल! पिता बनू शकलो नाही, गुरू बनू शकत नाही. परंतु, आता जर विधात्यानें कृपा
केली आणि याच्या हातानें शिवधनुष्य भंग झालं तर याला माझा जावई करून याचा सासरा
तरी बनेल, पण काही ना काही नातं
मात्र नक्कीच जोडेल! संधी सोडणार नाही!
कल्पना करा काय मानसिक अवस्थेत जनक महाराज
असतील! यांतून एक महत्वाचा बोध
मिळतो की, ब्रम्हज्ञान प्राप्त
होऊनही, वैराग्यसंपन्न अधिकारी
महात्मा बनुनही जोपर्यंत भगवंताचं सगुण प्रेम मिळत नाही, तोपर्यंत जीवन कृतार्थ
झाल्यासारखं वाटत नाही. आणि हे रामप्रेम प्राप्त
करून घेण्यासाठी रामाशी कोणतं तरी एक नातं जोडलं पाहिजे! माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावें। हाचिं
सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावें ।।
या इच्छापुर्तीसाठी जनकानें मग विश्वामित्र
मुनींना महालात निवासाचा आग्रह केला. आणि रामरायाच्या निवासासाठी
सर्वांत सुंदर सदन जे सीतेचं होतं ते रिकामं केलं.सीतेच्या सदनाचं नावच 'सुंदरसदन' होतं. आणि बरोबरच आहे, भगवंत जे शांतीरूप सुंदर
सदन आहे तिथेंच निवास करतो! आपण आपलं अंतःकरण
नामप्रेमानें सुंदर बनवलं की रामराया तिथेंच वास्तव्य करेल!
याठिकाणी पुढील विलोभनीय प्रसंग अनेक आहेत, पण आता मोह आवरतो आणि पुढे
जातो....
संपूर्ण रामायण हे त्यागाच्या अधिष्ठानावर
आहे. याची प्रचिती येते ती
वनवास वचनाच्या प्रसंगापासून...
रामचंद्र वनवासांत जाण्यासाठी आनंदानें सज्ज
झाले असतांना सीतेनें देखील कैकयी मातेविरुद्ध कोणताही आकांडतांडव न करता
स्वतःदेखील वनवास भोगण्यासाठी सज्ज झाली....
रामानें विरोध केल्यावर ही शांतीमाता म्हंटली, तुम्ही माझे पती आहात आणि
मी तुमची पत्नी आहे म्हणून मी तुमच्या सोबत येण्याचा हट्ट धरला आहे असं नाही, तर तुम्ही रामचंद्र आहात
आणि मी चंद्रिका! चांदणी चंद्रासोबतच राहणार, हा विधीनियम आहे, तो तुम्ही नाकारू शकत नाही. तेंव्हा मला तुमच्यासोबत
येऊ द्या!
शंभू तेथें अंबिका, चंद्र तेथें चंद्रिका। संत
तिथें विवेका, असणे चि की।।
वनगमनाच्या वेळी कैकयीनें सीतेला वल्कले
नेसायला दिल्यावर वसिष्ठांसारख्या तपोनिष्ठ महर्षींनी सुद्धां प्रक्षुब्ध मनानें
कैकयीची निर्भत्सना केली, पण सीतेच्या मनांत आपल्या
सासूबद्दल कोणताही विकार किंवा क्रोध आला नाहीं.
श्रीरामाच्या तोंडून वनवासातील अनेक
प्रकारच्या क्लेशांना ऐकूनही सीता आपल्या निश्चयापासून यत्किंचीतही ढळली नाही. त्यामुळें, पतीसेवेपुढे जगातील सर्व
सुख आणि वैभव तुच्छ मानणाऱ्या सीतेला रामाला सोबत घ्यावें लागले.
सीताराम मला प्राप्त व्हावें ही जशी आपली
इच्छा आहे तशीच इच्छा रावण व शुर्पणखा यांची सुद्धां होती. रावणाला सीता हवी होती तर
त्याच्या बहिणीला राम हवा होता. परंतु, या बहीण-भावांचा हेतू आणि मार्ग
शुद्ध नव्हता!
श्रीराम हा भगवंत आणि सीता ही शांती! शांती सीता समाहिता
आत्मारामो विराजते। असं आद्य शंकराचार्यांनी
वर्णन केलं आहे. शुर्पणखानें शांतीला दूर
करून भगवंत आणि रावणानें भगवंताला दूर करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आणि जो कपटाचरणानें हरण
करून शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्या रावणाचा शेवट कसा
झाला, हे आपल्याला माहीत आहे!
