Thursday, January 4, 2018

श्रीकृष्ण कळायचा असेल तर अगोदर रामासारखं आचरण करावं लागेल, म्हणजे काय? किर्तन आणि प्रवचन यात फरक काय?


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- श्रीराम समर्थ! श्रीकृष्ण कळायचा असेल तर अगोदर रामासारखं आचरण करावं लागेल!!! दादा, यावर थोडं जमेल तेव्हा विवेचन करावं.
किर्तन आणि प्रवचन यात फरक काय आहे !‬‬‬‬‬‬‬‬


श्रीराम! किर्तन म्हणजे कान्हा श्याम; प्रवचन म्हणजे पुरूषोत्तम राम!

किर्तन श्रीकृष्णावतारासारखं वरपांगी मनोरंजक वाटतं, तर प्रवचन श्रीरामावतारासारखं कठोर मनोमंथन वाटतं. परंतु, किर्तनातील नवनित मिळवण्यासाठी प्रवचनातील अर्क अंगात उतरला पाहिजे!

म्हणजे दादा जर का किर्तनाची तयारी एखाद्या साधकाला करायची असेल तर आधी नाम,नंतर प्रवचन व त्यानंतर किर्तन असेच ना?

हो, आधी नाम, नंतर प्रवचन, नंतर किर्तन आणि शेवटी नाम! नाम अनादी अनंत आहे! किर्तन, प्रवचन हे आवरण आहे; परंतु खरं तत्व नामच आहे, दुसरं कोणतं नाही! नाम अनाम अनंत है, दुजा तत्व न होई।।

आज विचारलेल्या किर्तन -प्रवचनातील फरक आणि काल विचारलेल्या राम-कृष्ण संबंध या दोन्हींचा अन्योन्य संबंध आहे. किर्तन म्हणजे कान्हा श्याम; प्रवचन म्हणजे पुरूषोत्तम श्रीराम!

प्रत्येक प्रापंचिक साधकानें किर्तन-प्रवचन जगलं तरच त्याचा प्रपंच परमार्थ कल्याणाचा होईल! किर्तनात लीला असतात; आपल्या जीवनातसुद्धां लीला असतात. कितीतरी चांगल्या वाईट माणसांसोबत आपल्याला प्रपंच आणि व्यवहार करावा लागतो. या सर्वांशी दोन हात करतांना रामाच्या मर्यादा आचरणें अत्यंत कठीण जाते. अशावेळी आपण श्रीकृष्णावतार जगत असतो. म्हणूनच श्रीमहाराजांनी गोंदवल्यात मस्तकावर श्रीकृष्ण घेतला.

अनेक साधक मला म्हंटले की, साधनेला जोर चढतोय, पण घरातील मंडळींकडून उपेक्षा, विरोध किंवा नाराजी व्यक्त होतोय. एकीकडे प्रापंचिक अपेक्षा दुसरीकडे पारमार्थिक ओढा यांत रस्सिखेच होतीये. काय करावं?

किर्तनात ताल, सूर, लय सर्व सांभाळून चिंतन मांडलं तर मनोरंजनातून नकळत मनोमंथन घडतं. त्याचप्रमाणें, प्रपंचांत घरातील लोकांचे एकेक ताल, बाहेरील समाजाचा निराळाच सूर व आपल्या व्यक्तिगत साधनेची लय यांना सांभाळून वर्तन केलं तर घरच्यांचं मन राखलं जाईल, त्यांचं मनोरंजन होईल व हे सर्व व्यवस्थित जमवल्यानें आपलं पारमार्थिक मंथनही होईल. आणि ही कसरत, ही लीला साधायला भगवंताचें श्रीकृष्ण रूपच समर्थ आहे!

श्रीकृष्णावताराकडे काही लोक विशेषतः कट्टर रामभक्त लबाडी किंवा मनोरंजन या दृष्टीकोनातून बघतात. जो स्वतःला रामभक्त म्हणवतो तो श्रीकृष्णाला जीवनात उतरवल्याशिवाय अंतःकरणात राम, आत्माराम प्रगट करू शकणार नाही! "आधी प्रपंच करावा नेटका" याचा मी अर्थ असा काढेल की, प्रपंचाला नाटक समजून आपल्याला मिळालेली प्रत्येक भूमिका नेटकेपणानें नटवली तरच परमार्थ साधेल!

ज्याला प्रपंचांतील नाटक गाजवता आलं नाही, तो परमार्थासाठी अपात्र आहे.

कालची एका साधकाची व्यथा बघा :

Shreeram!  Dada maza  aanand , samadhan akhand nahi he kalale..... mulicha maths cha paper khup kathin hota.....ti khup radali tevha aanand samadhan gayab zale.

त्यांना मी म्हंटलं, जर मुलीच्या अपयशानें तुम्ही व्यथित झाला नसता तर तुम्ही परमार्थात अपयशी झाला असतात. तेंव्हा, तुमचं व्यथित होणं हेच दर्शवतं की तुम्ही पालकाची भूमिका छानच बजावली!

