Friday, January 19, 2018

मरणाचे स्मरण असावे | हरिभक्तीसी सादर व्हावे || यावर थोडंसं सांगावं!


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका : मरणाचे स्मरण असावे | हरिभक्तीसी सादर व्हावे || यावर थोडंसं सांगावं!



श्रीराम! भगवंत नेहमी भक्त-अभक्त बघून पक्षपात करतो. संत, सद्गुरू देखील पूर्ण कृपा करतांना शिष्यांमध्यें पक्षपात करतात. परंतु, मृत्यू कधीही पक्षपात करत नाही. मृत्यूनें कंसाला कवटाळले, तसे परब्रम्ह परमात्मा श्रीकृष्णाला देखील कवटाळले. रावणाला देह सोडून जावे लागले, तसें रामरायाला देखील नश्वर देह ठेवून वैकुंठात जावे लागले.
कोणत्याही प्राण्याच्या आणि त्यातल्या त्यात नरदेहाच्या संचित कर्माचा हिशोब पूर्ण झाला की मृत्यू ती व्यक्ती संत आहे की नास्तिक हे बघत नाही; भगवंत आहे की दानव हे बघत नाही; लहान मूल आहे की तरूण आहे की जख्खड वयोवृद्ध हे बघत नाही; पूण्यवान आहे की महापापी हे बघत नाही.
अकस्मात सांडुनिया सर्व जाती ॥

वेळ आली की हातातलं काम टाकून त्याला जीवनाला राम-राम करावा लागतो.
दररोज वर्तमानपत्रात आपण इतके आकस्मिक मृत्यू वाचतो, पण आपल्याला त्याचं फारसं काही वाटत नाही. परंतु, जेंव्हा जवळचा एखादा मनुष्य जातो तेंव्हा आपण हादरून जातो. आणि मग त्याबद्दल अतोनात शोक करून आयुष्याच्या अनिश्चिततेबद्दल क्षणिक चिंतन करतो. आणि दुःखद चिंतनातून नश्वर गोष्टींबद्दल आपल्या मनांत जे वैराग्य येतं, ते म्हणजे "स्मशान वैराग्य"! आणि आपलं हेच आपलं दुर्दैव आहे की भगवंत किंवा संत आपल्याला वेळोवेळी अशा घटनांमधून जागं करण्याचा प्रयत्न करतात.
होऊनिया जागे, उठा वेग करा ।
शरण जा उदारा, रघुवीरा ।।
जो यांतून बोध घेऊन तसं आचरण करतो, तोच मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवून रामचरणी लीन होतो!

जन्म आणि मृत्यू यांतील अंतर खरं किती आहे, यांवर एक दृष्टांत बघुया...
एक सज्जन एका नवीन गावांत स्थलांतरीत झाला. गावांत येतांना वेशीजवळ असलेल्या स्मशानभूमीकडे लक्ष गेले आणि त्याला आश्चर्य वाटलं.  त्याठिकाणी लहान लहान पट्टीवर मृत व्यक्तीचं नाव आणि त्याचं वय लिहिलेलं होतं. कुणाच्या नावाखाली २० वर्ष, कुणाच्या नावाखाली १२ वर्ष, काही ठिकाणी ३ वर्ष, काही ठिकाणी ६ महिने तर काही नावांखाली काही दिवस एवढंच आयुर्मान लिहिलेलं होतं....

तो गृहस्थ गावात गेल्यावर गावकऱ्यांनी या नवागताचं स्वागत केलं आणि तो तिथे राहू लागला. परंतु, त्याच्या मनांत लवकर मरणाचं भय होतं. त्या भितीपोटी तो अस्वस्थ झाला आणि काही दिवसांतच गाव सोडण्याची तयारी करू लागला.... लोकांना हे पाहून वाईट वाटलं आणि त्यांनी त्याला अचानक गाव सोडण्याचं कारण विचारलं. यांवर त्याने सांगितलं की या गावात कुणी जास्त काळ जगत नाही, म्हणून मृत्यूच्या भितीनें मी गाव सोडत आहे. लोकांना त्याचं हसू आलं. एक गांवकरी म्हंटला, तुम्ही पुस्तकी ज्ञान घेतलं, पण व्यावहारिक ज्ञान काहीच दिसत नाही. अहो, आमच्याकडे बघा, काहीजण ४०, काही ५० तर बरेच जण आयुष्याची सत्तरी गाठलेले आहेत. १५-२० लोक तर नव्वदी पार केलेले आहेत!

