Wednesday, January 31, 2018

जय श्रीराम. दादा, ग्रहणकाळाबद्दल थोडं सांगाल का?

🌹🌷🌹  *" नामप्रेमचिंतन "*  🌹🌷🌹

*शंका*- दादा, ग्रहणकाळाबद्दल थोडं सांगाल का?


*श्रीराम!*
मनुष्य जन्माला येतो तो विषयवासनेच्या आहारी गेल्याने. याचा अर्थ विषय पूर्णपणे त्याज्य आहे असे नाही. विषय भगवंताने दिलेले असल्याने ते आपल्या कल्याणासाठीच असले पाहिजे. धर्माच्या मर्यादेत राहून देहाने अर्थ आणि काम सेवन केला व  मनाने निर्विषय होऊन साधना केली तर मोक्षाचे दार उघडते, असे अध्यात्म सांगते. तेंव्हा, स्थल, काल, निमित्त सांभाळून भोगलेला विषय ग्राह्य आहे. परंतु, नको तिथे, नको तेंव्हा, अकारण भोगलेल्या विषयामुळे साधकाच्या साधनेला ग्रहण लागते.

मर्यादित आहार, मर्यादित विहार, मर्यादित व्यापार वगळता इतर अतिरेकी आहार, विहार, उच्चार हा आपल्या साधनेतील महत्वाचा वेळ खाऊन टाकतो. हा वाया गेलेला वेळ म्हणजे ग्रहणकाळ समजावा. जो मनुष्य या ग्रहणकाळात विषयसेवन करतो, त्याला ग्रहण विशेषत्वाने ग्रासू शकते. ज्याठिकाणी रजोगुणी, तमोगुणी विचार, उच्चार आणि आचार असतो, त्याठिकाणी सत्वगुणी माणसाने जाणे टाळावे. परंतु, प्रसंग आलाच तर अशावेळी आपला सत्वगुण जपण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हा अध्यात्मिक व वैज्ञानिक दोन्ही अंगांनी बघितले असता रजोगुणी व तमोगुणी वृत्तीचा काळ मानल्या जातो. याचे महत्वाचे कारण म्हणजे सूर्याचे जीवनदायी तेज व चंद्राची शीतलता दोन्ही पृथ्वीवर येण्यास बाधा निर्माण होते. अशावेळी जो सत्वगुण वाढवतो, तो इतरवेळी तर नक्कीच सदाचरण राखू शकतो. प्रतिकूल काळात ज्याला साधन टिकवता आले, त्याला अनुकूल काळात तर सहज साधना घडेल. म्हणून या ग्रहणकाळात साधकाने विषय सोडून विश्वात्मा धरावा. उपासना, नामस्मरण, सद्ग्रंथाचे वाचन, मनन केल्यास ते निष्ठेच्या दृष्टीने विशेष फलदायी ठरेल.

यांत श्रीमद्भागवतासारखा सद्ग्रंथ चिंतनाला घेतला तर विषयाचे पर्यवसान विश्वासात होईल. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही विषय परमात्ममय करण्याचा हा सुवर्णकाळ म्हणता येईल.
ग्रहणकाळात इतर शब्दरुपी विषय सोडून भागवत वाचल्यास शब्दब्रम्ह प्रगट होईल. *येथें व्यासांची वाणी | सार्थक हरिगुण गाउनी |*
या ग्रंथात एकाग्र चित्त झाल्यास स्पर्श नावाचा विषय रजोतमोगुण सोडून कृष्णस्पर्शाची सुखद अनुभूती देईल. *कृष्णपदी ठेवू माथा |*
व्यासांनी उभ्या केलेल्या या शब्दब्रम्हाला आपण मनाने स्पर्श केला तर रूप नावाचा विषय सौम्य होऊन परब्रम्हाचे रूप अंतःचक्षूसमोर येईल. *ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण | गीते वेधी मन पूर्ण |*

भागवत ग्रंथ हा भगवंताच्या लीलांचे भावपूर्ण वर्णन असल्याने लौकिक कामरस नावाचा विषय जाऊन कान्हरस चाखायला मिळेल. *भान हरपले रस पिता | आरती करू तुज भगवंता |*
आणि याची परिणती म्हणजे विषयाचा पाचवा घटक गंध जाऊन भगवद्प्रेमाचा गंध अंतःकरणात दरवळू लागेल. *निर्मळ भक्तीजले भारित | विहरे हरि हंसचि चित्त |*

अशाप्रकारे लौकिक पंचविषय जाऊन पाच अंगांनी भगवंतावरचे प्रेम दृढ होण्यासाठी ग्रहणकाळात *वेदतरूचे मधुर फळ | स्वादुरसे जे सोज्वळ |* अशा भागवत ग्रंथाचे किंवा आपल्या श्रद्धेनुसार आपल्या दैवताचे चिंतन वाचून मनन करूया; परमात्मप्रेमाचा निजध्यास नक्की अनुभवला येईल!

ग्रहणकाळात रजोगुणी व तमोगुणी वृत्ती खुप जास्त प्रमाणात वातावरण दूषित करतात. त्याचा आपल्या साधनेवर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या नामात राहून आपली सत्वशुद्धी करून घ्यावी.

याकाळात जो मुखात गुरूमंत्र आणि मनात गुरूमुर्ती स्थीर करेल, त्याच्या साधनेला ग्रहण न लागता अंतःकरणातील विकार नाहिसे होण्यासाठी त्याला सात्विक गुरूबल मिळेल आणि त्यायोगे गुरूनिष्ठा व नामप्रेम वृद्धिंगत होईल!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

Friday, January 26, 2018

'नामात महाराज आहेत' याची प्रचिती म्हणजे काय?

              

                  🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका- एक विचारायचं होतं... श्री बाबांचा डॉ. कुर्तकोटी यांच्याबरोबर झालेल्या संवादात असा उल्लेख आहे की, स्वामी म्हणाले, "या माळेवर खूप नाम झाले आहे. नामाचे अनुभव पण आले आहेत. त्या नामात महाराज आहेत याची प्रचितीदेखील आली."
ही प्रचिती काय असावी???
श्रीराम! प्रापंचिक अडचणीतून बाहेर पडणे, मनात ‘महाराज बघा’ असं म्हटलं आणि आपली समस्या सुटली, ही नामात महाराज असण्याची प्रचिती नाही. श्रीमहाराजांनी देहदृष्टीनेसुद्धा नामाशिवाय दुसरं काही जीवन जगलं नाही. त्रेतायुगात हनुमंताच्या हृदयात श्रीराम दिसले. कलियुगाचा विचार केला तर असे म्हणता येईल की नामाच्या प्रतापाने रामरायाच्या हृदयात महारुद्र जे मारुती रामदास असे श्रीमहाराज आहेत. आणि नाम हे रामरायापेक्षा व्यापक असल्याने नाम घेतले की तो रामराया आणि रामहृदयातून श्रीमहाराज प्रगट होतातच होतात. याचा एक उद्बोधक प्रसंग बघूया.

श्रीमहाराजांचे कानडी भाषेमध्ये एक चरित्र आहे. एकदा पुण्यतिथी पर्वकाळात म्हैसूरला एका शिष्याने त्याचे वाचन आणि विवरण केले. त्यावेळी श्रोत्यांमध्ये एक लहान मुलगासुद्धा होता. ९-१० वर्ष वय असेल त्याचे. आता महाराजांचं चरित्र म्हणजे नाममहिमा, दुसरं आणखी काय. तो लहान मुलगा लक्ष देऊन ते ऐकत होता आणि त्याच्या मनावर त्या चरित्राचा म्हणजे पर्यायाने नामाचा जबरदस्त ठसा उमटला.

पुढे एक-दोन वर्षांनी तो मुलगा फार आजारी पडला आणि त्याला cancer असल्याचे निदान झाले. त्यामुळे आईवडील स्वाभाविकपणे दुःखी कष्टी आणि हतबल झाले. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होते. कारण देहात रोग असला तर अंतःकरणात नामच होते. त्याची आई त्याला म्हटली, ‘तू एवढं नामस्मरण करतो तरी तुझा आजार बरा होत नाहीये.’ तो मुलगा हसून म्हटला, ‘आई, नामस्मरणाचा आणि आजाराचा काय संबंध?’ मग आईने विचारले, “मग नाम कशासाठी घेतो?” तो मुलगा पूर्ण छातीठोकपणे म्हटला, “नामात राहिल्याने महाराज भेटतात. बघ, महाराज माझ्याजवळ बसलेले आहेत. त्यामुळे मला फार समाधान लाभलं आहे. ते समाधान दुसरीकडे कुठेच मिळत नाही.”
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला ।
नाम आठविता रूपे प्रगट पै झाला ।।
आणि पुढे वर्षभराच्या आत त्या मुलाने प्राण सोडला. त्या दहा वर्षाच्या मुलाने जे अनुभवलं ते म्हणजे नामात महाराज आहेत ही प्रचीती!

मग आपण इतक्यावर्षांपासून नाम घेत असूनही आपल्याला ती प्रचिती का येत नाही? तर याचे महत्वाचे कारण म्हणजे देहतादात्म्य! देहतादात्म्य न सोडता नामाशी तादात्म्य कसे साधेल? मी देह आहे, हा अभिमान सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो नामाने समूळ मारावा, हा सद्गुरूंचा निरोप आपण कानाने ऐकतो, मनाने नाही. कारण मन देहाशी तदाकार झालेले आहे. देहाने नाम घेणे ही नामसाधनेची प्राथमिक पायरी आहे. ती आवश्यक आहे; परंतु महाराजांचं दर्शन होण्यासाठी पायरीवरच न थांबता आत प्रवेश करणे जरूर आहे. केवळ देहाने यंत्रवत नाम घेणे हे समाधीमंदिराजवळ जाऊन CCTV च्या माध्यमातून होणारे टीव्हीवरील दर्शन; तर मनाने नाम घेणे म्हणजे गाभाऱ्यात जाऊन श्रीचरणावर मस्तक ठेवण्यासारखे आहे. त्या मुलाने मनाने नाम घेतल्याने त्याला महाराजांच्या चरणाशी असल्याची प्रचिती अखंड येत होती.

आपण देहाशी मनाने एकरूप होऊन वाणीने नाम घेत असतो. कधीकधी देहभान हरपून वाणीबरोबर मनसुद्धा जेंव्हा नामाशी एकरूप होते, तेंव्हा ‘कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे’ हा अनुभव म्हणजे नामात महाराज आहेत ही प्रचीती येते. परंतु, आपला हा दिव्यानुभव फार काळ टिकत नाही. याचं कारण आपल्या मनाचं देहाशी तादात्म्य दृढ आणि जन्मोजन्मीचं आहे. 

श्रीमहाराज म्हणत, ‘सामान्य माणसाचं देहतादात्म्य त्याच्या बारशापासून ते बाराव्यापर्यंत सुटत नाही.’ वरील प्रसंगातील मुलगा वयाच्या बाराव्या वर्षीच मरण पावला. परंतु, या एक तप आयुष्यातील शेवटच्या दोन वर्षांत निष्ठेने नामतप केले आणि याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा काय असतो, याची प्रचिती घेतली.

शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती याच्याही पुढे जाऊन आत्मप्रचितीपर्यंत पोचणे हे साधकाचे ध्येय असावे. आपल्याला जर या सर्वोच्च प्रचितीपर्यंत पोचायचे असेल तर देहाबरोबर (वाणीबरोबर) मनाने नाम घेणे साधले पाहिजे. आणि हे साधण्यासाठी देहाचे लाड, देहाचे ममत्व कमी कमी होत गेले पाहिजे.
या देहाची हो कुरवंडी ।
पंचप्राण ओवाळून सांडी ।।

    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 

Tuesday, January 23, 2018

प्रवासात नेहमी नाम छान होते. यामागे काही कारण असेल का? कृपया सांगावे!

 🌹🌷🌹 " नामप्रेमचिंतन "  🌹🌷🌹

शंका- प्रवासात नेहमी नाम छान होते. यामागे काही कारण असेल का? कृपया सांगावे!


श्रीराम! प्रवासांत नाम छान जमतं म्हणजे खरोखर एक प्लस पॉईंट समजावा!

पण, थोडं व्यापक अंगानें बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की, ज्याला नामाची गोडी लागलेली आहे, तो एखाद्या लग्नसमारंभ, पार्टी यांतसुद्धा अनुसंधान टिकवू शकेल; याऊलट ज्याला त्यात रस नाही तो श्रींच्या समाधी मंदिरात बसल्यावरही विषयाचंच चिंतन करेल....
अंतरीचें धावें स्वःभावें बाहेरी।।

तरिसुद्धां, इतरत्र म्हणजे घरी, मंदिरात ज्यांना नामांत तंद्री लागते, त्यांच्यापैकी काहींचं प्रवासांत नाम छान चालतं, तर काहींना ते साधतच नाही....

मला व्यक्तीशः असं वाटतं की, समारंभात, बाजारात किंवा प्रवासांत गर्दी असते, पण प्रवासात सापेक्षतः चांगलं नामस्मरण होतं.

याचं कारण असं असावं की समारंभ किंवा बाजार इ. ठिकाणी जे विषयी वातावरण असतं ते प्रवासांत कमी असतं!

कसं ते पहा,

समारंभात भोगासक्ती जास्त असते, तर बाजार इ.ठिकाणी व्यावहारिक आसक्ती जास्त असते.

कारण समारंभात आलेली सर्व मंडळी ही एकमेकांना ओळखत असतात. परिणामी, न बोलणाऱ्याला देखील इकडचं, तिकडचं बोलावं लागतं.

समारंभात बऱ्याच दिवसांनी भेटलेली माणसं मग आपला भूतकाळ, वर्तमान विचारून भविष्याबद्दल सल्ले देताता किंवा त्यांचा भूतकाळ उकरून अनावश्यक चर्चा करतात. या सगळ्या विषयी गर्दीत अनुसंधान निसटून जातं.

बाजारात वगैरे परिचयाचे लोक तुलनेनें फारच कमी असतात. परंतु, स्वार्थ आणि अर्थ(पैसा) यांवर आधारीत ते एकत्रिकरण असल्यानें तिथें चिंतन व्यवहाराचंच होणार. अशा स्वार्थात परमार्थ साधणं कठीण जातं!

या दोन्हीच्या तुलनेत प्रवासांत एकत्र आलेली बहुतांश मंडळी ही अनोळखी असतें. त्यामुळें, बोलण्याची फारशी गरज पडत नाही. (आता काही लोक अनोळखी प्रवाशासोबत संपूर्ण प्रवास पुरून उरेल इतक्या गप्पा मारतात, तो भाग निराळा!)

प्रवासांत सुद्धां विषयी माणसं असतातच. परंतु, प्रवास हा स्थीर नसल्यानें, हलता असल्यानें लोक शक्यतो बाहेरचा निसर्ग तरी बघतात किंवा गार हवा लागल्यानें झोपी जातात. (यांत काहीवेळा तर गाढ झोप लागून कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे सुद्धां बघायला मिळते!) या कारणांमुळें बस, रेल्वे इ. प्रवासांत विषयी माणसं असतात, पण त्यांचा विषय बऱ्याच अंशी शांत, सुप्त असतो.

त्यामुळें, ज्याला नामाची गोडी आहे त्याला हे प्रवासाचं वातावरण थोडं पोषक वाटतं. कारण, काम काहीच नाही, मुक्काम ठरलेला आहे, चालक गाडी चालवतोय आणि तो आपल्याला इप्सित स्थळी सुखरूप नेईल, हा भरवंसा सुद्धां आहे. मग आता स्वस्थ बसून नाम घ्यायला कसली आडकाठी आहे!

ज्याला या प्रवासांत परमेश्वराचा वास अनुभवायचा असेल त्यानें नामाची तार जोडून पहावी.

आपण उकाडा वाढला की कुलरच्या गार हवेत मस्त झोपतो. पण त्या कुलरच्या पाण्यांत सुगंधी द्रव्य टाकलं तर गार हवेबरोबर, सुगंधी निद्रादेवीचा अनुभव येतो. त्याचप्रमाणें, प्रवासांत गार हवा सुटली की इतर सर्व लौकिक निद्रेत जातात आणि त्यांचे विकार स्वस्थ होतात. नेमकं त्याच वेळी त्या गार हवेत नामाचा परफ्युम घालावा, समाधीसुखाचा अनुभव येईल!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

Friday, January 19, 2018

मरणाचे स्मरण असावे | हरिभक्तीसी सादर व्हावे || यावर थोडंसं सांगावं!


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका : मरणाचे स्मरण असावे | हरिभक्तीसी सादर व्हावे || यावर थोडंसं सांगावं!



श्रीराम! भगवंत नेहमी भक्त-अभक्त बघून पक्षपात करतो. संत, सद्गुरू देखील पूर्ण कृपा करतांना शिष्यांमध्यें पक्षपात करतात. परंतु, मृत्यू कधीही पक्षपात करत नाही. मृत्यूनें कंसाला कवटाळले, तसे परब्रम्ह परमात्मा श्रीकृष्णाला देखील कवटाळले. रावणाला देह सोडून जावे लागले, तसें रामरायाला देखील नश्वर देह ठेवून वैकुंठात जावे लागले.
कोणत्याही प्राण्याच्या आणि त्यातल्या त्यात नरदेहाच्या संचित कर्माचा हिशोब पूर्ण झाला की मृत्यू ती व्यक्ती संत आहे की नास्तिक हे बघत नाही; भगवंत आहे की दानव हे बघत नाही; लहान मूल आहे की तरूण आहे की जख्खड वयोवृद्ध हे बघत नाही; पूण्यवान आहे की महापापी हे बघत नाही.
अकस्मात सांडुनिया सर्व जाती ॥

वेळ आली की हातातलं काम टाकून त्याला जीवनाला राम-राम करावा लागतो.
दररोज वर्तमानपत्रात आपण इतके आकस्मिक मृत्यू वाचतो, पण आपल्याला त्याचं फारसं काही वाटत नाही. परंतु, जेंव्हा जवळचा एखादा मनुष्य जातो तेंव्हा आपण हादरून जातो. आणि मग त्याबद्दल अतोनात शोक करून आयुष्याच्या अनिश्चिततेबद्दल क्षणिक चिंतन करतो. आणि दुःखद चिंतनातून नश्वर गोष्टींबद्दल आपल्या मनांत जे वैराग्य येतं, ते म्हणजे "स्मशान वैराग्य"! आणि आपलं हेच आपलं दुर्दैव आहे की भगवंत किंवा संत आपल्याला वेळोवेळी अशा घटनांमधून जागं करण्याचा प्रयत्न करतात.
होऊनिया जागे, उठा वेग करा ।
शरण जा उदारा, रघुवीरा ।।
जो यांतून बोध घेऊन तसं आचरण करतो, तोच मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवून रामचरणी लीन होतो!

जन्म आणि मृत्यू यांतील अंतर खरं किती आहे, यांवर एक दृष्टांत बघुया...
एक सज्जन एका नवीन गावांत स्थलांतरीत झाला. गावांत येतांना वेशीजवळ असलेल्या स्मशानभूमीकडे लक्ष गेले आणि त्याला आश्चर्य वाटलं.  त्याठिकाणी लहान लहान पट्टीवर मृत व्यक्तीचं नाव आणि त्याचं वय लिहिलेलं होतं. कुणाच्या नावाखाली २० वर्ष, कुणाच्या नावाखाली १२ वर्ष, काही ठिकाणी ३ वर्ष, काही ठिकाणी ६ महिने तर काही नावांखाली काही दिवस एवढंच आयुर्मान लिहिलेलं होतं....

तो गृहस्थ गावात गेल्यावर गावकऱ्यांनी या नवागताचं स्वागत केलं आणि तो तिथे राहू लागला. परंतु, त्याच्या मनांत लवकर मरणाचं भय होतं. त्या भितीपोटी तो अस्वस्थ झाला आणि काही दिवसांतच गाव सोडण्याची तयारी करू लागला.... लोकांना हे पाहून वाईट वाटलं आणि त्यांनी त्याला अचानक गाव सोडण्याचं कारण विचारलं. यांवर त्याने सांगितलं की या गावात कुणी जास्त काळ जगत नाही, म्हणून मृत्यूच्या भितीनें मी गाव सोडत आहे. लोकांना त्याचं हसू आलं. एक गांवकरी म्हंटला, तुम्ही पुस्तकी ज्ञान घेतलं, पण व्यावहारिक ज्ञान काहीच दिसत नाही. अहो, आमच्याकडे बघा, काहीजण ४०, काही ५० तर बरेच जण आयुष्याची सत्तरी गाठलेले आहेत. १५-२० लोक तर नव्वदी पार केलेले आहेत!

यांवर त्या गृहस्थाने स्मशानभूमीतील पट्ट्या आणि त्यावरील आयुर्मानबद्दल विचारलं!

तेंव्हा, एक आजोबा म्हंटले, "आमच्या गावांत एक नियम आहे. जेंव्हा एखादी व्यक्ति रात्री झोपायच्या तयारीत असते, तेंव्हा ती स्वतःच्या वहीत एक हिशोब लिहिते"! 

कसला हिशोब?

"आज दिवसभरातील माझा किती वेळ परमार्थात गेला, तेवढा वेळ आठवून तितके तास किंवा मिनीट तारखेसह ती व्यक्ती आपल्या वहीत नोंदवून ठेवते. अशा प्रकारे प्रत्येक गावकरी दररोज रात्री नोंदणी ठेवतो. आणि त्याचा मृत्यू झाला की त्याची ती वही काढून त्या सर्व मिनीटं, तासांची गोळाबेरीज करून एकूण वर्ष, महिने, दिवस काढले जातात. तेच त्याचं आयुर्मान म्हणून त्याच्या नावाखाली लिहिलं जातं!"

जेवढा वेळ परमार्थात गेला, तेवढंच आयुष्य! तेंव्हा, तुम्ही शंभर वर्ष देहानें कदाचित जगला असाल, पण
अल्पायुष्य मानव देह ।
शत गणिले ते अर्धरात्र खाय ।
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय ।
काय भजनासी उरले ते पाहे गा ।।
आयुष्य शत म्हणजे शंभर असले तरी त्यातील अर्ध आयुष्य रात्रीने (झोपेनें) खाल्लं. मधलं दिवसाचं जे अर्ध आयुष्य आहे, त्यातील बालपण, आजार, म्हातारपण, भांडण तंटा, द्वेष, काळजी, भिती यात बहुतांश जीवन गेलं तर भजनासाठी म्हणजे परमार्थासाठी किती उरलं ते पहा...