श्रीकृष्णानें गीतेत सांगितलं की, धर्माच्या अविरूद्ध कर्मात मी आहे! आईवडिलांनी मुलांच्या दुःखाला आपलं दुःख मानणं, हा धर्म आहे. आणि तुम्ही हा धर्म बजावता, तेंव्हा तुमचं आचरण धर्माचरण म्हणजेच कृष्णाचरण आहे! यांत, मुलगी रडत असतांना तुम्ही रामरायाप्रमाणें लगेच अभ्यास मर्यादा वगैरे सांगितलं तर ते योग्य ठरणार नाही! अशावेळी तुमचं व्यथित होणं तिची व्यथा कमी करेल. ही शुगर कोटेड गोळी म्हणजे किर्तन!

आणि मग थोड्या वेळाने तुम्ही अभ्यासातील त्रुटी, वेळेचं नियोजन इ. कडू गोळीचं प्रवचन दिलं तर त्या प्रवचनाचा चांगला गुण येईल. आणि मग पुढच्या परिक्षेत तिला चांगले गुण मिळतील! तेंव्हा, अशाप्रकारे प्रपंचांत समरस होऊन साधनेला लागणं ही खरी कला आहे. आणि ही कला साधण्यासाठी कान्हाची लीला डोळ्यासमोर ठेवावी!

परंतु, किर्तन ऐकतांना जर आपण लीलांमध्ये मनाचं रंजन करत गेलो व त्याचं सार गमावून बसलो तर पंचपक्वान्न खाऊन उपाशी राहिल्यासारखं होतं. त्याचप्रमाणें, प्रपंचांत समरस होतांना त्यातच रमलो व परमार्थ गमावून बसलो तर समाधानाची तृप्ती मिळणार नाही. आणि म्हणूनच देहानें कृष्णाचरण करतांना मनानें रामाचरण ठेवणें जरूर आहे! देहानें कृष्णाचरण केल्यानें बाह्यांगानं शुद्धता मिळेल; तर मनानें रामाचरण केल्यानें अंतरंगानें पवित्रता मिळेल!

आपल्याला समुद्र बघायला फार आवडतो. विशेषतः त्या एकानंतर एक उसळत येणाऱ्या लाटा! हा समुद्र वरून स्वच्छंदपणें उसळलेला दिसत असला तरी तो तळाशी अतिशय शांत, स्थीर असतो, निश्चल असतो! या माणसाला मोहून टाकणाऱ्या लाटा म्हणजे मनमोहन श्रीकृष्ण! यानें मनोरंजन होतं, यात प्रत्येक लाट निराळी, वेगवेगळ्या छटांची. किर्तन असंच असतं; प्रत्येक वेळी वेगळा भाव, वेगळी छटा! परंतु, या उसळणाऱ्या लाटांचं अधिष्ठान म्हणजे त्याचा शांत, निश्चल पाया म्हणजे पुरूषोत्तम श्रीराम! वरून कितीही उसळला तरी आंत स्थीर, शांत, समाधानी! तोच निर्गुण निराकार सुप्त आनंद! अंतःकरणाच्या तळाशी असं स्थीर रामाचरण असेल तर वरच्या कृष्णाचरणानें येणाऱ्या लाटांचा त्रास न वाटता मजा वाटेल!

अंतःकरणात रामरायाचं सतत स्मरण असेल तर प्रत्येक क्षणी येणारा नवीन प्रसंग, प्रपंचांतील, व्यवहारातील आव्हानांच्या लाटा या कान्हाच्या लीला वाटतील. आणि देहानें कृष्णाचरण व मनानें रामाचरण केल्यानें देह ज्या घरांत राहतो, ते घर गोकुळ; तर देहाच्या आत जे अंतःकरण आहे ते अयोध्या बनेल! परवा, एका साधकानें मला विचारलं की, माझ्यासाठी महाराजांचा काय निरोप आहे तो सांगा! मी म्हंटलं, महाराज म्हंटले की "आनंदसागर हो!!!" आनंदसागर वरून उसळत असतो, कारण तळाशी तो स्थिर असतो! तळाचं स्थैर्य स्वान्तःसुखाय असतं, तर वरची उसळी जनसुखाय असते!

अंतःकरणातील श्रीराम हा स्वान्तःसुखाय ठरेल, त्यालाच प्रवचन म्हणावं! मला रामरायाच्या इच्छेनें साखरखेर्डा, गोंदवले, जालना, औरंगाबाद इ. ठिकाणी जी प्रवचन सेवा घडते, ती मी लोकांना उपदेश द्यायचा म्हणून करत नसून ती सेवा स्वान्तःसुखाय असते. त्या प्रवचनातील थोडासा अर्क माझ्या अंतःकरणात स्थीर झाला तरी कल्याण करी रामराया!!! तेंव्हा, प्रवचन हे स्वान्तःसुखाय असते तर किर्तन हे जनसुखाय असते! याठिकाणी सुख हा शब्द समाधान या अर्थानें घ्यावा!

आपली पारमार्थिक साधना म्हणजे प्रवचन; तर प्रापंचिक सेवा म्हणजे किर्तन! आपली साधना मनांत असेल तर आनंद मिळेल. आणि त्या आनंदाच्या लाटा बनून त्या लाटा जनसेवेत म्हणजे कुटुंबातल्या लोकांच्या सेवेत गेल्या तर 'आनंदसागर' तयार होईल! तेंव्हा, या चिंतनातून एकच विनवणी करावी वाटते की, प्रपंच परमार्थ दोन्ही कल्याणाचं होण्यासाठी राम-कृष्ण संबंध जोपासावा, "आनंदसागर" उसळेल!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏 

1 comment: