🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : आपण
एका प्रवचनात म्हंटले की चित्तशुद्धीसाठी नाम खर्ची पाडू नका. हे नाम खर्ची पाडणे म्हणजे
नेमके काय?
➡
श्रीराम!
ज्या अंतःकरणात
परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा असतो, त्या अंतःकरणाला शुद्ध
केल्याशिवाय आत्म्याला परमात्मस्वरुपाचं भान येत नाही. आणि हे भान आल्याशिवाय
समाधीसुख म्हणजे सोप्या भाषेत अखंड समाधानाचा अनुभव घेता येत नाही. कर्ममार्ग, भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग या
शाखांमधील पदवी मिळवण्यासाठी अगोदर १० वी पर्यंत सर्व विषयात उत्तिर्ण होणें जरूर
आहे. आणि दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील विषय म्हणजे सद्विचार, सद्भावना, सत्क्रिया आणि
सदाचरण!
नामस्मरण हा पदवी
शिक्षणातील अभ्यासक्रम आहे! आपण अनुग्रहीत झाल्यानंतर जे नाम घेतो, ते म्हणजे पदवी
शिक्षणातील प्राविण्य मिळवण्यासाठीची शिकवणी होय! जर एखाद्यानें ही
शिकवणी डिग्री मिळवण्यासाठी न लावता चौथीत पास होण्यासाठी लावली तर आपल्याला
त्याच्या बालिशपणाची कीव येईल! त्याचप्रमाणें, नामस्मरणाची
शिकवणी 'रामदास' ही डिग्री
मिळवण्यासाठी न लावता चित्तशुद्धी करण्यासाठी लावली तर संतमंडळींना आपल्या
बालिशपणाची कीव येत असेल!
माझा एक आवडता
ग्रंथ "विवेकचुडामणी" यांत आचार्यांनी एका ठिकाणी फार मार्मिक सांगितलं
आहे : चित्तस्य शुद्धये
कर्म न तु वस्तुपलब्धये। कर्मानें चित्त शुद्ध करता येईल, परंतु त्यानें
"भगवद्प्रेम" नावाची वस्तु मिळत नाही, असं सांगतांना
शंकराचार्यांनी दोन अतिशय महत्त्वाचे संकेत केले असावेत....
पहिला संकेत
म्हणजे कर्म केवळ चित्तशुद्धीसाठी सहाय्यभूत ठरतील. त्यामुळे, भगवद्प्रेम किंवा
परमात्मज्ञान प्राप्त करण्याची बैठक तयार होईल. त्यानें अध्यात्म कक्षेत प्रवेश
होईल. परंतु, प्रवेश म्हणजे पदवी नाही!
चित्तशुद्धी
म्हणजे मंदिरात प्रवेश; तर शुद्ध चित्तात नाम भरणं म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश! आपलं ध्येय
गाभाऱ्यात प्रवेश हे आहे! परंतु, गाभारा प्रवेश हे long term goal आहे. तत्पुर्वी मंदिरप्रवेश
हे short
term goal आहे! आणि मंदिर प्रवेशासाठी मंदिरापर्यंत जाण्याचं कर्म करावं
लागेल. याचा अर्थ, कर्मानेंच मंदिरप्रवेश अर्थात चित्तशुद्धी साधेल!
वरील संस्कृत
वचनातील दुसरा संकेत म्हणजे भगवद्प्रेम ही वस्तू कर्मापेक्षा उच्चकोटीच्या
निराळ्या मार्गानें प्राप्त करता येते. भगवद्प्रेम ही पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला
"नामस्मरण" ही शिकवणी जरूर आहे!
नामस्मरणानेंच
नामी लाभेल! जर नामानें नामी लाभत असेल तर चित्तशुद्धी होणार नाही का? होईल.
परंतु, चित्तशुद्धीसाठी
नाम खर्च करणे म्हणजे बाराखडी शिकण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा वेळ व उर्जा
खर्च करण्यासारखं आहे! तेंव्हा, चित्तशुद्धीसाठी नाम खर्च करणे हे नामाचं मोठं अवमुल्यन होईल! आणि
हींच खंत श्रीमहाराजांनी देह ठेवायच्या काही दिवस अगोदर व्यक्त केली की, माझ्याकडे येणारी
माणसं नाम घेतात, पण "रामप्रेम" ही वस्तू प्राप्त करण्यासाठी नाही तर
कामप्रेम पुर्ततेसाठी नाम घेतात. हे तर फारच जास्त अवमुल्यन झालं!
मंदिरात जाणे हे
कर्म आहे; परंतु आत गेल्यावर
कर्म करायचं नसून सेवा करायची आहे. चित्तशुद्धी हे
कर्म आहे; तर नामस्मरण ही
सेवा! ज्या कर्माला भगवद्प्रेम चिकटतं ते कर्म कर्म न राहता सेवा बनतं; तर ज्या सेवेला
विषयप्रेम चिकटतं ती बाह्यांगानं वाटणारी सेवा सुद्धां कर्म ठरते!