प्रत्येकाचा जन्म कुठे होणार हे जसं त्याचं पूर्वसुकृत ठरवतं, त्याचप्रमाणें, मृत्यू कुठे होणार, कधी होणार, कशा प्रकारे होणार हे त्याच्या पूर्वकर्मानुसार निश्चित होतं. आणि मग वेळ आली की ती व्यक्ती त्या ठिकाणी, त्या परिस्थितीत बोलावल्यासारखी जाऊन हजर होते व इच्छा असो किंवा नसो मृत्यूला स्वाधिन होते.

सर्वांसाठी जन्माचं केंद्र मातेचा गर्भ आणि जन्माचं कारण वासना हे एकच आहे. आणि मृत्यूसुद्धां प्रत्येक मनुष्याला अनिवार्य आहे. परंतु, त्या मृत्यूचं केंद्र आणि कारण प्रत्येक मनुष्याचं वेगवेगळं असतं. तो मृत्यु कसा येतो आणि मनुष्य त्याला कसा सामोरा जातो याला महत्व आहे.

कबीराने देहाला पिंजरा आणि आत्म्याला पक्षी म्हंटलं आहे. हा पक्षी पिंजरा तोडून केंव्हा उडून जाईल सांगता येत नाहीं. उड जाएगा हंस अकेला । या जगाच्या जत्रेत तो हंस येतो, फिरतो आणि मग अचानक उडून जातो.
कोण समयो येईल कैसा ।
याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा ।
उडोन जाती ।।
तो हंस जाणार तर आहेच, पण तो सद्गतीला जावा असं वाटत असेल तर जीवन जगतांना 'हंस' चं उलटं 'सहं' म्हणजेच "सोहं" हे त्यांने ध्यानांत ठेवावं. हे 'सोहं' म्हणजेच नाम! हीच हरिभक्ती! आणि म्हणूनच अंततो गत्वा समाधानासाठी,
🌿🌿   मरणाचे स्मरण असावे ।   🌿🌿
🌿🌿 हरिभक्तीसी सादर व्हावे ।। 🌿🌿

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Wednesday, January 17, 2018

करोमि यद्यत्सकलं परस्मै ॥ या चरणाचा मतितार्थ सांगावा.

      🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका - कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै । गुरुवरायेति समर्पयामि ॥ यातील तिसऱ्या चरणाचा मतितार्थ सांगावा. 

श्रीराम! यातील तिसरी ओळ हा सेवामार्गाचा प्राण आहे! भक्ती दोन प्रकारे करता येते: १) साधन भक्ती २) निःसाधन भक्ती साधन भक्तीमध्यें पुजाअर्चा, स्तोत्र पठन, नैवेद्य, आरती, तिर्थयात्रा, यज्ञयाग इ. अनेक उपप्रकार येतात. परंतु, कलियुगात विषयी माणसाकडे वरील सर्व साधनांना आवश्यक असलेली पात्रता नाही आणि क्षमताही नाही. ती सर्व साधनं मोक्षदायिनी आहेतच, पण त्यातील अनेक साधनं आज तमोगुण, रजोगुणप्रधान परिस्थितीमुळे नष्ट तरी झाली आहेत किंवा दूषीत तरी झाली आहेत. 

अशा प्रतिकुल काळात जेंव्हा साधक पात्रता अपात्रता, योग्यता अयोग्यता या द्वंद्वात अडकतो, तेंव्हा साधनेत बाधक तत्व येतात. परंतु, साधकानें करोमि यद्यद सकल कर्म त्याला समर्पित केले तर भगवंत पात्र अपात्र हा विचार न करता त्या जीवावर कृपा करतात. त्याला श्रीमद्भागवत ग्रंथात पोषण असं म्हंटलं आहे. यालाच "निःसाधन भक्ती" असे म्हंटले जाते! निःसाधन भक्तीमध्यें प्रेमभाव प्रबळ असतो. यात भक्ताला विशेष प्रयत्न करावा लागत नाही. साधन भक्ती ही मर्यादा भक्ती आहे; तर निःसाधन भक्ती ही पुष्टी भक्ती आहे. पुष्टी भक्तीमध्यें भगवंत स्वतःला वाटेल त्याच्यावर वाटेल तिथे जाऊन कृपा करतो. साधन भक्तीमध्यें भक्त परतंत्र असतो व भगवंत स्वतंत्र असतो. परंतु, पुष्टी भक्तीमध्यें भगवंत परतंत्र असतो तर भक्त स्वतंत्र! भक्ताच्या प्रेमाच्या बंधनात भगवंत अडकतो! 
 
यशोदा मातेच्या प्रेमामुळेच भगवंत दोरीनें बांधले गेले, गोपिकांच्या लोण्याच्या नवनित प्रेमामुळेच भगवंत नाचु लागले. निःसाधन भक्तीमध्यें भगवंत स्वतःच साधन बनतो! साधन भक्तीमध्ये भगवंताला काही समर्पित केल्यावर ते भक्तानें वापरणें निषेध मानलं आहे; परंतु निःसाधन भक्तीमध्यें भगवंताला यद्यद सकल समर्पित केल्यावर ते प्रसाद म्हणून वापरण्याचा विधी मानला आहे! साधन भक्तीमध्यें शोडषोपचार, नैवेद्य, धुपदिप आरती, श्लोक इ. झालं की पुजा समाप्त! पण निःसाधन भक्तीमध्यें भांडी घासणे, घर झाडणे, भाजी आणणे ही भगवद्सेवा अविश्राम अहर्निशी चालू असते! कारण, कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै । गुरुवरायेति समर्पयामि ॥ 

    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, January 15, 2018

प पू प्रल्हाद महाराजांच्या सवाईवर चिंतन - साखरखेर्डा - १४ जानेवारी २०१८

श्रीराम! "आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे" या समर्थ वचनाचे अक्षरशः आचरण करणारा सत्पुरूष म्हणजे प. पू. सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज! आजच्याच पर्वकाळात ९८ वर्षांपूर्वी म्हणजे १९२० साली महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने सर्व वस्तूंसह गृहदान करून अनासक्तीचा कळस गाठला. महाराजांच्या पारमार्थिक जीवनातील या प्राथमिक संक्रमणाचा हा संक्रांतीचा पर्वकाळ!
आज या पर्वकाळात साखरखेर्डा येथे श्रीचरणी प्रवचन सेवा घडली.

चिंतनासाठी घेतलेला विषय: जोहार मायबाप जोहार ।
सद्गुरू प्रल्हादाचा मी महार ।।

या चिंतनातून बोध घेऊन सदाचरण आणि सदास्मरण साधले तर सद्गुरू आपल्याला रामानंद काय आहे याची अनुभूती देतील!!!


Friday, January 12, 2018

एकाच्या कैवाडे ! उगवी बहुतांचे कोडे !! म्हणजे काय समजुन सांगा ना.

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


*शंका*- एकाच्या कैवाडे ! उगवी बहुतांचे कोडे !! म्हणजे काय समजुन सांगा ना ....ही नम्र विनंती !


श्रीराम! ताई, तुम्ही ही शंका अगोदर मला वैयक्तिक अकाऊंटवर विचारली, तेंव्हा मी तुम्हाला म्हंटलं की इथे सांगू की ग्रुपमध्ये? तर तुम्ही म्हंटलात, "ग्रुपमध्ये! कारण इतरांना देखील त्याचा अर्थ समजेल."

