Wednesday, May 23, 2018

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही!

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात त्याप्रमाणे आपण त्या अवस्थेत गेल्याशिवाय तो अनुभव येत नाही. परमार्थात आपण ‘अखंड समाधान’ यासंबंधी अखंड वाचन, श्रवण करत राहिलो तरी सच्चिदानंदाचे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी ‘मीपणा’ मेला पाहिजे. आणि आपली सर्व साधना ही केवळ त्या ‘मी’पणाला मारण्यासाठी आहे.
पण आपली गंमत कशी होते की, अनेकदा ‘मी’पणा नाहीसा होण्यासाठी अध्यात्मग्रंथ श्रवण, वाचन, भजन, पूजन अशा ज्या साधनमार्गांचा आपण अवलंब करतो, त्यातच आपण सूक्ष्मपणे ‘मी’पणाला खतपाणी घालत असतो. ‘मी’ अमुक एक साधन करतो, या आंतरिक सूक्ष्म अहंकाराला जागं ठेवून जर आपण साधन करू लागलो तर त्यातून अखंड समाधान न मिळता विकारांना अखंड आयुष्य मिळण्याची पायाभरणी होत असते. आणि आपण बाह्यांगाने साधनेत आहोत असं आपल्याला आणि जगाला दिसत असल्याने आत खरं काय सुरु आहे, याकडे आपले मुळीच लक्ष जात नाही.
तेंव्हा, साधकाने अगोदर प्रपंचात नेटकेपणा साधण्यासाठी “मीपण जाळोनिया जगी वागा” हा सुबोध अंगीकृत करावा आणि हे करत असतांना परमार्थसंपन्नता साधण्यासाठी “नित्य नामगायनी जागा” हा सुबोध अंतःकरणात रुजवावा. यातूनच ‘अभिमान शत्रू मोठा’ मारल्या जाऊन “मानावा राम सर्वदा कर्ता” हा भाव दृढ होईल. रामरूप होण्याची हीच सूक्ष्म गुरुकिल्ली आहे!


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment