🌹🌷🌹 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷🌹
शंका- शुद्ध आणि विशुद्ध यात नेमका फरक काय? कृपया सांगावे.🙏🏻
➡
श्रीराम! शुद्ध आणि विशुद्ध दोन्ही संस्कृत शब्द आहेत आणि समानार्थी म्हणून वापरले जातात. परंतु, त्यात फरक असेल असं मला वाटतं. शुद्ध म्हणजे पवित्र आणि विशुद्ध म्हणजे विशेष शुद्ध, परमपवित्र!
थोडा खोलात विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की,
शुद्ध म्हणजे पवित्र केलेलं!
विशुद्ध म्हणजे पवित्र असलेलं!
आपल्याला सोने विकायचे असते तेंव्हा सोनार त्यात जर भेसळ असेल तर ते अगोदर शुद्ध करून त्याची किंमत ठरवतो आणि मग त्यानुसार आपल्याला त्याचे पैसे किंवा दागिणा देतो. याचा अर्थ शुद्धी सिद्ध करावी लागतें!
सोनं शुद्ध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याची चार प्रकारे परिक्षा होते : घर्षण, छेदन, ताप आणि ताडन!
रावणानें सुवर्णमृग पाठवल्यावर ते शुद्ध सोनं आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी रामरायानें त्याचे छेदन करून परिक्षा बघितली. परंतु, बाण लागल्यावर त्याचा नाश झाला. याचा अर्थ ते शुद्ध सोनं नव्हतं! हनुमंत लंकेत गेल्यावर लंका खरंच सोन्याची आहे की नाही हे कळण्यासाठी तिला तापवलं, तर ती जळून गेली. याचा अर्थ लंका शुद्ध सोन्याची नव्हती. त्या तापवण्यातून जे उरलं तेवढंच सोनं! आणि लंकादहनाचा दाह सर्वांना झाला. मात्र दोन अपवाद होते; सीतामाई आणि बिभिषण!
बिभिषण हा शुद्ध होता; तर सीतामाई विशुद्ध होती!
बिभिषणावर प्रक्रिया होऊन तो शुद्ध बनला. ही प्रक्रिया म्हणजे रावणानें त्याला ताडन केले तरी तो कोलमडला नाही. लंकेतील विषयी, कामी वातावरणात तो तापला तरी त्याचं अध्यात्मिक अधिष्ठान हललं नाही. आणि म्हणूनच तो परमार्थाचा अधिकारी बनला! जो त्रिविध तापे पोळला । तोच परमार्थाचा अधिकारी बनला असं समर्थांनी सांगितलं आहे, याचं हे उदाहरण!
सीतामाई ही मुळातच शुद्ध आहे. जे स्वाभाविक शुद्ध आहे त्याला विशुद्ध म्हणतात. आणि जे विशुद्ध आहे, त्याचं नाव भगवंत आपल्याअगोदर लावतो! म्हणूनच आपण "जानकीजीवन, सीताराम" असं म्हणतो!
मिथीलेत रामराया जेंव्हा फुलं तोडण्यासाठी पुष्पवाटिकेत आले, तेंव्हा जानकीला पहिल्यांदाच बघितल्याबरोबर त्यांच्या मनांत अनुराग निर्माण झाला.
काय गंमत आहे बघा! विदेही, विरागी जनकाच्या नगरीत निष्काम राम विरागीचा अनुरागी बनला. याचं कारण तो भक्तीवाटिकेत विशुद्ध प्रेमस्वरूप सीतेच्या समोर आला होता. तिला बघून राघव लक्ष्मणाला म्हंटले, "जिच्या चेहऱ्यावर लौकिक नाही, अलौकिक शोभा आहे, तिला बघून माझं सहजपुनित मन अनुरागी बनलं आहे!"
जासु बिलोकि अलौकिक सोभा ।
सहज पुनीत मोर मनु छोभा ॥
भगवंत हा निर्गुण, निराकार, निर्लेप आहे. परंतु, तो विशुद्ध प्रेमापोटी सगुणसाकार होऊन त्या प्रेमाच्या अधीन होतो!
भगवंत हा स्वतः विशुद्ध असल्याने तो केवळ आणि केवळ विशुद्ध प्रेमच स्विकारतो. जानकी ही भक्तीरूपिनी आहे; भक्ती ही परमप्रेमरूपा आहे; भक्ती ही परमशुद्ध म्हणजे विशुद्ध आहे.
पुष्पवाटिकेत जाण्याच्या आदल्या दिवशी राम-लक्ष्मण मिथीलेत नगरदर्शनाला गेले असतांना सर्व मिथिलावासी रामचंद्राच्या प्रेमांत पडले, परंतु रामराया त्यापासून अलिप्त राहिले. कारण, सर्व मिथिलावासी शुद्ध असतील पण विशुद्ध नाही!
