Friday, January 26, 2018

'नामात महाराज आहेत' याची प्रचिती म्हणजे काय?

              

                  🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका- एक विचारायचं होतं... श्री बाबांचा डॉ. कुर्तकोटी यांच्याबरोबर झालेल्या संवादात असा उल्लेख आहे की, स्वामी म्हणाले, "या माळेवर खूप नाम झाले आहे. नामाचे अनुभव पण आले आहेत. त्या नामात महाराज आहेत याची प्रचितीदेखील आली."
ही प्रचिती काय असावी???
श्रीराम! प्रापंचिक अडचणीतून बाहेर पडणे, मनात ‘महाराज बघा’ असं म्हटलं आणि आपली समस्या सुटली, ही नामात महाराज असण्याची प्रचिती नाही. श्रीमहाराजांनी देहदृष्टीनेसुद्धा नामाशिवाय दुसरं काही जीवन जगलं नाही. त्रेतायुगात हनुमंताच्या हृदयात श्रीराम दिसले. कलियुगाचा विचार केला तर असे म्हणता येईल की नामाच्या प्रतापाने रामरायाच्या हृदयात महारुद्र जे मारुती रामदास असे श्रीमहाराज आहेत. आणि नाम हे रामरायापेक्षा व्यापक असल्याने नाम घेतले की तो रामराया आणि रामहृदयातून श्रीमहाराज प्रगट होतातच होतात. याचा एक उद्बोधक प्रसंग बघूया.

श्रीमहाराजांचे कानडी भाषेमध्ये एक चरित्र आहे. एकदा पुण्यतिथी पर्वकाळात म्हैसूरला एका शिष्याने त्याचे वाचन आणि विवरण केले. त्यावेळी श्रोत्यांमध्ये एक लहान मुलगासुद्धा होता. ९-१० वर्ष वय असेल त्याचे. आता महाराजांचं चरित्र म्हणजे नाममहिमा, दुसरं आणखी काय. तो लहान मुलगा लक्ष देऊन ते ऐकत होता आणि त्याच्या मनावर त्या चरित्राचा म्हणजे पर्यायाने नामाचा जबरदस्त ठसा उमटला.

पुढे एक-दोन वर्षांनी तो मुलगा फार आजारी पडला आणि त्याला cancer असल्याचे निदान झाले. त्यामुळे आईवडील स्वाभाविकपणे दुःखी कष्टी आणि हतबल झाले. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होते. कारण देहात रोग असला तर अंतःकरणात नामच होते. त्याची आई त्याला म्हटली, ‘तू एवढं नामस्मरण करतो तरी तुझा आजार बरा होत नाहीये.’ तो मुलगा हसून म्हटला, ‘आई, नामस्मरणाचा आणि आजाराचा काय संबंध?’ मग आईने विचारले, “मग नाम कशासाठी घेतो?” तो मुलगा पूर्ण छातीठोकपणे म्हटला, “नामात राहिल्याने महाराज भेटतात. बघ, महाराज माझ्याजवळ बसलेले आहेत. त्यामुळे मला फार समाधान लाभलं आहे. ते समाधान दुसरीकडे कुठेच मिळत नाही.”
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला ।
नाम आठविता रूपे प्रगट पै झाला ।।
आणि पुढे वर्षभराच्या आत त्या मुलाने प्राण सोडला. त्या दहा वर्षाच्या मुलाने जे अनुभवलं ते म्हणजे नामात महाराज आहेत ही प्रचीती!

मग आपण इतक्यावर्षांपासून नाम घेत असूनही आपल्याला ती प्रचिती का येत नाही? तर याचे महत्वाचे कारण म्हणजे देहतादात्म्य! देहतादात्म्य न सोडता नामाशी तादात्म्य कसे साधेल? मी देह आहे, हा अभिमान सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो नामाने समूळ मारावा, हा सद्गुरूंचा निरोप आपण कानाने ऐकतो, मनाने नाही. कारण मन देहाशी तदाकार झालेले आहे. देहाने नाम घेणे ही नामसाधनेची प्राथमिक पायरी आहे. ती आवश्यक आहे; परंतु महाराजांचं दर्शन होण्यासाठी पायरीवरच न थांबता आत प्रवेश करणे जरूर आहे. केवळ देहाने यंत्रवत नाम घेणे हे समाधीमंदिराजवळ जाऊन CCTV च्या माध्यमातून होणारे टीव्हीवरील दर्शन; तर मनाने नाम घेणे म्हणजे गाभाऱ्यात जाऊन श्रीचरणावर मस्तक ठेवण्यासारखे आहे. त्या मुलाने मनाने नाम घेतल्याने त्याला महाराजांच्या चरणाशी असल्याची प्रचिती अखंड येत होती.

आपण देहाशी मनाने एकरूप होऊन वाणीने नाम घेत असतो. कधीकधी देहभान हरपून वाणीबरोबर मनसुद्धा जेंव्हा नामाशी एकरूप होते, तेंव्हा ‘कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे’ हा अनुभव म्हणजे नामात महाराज आहेत ही प्रचीती येते. परंतु, आपला हा दिव्यानुभव फार काळ टिकत नाही. याचं कारण आपल्या मनाचं देहाशी तादात्म्य दृढ आणि जन्मोजन्मीचं आहे. 

श्रीमहाराज म्हणत, ‘सामान्य माणसाचं देहतादात्म्य त्याच्या बारशापासून ते बाराव्यापर्यंत सुटत नाही.’ वरील प्रसंगातील मुलगा वयाच्या बाराव्या वर्षीच मरण पावला. परंतु, या एक तप आयुष्यातील शेवटच्या दोन वर्षांत निष्ठेने नामतप केले आणि याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा काय असतो, याची प्रचिती घेतली.

शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती याच्याही पुढे जाऊन आत्मप्रचितीपर्यंत पोचणे हे साधकाचे ध्येय असावे. आपल्याला जर या सर्वोच्च प्रचितीपर्यंत पोचायचे असेल तर देहाबरोबर (वाणीबरोबर) मनाने नाम घेणे साधले पाहिजे. आणि हे साधण्यासाठी देहाचे लाड, देहाचे ममत्व कमी कमी होत गेले पाहिजे.
या देहाची हो कुरवंडी ।
पंचप्राण ओवाळून सांडी ।।

    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 

1 comment:

  1. ॥श्रीराम जय राम जय जय राम॥
    स्पष्टीकरण फारच सुंदर आहे!

    ReplyDelete