Monday, February 19, 2018

अंतःकरणाच्या चार सूक्ष्म अंगातील फरक सांगाल का?

🌹🌷🌹  " नामप्रेमचिंतन "  🌹🌷🌹

शंका- दादा, अंतःकरणाच्या चार सूक्ष्म अंगातील फरक सांगाल का?


🌿   स्थूल- सुक्ष्म करण : परमार्थ   🌿

श्रीराम! सर्वांत मोठी साधना अखंड सावधानता ही आहे. साधकानें ही सावधानता चार अंगांनी बाळगणें अपेक्षित आहे! ते चार अंग म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार....

अध्यात्मदृष्ट्या विचार करता साधना दोन प्रकारच्या असू शकतात. एक करणसापेक्ष आणि करणनिरपेक्ष. मला असं वाटतं भगवद्प्राप्तीसाठी भक्ती ही करणसापेक्ष साधना आहे, ज्यामध्ये स्थूल व सुक्ष्म दोन्ही करणांची जरूरी असतें. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चारही अंग सुक्ष्म करण आहेत. परंतु, त्यातल्या त्यात मनापेक्षा बुद्धी सुक्ष्म, बुद्धीपेक्षा चित्त सुक्ष्म, चित्तापेक्षा अहंकार सुक्ष्म आहे. या चार सुक्ष्म करणांचा संबंध चार स्थूल करणांशी येतो!
मन या सुक्ष्म करणाचा संबंध वाणी या स्थूल करणाशी आहे!एखाद्याचं मन कसं आहे, हे त्याच्या बोलण्यातून व्यक्त होतं. अंतरिचे धावें स्वभावे बाहेरी ।
तेंव्हा, वाणीची सावधानता ही साधना साधण्यासाठी मनाला अगोदर सावध करावं. समर्थांनी मनाचे श्लोक मनाला सतत सावधान करण्यासाठीच रचले आहेत!

बुद्धी, चित्त आणि अहंकार या सुक्ष्म करणांना सावधान करून ५०% परमार्थ साधल्या जातो. परंतु, मन या सुक्ष्म करणाला सावधान ठेवलं की तो पुढील तीन सुक्ष्म करणांइतका म्हणजे ५०% परमार्थ एकटाच साधतो. हेच सूत्र श्रीमहाराजांनी सोपं करून सांगितलं की, "ज्यानें जीभ जिंकली त्यानें अर्धा परमार्थ जिंकला!" जीभ हे स्थूल करण मन या सुक्ष्म करणांचं व्यक्त स्वरूप आहे!

समर्थांनी दासबोधात शिष्यत्वाची लक्षणं सांगतांना
शिष्य असावा परमशुद्ध ।
शिष्य असावा परमसावध ।। असं म्हंटलं आहे.
या परमशुद्धीसाठी परमसावधानता जरूर आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सुक्ष्म करण आहेत. यांना परमशुद्ध करण्यासाठी चार स्थूल करण परमसावध ठेवावें. या चार सुक्ष्म करणांपैकी मन या सुक्ष्म करणाला शुद्ध करण्यासाठी वाणी या स्थूल करणाला परमसावध ठेवावें, यांवर आपलं आणखी विस्तृत चिंतन याअगोदर इतर चिंतनातून झालं आहे!

मनापेक्षा सुक्ष्म करण म्हणजे बुद्धी! आपले मन सतत काही ना काही संकल्प करत असते. या बऱ्यावाईट संकल्पांपैकी सत्संकल्प सिद्धीला जावे असं वाटत असेल तर आपली बुद्धी भगवंताच्या पायी समर्पित करावी!
मनाचें संकल्प पाववेल सिद्धी ।
जरी राहे बुद्धी त्याचे पायी ।।
बुद्धी त्याच्या पायी राहणें म्हणजे त्याच्या बुद्धीनें वागायचं. संतांची बुद्धी ही परमात्म्याचा अंश असलेल्या आत्म्यापासून प्रेरित झालेली असते. त्यामुळे त्या बुद्धीला आत्मबुद्धी असं म्हणतात. याउलट आपली बुद्धी ही देहाला सुख देण्याकरताच वापरतो, त्यामुळे त्या बुद्धीला देहबुद्धी असं म्हणतात. जेंव्हा देहबुद्धी ही आत्मबुद्धी होऊन त्या आत्मबुद्धीनुसार मन देहाला विशिष्ट क्रिया करण्याचे आदेश देतं तेंव्हा ते प्रत्येक कर्म आत्मा ते परमात्मा प्रवासातील एक महत्त्वाचं पाऊल ठरतं!

