🌹
🌷
।। नामसंध्या ।।
🌹
🌷
श्रीराम!
‘अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः !’ किती भरवशाचं वचन आहे हे! समोरच्या व्यक्तीची लहानात लहान चूक आपण सहन करत नाही. आणि याठिकाणी परमात्मा म्हणतो की, “तुझ्या सर्व पापांचा मी समूळ नाश करीन, काळजी करू नकोस!”
असं आश्वासक विधान परमात्मा सद्गुरुरूपाने उभा राहून अर्जुनरुपी सत्शिष्यासाठी करत आहे, हे ध्यानांत घेतले पाहिजे. अर्जुन आसक्त झालेला होता, हताश होता, पण एका गोष्टीमुळे सद्गुरूंनी त्याच्या पापक्षालनाची जबाबदारी घेतली. ती एक गोष्ट म्हणजे शरणागती! नातेवाईक, तथाकथित स्वजन यांच्यात आसक्त असलेल्यावर भगवंत कृपा करत नाही. परंतु, अर्जुन जेंव्हा केशवाला सद्गुरु मानून आसक्तीसहित शरण गेला, हात जोडले, अहंकाररहित मस्तक टेकवले, तिथेच त्याचे काम झाले.
आपणसुद्धां आपल्या सद्गुरुंसमोर हात जोडतो, मस्तक टेकवतो. पण त्या हातातला कर्तृत्वाभिमान आणि मस्तकातला अतिशय सूक्ष्म ‘मीपणा’ आपल्यापासून जराही विभक्त करत नाही. परिणामी शरणागती रहित केलेला नमस्कार भक्ती प्रगट करत नाही. आणि म्हणूनच सद्गुरु आपली काळजी स्वतःकडे घेत नाही.
साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधुस लागली ।। याचं मर्म समजून घेऊन तो आवश्यक भाव आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यासाठी समाजात आपल्याला भाव मिळावा, ही आस सोडणे, ही महत्वाची अट आहे. परमार्थाच्या वाटेवर लौकिकाची हौस असलेला खड्डा लागतो, जो त्यात अडकणार नाही, तोच पुढे जाईल! सोपं नसेल कदाचित, पण चिंतामुक्त समाधान अनुभवण्यासाठी एवढी सावधानता बाळगायला नको का?


No comments:
Post a Comment