वरील ओवीचा हाच तर अर्थ आहे. ही शंका तुम्ही एकटीनें मांडली. परंतु, त्याचं निरसन एकांतात न करता लोकांतात केलं तर अनेकांना या ओवीचं कोडं सुटेल. हेच तत्व तुकोबांनी ओवीबद्ध करून सांगितलं की, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचें कोडे । भगवंताचा स्वभाव वर्णन करतांना तुकोबा म्हणतात की, एकाच्या समाधानासाठी चिंतनाचं निमित्त करून तो अनेकांचं कोडं सोडवतो!

आपल्याला व्यवहारातील 'गव्हासोबत किडे रगडले जातात', असा वाक्प्रचार माहीत आहे. त्याचा अर्थ एखादी वाईट व्यक्ती असेल तर तिचा नाश करतांना अनेक निरपराध लोकांना देखील शिक्षा भोगावी लागते. परमार्थात याच पातळीवरचा परंतु सुखद सिद्धांत वरील ओवीत तुकोबांनी मांडला आहे. एकाच्या कैवाडे, उगवी बहुतांचें कोडे । एखाद्या भक्ताच्या कल्याणाचं निमित्त करून भगवंत अनेक बद्धांना सिद्धावस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग खुला करून देतो.

या ओवीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे परब्रम्ह परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि शरणागत भक्त अर्जुन! अर्जुनाच्या मनांत शंका होती. ही शंका युद्ध करणे, न करणे याबद्दल नव्हती. ही शंका मोहातून निर्माण झाली होती. मोह ही शंका नव्हती. प्रिय व्यक्तींबद्दलच्या मोहातून श्रियसंदर्भात शंका होती. युद्ध करणे न करणे यांतून श्रिय म्हणजे हित, कल्याण होईल का? ही ती शंका होती. आणि ही श्रिय म्हणजे कल्याण कशात आहे शंका विचारल्यावर भगवंतानें या एकाच्या कैवाडे (एकाच्या कल्याणासाठी) जो हितोपदेश दिला, त्यातून येणाऱ्या लाखो करोडो लोकांचे म्हणजे बहुतांचे सर्व कोडे सुटले गेले! एकाच्या कैवाडे उगवें बहुतांचें कोडे ।

खरोखर, अर्जुनासारख्या एका भक्ताच्या समर्थनासाठी (एकाच्या कैवाडे) आजच्या मोहाच्या गुंत्यात गुंतलेल्या बहुतांचे कोडे उलगडण्याचं काम या भगवद्गीतेनें केलं आणि पुढेही करत राहील! आपल्याला देखील प्रेयसापेक्षा (विषयापेक्षा) श्रेयसाचा (कल्याणाचा) ध्यास असेल, तर अर्जुनासारखा पूर्ण शरणागत भाव ठेवावा!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏 

Wednesday, January 10, 2018

भगवंताच्या प्रति असलेलं प्रेम वेडं खरं की डोळस खरं?

🌹🌷🌹  *" नामप्रेमचिंतन "*  🌹🌷🌹

*शंका*- एका अधिकारी सत्शिष्यानें विचारलं की, भगवंताच्या प्रति असलेलं प्रेम वेडं खरं की डोळस खरं? आणि यातलं उच्चकोटीचं कोणतं?


*श्रीराम!* मुळात प्रेमाचं खरं स्वरूप म्हणजे प्रेम हे खरं असतं, डोळस असतं आणि वेडंही असतं!

विषयावरचं प्रेम हे प्रेम नसतं. याची तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण स्थल, काल, निमित्तानुसार विषयात प्रेमाचं केंद्र बदलत असतं. दुसरं म्हणजे ते अज्ञानावर आधारित असतं आणि तिसरं कारण म्हणजे त्यात स्वार्थ, अपेक्षांचं गालबोट लागलेलं असतं! विषयावरची आसक्ती जाऊन जेंव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार भगवंताला समर्पित होतं, तेंव्हा विषयाची आस जाऊन भगवंताचा ध्यास लागतो. यालाच "प्रेम" म्हणतात.

हे 'प्रेम' भगवंतावर असते आणि भगवंत हा शाश्वत असल्याने, खरा असल्याने हे 'प्रेम' देखील खरे असते. या खरेपणाला, शाश्वतपणाला अध्यात्मशास्त्रात 'सत्' म्हणतात! विषय अनित्य, असत्य आहे याची जाणीव झाली की मनुष्याला अखंड समाधान देणाऱ्या भगवंताची ओढ लागते. याचा अर्थ, भगवंताच्या प्रेमात पडणें हे विषयासक्ती जाण्याचं लक्षण आहे. म्हणजेच भगवंतावर प्रेम जडणें हे ज्ञानाचं लक्षण आहे.
ज्ञानाचा प्रकाश चित्तात प्रगट होतो. प्रेमाच्या चित्तातील प्रगटीकरणाला अध्यात्मशास्त्रात 'चिद्' म्हणतात!
विषयासक्ती असत्य आणि भगवंताचें प्रेम खरं असल्याचं ज्ञान झाल्यावर त्या प्रेमाचा निजध्यास लागतो. हा निजध्यास जेंव्हा आपली परिसिमा गाठतो, तेंव्हा त्या भक्ताला लौकिकाची चाड, धनमानाची कामना रहात नाही. याला भगवंताचें वेड लागणें म्हणतात. याच वेडेपणाला अध्यात्मशास्त्रात 'आनंद' म्हणतात!
अशाप्रकारे, भगवंताचें 'प्रेम' हे खरे म्हणजे सत्; डोळस म्हणजे चिद्; आणि वेड म्हणजे आनंद स्वरूप अर्थात सच्चिदानंद स्वरूप आहे!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, January 8, 2018

कृपया ज्ञान आणि भक्तीचा भावार्थ उलगडून सांगावा.

🌹🌷🌹  *" नामप्रेमचिंतन "*  🌹🌷🌹

*शंका*- रघुवीरजी कृपया ज्ञान आणि भक्तीचा भावार्थ उलगडून सांगावा.


*श्रीराम!* एखाद्या अभंगाच्या प्रति असलेला भाव म्हणजे भक्ती! आणि त्या भक्तीपोटी एखाद्याने मांडलेलं भावपूर्ण चिंतन म्हणजे ज्ञान!

*भाव = भक्ती; अर्थ = ज्ञान*
*भावार्थ = भक्ती + ज्ञान*

भक्ती आणि ज्ञान यांचा अन्योन्य संबंध आहे, असं एका रामायणकारानें म्हंटलं आहे. श्रीरामचंद्राचं चरित्र सर्वप्रथम महादेवानें गायलं. त्यावेळी श्रोता होती पार्वती माता! नंतर हे रामायण काकभुषुंडींने गरुडाला ऐकवलं. नंतर तीच कथा भारद्वाज मुनींनी याज्ञवल्क्य या अधिकारी श्रोत्यासमोर गायली. पुढे तुलसीदासानें तेच रामचरित स्वान्तःसुखाय गायलं! यापैकी काकभुषुंडींने गरूडासमोर रामकथा गातांना भक्ती-ज्ञानाचा समन्वय सांगितला की,
*ज्ञानहिं भगतिहि नहिं कछु भेदा ।*
*उभय हरहि भव संभव खेदा ।।*

काकभुषुंडी म्हंटले, ज्ञान आणि भक्ती यांच्यात काहीही भेद नाहीये; दोन्हीचं कार्य एकच आहे, ते म्हणजे भवभ्रम आणि भवदुःख हरण करणें! काय गंमत आहे बघा, ज्ञानी मनुष्याला जगत मिथ्या आहे, हे ज्ञान झालेलं असतं. आणि जगतच मिथ्या तर त्या जगातील दुःखसुद्धां ज्ञानी माणसाला मिथ्याच अाहे. त्यामुळे, त्याला भवभ्रम होत नाही आणि भवदुःखही रहात नाही. तो मनुष्य कर्म करुनही ज्ञानयोगी जीवन जगत असतो!

