🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : नाम आत गेले पाहिजे म्हणजे नेमके काय? नाम उपाधिरहित आहे म्हणजे काय?
➡
श्रीराम!
आजपर्यंत प्रत्येक युगामध्ये भगवद्प्राप्ती किंवा आत्मकल्याण साधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचे अनुसरण निर्देशित केले आहे. अगोदरच्या युगातील साधनं आज निरूपयोगी आहेत असं नाही; तर आपला देह, मन आणि बुद्धी त्या साधनांच्या दृष्टीने निरूपयोगी आहे. आणि म्हणूनच कलौ केशव कीर्तनम् । असा भगवंताचा संकेत आहे. भगवंताच्या नामसंकिर्तनाने पाषाण तरले, असंख्य भक्त उद्धरले, एवढेच नाही तर महापापी लोक परमपवित्र झाले. असे कल्याणकारी नाम आणि तेही सद्गुरूंच्या वरदहस्ताने सिद्ध गुरूमंत्र रूपाने मिळूनही आपण आज काळजी, चिंता आणि असमाधानकारक आयुष्य अनुभवत आहोत. याचं कारण नाम आत गेलं नाहीये. आत म्हणजे कुठे? तर आज जे वाणीने म्हणजे कर्मेंद्रियाने नाम घेतले जात आहे, ते त्याच्या पलीकडे गेले पाहिजे.
इंद्रियाणि पराण्याहु: इंद्रियेभ्य: परं मन: ।
मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।।
इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे आणि आत्म्याच्या पलीकडे म्हणजे आत्म्याहून श्रेष्ठतम म्हणजे परमात्मा. आता परमात्म्याहून श्रेष्ठ काही आहे का? तर आहे; ते म्हणजे त्याचे नाम! तेंव्हा, ज्या परमात्म्याचे नाम आपण इंद्रियांनी घेतो ते नाम जिथून उगम पावलं तिथपर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत पोचणं म्हणजे नाम आत जाणं आहे.
नाम आत गेलं आहे, हे कळायचं कसं? तर बाह्यजगतात घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टींचा इंद्रियांवर परिणाम होत असला तरी आत मात्र एक अलौकिक स्थिती टिकून राहिली पाहिजे. ही अलौकिक स्थिती एखाद्या मुनीसारखी असली पाहिजे. मुनी म्हणजे ज्याने आपले मन जिंकले आहे, मुनी म्हणजे ज्याच्या मनावर बाह्यसृष्टीच्या चढउताराचा काहीही परिणाम होत नाही. गीतेमध्ये एक अतिशय अप्रतिम श्लोक आलेला आहे, जो मला हृदयाशी कवटाळून ठेवावा वाटतो. त्या श्लोकात भगवंताने मुनीची सर्वांगपरिपूर्ण व्याख्या केली आहे.
दु:खेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृह: ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ।।
लौकिक दुःखाचा प्रसंग आल्यानंतर जो अनुद्विग्न राहतो, लौकिक सुखाचा प्रसंग आल्यानंतर त्याबद्दल जो निस्पृह राहतो, मनामध्ये आसक्ती, भीती आणि क्रोधाचा लवलेशही नसल्याने ज्याची बुद्धी ‘कायमची’ स्थिर झालेली असते, तो मुनी!
नाम आत जाण्यासाठी ज्या इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा अशा पायऱ्या आपण वर पहिल्या त्या प्रत्येक पायरीवर आज सुख-दुःख, आसक्ती, भय आणि क्रोधाचे प्राबल्य असल्याने प्रतिकूल परिस्थिती आली की बुद्धीचे स्थैर्य कुठल्या कुठे पळून जाते आणि बुद्धीनाशात् प्रणश्यति या सूत्राप्रमाणे आत्मघात ओढवल्या जातो.
हा आत्मघात टाळण्यासाठी आपल्याला समर्थांनी बोध केल्याप्रमाणे ‘सावधानता’ आणि तीदेखील अखंड बाळगणे अनिवार्य आहे. ‘नाम आत जाणे’ हे ध्येय असणाऱ्या साधकाने अखंड सावध राहून उद्वेग, आसक्ती याला मी बळी न पडता देहाने कर्तव्याभिमुख आणि मनाने साधनसन्मुख असले पाहिजे.
या आत्मकल्याणकारी साधनेत “आजच्या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी सत्संगती आणि नामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही”, हे उद्बोधक सूत्र आहे. हे मोक्षप्राप्तीचे रहस्य सांगणारा कुणी साधारण मनुष्य नसून सर्व वेदोपनिषदे कोळून पिलेला परंतु सद्गुरुसेवा आणि नामनिष्ठा यांत तनमनजीवप्राण समर्पण करणारा सत्पुरुष अर्थात पू. ब्रम्हानंद महाराज आहेत. त्यांच्या अंतःकरणात केवळ भगवन्नाम आणि पर्यायाने खरी गुरुकृपा अखंड वास करून होती.
