Tuesday, January 23, 2018

प्रवासात नेहमी नाम छान होते. यामागे काही कारण असेल का? कृपया सांगावे!

 🌹🌷🌹 " नामप्रेमचिंतन "  🌹🌷🌹

शंका- प्रवासात नेहमी नाम छान होते. यामागे काही कारण असेल का? कृपया सांगावे!


श्रीराम! प्रवासांत नाम छान जमतं म्हणजे खरोखर एक प्लस पॉईंट समजावा!

पण, थोडं व्यापक अंगानें बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की, ज्याला नामाची गोडी लागलेली आहे, तो एखाद्या लग्नसमारंभ, पार्टी यांतसुद्धा अनुसंधान टिकवू शकेल; याऊलट ज्याला त्यात रस नाही तो श्रींच्या समाधी मंदिरात बसल्यावरही विषयाचंच चिंतन करेल....
अंतरीचें धावें स्वःभावें बाहेरी।।

तरिसुद्धां, इतरत्र म्हणजे घरी, मंदिरात ज्यांना नामांत तंद्री लागते, त्यांच्यापैकी काहींचं प्रवासांत नाम छान चालतं, तर काहींना ते साधतच नाही....

मला व्यक्तीशः असं वाटतं की, समारंभात, बाजारात किंवा प्रवासांत गर्दी असते, पण प्रवासात सापेक्षतः चांगलं नामस्मरण होतं.

याचं कारण असं असावं की समारंभ किंवा बाजार इ. ठिकाणी जे विषयी वातावरण असतं ते प्रवासांत कमी असतं!

कसं ते पहा,

समारंभात भोगासक्ती जास्त असते, तर बाजार इ.ठिकाणी व्यावहारिक आसक्ती जास्त असते.

कारण समारंभात आलेली सर्व मंडळी ही एकमेकांना ओळखत असतात. परिणामी, न बोलणाऱ्याला देखील इकडचं, तिकडचं बोलावं लागतं.

समारंभात बऱ्याच दिवसांनी भेटलेली माणसं मग आपला भूतकाळ, वर्तमान विचारून भविष्याबद्दल सल्ले देताता किंवा त्यांचा भूतकाळ उकरून अनावश्यक चर्चा करतात. या सगळ्या विषयी गर्दीत अनुसंधान निसटून जातं.

बाजारात वगैरे परिचयाचे लोक तुलनेनें फारच कमी असतात. परंतु, स्वार्थ आणि अर्थ(पैसा) यांवर आधारीत ते एकत्रिकरण असल्यानें तिथें चिंतन व्यवहाराचंच होणार. अशा स्वार्थात परमार्थ साधणं कठीण जातं!

या दोन्हीच्या तुलनेत प्रवासांत एकत्र आलेली बहुतांश मंडळी ही अनोळखी असतें. त्यामुळें, बोलण्याची फारशी गरज पडत नाही. (आता काही लोक अनोळखी प्रवाशासोबत संपूर्ण प्रवास पुरून उरेल इतक्या गप्पा मारतात, तो भाग निराळा!)

प्रवासांत सुद्धां विषयी माणसं असतातच. परंतु, प्रवास हा स्थीर नसल्यानें, हलता असल्यानें लोक शक्यतो बाहेरचा निसर्ग तरी बघतात किंवा गार हवा लागल्यानें झोपी जातात. (यांत काहीवेळा तर गाढ झोप लागून कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे सुद्धां बघायला मिळते!) या कारणांमुळें बस, रेल्वे इ. प्रवासांत विषयी माणसं असतात, पण त्यांचा विषय बऱ्याच अंशी शांत, सुप्त असतो.

त्यामुळें, ज्याला नामाची गोडी आहे त्याला हे प्रवासाचं वातावरण थोडं पोषक वाटतं. कारण, काम काहीच नाही, मुक्काम ठरलेला आहे, चालक गाडी चालवतोय आणि तो आपल्याला इप्सित स्थळी सुखरूप नेईल, हा भरवंसा सुद्धां आहे. मग आता स्वस्थ बसून नाम घ्यायला कसली आडकाठी आहे!

ज्याला या प्रवासांत परमेश्वराचा वास अनुभवायचा असेल त्यानें नामाची तार जोडून पहावी.

आपण उकाडा वाढला की कुलरच्या गार हवेत मस्त झोपतो. पण त्या कुलरच्या पाण्यांत सुगंधी द्रव्य टाकलं तर गार हवेबरोबर, सुगंधी निद्रादेवीचा अनुभव येतो. त्याचप्रमाणें, प्रवासांत गार हवा सुटली की इतर सर्व लौकिक निद्रेत जातात आणि त्यांचे विकार स्वस्थ होतात. नेमकं त्याच वेळी त्या गार हवेत नामाचा परफ्युम घालावा, समाधीसुखाचा अनुभव येईल!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

2 comments: