🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : श्रीमहाराजांनी आपल्याला अखंड नाम घेण्यास सांगितले आहे. तर हे नाम घेणे आणि नामात राहणे यांत काय फरक आहे? श्रीराम!
➡
श्रीराम!
नाम घेणे आणि नामात राहणे यात
महदंतर आहे. सद्गुरु
जेंव्हा आपल्याला नाम देतात, तेंव्हा मी जप केला पाहिजे असं वाटतं, हा परमार्थ
प्रवेशाचा संकल्प होतो. परंतु, ते वाटणं जेंव्हा कृतीत येऊ लागतं, तेंव्हा आपण नाम
घेणे याला सुरुवात होऊन परमार्थाची पायाभरणी होते. सुरुवातीला हे नाम कोरडे असले
तरी पुढे त्या वैखरी नामाच्या पायावर आवडीने, भावे हरीनाम घेसी अशी एकेक वीट लावली
जाते. सदाचरण, विवेकबुद्धी, विरागी वृत्ती, निंदा-स्तुतीचा त्याग, या खांबावर
नामनिष्ठेचं छत बांधलं जातं. शेवटी "नामापरते न सत्य मानावे", हा भाव दृढ होऊन अखंड
नाम घेत राहणे म्हणजे सतत नामात राहणे, हा कळस बांधल्या जातो. तेंव्हा, नाम
घेणे हा पाया आहे; नामात राहणे हा कळस आहे!
आपल्या सद्गुरूंच्या चरणी जाऊन आपण
त्यांना मला नाम द्या असं विनवतो. तेंव्हा, आपला अधिकार असो नसो, आपण
त्यांच्याकडून नाम घेतो. त्यावेळी आपले सद्गुरु सांगतात, “कर्तव्यात कसर सोडू नका,
आणि कर्तव्य करतांना नामाला सोडू नका. जिथे नाम आहे, तिथे मी आहे.” जेंव्हा,
महाराज नामरूपाने माझ्या घरी यावे असं वाटून आपण नामाला लागतो, तेंव्हा आपण नाम
घेणे या कक्षेत येतो. कालांतराने, नामात खरंच महाराज आहेत असं आतून वाटू लागतं आणि
नाम म्हणजेच महाराज ही नामनिष्ठा व गुरुनिष्ठा एकरूप होते, तेंव्हा
गुरुप्रेम-नामप्रेम एकत्वाने आपण सतत नाम घेऊ लागतो. याची परिणती अशी होते की ज्या
नामामुळे महाराज आपल्या घरी आले, त्या नामाची खरी चटक लागल्याने आता महाराज आपल्या
घरी न थांबता आपल्याला स्वतःच्या घरी घेऊन जातात. यालाच नामात राहणे म्हणतात. असं
नामात राहणे म्हणजे गोंदवल्यात राहण्यासारखं आहे. तेंव्हा, नाम घेणे हे
महाराजांना आपल्या घरी बोलावण्यासारखे आहे; नामात राहणे हे महाराजांच्या घरात जाऊन
राहणे आहे!
नाम हे मातेसमान आहे. त्यात प्रेम,
जिव्हाळा, आपुलकी, काळजी घेणे सगळं येतं. लौकिक आईच्या दुधाने देह पुष्ट होतो, पण
नामरुपी मातेच्या प्रेमरूपी दुधाने आत्मा संतुष्ट होतो. एखादे मूल लहान असतांना
आईचे बोट धरून चालते. यामध्ये मुलाने आईचे बोट धरलेले असेल तर तो ते बोट सोडून
इकडेतिकडे जाण्याची, पडण्याची शक्यता असते. परंतु, आई जर मुलाचा हात धरून चालू
लागली तर ती पकड मजबूत असते ज्यामुळे आई जिकडे जाईल तिकडे मुलाला जावे लागते.
नामधारक सुरुवातीला नाम घेत असतो त्यावेळी तो नामाचे बोट धरून चालत असतो. यांत
कधीकधी नामाचे बोट सोडून तो व्यक्ती कामाकडे जाण्याची शक्यता असते. परंतु, एकदा का
त्या नामधारकाला नामात रस येऊ लागला, नामाची ताकद कळू लागली की त्याला नामाशिवाय
जगणे असह्य होते. अशावेळी त्याने नामाचे बोट धरलेले नसते तर नामाने त्या व्यक्तीचा
हात धरलेला असतो. हात म्हणजे कर्म. जो सतत नामात राहतो, त्याच्या प्रत्येक कर्मात
नाम पर्यायाने नामीचे कर्तृत्व असते, सत्ता असते. जन्म कर्म च मे दिव्यं! हे
भगवंताचे वचन जगणे म्हणजे नामात राहणे. तेंव्हा, नाम घेणे म्हणजे आपण नामाला
धरणे; नामात राहणे म्हणजे नामीने आपल्याला धरणे!
