🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका- "जगी येतसे तीनदा संधिकाल" म्हणजे काय?
➡
श्रीराम!
तुम्ही कोणत्या अनुषंगानें विचारलं माहीत नाही. परंतु, मला असं माहीतीये की, भगवंत मनुष्याला आत्मज्ञान होण्याच्या
तीन संधी देतो....
पहिली
संधी जन्माला आलो तो क्षण!
दुसरी
संधी विवाहबंधनात अडकतो तो क्षण!
व
तीसरी संधी मृत्युचा क्षण!
या
तिन्हीपैकी एका संधीकालात भगवंताचं स्मरण मनुष्याला परमात्मज्ञान प्राप्त करून देऊ
शकतं!
संधी
म्हणजे जोडणे! जीव शिवाशी पुन्हा जोडण्याचा काळ म्हणजे संधीकाल! जन्माला आलं
त्याक्षणी मी कोण?
(कोहं, कोहं) असं बाळ रडत असतं. त्यामुळे, ती संधी ध्यानांत आली नाही!
दुसरी संधी विवाहबंधनात अडकतो तो क्षण:
त्यावेळी आपल्याला सर्वजण सावधान करतात, पण आपण सावध होत नाही. आणि जो त्यावेळी सावधान ऐकून सावध झाला, त्या राम-दासाला लोक समर्थ म्हणू
लागले!
तिसरी
संधी ही मृत्युच्या थोडं अगोदर मिळते! गेल्या शतकात, कागवाड येथे एक गणुबुवा म्हणून रामदासी रहात होते. श्रीमहाराजांच्या
पहिल्या दर्शनातच बुवांनी अनुग्रह घेतला आणि नामाचा जोर वाढवला! महाराजांच्या आज्ञेने गणुबुवांनी घरात
रामरायाची स्थापना करून रामोपासनेत राहिले. त्यांच्याकडे एक संतुबाई नावाची एक महारीण झाडलोट करत असे. (मला नाव नक्की आठवत नाही. संतुबाई
असावं कदाचित) ही
अडाणी बाई दिवसभर मुखानें नाम आणि हातानें साफसफाई अगदी मनापासून करत असे. महाराजांना बघितलं नाही, पण त्यांना आवडणारं नाम निष्ठेनं ही
बाई घेत असे...
तीचं
वय झालेलं होतं आणि अजून महाराजांचं दर्शन झालं नव्हतं. तीने मजुरीचे पैसे साचवून
शेजारच्या बाईकडे देऊन सांगितलं, "माझं मयतकार्य या पैशातून कर." अशातच महाराज कागवाड येण्याचं ठरलं... जेंव्हा गणुबुवांनी या महारणीला
विचारलं, "महाराज आले की त्यांना काय मागशील?" तेंव्हा, ती म्हंटली, "तोंडात रामाचं नाव राहू द्या आणि चांगलं मरण द्या!"
महाराज
येणार, महाराज येणार या ध्यासानें तिचा नामाचा
जोर वाढला. श्रीमहाराज कागवाडला आले
तेंव्हा हीनें डोळे भरून महाराजांना बघितलं आणि पायावर डोकं ठेवलं. थोड्या वेळाने ती म्हंटली, "महाराज, सांभाळा मला! मी घरी चालले!" श्रीमहाराज म्हंटले, 'रामराया तुझ्या सोबत आहे. जा घरी!'
ती
बाई घरी जाऊन घोंगडीवर पडली आणि 'राम राम राम' म्हणून शांतपणे देह सोडला! महाराजांनी
स्वतः तिच्या अंतिमविधीसाठी पन्नास रूपये दिले आणि नंतर तिच्या नावे अन्नदान
करतांना महाराज म्हंटले, "ती
एक अधिकारी भक्त होती. तिची उच्चकोटीची भक्ती कुणाला लक्षात आली नाही.
पूर्वकर्मानें ती महारीण झाली, पण आता रामरायाच्या ध्यासानें तिला सद्गती मिळाली!" तिसरा संधीकाल हा आहे! मृत्युपुर्वी एखादा मनुष्य बेशुद्ध जरी असला
तरी काही क्षण तो शुद्धीवर येतो. आणि त्या क्षणी जर त्याला भगवंताचें स्मरण घडलं
तर त्याचा उद्धार झालाच!
यासंदर्भात
अर्जुनानें श्रीकृष्ण परमात्म्याला एक शंका विचारली, "हे मोहन, जर शेवटचा क्षण भगवंताच्या स्मरणात गेल्यावर मोक्षलाभ असेल तर
आयुष्यभर विषयभोग घेऊन सर्वच लोक शेवटच्या क्षणी नाम घेऊन उद्धरून जातील ना!" भगवंत म्हंटले, दिवसभर ज्याचं चिंतन असेल तेच
स्वप्नांतसुद्धां येतं. तसंच आयुष्यभर विषयाचंच चिंतन केलं असेल तर शेवटचा संधीकाल
विषयाचंच स्मरण करेल. त्यामुळे, अंतकाळी भगवंताचें स्मरण व्हावें अशी
इच्छा असेल तर आयुष्यभर भगवंताचंच स्मरण राखावं लागेल!
श्रीमहाराज
म्हणत, तुम्ही जागेपणी नाम घ्या, झोपेत आणि स्वप्नांत नाम येण्याची
जबाबदारी माझी! तेंव्हा, पहिली संधी लक्षात आली नाही, दुसरी संधी हुकली आहे. आता तिसरी आणि
शेवटची संधी सोडू नयें!
पुन्हा
नाही ऐसी वेळ!
कारण, आयुष्याचा भरवंसा नाही. म्हणून शक्य
तितक्या त्वरेनें व तळमळीनें कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा!
रघुवीरजी एक विचारू का हो? पहिली संधी सगळ्यांचीच चुकणार ना? मग ती संधी ग्राह्य कशी मानायची?
श्रीराम!
मी वर म्हंटलं की दुसरी संधी हुकली. पहिली हुकली नाहीच. पहिली संधी लक्षात आली नाही, असं म्हंटलो! पहिली संधी म्हणजे जन्म!
हो. पण तिचा कुणालाही उपयोग करून घेता येणार नाही. मग ती वायाच जाणार.
एखादा
सामान्य मनुष्य जेंव्हा अधिकारी संतसत्पुरूषाला शरण जाऊन त्यांच्याकडून 'नाम' प्राप्त करून घेतो, हे शिष्यत्व म्हणजे खरा जन्म! हे शिष्यत्व खऱ्या अर्थानें आपल्या तन, मनांत रुजवलं मात्र पाहिजे! आणि ही जी पहिली संधी आहे ती लौकिक जन्माला येतांना मिळते आणि आजन्म
ती तशीच राहते! त्या
पहिल्या संधीची validity
लाईफटाईम
असते. तिसरी संधी येतांनाच ती पहिली संधी expire होते!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
Shri Ram
ReplyDelete