Monday, January 1, 2018

प्रारब्धाधीन जगणे आणि प्रारब्धाला अधीन करून जगणे यातील फरक काय आणि ते कसे करावे?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका- प्रारब्धाधीन जगणे आणि प्रारब्धाला अधीन करून जगणे यातील फरक आणि ते कसे करावे यावर बोलावे ही विनंती!

।। प्रारब्ध पुरूषार्थ ।।

श्रीराम! आपण असं वाचलं म्हणत आहात की, प्रारब्धाच्या अधीन न होता प्रारब्धाला अधीन करून घेणं याला पुरूषार्थ म्हंटलं आहे! भगवंत शास्त्र शिकवतो, तर संत कला शिकवतात! प्रारब्ध कसं असतं हे भगवंत शिकवतात, सांगतात; परंतु आलेलं प्रारब्ध कसं भोगावं ही कला संत आचरून दाखवतात.....

प्रारब्ध हे नेहमी कटूच असतं असं नाही, ते सुखदसुद्धां असतं. परंतु, आपलं कसं असतं? प्रारब्धयोगानें चांगलं काही घडलं तर आनंद वाटतो आणि प्रारब्धवश काही अनपेक्षित घडलं तर दुःख होतं! एखाद्या अतिशय गरिब माणसाला प्रारब्धयोगानें लकी ड्रॉ मध्ये कार मिळाली तर त्याला किती आनंद होईल! पण त्या कारमध्ये डिझेल टाकायला पैसे नसल्यानें ती कार विकण्याचं प्रारब्ध पुढे वाढून ठेवलेलं असेल. त्यातून आलेल्या पैशानें तरी तो पूर्ण सुखी होत नाही. कारण, माझं नशिब बलवत्तर आहे असं समजून तो लॉटरी, लकी ड्रॉ इ. च्या आहारी जाऊन दयनीय अवस्था करून घेतो! तात्पर्य हे की प्रारब्धानुसार जीवनात बरे वाईट प्रसंग येतच राहणार. आपण त्यांना कसं सामोरे जातो यांवर नवीन प्रारब्ध अवलंबून असतं!

मग यावर कसा मार्ग काढावा? तर यावर उपाय म्हणूनच पु. आगाशे काकांनी प्रारब्धाला अधीन करून घ्यायला सांगितलं आहे!

एक उदाहरण बघुया.... एखाद्या माणसाला काही रोग झाला आहे. त्याचा रोग जाण्यासाठी त्यानें नियमितपणे औषध घेणं जरूरी आहे. त्याबरोबर काही फलाहार वगैरे सुद्धां सुचवला जातो. फलाहार आनंदानें घेता येतो. पण ते औषध जे अतिशय कडू आहे, ते घेण्याचा रोगी कंटाळा करणारा असेल तर डॉक्टर त्याच्या मानगुटीवर बसून त्याला ते पाजतात. तसं आपण सर्वजण भवरोगी आहोत. आपल्याला प्रारब्धवश काही कटू प्रसंगांची औषधं व काही गोड प्रसंगसुद्धां भोगावें लागतात. एखादा भवरोगी ते वाईट प्रसंग घेण्याचा कंटाळा करणारा असेल तर नियतीरूपी डॉक्टर त्याच्या छाताडावर बसून त्याला ते कटू प्रसंग पाजतात. त्यामुळे या भवरोग्याला तो कडवटपणा जाणवून त्रास होतो. याला प्रारब्धाधीन होणें म्हणतात.

दवाखान्यात भरती केल्यावर उपचार करवून घेणं अनिवार्यच असतं. त्यातून सुटका नाही. तसं भगवंतानें जगांत भरती केल्यावर प्रारब्ध उपचार करवून घेणं अनिवार्यच असतं. परंतु, एखादं अतिशय कडू औषध जे नकोसं वाटतं, ते जर मधात टाकून घेतलं तर कडवटपणा जाणवत नाही पण त्या औषधाचा गुण मात्र येतो! त्याचप्रमाणें , जीवनात अतिशय कटू प्रसंग येणं नकोसं वाटतं. परंतु, ते जर गोड नामांत टाकून भोगले तर जीवनातील कटूतेचं कर्ज कमी होईल व समाधानाचा गुण येईल! यालाच प्रारब्धाला अधीन करून घेणं म्हणतात.

दवाखान्यात येऊन डॉक्टरच्या स्वाधीन होणं तसं जन्माला येऊन सद्गुरूंच्या स्वाधीन होणं! मग जे करायचं ते सद्गुरू करतील, हा विश्वास असावा आणि त्याच विश्वासानें सद्गुरूंनी prescribe करून दिलेल्या प्रारब्ध औषधी स्विकारावी! प्रत्येक जीवाला श्वास जेवढा अनिवार्य आहे, तेवढाच परमार्थात साधकाला विश्वास अनिवार्य आहे! श्वास थांबला की प्राण गेला, तसं सद्गुरूंवरचा विश्वास गेला की आपलं अध्यात्म गतप्राण होतं!

समर्थ रामदास स्वामी, सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज या संतांनी प्रेत उठवलं! परंतु, हे पुन्हा पुन्हा केलं नाही. याचं कारण त्या व्यक्तीच्या प्रारब्धयोगानें त्याची जीवनमर्यादा वाढणार होती! ज्या परब्रम्ह परमात्म्यानें आपल्या गुरूपुत्राला एक तपानंतर जिवंत केलं, त्या श्रीकृष्णानें आपल्या स्वतःच्या सहा भावंडांना का जिवंत केलं नाही? देवकी मातेनें कारण विचारलं तेंव्हा कृष्णानें तिच्या डोळ्यांना हात लावून तिच्या गेल्या जन्मातील पापाचं स्मरण करून दिलं की हे तुझं प्रारब्ध आहे.