भक्तीमार्गामध्ये सुद्धां भवभ्रम आणि भवदुःख उरत नाही. कसं? तर भक्त भगवंताला समर्पित झालेला असल्याने त्याला जगताचं भानच उरत नाही. म्हणजे जग सत्य आहे की मिथ्या या भानगडीत तो पडत नाही. आणि जो जगाला विसरला त्याला जगातील दुःखाचं भय कसं उरेल? तो तर नित्य आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत असतो! तेंव्हा, भगवद्भजनी रंगलेल्या भक्ताला भवभ्रम होत नाही आणि भवदुःखही रहात नाही! अशाप्रकारे, ज्ञान आणि भक्ती यांच्यात काहीही भेद नाहीये!

तुलसीदासानें भक्ती-ज्ञानाचा समन्वय सांगितला असला तरी त्यात एक निराळी तार आहे असं मला वाटतं! ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समाधीसुख मिळेल, पण ते थोडं कोरडं असेल. क्षमा मागतो, पण एक जेवणाचं उदाहरण बघुया. एखाद्याला बटाटा आवडतो. पण पोळीसोबत बटाट्याची कोरडी भाजी खातांना जेवण थोडं कोरडं वाटेल, एखाद्याच्या छातीत बसेल. मग तो म्हणेल या भाजीला रस्सा केला तर आणखी मजा येईल, जेवणाचा आस्वाद घेता येईल! तसंच जीवन सर्वांना आवडतं. पण, भगवंतासोबत ज्ञान जोडलं तर ते कोरडं वाटेल, एखाद्याच्या छातीत नाही पण अहंकाररुपानें मस्तकात बसेल. मग तो म्हणेल या कोरड्या ज्ञानाला भक्तीप्रेमाचा रस्सा मिळाला तर मजा येईल, जीवनाचा आस्वाद घेता येईल!

उद्धवाकडे ज्ञान होतं, परंतु ते कोरडं होतं, कच्चं होतं. तांदुळ कच्चा राहिला तर त्याला पुन्हा अग्नीवर शिजवतात. या सिद्धांताप्रमाणें उद्धवाचे ज्ञान पक्व करण्यासाठी भगवंतानें त्याला आपल्या सर्वोत्तम भक्तांकडे म्हणजे गोपींकडे आपला संदेश देऊन पाठवलं. तिथें त्याचं ज्ञान कोणत्या अग्नीवर पक्व करायचं होतं? तर सर्व गोपिका कान्हाच्या विरहाच्या ज्या अग्नीवर जळत होत्या त्या अग्नीवर!

गोपिकांना भेटल्यावर उद्धव त्यांना म्हंटला, मी तुमच्यासाठी कन्हैयाचा संदेश घेऊन आलो आहे. यांवर गोपिका हसून म्हंटल्या, "संदेश कुणाचा येतो? जो दूर आहे त्याचा. जो सतत आपल्या जवळच असतो त्याचा संदेश वगैरे काही येत नसतो, वेड्या!" गोपिकांच्या प्रेमाग्नीने उद्धवाचं ज्ञान परिपक्व झालं. गोपिकांनी भक्तीरसानें त्याला इतका भिजवला की तो त्या मातीत कृष्णप्रेमानें लोळू लागला!

तत्वज्ञानी उद्धव आला। प्रबोधन्या त्या गोपीबाला।
पाहुनी त्यांच्या दृढ भक्तीला । हरले त्याचे समूळही ज्ञान ।

तेंव्हा, भक्ती म्हणजे ज्ञानाची परिपक्व अवस्था! आणि ज्ञान म्हणजे भक्तीची पराकाष्ठा! गोपिकांनी वेद, उपनिषदे इ. ग्रंथांचे अध्ययन न करता जे अंतिम ज्ञान उद्धवाला मिळालं नाही ते त्यांनी कमावलं! हे कसं शक्य झालं? तर, त्यांच्या भक्तीनें परिसिमा गाठली होती. आणि भक्त जेंव्हा आपल्या भगवद्प्रेमाची परिसिमा गाठतो, तेंव्हा तो आपोआप, अनायासे ब्रम्हज्ञानी बनतो!

भक्तीचे तीन प्रकार आहेत: प्रवेशात्मक भक्ती, क्रियात्मक भक्ती आणि संबंधात्मक भक्ती! प्रवेशात्मक भक्तीमध्यें तीन मार्ग आहेत. त्यांना श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण असं म्हणतात; क्रियात्मक भक्तीमध्यें तीन मार्ग आहेत. त्यांना पादसेवन, अर्चन आणि वंदन म्हणतात; तर संबंधात्मक भक्तीमध्यें देखील तीन मार्ग आहेत. त्यांना दास्यत्व, सख्य आणि आत्मनिवेदन असं म्हणतात!

जेंव्हा एखादा भक्त या तीन प्रकारातील नऊ भक्तीमार्ग अनुभवतो, तेंव्हा त्याला नवविधा भक्तीमुळे जे समाधीसुख प्राप्त होतं, त्याचं वर्णन वेदांतच काय प्रत्यक्ष परब्रम्ह परमात्मा सुद्धां करू शकत नाही! आपण या समाधीसुखाच्या दिशेने चालायला निष्ठेनं, चिकाटीनं आणि प्रेमानं सुरूवात करूया, आज ना उद्या मुक्कामाला पोहचूच!

         *("नामप्रेम" पुस्तकातून साभार)*

🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Saturday, January 6, 2018

"जगी येतसे तीनदा संधिकाल" म्हणजे काय?

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷


शंका- "जगी येतसे तीनदा संधिकाल" म्हणजे काय?

श्रीराम! तुम्ही कोणत्या अनुषंगानें विचारलं माहीत नाही. परंतु, मला असं माहीतीये की, भगवंत मनुष्याला आत्मज्ञान होण्याच्या तीन संधी देतो....
पहिली संधी जन्माला आलो तो क्षण!
दुसरी संधी विवाहबंधनात अडकतो तो क्षण!
व तीसरी संधी मृत्युचा क्षण!
या तिन्हीपैकी एका संधीकालात भगवंताचं स्मरण मनुष्याला परमात्मज्ञान प्राप्त करून देऊ शकतं!

संधी म्हणजे जोडणे! जीव शिवाशी पुन्हा जोडण्याचा काळ म्हणजे संधीकाल! जन्माला आलं त्याक्षणी मी कोण? (कोहं, कोहं) असं बाळ रडत असतं. त्यामुळे, ती संधी ध्यानांत आली नाही! 
दुसरी संधी विवाहबंधनात अडकतो तो क्षण: त्यावेळी आपल्याला सर्वजण सावधान करतात, पण आपण सावध होत नाही. आणि जो त्यावेळी सावधान ऐकून सावध झाला, त्या राम-दासाला लोक समर्थ म्हणू लागले!