अत्यंत कमी काळात त्यांच्या हृदयात नाम स्थिर झाले तसे आपले इतकी वर्ष साधनेत असूनही होत नाही; कारण त्यांच्याइतकी श्रद्धा आणि समर्पण भावना आपल्यात नाही. आपल्यात त्या उंचीची श्रद्धा आणि शरणागती नसण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या परमार्थाला अनेकानेक उपाधींनी जखडून ठेवले आहे.
गोंदवले दर्शन म्हणजे तेथील व्यवस्था, तेथील ऐश्वर्य याने भारावून जाऊन मुख्य अनुसंधानाचे ऐश्वर्य याकडे कानाडोळा करणे म्हणजे बाह्य आकर्षणांची उपाधी. घरी उपासना करतांना एखादी वस्तू किंवा वाद्य इ. कमी पडले, अपेक्षित मंडळी उपासनेला नसली की आपल्या मनात विकल्प येतो, ही बडेजावपणाची उपाधी. तीर्थयात्रेला गेल्यावर एखाद्या ठिकाणी निवासाची, भोजनाची, वाहनाची गैरसोय झाली की अस्वस्थ होणे, ही तीर्थयात्रेला ट्रीपची उपाधी. याचा अर्थ गोंदवल्याला जाऊ नये, उपासना करू नये, तीर्थयात्रा टाळावी असा मुळीच नाही. किंबहुना या गोष्टी साधनेला पोषकच आहेत. परंतु, जेंव्हा या गोष्टींना भौतिकदृष्टीने केंद्रस्थानी ठेवून आपण परमार्थ करत असल्याचा आव आणतो आणि ‘अनुसंधाना कधी न चुकवावे’ याचा विसर पडतो, तेंव्हा तो तथाकथित परमार्थ मनोरंजनाचे माध्यम बनून जातो. “अती दाट वस्तीत नाना उपाधी” या संतवचनाप्रमाणे आपण साधनेला पूरक काही हवे म्हणून इतर गोष्टी जसजशा वाढवत जातो तसतशा नाना उपाधी निर्माण होत जातात. आणि मग शोभेच्या आणि शृंगाराच्या हव्यासाच्या आजच्या मोहक जगात आपण साधनेलासुद्धा उपाधींची एवढी आरास चढवतो की कालांतराने साधना दबून जाऊन उपाधी हेच साध्य बनून जाते.
उपाधीसहितच साधना हवीशी वाटते याचा अर्थ तो साधक खरा साधक नसून मंदमुमुक्षु आहे त्याला साधनेचा छंद नसून उपाधीचा छंद आहे. भगवंताच्या कृपेने मला मंदिरात काही गायन, कीर्तन, प्रवचनाची सेवा घडत असते आणि त्या निमित्ताने भगवंताचे स्मरण घडत असते. परंतु, उद्या जर अशी वेळ आली की येत्या उत्सवात हे गायन, कीर्तनादी न करता केवळ नामात रहायचे आहे, तर मनात विषण्णता यायला नको.
मी फेसबुक किंवा whatsappच्या माध्यमातून अध्यात्मिक चिंतन पाठवू लागलो आणि त्याचेच व्यसन लागले तर कालांतराने भगवंताच्या स्मरणाऐवजी या उपाधींची आरास एवढी वाढते की, निरुपाधिक नामाचा ध्यास मी गमावून बसतो. एक महिनाभर हे सर्व बंद ठेवून केवळ नामात रहा, म्हटले तर मला खरंच नामाचे अनुसंधान साधेल का? याचे उत्तर नाही असेल तर आपण साधनेपेक्षा उपाधीला महत्त्व दिले असे होईल. याचाच अर्थ साधनेचा हेतू अलौकिक समाधान हे नसून लोकेषणा हा आहे. आणि लोकेशणेमुळे इतरांचे काही नुकसान होणार नाही, परंतु तो तथाकथित साधक आपले साधकत्व गमावून एका पारमार्थिक किंवा साधक वेशातील बद्धावस्थेकडे नकळत झुकत जाईल. त्यामुळे, जोपर्यंत उपाधीची अनिवार्यता वाटते तोपर्यंत भवव्याधीचे निरसन होणार नाही, हे साधकाने ध्यानांत घेतले पाहिजे. एकदा खरा नामाचा, निव्वळ निष्काम, निर्लेप नामाचा छंद लागला की;
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
त्यासाठी माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ।।
साधनेला आणखी एका उपाधीची कीड लागू शकते, ती म्हणजे लौकिक अनुभवाची. क्षमा करा, परंतु, मी याठिकाणी ‘कीड’ असा शब्दप्रयोग केला आहे. परंतु, मला लौकिक अनुभव यावेत असं वाटणं, आले की ते अभिमानाने लोकांना सांगणं आणि पुढे आणखी असे अनुभव यावे अशी आस लागणं ही साधना खाऊन टाकणारी कीड आहे. अशी उपाधी चिकटवणे हे साधनेचे अवमूल्यन आणि साधकाचे अध्यात्मिक अधःपतन करणारे ठरणार नाही, याची काळजी घेणे फार जरूर आहे. अशा परिस्थितीत नामस्मरण ही साधना साधकाला उपाधीरहित करायला पोषक आहे. “नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये; म्हणजे, नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. आणि अखंड नामस्मरण टिकले, की पुरा अनुभव आला.” यामध्ये, नामाला अखंड आणि स्मरण यांची जोड मिळाली की अलौकिक अनुभव मागितला नाही तरी येणार! लौकिक अनुभवात अडकू नये यासंदर्भातच श्रीमहाराजांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे.