भिष्म पितामह जेंव्हा शरपंजराचं प्रारब्ध भोगत होते, तेंव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारलं की मी आयुष्यभर सदाचरण, धर्माचरण करुनही मला हे दुःख का? यांवर भगवंतानें त्यांना दिव्यदृष्टी देऊन मागचा जन्म बघायला सांगितलं. त्यात कोणतंही पापकर्म दिसलं नाही. मग आणखी मागचे जन्म बघायला सांगितलें. शेवटी, शंभर जन्मापुर्वीचं पापकर्म संचित होऊन या जन्मांत प्रारब्ध बनून भोगावं लागत आहे, हे त्यांना समजलं!

रामावतारात प्रारब्ध या विषयावर राघवाची सद्गुरू वसिष्ठमुनींनी बरोबर चर्चा झाली. त्यात रामानें प्रारब्ध कसं बलवान आहे हे सांगितलं. परंतु, वसिष्ठमुनींनी ते नाकारून प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ हे पटवून दिलं! अर्थात, प्रयत्न परमार्थात श्रेष्ठ तर प्रारब्ध प्रपंचांत श्रेष्ठ असं आहे. आपण उलटं करतो! प्रपंचांत प्रयत्न श्रेष्ठ मानून अहंकार वाढवतो आणि मग प्रारब्धाच्या अधीन होऊन सुख दुःख भोगतो आणि परमार्थात म्हणतो रामाची इच्छा असेल तर येऊ दर्शनाला! म्हणजे परमार्थात प्रयत्न न करता प्रारब्धावर सोपवतो. असं वागणं हे प्रारब्धाच्या अधीन होणं आहे. याउलट, प्रपंचांत प्रयत्न केल्यावर जे प्रारब्धात आहे ते होईल असं मानावं! कारण प्रारब्ध अगोदरच निश्चित झालं आहे! परमार्थात मात्र प्रयत्न करून प्रारब्धाला समाधीप्रवेशाचं माध्यम बनवता येतं! यालाच प्रारब्धाला अधीन करून घेणं म्हणतात! यात चिंता जाऊन भगवद्चिंतन घडतं आणि कटू प्रारब्ध आलं तरी समाधान अढळ राहतं! तेंव्हा, या चिंतनातून एकच बोध घ्यावा :
प्रारब्ध पहले रचा, पीछे रचा शरीर ।
तुलसी चिन्ता क्यो करे, भज ले श्री रघुवीर ।।

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

4 comments:

  1. प्रारब्धाचे कटू प्रसंग आल्यावर त्यातल्या कटुपणाकडे दुर्लक्ष होऊन गोड नामावर लक्ष केंद्रित करणं किती जणांना जमतं? म्हणजे जगाला तसं वाटून उपयोगी नाहीं पण स्वतःला छटोठोकपणे तसं खात्रीपूर्वक सांगता आलं पाहिजे की कुठलाही प्रसंग येवो, माझं लक्ष नामाकडेच राहील!मी १९८५ सालपासून नाम घेतो पण असं खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीं.

    ReplyDelete
  2. प्रारब्धाचे कटू प्रसंग आल्यावर त्यातल्या कटुपणाकडे दुर्लक्ष होऊन गोड नामावर लक्ष केंद्रित करणं किती जणांना जमतं? म्हणजे जगाला तसं वाटून उपयोगी नाहीं पण स्वतःला छटोठोकपणे तसं खात्रीपूर्वक सांगता आलं पाहिजे की कुठलाही प्रसंग येवो, माझं लक्ष नामाकडेच राहील!मी १९८५ सालपासून नाम घेतो पण असं खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीं.

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीराम! हे एक विदारक सत्य आहे. अनेकानेक जन्मांची वासना गाठीशी घेऊन पुन्हा या जन्मात त्यातल्या त्यात विषयी कलियुगात वावरतांना माझ्या मनावर प्रारब्धवश आलेल्या कटू प्रसंगांचा परिणाम होणार नाही अशी आत्मबुद्धी प्रगट झालेला मनुष्य अंतःकरण दृष्ट्या फार जबरदस्त असला पाहिजे.
      "तुम्ही नाम घ्या, बाकी सगळे मी बघून घेईल!" या श्रीमहाराजांच्या बोधवचनाची ढाल करून आपण एकीकडे वरवरचं यांत्रिक पद्धतीने नाम घेत असतो तर दुसऱ्याबाजूने नको ते आचरण करत राहतो. त्यामुळे आपण नामाच्या जोरावर अध्यात्मिक उंची गाठण्याऐवजी दुर्दैवाने नामालाच खाली खेचत आहोत, याची आपल्याला जराही कल्पना येत नाही.
      तेंव्हा, गोड नामावर पूर्ण लक्ष लागावं असं मनापासून वाटत असेल तर प्रत्येक क्षणाला अगदी प्रत्येक क्षणाला मनाने सावध राहून शक्य तितके सदाचरण आणि सदास्मरण सांभाळणे ही कलीयुगातील साधनेची महत्वाची अट आहे! त्याशिवाय परमार्थ नाहीच.

      Delete
  3. श्रीराम जय राम जय जय राम !

    ReplyDelete