Thursday, May 24, 2018

साधकत्वातील अडचणी

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
माझी एवढी अडचण दूर झाली की मी नाम घ्यायला मोकळा. एकदा मुलं व्यवस्थित शिक्षणाला, नोकरीला लागले की मी आणि माझा देव, बस्स! आमच्या ऑफिसमध्ये सध्या कामाचा फार ताण आहे, माझ्या घरी सध्या औषधपाणी, दवाखाना याच्यातच सगळा दिवस जातोय. महिना, पंधरा दिवसानंतर मला चांगलाच रिकामा वेळ मिळणार आहे. नंतर मी जास्तीत जास्त नामस्मरण करत बसणार. मुलीच्या लग्नाची फार काळजी लागली आहे. तिला चांगलं स्थळ मिळालं की आपली जबाबदारी संपली. आणि आपण प्रपंचाकडे दुर्लक्ष केलेलं महाराजांना तरी आवडेल का? त्यामुळे सगळी कर्तव्य पूर्ण केली मी आणि माझी माळ! अहो, सध्या पाठीच्या दुखण्यानं फार हैराण झालो आहे. डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरु आहे. त्यामुळे माळ घेऊन जरावेळ बसलो तरी उसण भरते. एकदा का या दुखण्यातून बरा झालो की दररोज १३,००० जप करायचं पक्कं केलंय. मला माझ्यासाठी कश्शाची अपेक्षा नाही. देवाच्या दयेनं सगळं छान आहे. एवढं या मुलाचं लग्न करून देऊन त्याला सगळं सोपवलं की आम्ही दोघांनी गुरूगृही सेवा द्यायचं ठरवलं आहे......... अपेक्षित नामस्मरण न होण्याची ही आणि अशी कितीतरी कारणं आपण कधी जड अंतःकरणाने तर कधी सहजपणे सांगत असतो.

ही कारणं जर खरी मानली तर याचा अर्थ ज्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण आहे, त्यांना कसलीही प्रापंचिक काळजी, त्रास नाही. परंतु, प्रपंच आहे आणि प्रापंचिक अडचणी नाही असं संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही. प्रत्यक्ष रामराया, श्रीकृष्ण यांच्या प्रपंचातसुद्धां उणीवा किंवा अडचणी होत्या. संत, सत्पुरुष यांना प्रापंचिक दुःख, दारिद्र्य काही कमी नव्हते. मग आजच्या सांसारिक लोकांना अडचणी आहेत, यात नवल ते काय? या अडचणी असूनही एकाला नामस्मरण साधतं आणि दुसऱ्याला नाही, असं का? यासंदर्भात ज्याचे त्याने आत्मचिंतन करून स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन घडवून आणणे साधकत्वाला जिवंत ठेवण्यासाठी जरूर आहे.

“नामापरते न सत्य मानावे” असं महाराजांचं वाक्य किंवा “नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्यशरीर” असं समर्थवचन आपण सिनेमाचा डायलॉग म्हणावा तसं अनेकदा म्हणत असतो. परंतु, नामाचे ‘सत्यत्व’ आणि ‘सातत्य’ हे वाणीपेक्षा मनाला चिकटून ते आचरणात आल्याशिवाय खरा परमार्थ नाही, नाही, नाही!

श्रीमहाराजांची दोनच बोधवचनं आपला प्रपंच आणि परमार्थ कल्पनेपेक्षा सुखाचा करण्यासाठी पुरेशी आहेत. त्यातलं एक नकारात्मक आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, ‘एवढी अडचण दूर झाली की मग भगवंताची उपासना करीन’, असे जो म्हणेल त्याला कायमचेच थांबावे लागेल! 
तर दुसरं सकारात्मक बोधवचन आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, "संसारातील खटपट संपल्यावर रोज जे ३-४ तास मिळतात तो वेळ नामांत नको का जायला? खरोखर दिवसभरात जो रिकामा वेळ मिळतो तो नामासाठी दिलात तर नामाच्या राशी पडतील!"
या दोन्ही वचनांचं मर्म ज्याच्या हृदयाला भिडलं तो खरा साधक!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Wednesday, May 23, 2018

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही!

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात त्याप्रमाणे आपण त्या अवस्थेत गेल्याशिवाय तो अनुभव येत नाही. परमार्थात आपण ‘अखंड समाधान’ यासंबंधी अखंड वाचन, श्रवण करत राहिलो तरी सच्चिदानंदाचे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी ‘मीपणा’ मेला पाहिजे. आणि आपली सर्व साधना ही केवळ त्या ‘मी’पणाला मारण्यासाठी आहे.
पण आपली गंमत कशी होते की, अनेकदा ‘मी’पणा नाहीसा होण्यासाठी अध्यात्मग्रंथ श्रवण, वाचन, भजन, पूजन अशा ज्या साधनमार्गांचा आपण अवलंब करतो, त्यातच आपण सूक्ष्मपणे ‘मी’पणाला खतपाणी घालत असतो. ‘मी’ अमुक एक साधन करतो, या आंतरिक सूक्ष्म अहंकाराला जागं ठेवून जर आपण साधन करू लागलो तर त्यातून अखंड समाधान न मिळता विकारांना अखंड आयुष्य मिळण्याची पायाभरणी होत असते. आणि आपण बाह्यांगाने साधनेत आहोत असं आपल्याला आणि जगाला दिसत असल्याने आत खरं काय सुरु आहे, याकडे आपले मुळीच लक्ष जात नाही.
तेंव्हा, साधकाने अगोदर प्रपंचात नेटकेपणा साधण्यासाठी “मीपण जाळोनिया जगी वागा” हा सुबोध अंगीकृत करावा आणि हे करत असतांना परमार्थसंपन्नता साधण्यासाठी “नित्य नामगायनी जागा” हा सुबोध अंतःकरणात रुजवावा. यातूनच ‘अभिमान शत्रू मोठा’ मारल्या जाऊन “मानावा राम सर्वदा कर्ता” हा भाव दृढ होईल. रामरूप होण्याची हीच सूक्ष्म गुरुकिल्ली आहे!