या प्रवासासाठी म्हणजेच देहबुद्धीला आत्मबुद्धी करण्यासाठी ज्याची आत्मबुद्धी मुळातच प्रगट आहे अशाची संगत धरावी.
देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ।।
ही संगती लाभणें म्हणजे संताचे ऐकणें! तेंव्हा, बुद्धी हे सुक्ष्म करण परमशुद्ध करण्यासाठी कान या स्थूल करणाला परमसावध ठेवणें आवश्यक आहे.
निश्चयात्मक बुद्धी तयार होण्यासाठी म्हणजे बुद्धीशुद्धीसाठी सावधश्रवण!
बुद्धी तर्क करते. ज्ञान कानांतून मनांत जातं आणि त्यातून बुद्धी तयार होते.
ऐकू येणें आपल्या हातांत नसेल कदाचित, पण ऐकणें आपल्या हातांत आहे.
श्रोत्र यांत्रिक आहे, पण श्रोतव्य सात्विक असावें. त्यातूनच सात्विक बुद्धी तयार होईल आणि सत्वबुद्धीनें सदाचरण घडेल.

दुर्योधनाने आपले कान शकुनीला देऊन अपशकुन करून घेतला आणि त्यातून त्याची बुद्धी फिरली. प्रत्यक्ष रामरायाच्या सहवासात असुनही कैकयीनें आपले कान मंथरेला दिले आणि त्यातून तिची बुद्धी फिरली.
आपण कुणाचे ऐकतो यांवर आपली बुद्धी सद्बुद्धी होणार की दुर्बुद्धी हे अवलंबून असते. ज्याचे कान विषयच ऐकतात, त्याची बुद्धी भगवंतापासून दूर जाऊन दुर्बुद्धी बनते. आणि दुर्बुद्धी म्हणजे आत्मघात!
आपण आपल्या घरात, समाजात कान भरणारे अनेक लोक बघतो. त्यातून बुद्धीभेद होऊन प्रपंच बिघडत जातो. त्या प्रपंचाची घडी बसवण्यासाठी काही कान धरणारे आवश्यक असतात. परंतु, प्रपंचाबरोबर परमार्थाची घडी सुव्यवस्थित बसवण्यासाठी कानमंत्र देणारे फार दुर्मिळ आहेत, ज्यांना आपण "संत किंवा समर्थ सद्गुरू" म्हणतो!

शिव भगवान रामकथा सांगत असतांना सतीने त्यांना कान दिले नाही. त्यामुळे तिच्या बुद्धीभेद होऊन तिनें रामाच्या परब्रम्ह तत्वावर संशय घेऊन आत्मघात ओढवला. परंतु, पुढील जन्मात पार्वती म्हणून आल्यावर शंकरानें तिला पुन्हा रामकथा सांगितली. त्यावेळी, शिव म्हंटले, ज्या कानांनी रामचरित्र श्रवण केलं नाही ते कान सापाच्या बिळासारखे आहे, त्यामुळे आपल्या बुद्धीला विष(य)स्पर्श होऊन मनुष्य स्वतःचा नाश करवून घेतो.
तेंव्हा, बुद्धी या सुक्ष्म करणच्या परमशुद्धीसाठी कान या स्थूल करणाला परमसावध ठेवावें, परमअर्थ म्हणजे परमार्थ साधला जाईल!

तिसरे सुक्ष्म करण म्हणजे चित्त!
आपले चित्त हे मन आणि बुद्धीपेक्षा सुक्ष्म करण आहे. या चित्तांत कितीतरी जन्मांच्या वासनावृत्तींचा ढीग जमा झालेला आहे. दूषित चित्त साधनेला बाधक आहे. तेंव्हा, या चित्ताला परमशुद्ध केल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. चित्त या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी ज्या स्थूल करणाला परमसावध ठेवायचं आहे ते म्हणजे डोळे!
चित्त आणि चक्षू यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या डोळ्यांनी आपण कितीतरी नको त्या गोष्टी पाहतो. हे पाहणे सावधानतेनें झालं नाही तर चित्तरूपी कॉम्प्युटरमध्ये सतत विषयाचा व्हायरस वाढत जातो आणि संपूर्ण सिस्टीम निकामी करून टाकतो.
कानानें ऐकू येणें आणि ऐकणें यांत फरक आहे, तसें डोळ्याने दिसणें आणि पाहणें यात फरक आहे. दिवसभर नकळत आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. आपण त्यांना दृष्टी दिली नाही तर त्या गोष्टी आपल्या चित्तांत ठसत नाही.

बसमधून जातांना आपल्याला अनेक झाडं, डोंगर इ. दिसतात मात्र आपण त्यांच्याकडे उदासीनतेने, passively पाहतो. त्यामुळे, एखादं हिरवंगार शेत असो किंवा खडकाळ जमीन आपल्या चित्तावर फारसा प्रभाव पडत नाही. परंतु, आपलं शेत जवळ आलं की चक्षूच्या माध्यमातून आपलं चित्त त्याकडे लागतं आणि मग आपल्या शेतातलं एखादं दूरचं झाड वाळून गेलेलं देखील स्पष्ट दिसतं. ते पाहून चित्तांत सुख-दुःख, लाभहानी इ वृत्ती उचंबळतात आणि तिथें समाधान कोलमडून जातं!
आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी चक्षूंनी सावधपणें जे परमशुद्ध आहे त्याकडे पहावं. परमशुद्ध केवळ परमात्माच आहे. तेंव्हा, चक्षूंनी चैतन्यब्रम्ह पाहणे यांतच चित्ताचं खरं सुख आहे.
डोळे तुम्ही घ्या रे सुख ।
पहा विठोबाचे मुख ।।
साधकाचें नयन सद्गुरूंचे चरण बघू लागले की दुश्चित्त सावचित्त होतें. सद्गुरूंचे चरण बघणें म्हणजे त्यांचे चरण ज्या मार्गानें गेले त्या मार्गाकडे जाणें. यालाच सत्संगती म्हणतात.