पुष्पवाटिकेत सीतेचं विशुद्ध रूप बघून रामरायाचं परमप्रेमरूप प्रगट झालं. केवळ रामाचंच नाही, जानकीची अवस्था काही निराळी नव्हती!
याठिकाणी हा विषय निघाला म्हणून एक गंमत सांगतो (कदाचित आपल्याला ठाऊक असेल)
राम-लक्ष्मण पुष्पवाटिकेत आले तेंव्हा जानकी देखील गिरिजादेवीच्या पूजेसाठी तिथें आलेली होती. ती पूजेत असतांना तिच्या एका मैत्रिणीने बाहेर येऊन पाहिलं तर राम-लक्ष्मण फुलं तोडतांना दिसले. त्यांना बघून ती भावविभोर झाली आणि मंदिरात येऊन जानकीला सांगितलं की "विश्वामित्र मुनींसोबत जे दोन राजकुमार आले ते सध्या याच वाटिकेत आहेत. काल ज्यांने संपूर्ण नगरजनांना मोहिनी घातली तो मनमोहक राम बाहेर आहे."
याठिकाणी श्रीरामाला 'मोहन' म्हंटलं आहे!
नारदमुनींनी देखील अगोदर रामरायाचं वर्णन केलेलं असल्याने जानकी अधीर होऊन बाहेर आली. त्यावेळी तीने रामरायाकडे बघितलं तर तिला गौरवर्ण कांती असलेला आनंदकंद परमात्मा राजकुमार वेषात दिसला. आणि तिला यात सर्वांत जास्त जे आवडलं ते म्हणजे राघवाच्या मस्तकावर असलेलं मयुरपंख!
राघव फुलं तोडतांना खाली एक मोरपिस दिसलं तर त्यानें ते मस्तकावर धारण केलं!
मोरपंख सिर सोहत नीके ।
गुच्छ बीच बिच कुसुम कली के ।।
(द्वापारयुगात मोरपंख घालण्याची मुहुर्तमेढ भगवंतानें त्रेतायुगांत या पुष्पवाटिकेत केलेली असावी!)
जानकीचं, रामरायाचं मन हे सहजपुनित आहे. सहजपुनित म्हणजे त्याच्यावर संस्कार करून त्याला पुनित, पवित्र करावं लागत नाही, ते मुळातच परमपवित्र म्हणजे विशुद्ध असतं!
ज्याच्यात विकार आहे त्याच्यावर संस्कार करून त्याला शुद्ध करावं लागतं. भगवंत हा निराकार असल्याने तो सगुणसाकार झाला तरी त्याच्यात आपल्यासारखे विकार नसतात, कारण तो विशुद्ध असतो!
आत्मा हा परमात्म्याचा अंश असल्याने तो तत्वतः विशुद्ध आहे. परंतु, वासनेच्या संगे जन्म घेणारा आत्मा देहदृष्टीने अशुद्ध होतो. मग केवळ देहाला शुद्ध करून आत्म्याचं विशुद्धतत्व प्रगट होणार नाही. तेंव्हा देहशुद्धीबरोबर अंतःकरण शुद्ध करायला हवं. ही अंतःकरणाची शुद्धी कशी करावी, हा एक वेगळा चिंतनविषय आहे. त्यातील मन (वाणी) यांवर चिंतन झालं आहे. उर्वरित तीन करणांच्या शुद्धीवर परवा चिंतन करूया!
आजच्या चिंतनातील विशुद्ध अवस्था ही शुद्धीच्या वरची आहे एवढं ध्यानांत ठेवून त्यावर मनन करूया!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
🙏 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🙏
शुदध विशुद्ध यांकडे बघण्याचा अजून एक प्रयत्न-
ReplyDeleteशुद्ध ही कल्पना जडतत्वाशी निगडित असावी, जस शुद्ध सोने, शुद्ध पूजा सामग्री इ.
विशुद्ध हे भाव, मन अशा सूक्ष्म गोष्टींशी निगडित असावं.
श्रीराम! बरोबर बोललात आपण. यातही जड वस्तुतील सुप्त चैतन्य प्रगट करून अशुद्ध वस्तूला शुध्द करणे अर्थात जडाला चैतन्याकडे नेणे आणि पुढे त्या शुद्धीला विशुद्धीकडे अर्थात ब्रम्हचैतन्याकडे नेणे ही मनुष्याच्या साधनेची पराकाष्ठा आहे. हे आपल्या नरदेहाचे गंतव्य स्थान बनवण्यात आपली शिवरूप सिद्धी दडलेली आहे!
Delete