यांवर त्या गृहस्थाने स्मशानभूमीतील पट्ट्या आणि त्यावरील आयुर्मानबद्दल विचारलं!

तेंव्हा, एक आजोबा म्हंटले, "आमच्या गावांत एक नियम आहे. जेंव्हा एखादी व्यक्ति रात्री झोपायच्या तयारीत असते, तेंव्हा ती स्वतःच्या वहीत एक हिशोब लिहिते"! 

कसला हिशोब?

"आज दिवसभरातील माझा किती वेळ परमार्थात गेला, तेवढा वेळ आठवून तितके तास किंवा मिनीट तारखेसह ती व्यक्ती आपल्या वहीत नोंदवून ठेवते. अशा प्रकारे प्रत्येक गावकरी दररोज रात्री नोंदणी ठेवतो. आणि त्याचा मृत्यू झाला की त्याची ती वही काढून त्या सर्व मिनीटं, तासांची गोळाबेरीज करून एकूण वर्ष, महिने, दिवस काढले जातात. तेच त्याचं आयुर्मान म्हणून त्याच्या नावाखाली लिहिलं जातं!"

जेवढा वेळ परमार्थात गेला, तेवढंच आयुष्य! तेंव्हा, तुम्ही शंभर वर्ष देहानें कदाचित जगला असाल, पण
अल्पायुष्य मानव देह ।
शत गणिले ते अर्धरात्र खाय ।
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय ।
काय भजनासी उरले ते पाहे गा ।।
आयुष्य शत म्हणजे शंभर असले तरी त्यातील अर्ध आयुष्य रात्रीने (झोपेनें) खाल्लं. मधलं दिवसाचं जे अर्ध आयुष्य आहे, त्यातील बालपण, आजार, म्हातारपण, भांडण तंटा, द्वेष, काळजी, भिती यात बहुतांश जीवन गेलं तर भजनासाठी म्हणजे परमार्थासाठी किती उरलं ते पहा...

प्रत्येकाचा जन्म कुठे होणार हे जसं त्याचं पूर्वसुकृत ठरवतं, त्याचप्रमाणें, मृत्यू कुठे होणार, कधी होणार, कशा प्रकारे होणार हे त्याच्या पूर्वकर्मानुसार निश्चित होतं. आणि मग वेळ आली की ती व्यक्ती त्या ठिकाणी, त्या परिस्थितीत बोलावल्यासारखी जाऊन हजर होते व इच्छा असो किंवा नसो मृत्यूला स्वाधिन होते.

सर्वांसाठी जन्माचं केंद्र मातेचा गर्भ आणि जन्माचं कारण वासना हे एकच आहे. आणि मृत्यूसुद्धां प्रत्येक मनुष्याला अनिवार्य आहे. परंतु, त्या मृत्यूचं केंद्र आणि कारण प्रत्येक मनुष्याचं वेगवेगळं असतं. तो मृत्यु कसा येतो आणि मनुष्य त्याला कसा सामोरा जातो याला महत्व आहे.

कबीराने देहाला पिंजरा आणि आत्म्याला पक्षी म्हंटलं आहे. हा पक्षी पिंजरा तोडून केंव्हा उडून जाईल सांगता येत नाहीं. उड जाएगा हंस अकेला । या जगाच्या जत्रेत तो हंस येतो, फिरतो आणि मग अचानक उडून जातो.
कोण समयो येईल कैसा ।
याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा ।
उडोन जाती ।।
तो हंस जाणार तर आहेच, पण तो सद्गतीला जावा असं वाटत असेल तर जीवन जगतांना 'हंस' चं उलटं 'सहं' म्हणजेच "सोहं" हे त्यांने ध्यानांत ठेवावं. हे 'सोहं' म्हणजेच नाम! हीच हरिभक्ती! आणि म्हणूनच अंततो गत्वा समाधानासाठी,
🌿🌿   मरणाचे स्मरण असावे ।   🌿🌿
🌿🌿 हरिभक्तीसी सादर व्हावे ।। 🌿🌿

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

2 comments:

  1. नमस्कार. सर्वच लेख उत्तम आहेत.
    'नाम निरूपाधिक आहे' हे वचन अधिक स्पष्ट करून सांगू शकाल का?(याचा गूढार्थ उदाहरण देऊन सांगू शकाल का?)

    ReplyDelete
  2. नाम उपाधी रहित असते म्हणजे काय?

    ReplyDelete