काल शिबिरात एक
महिला भेटली. ती म्हंटली "माझा मुलगा फारच गुणी आहे, पण नोकरीच मिळत
नव्हती. त्यासाठी मी अनेक पारायणं केली, साखरखेर्डा वारी केली ; महाराजांना आता
दया आली!
आता त्याला एक
एजन्सी चालवायला मिळाली आहे, रोजचा चांगला गल्ला आहे! या परमार्थाला परमार्थ म्हणावा की
स्वार्थ! क्षमा करा, पण अशी व्यक्ती मंदिरात सेवा जरी करू लागली तर मनांत विषयकामना
धरूनच करेल. तेंव्हा, ज्याचे चित्त
भोगात गुंतले आहे, तो सेवा करू शकत नाही हे ध्यानांत ठेवावं! यासाठीच महाराजांनी
सांगितलं, भोगासंगे कुठे न
गुंतावें ।। चित्तशुद्धी नसेल
तर मुखांत नाम असुनही चित्तात नामप्रेम नसेल.
एखाद्या परवचा न
म्हणणाऱ्या मुलालासमोर चॉकलेट ठेवून शुभं करोती म्हणण्याची बळजबरी केली तर तो शुभं
करोती बाह्यांगानं म्हणेल पण त्याचे चित्त चॉकलेटकडे असेल. आपलंसुद्धां
अनेकदा नाम घेताहे वैखरी
। चित्त धावे विषयावरी ।। असं होतं. त्यामुळे, प्रापंचिक अडचण कदाचित सुटेल, पण खरं समाधान
मिळणार नाही. आणि जर सर्व परिस्थितीमध्ये समाधान टिकत नसेल तर समजून घ्यावं की
अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कारण वरवर नाम घेत असुनही अजुनही चित्तात कामनेची
घाण आहेच.
मुळात चित्त शुद्ध
नाही म्हणजे त्यात विषयाची आवड आहे. विषयाच्या प्रति जो अनुराग आहे, तो नाहिसा होणें
म्हणजे विराग म्हणजे वैराग्य म्हणजेच चित्तशुद्धी! परंतु, त्यासाठी नाम खर्च
करू नयें. चित्तात जी आहार, विहार इ.ची आसक्ती आहे ती विवेकानें कमी करावीं! आहार अती झाला तर
आळस येईल, आहार तामसिक झाला
तर प्रमाद येईल, विहार अती झाला की शीण येईल, विहार तामसिक झाला
तर तमोवृत्ती वाढेल, हा आहारविहार संबंधीत विवेक! विवेकानें संयम आणणें हा
नीतिधर्म आहे. तो आपल्या आचरणांत आला की शनैः शनैः चित्तशुद्धी होईल. म्हणूनच
महाराजांनी म्हंटलं, आचारसंयमानें युक्त असा नीतिधर्म पाळावा ।
हेंच तत्व भगवंतानें गीतेमध्ये
सांगितलं की, युक्ताहार विहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु।
पण, गंमत अशी
होते की आपल्याला विवेक बुद्धीनें माहीत आहे पण चित्तात संयम ही वृत्ती नाही.
म्हणून सदाचरण राखण्यासाठी मनांत नाम आणि हातात प्रपंचाचें काम (कर्तव्य) हे आपण
सतत' सांभाळावं! यामुळें दुहेरी फायदा होईल: प्रपंचाच्या कर्तव्यानें
चित्तशुद्धी होईल आणि मनांत नाम राहिल्यानें ते नाम मनातून खोल खोल जात राहील.
मनातून खाली बुद्धीमध्ये, बुद्धीतून चित्तांत आणि चित्तातून
अहंकाराला जाळून तो देह रामरूप होईल, यांत संशय नाही!
अर्थात हे एकदम होणार नाही.
किंबहुना, एकदम झालं तर तो देह राहणार नाही. ही प्रक्रिया हळूहळू
झालेली उत्तम! विवेकयुक्त सदाचरणानें चित्तशुद्धी संदर्भात श्रीमहाराजांचं एक
बोधवचन आपण परवा बघितलं: एखाद्याला आज १०५
ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झाला, तर ते बरें नाही.
तसेंच, मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर
तेही बरे नव्हें. आपल्यामध्यें हळूहळू परिवर्तन व्हावें आणि तें विवेकानें घडवून
आणावें!
तेंव्हा, चित्तात
राग आहे, पैशाचा हव्यास आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चोचले आहेत, एखाद्याबद्दल
द्वेष आहे, तिथे नामप्रेम कसं प्रगट होणार? यासाठी, एकीकडून नामस्मरण आणि दुसऱ्या बाजूनें
सावधानता राखून नीतिमत्तेनें आचरण हे सांभाळलं, तर
रामराया प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कल्याणाचं करेल!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


No comments:
Post a Comment