अशोकवनांत रावणानें आपले वैभव आणि प्रलोभने
दाखवून सीतेचें मन विचलीत करण्याचे काही कमी प्रयत्न केले नव्हतें. परंतु, आपल्या पतिव्रता धर्म आणि
श्रीराम निष्ठेपासून सीतामाई स्वप्नांतसुद्धां ढळली नाहीं. तिन्ही अवस्थेत आणि
कुठल्याही परिस्थितीत मन, बुद्धी, चित्तामध्यें केवळ
पतीपरमेश्वराचेंच ध्यान हे या मातेचें चरित्र आहे.
पुढे रावणवधानंतर अग्नीदेवतेनें जिच्या
पावित्र्याला सिद्ध केलें अशा सतीसाध्वी सीतेला लोकापवादासाठी गर्भिणी अवस्थेत
पुन्हा वनवास भोगून शेवटी पाताळप्रवेश करावा लागला.
प्रेम, ममता आदी भावनेपेक्षा
कर्तव्य श्रेष्ठ असलेल्या रामचंद्राच्या बरोबरीचें किंबहुना काकणभर वरचढ ठरलेल्या
सीतामाईचें साहस, धर्मपरायणता, क्षमा आणि सेवाभाव पूजनीय
आणि अनुकरणीय आहे!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
Saturday, March 24, 2018
अतुल्य त्याग, सेवा व पराक्रमाचा संगम: लक्ष्मण






! रामायण !
अतुल्य त्याग, सेवा व पराक्रमाचा संगम: लक्ष्मण
श्रीराम! शेष हा भगवान नारायणाच्या
सोबतच राहणार, या न्यायानें रामावतारांत
शेषाने लक्ष्मण रुपानें रामचंद्राची सेवा हाच मुख्य धर्म आणि हेंच परमध्येय मानलें.
अत्यंत निष्कपट, तेजस्वी, त्यागी आणि पराक्रमी
लक्ष्मण विश्वामित्रांकडे यज्ञरक्षणासाठी आणि वनवासांत रामसीता सेवेसाठीं सदैव
छायेप्रमाणें भगवंताबरोबर राहिला.वास्तविक पितृवचनाची पुर्ती रामालाच बंधनकारक असुनही
लक्ष्मणानें सुद्धां १४ वर्षे ब्रम्हचर्यव्रतानें केवळ रामसीता सेवेंसाठी वनवास भोगला.
वनवासाला निघण्यापुर्वी माता सुमित्रा
लक्ष्मणाला म्हंटली,
"रामालाच
साक्षात पिता दशरथ, सीतेला माझ्याठिकाणी आणि
वनाला अयोध्या समज. त्यांच्या सेवेंत चुकूं
नकोस. आपला ज्येष्ठ बंधू, श्रीराम हीच तुझी परमगती
आहे."
आणि एक महत्वाची सूचना याठिकाणी सुमित्रा मातेनें
लक्ष्मणाला केली,
'हे
बघ! तू क्रोधावतार आहेस. पण या वनवास काळांत तुझ्या
मनांत जागेपणी तर सोड स्वप्नांतसुद्धा मोह, मद, अहंकार इ. विकार येऊ देऊ नकोस!'
यांवर लक्ष्मणानें उत्तर दिलं ते फार बोधप्रद
आहेच पण आचरायला कठीण आहे! तो म्हंटला, 'माते, मी जागेपणी तर मी पूर्ण
काळजी घेईल. पण झोपल्यावर चुकून
स्वप्नात मनामध्यें विकार आले तर तुझा अनादर होईल. परंतु, मी झोपलो तर स्वप्न पडेल
ना!'
असं म्हणून या सेवाधर्मी लक्ष्मणानें १४ वर्ष
जागरणाचा संकल्प केला आणि तो तडीस नेला....
हे केवळ लक्ष्मण आणि लक्ष्मणच करू शकतो. मन हा इंद्रियांचा राजा
आहे. त्या मनांत कोणताही विकार
येऊ नयें म्हणून ज्याचं लक्ष मनांवर आहे, तो लक्ष्मण!
लक्ष्मणाचे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे त्याच्या
मनाला जी गोष्ट खटकत असे, ती तो प्रखर शब्दांत
श्रीरामासमोर मांडत असें. अर्थात वीररसाच्या आवेशात
आणि रामाच्या प्रेमानें विवश होऊन तो असें वागायचा पण श्रीराम त्याला लगेच शांत
करीत.