कारण, पारमार्थिक लोकेषणा, लौकिक अनुभव इ. उपाधींमध्ये मनुष्य अडकू लागला की त्याच्या वरपांगी साधनेतून आत्मबुद्धी प्रगट होत नसून समर्थांनी म्हटल्याप्रमाणे, उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। याची प्रचिती येते. श्रीमहाराज म्हणत, आपण देहबुद्धिच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, आणि नाम तर निरुपाधिक आहे. संतानाच नामाचे खरें महत्व कळते.” म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा प्रवास करण्यासाठी सदा सज्जनाची संगत धरून त्यांच्याप्रमाणे सदाचरण आणि सदास्मरण राखावे. सत्संगतीमुळेच विवेके तोडिली उपाधी । हा अनुभव समर्थांनी सांगितला. समर्थांनी मनोबोधामध्ये सर्वोत्तम दासाची लक्षणं सांगतांना प्रापंचिक असूनही उपाधिरहित असणे हे एक लक्षण सांगितले आहे.
बद्ध ते सिद्ध प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्या भक्ती संप्रदायामध्ये सुद्धा अनेक मार्ग सांगितले आहेत. परंतु, नामस्मरण हा एकमेव असा मार्ग आहे, ज्यामध्ये कोणत्याही वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीची उपाधी जरुरी नाही. परमात्मा हा मुळात उपाधिरहित असल्याने त्याची प्राप्ती करून घेण्याचे साधन देखील तसेच निरुपाधिक असले पाहिजे. आणि असे साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’.
जन्ममृत्युचे कारण देहबुद्धी. देहबुद्धीला दृढ करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे उपाधी आणि वासना. उपाधी आणि वासना दोन्हीला जाळण्याचे काम केवळ नामच करते. याचा अर्थ नाम हे वासनाविमुक्त आणि निरूपाधिक आहे.
श्रीमहाराज म्हणत, “एका दृष्टीनें नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण आहे. नामाला स्वतःची अशी चव नाही; म्हणून जरा नामस्मरण केलें की त्याचा कंटाळा येतो. कारण, आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही, उपाधीमध्यें मन रमतें. तेंव्हा, नामांत मन रमणें ही मोठी भाग्याची गोष्ट आहे!”
हा परमभाग्याचा दिवस येण्यासाठीच नाम आत मुरलं पाहिजे.
आवळा आणि इतर सामग्री एकत्र करून मुरंबा बनवतात. परंतु, त्याला खरी गोडी येण्यासाठी तो आवळा मुरला पाहिजे. त्याप्रमाणें, नाम आत मुरलं तर ब्रम्हानंदाची गोडी अनुभवता येईल.
तेंव्हा, प्रापंचिक कर्तव्ये करीत असतांना आपण कोणत्याही अटीशिवाय, कसल्याही प्रकारच्या उपाधींचा अट्टाहास न बाळगता मनोभावे नाम घेण्याचा अभ्यास केला तर आपल्यातील समर्थांना किंवा महाराजांना अपेक्षित सर्वोत्तम दास प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वोत्तम दास प्रगट झाला की पुरुषोत्तम नारायण प्रगट व्हायला वेळ लागणार नाही, हे सांगणे न लगे! हा ब्रम्हरस चाखण्यासाठी उपाधींची आस सोडून नामाला अंतःकरणात मुरवण्याचा ध्यास धरूया, श्रीमहाराज आपलं सर्वांचं कोटकल्याण करतील!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


खूपच छान आणि सोप्या रीतीने सांगितले आहे आपण.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
यातून नामस्मरण वाढले तरच उपयोग, नाहीतर केवळ व्यर्थ लेखनप्रपंच!
Deleteखूपच छान आणि सोप्या रीतीने सांगितले आहे आपण.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
पुनः पुन्हा वाचून चिंतन करण्या योग्य लेख , प्रवचन ... मनात नाम उतरवायला नक्कीच मदत होईल ।
ReplyDeleteआपले मनापासून आभार ।
श्री राम जय राम जय जय राम ।।
वाह, नामनिष्ठा व नामध्यास दृढ झाला तर आनंदच!
Delete