परवा, एका साधकानें सांगितले की, मानसपुजेत मला महाराज दिसत नाहीत. मी त्यांना म्हंटलं चित्तांत अगोदरपासून साठलेली घाण काढावी लागेल. ती काढण्यासाठी डोळ्यांनी सतत सावधान रहायला हवं. डोळे बंद केल्यावर मानसपुजेत महाराज दिसावें असं वाटत असेल तर उघड्या डोळ्यांनी सात्विकता बघावी! बापाला जो जड खांब दिसला, तोच खांब त्याच्या मुलाला सच्चिदानंद परमात्म्याचे चेतन निवासस्थान दिसला! याचं कारण त्या मुलाच्या चित्तांतच विशुद्ध परमात्मा होता!
आपण चक्षूंनी काम बघत राहिलो तर आपल्या चित्तात राम कसा येईल? आणि चित्तांतच राम नसेल तर चक्षूंसमोर खांब नाही राममंदिरातील गाभाऱ्यात जाऊनही राम दिसणार नाही.

रामासमोर उभे राहिल्यावर, भजनाला बसल्यावर ज्याच्या डोळ्यांत दोन थेंब येतात, त्याचें चित्त शुद्ध झाले आहे, यात संशय नाही. एखाद्याचे चित्त परमशुद्ध आहे की नाही हे त्याच्या डोळ्यांत दिसतं! चित्तांत वासनाविकार असेल तर त्याची दृष्टीसुद्धां विकारीच राहणार!
संत, सद्गुरूंचे डोळे बघितले तर आपल्याला त्यात विषयी लोकांबद्दल करूणा आणि भगवंताबद्दल प्रेम दिसतें. आपलं चित्त परमशुद्ध करण्यासाठी आपण आपली दृष्टी सतत गुरूनयन, गुरूवचन आणि गुरूचरण याकडेच ठेवावीं!

तीन सुक्ष्म व स्थूल करण आपण आतापर्यंत पाहिले.
मन या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी वाणी या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
बुद्धी या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी कान या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
चित्त या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी चक्षू या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!

आणि चौथं सुक्ष्म करण म्हणजे अहंकार!
अहंकार या सुक्ष्म करणाला परमशुद्ध करण्यासाठी मस्तक या स्थूल करणाला परमसावध ठेवावें!
अहंकार या सुक्ष्म करणाबद्दल काय सांगावं? आपल्या सर्वांच्या अतिशय जवळचा मित्र आहे तो. त्याला आपण फार जपतो, वाढवतो आणि त्याला कुणी धक्का जरी लावला तरी सर्व शक्तीनिशी आपण समोरच्यावर प्रहार करतो!

हा अहंकार आपल्या डोक्यात असतो. त्याला डिवचलं की डोकं गरम होतं आणि त्या क्रोधानें चित्तांत घर केले की बुद्धी फिरून मनमानी स्वैराचार होतो. हा स्वैराचार म्हणजेच स्वनाश!
अहंकार डोक्यात असल्याने ज्याचा अहंकार मजबुत आहे असा मनुष्य आपलं डोकं सहजासहजी झुकवत नाही. भगवंताचे आतापर्यंत जे जे अवतार झालें ते या अहंकाराला संपवण्यासाठीच! रावणासारख्या बुद्धीमान, शक्तीसंपन्न शिवभक्ताचा अहंकार संपवण्यासाठी रामरायानें त्याचे मस्तक उडवलें.
एखादा साधक साधनेच्या शिखरावर पोचलेला असुनही त्याचा अहंकार, अभिमान हा समूळ नष्ट झालेला नसतो. "मी साधना केली" हा अभिमानच त्याच्या साधनेला काडी लावू शकतो!
त्यामुळे, हा अहंकार किंवा अभिमान माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. या शत्रुला हरवण्यासाठी आपण आपलं मस्तक ज्यानें अहंकाराला, अभिमानाला पायी तुडवलं आहे अशा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करावं!

मस्तक झुकवलं याचा अर्थ मस्तक (अहंकार) याचबरोबर डोळे (चित्त), कान (बुद्धी) आणि वाणी (मन) हेदेखील समर्पित झालं आहे!
हे समर्पण होण्यासाठी 'मी कर्ता' ही भावना सोडून 'राम कर्ता' हा भाव ठेवावा. हा भाव निर्माण होण्यासाठी हातानें काम आणि मुखानें नाम हे सतत सावधानतेनें सांभाळावं! यातूनच चार सुक्ष्म व चार स्थूल करणाला योग्य दिग्दर्शन होऊन खरा परमार्थ साधेल!


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

2 comments:

  1. ।। श्री राम जय राम जय जय राम ।।

    ReplyDelete