काही उपासना, कुलाचार हे विशिष्ट
प्रसंग, सण किंवा पर्वकाळात असतात; परंतु देवाची पूजा ही दररोज करायची असते.
नामसाधक नाम मिळाल्यावर अनुग्रह घेतेवेळी सांगितलेले ऐकून रोज सकाळसंध्याकाळ १,३
किंवा १३ माळा जप करतो. अशी काही ठराविक जपसंख्या दररोज करणे म्हणजे नाम घेणे या
सदरात येते. परंतु, नाममहिमा इतर साधनेहून फार वरचा आहे, हे ध्यानांत येऊन ठराविक
जपसंख्येव्यतिरिक्त जास्तीत जास्त काळ नाम घेणे हे नामात राहणे, या सदरात येते.
तेंव्हा, नाम घेणे ही नैमित्तिक उपासना; तर नामात राहणे ही नित्योपासना!
नाम घेणे म्हणजे आपण जप करत असतो
ते आपले कल्याण व्हावे म्हणून. यात नामाने मला दुःखापासून जपावे हा भाव असतो.
परंतु, नामाची खरी गोडी जाणवून नामाशिवाय चैन पडेनाशी होऊ लागले की नामाने मला
जपावे, हा भाव जाऊन आपण नामाला आपल्या प्राणापलीकडे जपतो. यालाच नामात राहणे असे
म्हणतात. या अवस्थेत नाम घेतल्यानंतर आपले कल्याण होईल हा भाव लोप पावून नामात
असणे हेच कल्याणाचे कल्याण आहे, हा एकात्मभाव प्रगट होतो. तेंव्हा, नाम घेणे हे
नामाने आपल्याला जपणे; तर नामात राहणे म्हणजे आपण नामाला जपणे!
आपल्या घरी कुणी पाहुणे आले की आपण
त्यांचे स्वागत करून त्यांना यथाशक्ती पाहुणचार करतो. त्यांना काय हवं नको याची
काळजी घेतो. तसे, नाम घेणे हे आपल्याकडे पाहुणे आले की त्यांच्या सेवेत तत्पर
होणे आहे! परंतु, याउलट आपण कुणाच्या घरी चार दिवस रहायला गेलो की, जेवायला
काय बनवायचे, घरात सामान आहे का कसलीही काळजी न करता मजेत पाहुणचाराचा आनंद घेतो.
नामात राहणे हे आपण पाहुणे म्हणून रहायचे म्हणजे काय होईल याची चिंता न करता मजेत
नामाचा प्रेमानंद घेणे आहे!
आतापर्यंत ज्या पद्धतीने मी नाम
घेत होतो, त्यात कदाचित चिकाटी आणि नियमितता असेलही. पण त्यात सर्वाधिक आनंद मिळणे
हे माझे ध्येय आहे. या ध्येयाप्रत पोचण्यासाठी मला सतत नामात रहावे लागेल.
यासाठीचा प्रवास सुरु झाला आहे, ती सुरवात चागली आहे. पण त्याची परिणती भगवंतालाच
माहित. आगाज अच्छा है, अंजाम खुदा जाने! तेंव्हा, नाम घेणे हा आगाज आहे;
नामात राहणे हा अंजाम आहे.
मला असं वाटतं की
भगवंत म्हणत असेल, “तुम्ही आज नामाला लागले आहात. ही सुरुवात आहे, परिसीमा नाही. नामाला
लागणे हे कमी नाही. कारण नामाला लागणे म्हणजे हृदयात काळजी, चिंता, दुःख यांचं आता
काही काम नाही. परंतु, काळजी, दुःख निवारण एवढंच नामाचं महिमान नाही. हजारो लौकिक
गोष्टींच्या गराड्यात नामाचा अलौकिक महिमा न कळण्याइतकं अतर्क्य, अगम्य असं माझं
नाम नाही.” भगवंताचं हेच म्हणणं खाली काव्यमय स्वरुपात आहे.
आगाज है अभी ये,
अंजाम नही है |
मायुसियो का इस दिल
मे कोई काम नही है |
पहचान न सके वो
हजारो की भीड मे |
इतनाभी तो अजीब मेरा
नाम नही है ||
तेंव्हा, यातील मर्म
समजून घेऊन आपण जे नाम घेत आहोत, त्याची आंतरिक तीव्रता, प्रेम, तळमळ वाढवून
आपल्या नामसाधनेचा आगाज आपण अखंड समाधानाच्या अंजाम पर्यंत नेण्याचा प्रयत्न याच
जन्मी करूया, महाराज नक्की यश देतील!


No comments:
Post a Comment