एकूण अवतारकार्यात लक्ष्मणानें फक्त एकदांच
रामाच्या आज्ञेचें उल्लंघन केले ते म्हणजे सुवर्णमृग प्रसंगी वनदेवतांवर सीतेची
जबाबदारी टाकून तो सीतेच्या कठोर आज्ञेपोटी रामाकडे गेला. त्याचा परिणाम काय झाला हे
आपल्याला ठाऊकच आहे. म्हणूनच अवज्ञा
कदा हो यदर्थी न किजे । मना सज्जनां राघवी वस्ती किजे ।।
सीताहरणानंतर सुग्रिवानें जेंव्हा जंगलात
सापडलेली आभुषणें दाखवली, तेंव्हा लक्ष्मण म्हणाला, "हे बाजुबंद आणि कुंडले
माहीत नाहीत, पण ही पैंजणे मात्र नक्कीच
सीतामातेची आहेत. कारण, नमस्कार करतांना ती नजरेंस
पडत होती!" असें ब्रम्हचर्य व्रत, पुज्यभाव आणि मर्यादा
आजपर्यंतच्या मानव इतिहासात इतर कुठे बघायला मिळेल?
लंकाविजय करून रामराया अयोध्येत परत आल्यावर
एकदां अगस्ती ऋषी रामदरबारात आले होते. अगस्ती ऋषी म्हंटलें, लक्ष्मणासारखा वीरपुरूष
त्रिभुवनांत नाही,रामसुद्धा नाहीं. रामानें कुंभकर्ण, रावणासारख्या महापराक्रमी
राक्षसांना मारलं यांत मोठी विरता आहे. परंतु, इंद्रजीतला मारणं सर्वांत
दुष्कर कार्य होतं. कारण,इंद्रजीतला वरदान होतं की, ज्यानें १४ वर्षांत निद्रा
भोगली नाही, स्त्रीचं मुख पाहिलं नाही
आणि भोजनही केलं नाही, असाच वीर त्याला मारू शकत
होता! असा वीर लक्ष्मणाशिवाय
दुसरा कुणी नव्हता....
१४ वर्ष निद्रा नाही, स्त्रीचा चेहरा बघितला
नाही हे वैराग्य माहीत आहे, परंतु भोजनाचं काय?
तर, वनवासांत लक्ष्मण दररोज जी
फळे तोडून आणत होता, त्याचे तीन भाग करून
रामराया व सीतामाईला दिल्यावर तिसरा भाग तसाच ठेवून देत असे. (शबरीची बोरं न खाण्याचं
कारण इंद्रजीतला संपवणें हे होतं)
चौदा वर्षे लक्ष्मणानें स्वतःच्या वाट्याची
फळे तशीच ठेवून दिली. ती मागवण्यात आली तर
त्यातील फळांत ७ दिवसांची फळे कमी आढळली. त्या सात दिवसांचा हिशोब
लक्ष्मणानें दिला....वनवासांत दशरथ
महाराजांच्या स्वर्गवासाची बातमी समजल्यावर निराहाराचे दिवसांत फळे आणलीच नाही, इंद्रजीतनें नागपाशात
बांधले त्या दिवशी,रावणानें शक्ती मारली त्या
दिवशी आणि रावणवधाच्या आनंदानें आणखी एक दिवस अशाप्रकारे सात दिवस फळे न आणल्यानें
त्या सात दिवसांची फळे कमी भरली!
अतुल्य पराक्रमानें इंद्रजिताचा वध, श्रीराम राज्याभिषेकानंतर
सीतामातेला वनवासात नेऊन सोडण्याच्या ह्रदयविदारक आज्ञेचे पालन आणि शेवटी
प्रत्यक्ष रामरायानें आपलासुध्दां त्याग केल्यावर शरयूत देहत्याग करून
अवतारसमाप्ती! भगवंतानें स्वमुखानें
भक्ताला भक्तीचं तत्वज्ञान सांगावं हे क्वचितच घडतं! आपण मागे एकदां रामरायानें
शबरीला नवविधा भक्तीचं स्तवन केलेलं बघितलं. शबरी व्यतिरिक्त आणखी एका
भक्ताला भगवंताच्या मुखांतून नवविधा भक्तीचं चिंतन श्रवण करण्याचं भाग्य लाभलं! तो भक्त म्हणजे "लक्ष्मण"!
लक्ष्मणाच्या एकूण चरित्रातला प्रत्येक गुण
आजच्या माणसाला आदर्श तर आहेच पण तो आचरणांत आणून जीवन राममय करण्यासाठी बोधप्रद
आहे! या अनुपम चरित्राइतकं नाही
तरी किमान परस्त्री मातेसमान मानून अतिआहार, अतिनिद्रा, अतीबोलणं टाळलं आणि मनाचं
लक्ष नामाकडें ठेवून कर्तव्य केलं तर आपलं जीवन कृतार्थ होईल, यात संशय नाही!
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏
Subscribe to:
Posts (Atom)