Saturday, April 28, 2018

प्रल्हादबोध!!!


🌸🌹🌸  ।। नामसंध्या ।।  🌸🌹🌸

श्रीराम!
एखादा साधक जेंव्हा निष्काम कर्मयोगाच्या शिखरावर पोचतो, तेंव्हा त्याला कृतकृत्यतेचा अनुभव येतो; तो जेंव्हा आत्मज्ञानाने परिपूर्ण होतो, तेंव्हा त्याला परमशांतीचा अनुभव येतो. परंतु, तोच साधक जेंव्हा भक्तियोगाच्या जोरावर भगवंताला अनन्यपणे साद घालतो, तेंव्हा भगवंत कुठूनही त्याच्यासाठी प्रगट होतो. हाके सरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥ बाह्यांगाने जड वाटणाऱ्या खांबातील सुप्त परब्रम्ह चैतन्य प्रगट करण्याचे सामर्थ्य प्रल्हादासारख्या एका अनन्य भक्तातच असते. भगवंत सदेह प्रगट व्हायला अत्यंत उतावीळ आहे; आपली तळमळ कमी पडते याला तो काय करणार!

आजच्या नृसिंह जयंतीच्या पर्वकाळात अद्वितीय भक्त प्रल्हादाकडून आपण पाच गोष्टी आत्मसात कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे बालपणापणीच अध्यात्मप्रवेश झाला तर मन उन्मन होण्याची एक अढळ बैठक तयार होते.  दुसरी गोष्ट म्हणजे एकदा का सद्गुरूंचा उपदेश मिळाला की त्यापरते दुसरे कुणीही दैवत नाही, ही श्रद्धा जरुरी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जन्माला आल्यावर कितीही लौकिक ऐश्वर्यसुख असलं तरी त्रिविध ताप आणि घरातील ताणतणाव चुकणार नाही, हे व्यावहारिक सत्य स्वीकारलेच पाहिजे. आणि चौथी पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कोणतीही सबब न देता निष्ठेने अखंड नामस्मरण साधता येते. या चार गोष्टी जो आत्मसात करेल, त्याला चतुर्विध मुक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!

कयाधूसुत प्रल्हादाने, नाम घेतले अति आवडीने ।
उद्धरिले त्या दुष्ट पित्याला, स्मरूनी हेचि नाम ।।

🌹 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🌹

No comments:

Post a Comment