🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : साधक अवस्थेपुर्वी मंद मुमुक्षु आणि तिव्र मुमुक्षु अशा दोन अवस्था असतात, असे आपण बोललात. त्यावर प्रकाश टाकावा!
➡
श्रीराम!
परमार्थ म्हणजे अखंड तेवत राहणारा नंदादिप! ज्याचा दिवा चालू आहे तो मुमुक्षु!
परंतु, सुटले अफाट वारे । मन तारू त्यात बिथरे ।। असे विषयाचे, विकाराचे वारे वाहू लागले की तो दिवा विझू शकतो. अखंड सावधानता हीच साधना!
भगवंतासमोर लावलेला नंदादिप हा विझू नयें म्हणून अखंड सावधानता आवश्यक आहे. हा दिवा विझू तर द्यायचाच नाही, पण त्याची ज्योत प्रखर ठेवण्याची काळजीदेखील घ्यायची. विषयभोगामुळे ज्याचा दिवा विझतो, तो मुमुक्षु अवस्थेतून बद्धावस्थेत फेकला जातो. ते टाळण्यासाठी विषय, विकाराची दारं खिडक्या बंद ठेवतो. परंतु, हे दूरचे विषय नाहीसे केले तरी काही जवळचे दोष असतात.
त्यातला एक महत्वाचा दोष म्हणजे तेलाची कमतरता. तेल कमी झालं की दिवा विझत नाही, मात्र मंदावतो. या अवस्थेला मंद मुमुक्षु म्हणावं. स्मरणाचं तेल भरपूर असेल तर दिवा मंदावत नाही, उलट तिव्र प्रकाश देतो. हा तिव्र प्रकाश म्हणजे तिव्र मुमुक्षु! मंदावण्याचे कारण स्मरणरूपी तेलाची कमतरता एवढंच नसून वातीला लागलेली मानाची, कौतुकाची, अपेक्षांची, काळजीची काजळी! ही काजळी वेळोवेळी काढत राहिलो आणि स्मरण आकंठ असेल तर हा तिव्र मुमुक्षु साधक पदाला पात्र ठरतो!
एखादा बद्ध हा सत्संग लाभला की मंद मुमुक्षु बनतो. हा सत्संग संतांचा असू शकतो, संतवचनाचा असू शकतो, एखाद्या सद्ग्रंथाचा असू शकतो, किर्तन, प्रवचन किंवा सद्विचारांचा असू शकतो. त्या सत्संगातून विषयाबद्दल अनासक्ती आणि भगवंताबद्दल भक्ती प्रगट करतो. आता हा सत्संग जर सतत घडला तर मुमुक्षा तिव्र होऊन तोच मुमुक्षु साधनेला लागून साधक बनतो. परंतु, तिव्र मुमुक्षा ही अट आहे.
मला विषय हवा, ही बद्धावस्था;
मला भगवंत हवा, ही मुमुक्षावस्था;
मला भगवंत(च) हवाच, ही साधकावस्था;
तर "भगवंताला मीच हवा", ही सिद्धावस्था!
आपली गंमत कशी होते: आपल्याला भगवंत हवा असं वाटून वैराग्य, विवेक वाटतो. पण ती अवस्था फार काळ टिकत नाही. किर्तन, प्रवचन ऐकतांना तयार झालेला वैराग्याचा पुतळा घरी विषयी वातावरणात आला की दुभंगून जातो. पैसा कमी पडू लागला, घरात वाद, रुसवेफुगवे झाले की विवेक झोपी जातो. समाधान, समाधान असा डांगोरा पिटणारं मन निराश होऊन जातं.
या अवस्थेत परमार्थाचा दिवा विझला नाही पण मंद झालेला असतो. हाच तो मंद मुमुक्षु! मग पुन्हा प्रवचन, सद्ग्रंथ वाचन, मनन, सत्संगात आलो की मी चुकलो ही जाणीव होऊन मंदपणा कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होतो!
मी चुकतोय हे कळत नाही, तो बद्ध!
मी चुकतोय ही जाणीव म्हणजे मंद मुमुक्षु!
मी सुधरून पुन्हा चुकतोय ही जाणीव म्हणजे तिव्र मुमुक्षु!
आपण दिव्याचा दृष्टांत बघतोय. त्यालाच मोजक्या शब्दात डोळ्यासमोर ठेवुया.
ज्याने हा अंतरिचा दिवा लावलाच नाही, तो मनुष्य बद्ध समजावा!
ज्याने दिवा लावला तो मुमुक्षु!
जो तो अंतरिचा मालवूच देत नाही तो साधक!
जो स्वतःच अखंड तेवणारा दिप बनतो, तो सिद्ध!
आपण नामालयातील मंडळी बद्ध, मंद मुमुक्षु, तिव्र मुमुक्षु या त्रिकोणात फिरत राहतो. थोडी सदाचरणाची चिकाटी आणि नामनिष्ठा वाढवुया, आपले सद्गुरू साधक व सिद्धावस्था सांभाळून घेतील!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


No comments:
Post a Comment