तिसरी संधी ही मृत्युच्या थोडं अगोदर मिळते! गेल्या शतकात, कागवाड येथे एक गणुबुवा म्हणून रामदासी रहात होते. श्रीमहाराजांच्या पहिल्या दर्शनातच बुवांनी अनुग्रह घेतला आणि नामाचा जोर वाढवला! महाराजांच्या आज्ञेने गणुबुवांनी घरात रामरायाची स्थापना करून रामोपासनेत राहिले. त्यांच्याकडे एक संतुबाई नावाची एक महारीण झाडलोट करत असे. (मला नाव नक्की आठवत नाही. संतुबाई असावं कदाचित) ही अडाणी बाई दिवसभर मुखानें नाम आणि हातानें साफसफाई अगदी मनापासून करत असे. महाराजांना बघितलं नाही, पण त्यांना आवडणारं नाम निष्ठेनं ही बाई घेत असे...
तीचं वय झालेलं होतं आणि अजून महाराजांचं दर्शन झालं नव्हतं. तीने मजुरीचे पैसे साचवून शेजारच्या बाईकडे देऊन सांगितलं, "माझं मयतकार्य या पैशातून कर." अशातच महाराज कागवाड येण्याचं ठरलं... जेंव्हा गणुबुवांनी या महारणीला विचारलं, "महाराज आले की त्यांना काय मागशील?" तेंव्हा, ती म्हंटली, "तोंडात रामाचं नाव राहू द्या आणि चांगलं मरण द्या!"
महाराज येणार, महाराज येणार या ध्यासानें तिचा नामाचा जोर वाढला.  श्रीमहाराज कागवाडला आले तेंव्हा हीनें डोळे भरून महाराजांना बघितलं आणि पायावर डोकं ठेवलं. थोड्या वेळाने ती म्हंटली, "महाराज, सांभाळा मला! मी घरी चालले!" श्रीमहाराज म्हंटले, 'रामराया तुझ्या सोबत आहे. जा घरी!'
ती बाई घरी जाऊन घोंगडीवर पडली आणि 'राम राम राम' म्हणून शांतपणे देह सोडला! महाराजांनी स्वतः तिच्या अंतिमविधीसाठी पन्नास रूपये दिले आणि नंतर तिच्या नावे अन्नदान करतांना महाराज म्हंटले, "ती एक अधिकारी भक्त होती. तिची उच्चकोटीची भक्ती कुणाला लक्षात आली नाही. पूर्वकर्मानें ती महारीण झाली, पण आता रामरायाच्या ध्यासानें तिला सद्गती मिळाली!" तिसरा संधीकाल हा आहे! मृत्युपुर्वी एखादा मनुष्य बेशुद्ध जरी असला तरी काही क्षण तो शुद्धीवर येतो. आणि त्या क्षणी जर त्याला भगवंताचें स्मरण घडलं तर त्याचा उद्धार झालाच!
यासंदर्भात अर्जुनानें श्रीकृष्ण परमात्म्याला एक शंका विचारली, "हे मोहन, जर शेवटचा क्षण भगवंताच्या स्मरणात गेल्यावर मोक्षलाभ असेल तर आयुष्यभर विषयभोग घेऊन सर्वच लोक शेवटच्या क्षणी नाम घेऊन उद्धरून जातील ना!" भगवंत म्हंटले, दिवसभर ज्याचं चिंतन असेल तेच स्वप्नांतसुद्धां येतं. तसंच आयुष्यभर विषयाचंच चिंतन केलं असेल तर शेवटचा संधीकाल विषयाचंच स्मरण करेल.  त्यामुळे, अंतकाळी भगवंताचें स्मरण व्हावें अशी इच्छा असेल तर आयुष्यभर भगवंताचंच स्मरण राखावं लागेल!

श्रीमहाराज म्हणत, तुम्ही जागेपणी नाम घ्या, झोपेत आणि स्वप्नांत नाम येण्याची जबाबदारी माझी! तेंव्हा, पहिली संधी लक्षात आली नाही, दुसरी संधी हुकली आहे. आता तिसरी आणि शेवटची संधी सोडू नयें!
पुन्हा नाही ऐसी वेळ!
कारण, आयुष्याचा भरवंसा नाही. म्हणून शक्य तितक्या त्वरेनें व तळमळीनें कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा!

रघुवीरजी एक विचारू का हो? पहिली संधी सगळ्यांचीच चुकणार ना? मग ती संधी ग्राह्य कशी मानायची?

श्रीराम! मी वर म्हंटलं की दुसरी संधी हुकली. पहिली हुकली नाहीच. पहिली संधी लक्षात आली नाही, असं म्हंटलो! पहिली संधी म्हणजे जन्म!

हो. पण तिचा कुणालाही उपयोग करून घेता येणार नाही. मग ती वायाच जाणार.

एखादा सामान्य मनुष्य जेंव्हा अधिकारी संतसत्पुरूषाला शरण जाऊन त्यांच्याकडून 'नाम' प्राप्त करून घेतो, हे शिष्यत्व म्हणजे खरा जन्म! हे शिष्यत्व खऱ्या अर्थानें आपल्या तन, मनांत रुजवलं मात्र पाहिजे! आणि ही जी पहिली संधी आहे ती लौकिक जन्माला येतांना मिळते आणि आजन्म ती तशीच राहते! त्या पहिल्या संधीची validity लाईफटाईम असते. तिसरी संधी येतांनाच ती पहिली संधी expire होते!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, January 4, 2018

श्रीकृष्ण कळायचा असेल तर अगोदर रामासारखं आचरण करावं लागेल, म्हणजे काय? किर्तन आणि प्रवचन यात फरक काय?


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका- श्रीराम समर्थ! श्रीकृष्ण कळायचा असेल तर अगोदर रामासारखं आचरण करावं लागेल!!! दादा, यावर थोडं जमेल तेव्हा विवेचन करावं.
किर्तन आणि प्रवचन यात फरक काय आहे !‬‬‬‬‬‬‬‬


श्रीराम! किर्तन म्हणजे कान्हा श्याम; प्रवचन म्हणजे पुरूषोत्तम राम!

किर्तन श्रीकृष्णावतारासारखं वरपांगी मनोरंजक वाटतं, तर प्रवचन श्रीरामावतारासारखं कठोर मनोमंथन वाटतं. परंतु, किर्तनातील नवनित मिळवण्यासाठी प्रवचनातील अर्क अंगात उतरला पाहिजे!

म्हणजे दादा जर का किर्तनाची तयारी एखाद्या साधकाला करायची असेल तर आधी नाम,नंतर प्रवचन व त्यानंतर किर्तन असेच ना?

हो, आधी नाम, नंतर प्रवचन, नंतर किर्तन आणि शेवटी नाम! नाम अनादी अनंत आहे! किर्तन, प्रवचन हे आवरण आहे; परंतु खरं तत्व नामच आहे, दुसरं कोणतं नाही! नाम अनाम अनंत है, दुजा तत्व न होई।।

आज विचारलेल्या किर्तन -प्रवचनातील फरक आणि काल विचारलेल्या राम-कृष्ण संबंध या दोन्हींचा अन्योन्य संबंध आहे. किर्तन म्हणजे कान्हा श्याम; प्रवचन म्हणजे पुरूषोत्तम श्रीराम!

प्रत्येक प्रापंचिक साधकानें किर्तन-प्रवचन जगलं तरच त्याचा प्रपंच परमार्थ कल्याणाचा होईल! किर्तनात लीला असतात; आपल्या जीवनातसुद्धां लीला असतात. कितीतरी चांगल्या वाईट माणसांसोबत आपल्याला प्रपंच आणि व्यवहार करावा लागतो. या सर्वांशी दोन हात करतांना रामाच्या मर्यादा आचरणें अत्यंत कठीण जाते. अशावेळी आपण श्रीकृष्णावतार जगत असतो. म्हणूनच श्रीमहाराजांनी गोंदवल्यात मस्तकावर श्रीकृष्ण घेतला.

अनेक साधक मला म्हंटले की, साधनेला जोर चढतोय, पण घरातील मंडळींकडून उपेक्षा, विरोध किंवा नाराजी व्यक्त होतोय. एकीकडे प्रापंचिक अपेक्षा दुसरीकडे पारमार्थिक ओढा यांत रस्सिखेच होतीये. काय करावं?

