🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷


श्रीराम! ५ मे २०१५ रोजी 'नारद जयंती' ला सद्गुरू कृपेने "नामालय" हा नामस्मरण उपक्रम सुरु झाला. देश विदेशातले अनेक नामसाधक या उपक्रमात सहभागी झाले. याच उपक्रमातून काही पारमार्थिक शंका समाधान "नामप्रेम" या whatsapp ग्रुपद्वारे झाले. ते पुस्तक रूपानेही आकारास आले (Contact 9881400280) इथे या माध्यमातून ते एकत्र करण्यात येत आहे. याबरोबर जी काही चिंतन सेवा गेल्या काही वर्षात झाली आहे, त्याचे एकत्रीकरणही या माध्यमातून केले आहे. यातून नामसाधन वाढीस लागून सर्वांना समाधान मिळावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!
🌸🌹🌸 ।। नामसंध्या ।। 🌸🌹🌸
श्रीराम!
भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली असल्याने याठिकाणी येणाऱ्या जीवात त्याचा अंश असतोच असतो. परंतु, अहंपणामुळे मनुष्य मी अंशीचा म्हणजे भगवंताचा अंश आहे हे विसरून अनाचार करतो. अहंपणामुळे जगतसंबंध दृढ होऊन मनुष्य बंधनात अडकत जातो. पण अहंकृतीला दंडित करून जो भगवद्संबंध दृढ करतो, तो मोक्षाकडे वाटचाल करतो.
हे जसे सामान्य मनुष्याचे आहे, तसेच मनुष्याला निर्माण करणाऱ्याला भगवंताचें आहे. अनन्यता पूर्वक समर्पण असेल तर भगवंत त्या समर्पित भावासाठी स्वतः जीवरूपाने जगतबंधनात येतो. माझं "प्रत्येक" कर्म, विचार, भाव जर भगवंताला समर्पित होत असतील, तर ते कर्म, विचार, भाव या ना त्या रूपात भगवंत स्विकारण्यासाठी हजर असतो. आणि भगवंतांचे असे प्रागट्य म्हणजे भक्तासाठी जिवंतपणी मुक्ती! यातून बोध घेऊन आपल्या सद्गुरूंना विनवणी करावी की,
अनन्यता मज घडो स्वानंद रूपी ।।
🌹।।जानकी जीवन स्मरण जय जय राम।।🌹
🌸🌹🌸 ।। नामसंध्या ।। 🌸🌹🌸
श्रीराम!
एखादा साधक जेंव्हा निष्काम कर्मयोगाच्या शिखरावर पोचतो, तेंव्हा त्याला कृतकृत्यतेचा अनुभव येतो; तो जेंव्हा आत्मज्ञानाने परिपूर्ण होतो, तेंव्हा त्याला परमशांतीचा अनुभव येतो. परंतु, तोच साधक जेंव्हा भक्तियोगाच्या जोरावर भगवंताला अनन्यपणे साद घालतो, तेंव्हा भगवंत कुठूनही त्याच्यासाठी प्रगट होतो. हाके सरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥ बाह्यांगाने जड वाटणाऱ्या खांबातील सुप्त परब्रम्ह चैतन्य प्रगट करण्याचे सामर्थ्य प्रल्हादासारख्या एका अनन्य भक्तातच असते. भगवंत सदेह प्रगट व्हायला अत्यंत उतावीळ आहे; आपली तळमळ कमी पडते याला तो काय करणार!
आजच्या नृसिंह जयंतीच्या पर्वकाळात अद्वितीय भक्त प्रल्हादाकडून आपण पाच गोष्टी आत्मसात कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे बालपणापणीच अध्यात्मप्रवेश झाला तर मन उन्मन होण्याची एक अढळ बैठक तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा का सद्गुरूंचा उपदेश मिळाला की त्यापरते दुसरे कुणीही दैवत नाही, ही श्रद्धा जरुरी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जन्माला आल्यावर कितीही लौकिक ऐश्वर्यसुख असलं तरी त्रिविध ताप आणि घरातील ताणतणाव चुकणार नाही, हे व्यावहारिक सत्य स्वीकारलेच पाहिजे. आणि चौथी पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कोणतीही सबब न देता निष्ठेने अखंड नामस्मरण साधता येते. या चार गोष्टी जो आत्मसात करेल, त्याला चतुर्विध मुक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
कयाधूसुत प्रल्हादाने, नाम घेतले अति आवडीने ।
उद्धरिले त्या दुष्ट पित्याला, स्मरूनी हेचि नाम ।।
🌹 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🌹