किर्तनात ताल, सूर, लय सर्व सांभाळून चिंतन मांडलं तर मनोरंजनातून नकळत मनोमंथन घडतं. त्याचप्रमाणें, प्रपंचांत घरातील लोकांचे एकेक ताल, बाहेरील समाजाचा निराळाच सूर व आपल्या व्यक्तिगत साधनेची लय यांना सांभाळून वर्तन केलं तर घरच्यांचं मन राखलं जाईल, त्यांचं मनोरंजन होईल व हे सर्व व्यवस्थित जमवल्यानें आपलं पारमार्थिक मंथनही होईल. आणि ही कसरत, ही लीला साधायला भगवंताचें श्रीकृष्ण रूपच समर्थ आहे!

श्रीकृष्णावताराकडे काही लोक विशेषतः कट्टर रामभक्त लबाडी किंवा मनोरंजन या दृष्टीकोनातून बघतात. जो स्वतःला रामभक्त म्हणवतो तो श्रीकृष्णाला जीवनात उतरवल्याशिवाय अंतःकरणात राम, आत्माराम प्रगट करू शकणार नाही! "आधी प्रपंच करावा नेटका" याचा मी अर्थ असा काढेल की, प्रपंचाला नाटक समजून आपल्याला मिळालेली प्रत्येक भूमिका नेटकेपणानें नटवली तरच परमार्थ साधेल!

ज्याला प्रपंचांतील नाटक गाजवता आलं नाही, तो परमार्थासाठी अपात्र आहे.

कालची एका साधकाची व्यथा बघा :

Shreeram!  Dada maza  aanand , samadhan akhand nahi he kalale..... mulicha maths cha paper khup kathin hota.....ti khup radali tevha aanand samadhan gayab zale.

त्यांना मी म्हंटलं, जर मुलीच्या अपयशानें तुम्ही व्यथित झाला नसता तर तुम्ही परमार्थात अपयशी झाला असतात. तेंव्हा, तुमचं व्यथित होणं हेच दर्शवतं की तुम्ही पालकाची भूमिका छानच बजावली!

श्रीकृष्णानें गीतेत सांगितलं की, धर्माच्या अविरूद्ध कर्मात मी आहे! आईवडिलांनी मुलांच्या दुःखाला आपलं दुःख मानणं, हा धर्म आहे. आणि तुम्ही हा धर्म बजावता, तेंव्हा तुमचं आचरण धर्माचरण म्हणजेच कृष्णाचरण आहे! यांत, मुलगी रडत असतांना तुम्ही रामरायाप्रमाणें लगेच अभ्यास मर्यादा वगैरे सांगितलं तर ते योग्य ठरणार नाही! अशावेळी तुमचं व्यथित होणं तिची व्यथा कमी करेल. ही शुगर कोटेड गोळी म्हणजे किर्तन!

आणि मग थोड्या वेळाने तुम्ही अभ्यासातील त्रुटी, वेळेचं नियोजन इ. कडू गोळीचं प्रवचन दिलं तर त्या प्रवचनाचा चांगला गुण येईल. आणि मग पुढच्या परिक्षेत तिला चांगले गुण मिळतील! तेंव्हा, अशाप्रकारे प्रपंचांत समरस होऊन साधनेला लागणं ही खरी कला आहे. आणि ही कला साधण्यासाठी कान्हाची लीला डोळ्यासमोर ठेवावी!

परंतु, किर्तन ऐकतांना जर आपण लीलांमध्ये मनाचं रंजन करत गेलो व त्याचं सार गमावून बसलो तर पंचपक्वान्न खाऊन उपाशी राहिल्यासारखं होतं. त्याचप्रमाणें, प्रपंचांत समरस होतांना त्यातच रमलो व परमार्थ गमावून बसलो तर समाधानाची तृप्ती मिळणार नाही. आणि म्हणूनच देहानें कृष्णाचरण करतांना मनानें रामाचरण ठेवणें जरूर आहे! देहानें कृष्णाचरण केल्यानें बाह्यांगानं शुद्धता मिळेल; तर मनानें रामाचरण केल्यानें अंतरंगानें पवित्रता मिळेल!

आपल्याला समुद्र बघायला फार आवडतो. विशेषतः त्या एकानंतर एक उसळत येणाऱ्या लाटा! हा समुद्र वरून स्वच्छंदपणें उसळलेला दिसत असला तरी तो तळाशी अतिशय शांत, स्थीर असतो, निश्चल असतो! या माणसाला मोहून टाकणाऱ्या लाटा म्हणजे मनमोहन श्रीकृष्ण! यानें मनोरंजन होतं, यात प्रत्येक लाट निराळी, वेगवेगळ्या छटांची. किर्तन असंच असतं; प्रत्येक वेळी वेगळा भाव, वेगळी छटा! परंतु, या उसळणाऱ्या लाटांचं अधिष्ठान म्हणजे त्याचा शांत, निश्चल पाया म्हणजे पुरूषोत्तम श्रीराम! वरून कितीही उसळला तरी आंत स्थीर, शांत, समाधानी! तोच निर्गुण निराकार सुप्त आनंद! अंतःकरणाच्या तळाशी असं स्थीर रामाचरण असेल तर वरच्या कृष्णाचरणानें येणाऱ्या लाटांचा त्रास न वाटता मजा वाटेल!

अंतःकरणात रामरायाचं सतत स्मरण असेल तर प्रत्येक क्षणी येणारा नवीन प्रसंग, प्रपंचांतील, व्यवहारातील आव्हानांच्या लाटा या कान्हाच्या लीला वाटतील. आणि देहानें कृष्णाचरण व मनानें रामाचरण केल्यानें देह ज्या घरांत राहतो, ते घर गोकुळ; तर देहाच्या आत जे अंतःकरण आहे ते अयोध्या बनेल! परवा, एका साधकानें मला विचारलं की, माझ्यासाठी महाराजांचा काय निरोप आहे तो सांगा! मी म्हंटलं, महाराज म्हंटले की "आनंदसागर हो!!!" आनंदसागर वरून उसळत असतो, कारण तळाशी तो स्थिर असतो! तळाचं स्थैर्य स्वान्तःसुखाय असतं, तर वरची उसळी जनसुखाय असते!

अंतःकरणातील श्रीराम हा स्वान्तःसुखाय ठरेल, त्यालाच प्रवचन म्हणावं! मला रामरायाच्या इच्छेनें साखरखेर्डा, गोंदवले, जालना, औरंगाबाद इ. ठिकाणी जी प्रवचन सेवा घडते, ती मी लोकांना उपदेश द्यायचा म्हणून करत नसून ती सेवा स्वान्तःसुखाय असते. त्या प्रवचनातील थोडासा अर्क माझ्या अंतःकरणात स्थीर झाला तरी कल्याण करी रामराया!!! तेंव्हा, प्रवचन हे स्वान्तःसुखाय असते तर किर्तन हे जनसुखाय असते! याठिकाणी सुख हा शब्द समाधान या अर्थानें घ्यावा!

आपली पारमार्थिक साधना म्हणजे प्रवचन; तर प्रापंचिक सेवा म्हणजे किर्तन! आपली साधना मनांत असेल तर आनंद मिळेल. आणि त्या आनंदाच्या लाटा बनून त्या लाटा जनसेवेत म्हणजे कुटुंबातल्या लोकांच्या सेवेत गेल्या तर 'आनंदसागर' तयार होईल! तेंव्हा, या चिंतनातून एकच विनवणी करावी वाटते की, प्रपंच परमार्थ दोन्ही कल्याणाचं होण्यासाठी राम-कृष्ण संबंध जोपासावा, "आनंदसागर" उसळेल!

         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