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, May 21, 2018

शरणागत भाव!!!

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷





श्रीराम! 

‘अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः !’ किती भरवशाचं वचन आहे हे! समोरच्या व्यक्तीची लहानात लहान चूक आपण सहन करत नाही. आणि याठिकाणी परमात्मा म्हणतो की, “तुझ्या सर्व पापांचा मी समूळ नाश करीन, काळजी करू नकोस!”
असं आश्वासक विधान परमात्मा सद्गुरुरूपाने उभा राहून अर्जुनरुपी सत्शिष्यासाठी करत आहे, हे ध्यानांत घेतले पाहिजे. अर्जुन आसक्त झालेला होता, हताश होता, पण एका गोष्टीमुळे सद्गुरूंनी त्याच्या पापक्षालनाची जबाबदारी घेतली. ती एक गोष्ट म्हणजे शरणागती! नातेवाईक, तथाकथित स्वजन यांच्यात आसक्त असलेल्यावर भगवंत कृपा करत नाही. परंतु, अर्जुन जेंव्हा केशवाला सद्गुरु मानून आसक्तीसहित शरण गेला, हात जोडले, अहंकाररहित मस्तक टेकवले, तिथेच त्याचे काम झाले.
आपणसुद्धां आपल्या सद्गुरुंसमोर हात जोडतो, मस्तक टेकवतो. पण त्या हातातला कर्तृत्वाभिमान आणि मस्तकातला अतिशय सूक्ष्म ‘मीपणा’ आपल्यापासून जराही विभक्त करत नाही. परिणामी शरणागती रहित केलेला नमस्कार भक्ती प्रगट करत नाही. आणि म्हणूनच सद्गुरु आपली काळजी स्वतःकडे घेत नाही.
साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधुस लागली ।। याचं मर्म समजून घेऊन तो आवश्यक भाव आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यासाठी समाजात आपल्याला भाव मिळावा, ही आस सोडणे, ही महत्वाची अट आहे. परमार्थाच्या वाटेवर लौकिकाची हौस असलेला खड्डा लागतो, जो त्यात अडकणार नाही, तोच पुढे जाईल! सोपं नसेल कदाचित, पण चिंतामुक्त समाधान अनुभवण्यासाठी एवढी सावधानता बाळगायला नको का?

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, May 10, 2018

संत मुक्ताबाई चिंतन

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : आज संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने थोडे चिंतन मांडावे!

श्रीराम!
जन्माला येतांनाच जीवन्मुक्त असलेल्या अधिकारी भगवद्भक्त मुक्ताईची आज पुण्यतिथी. मुक्ताबाईच्या समग्र चरित्रातील दोन उच्चकोटीचे प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात मुक्ताईने भागवत संप्रदायातील दोन अत्यंत महानतम संतसत्पुरुषांना दिग्दर्शन केले आहे. त्यातील एक संत म्हणजे ज्ञानियांचा राजा असलेले ज्ञानेश्वर महाराज; तर दुसरे संत म्हणजे ज्यांच्या हाताने प्रत्यक्ष भगवंत जेवतो असे पंढरीरायाचे प्रेमभांडारी असलेले नामदेव महाराज! नामदेव महाराजांना केलेले उद्बोधन नंतर कधी बघूया. आज ज्ञानोबा-मुक्ताई हितगुज!

एखादा कीर्तनकार किंवा प्रवचनकार जेंव्हा अध्यात्मिक प्रबोधन करतो, तेंव्हा ते प्रबोधन, ते अध्यात्म चिंतन श्रोत्यांच्या मनाला भिडणारे आहे की नाही, याचा विचार त्या प्रबोधनकाराने करणे जरूर आहे. परंतु, ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण अध्यात्मिक उद्बोधन केल्यानंतर आणखी एक आढावा घेतात, जो आजच्या प्रत्येक पारमार्थिक वक्त्याने घ्यायला हवा. तो आढावा म्हणजे जे चिंतन मांडले आहे, ते श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनाला केवळ तेवढ्यापुरतेच भिडले आहे की त्यातून त्यांचे आचरण किंवा एकूणच साधन यांत सुयोग्य बदल होत आहे का?

ज्ञानोबांनी हा आढावा घेतल्यानंतर जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की लोक अध्यात्म ऐकत नाही आणि ऐकले तरी त्यातून अपेक्षित मनोमंथन घडत नाहीये, तेंव्हा त्यातून आलेल्या उद्विग्नतेची परिणती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला कोंडून घेतले. अशावेळी ज्ञानेश्वर महाराजांना शांत करण्याचे, त्यांना पुन्हा जगत्कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे अद्भुत कार्य ज्यांनी केले त्या संत मुक्ताबाई!

ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्या कोट्यानुकोटी बद्धांना माऊली बनून समजावून सांगितले, त्या ज्ञानीयांच्या राजाला समजावून सांगणाऱ्या मुक्ताईचा अधिकार काय असेल, याचा सूक्ष्म विचार करायला हवा.

ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये क्रोध, उद्वेग, अशांती यांना जिंकण्यासाठी अत्युच्च कोटीचे उद्बोधन केले, त्या ज्ञानोबांना जेंव्हा समाजाची अधोगती बघून जी बाह्यांगाने उद्विग्नता आली, तिला शांत करण्याचा अधिकार त्रिभुवनात केवळ आणि केवळ मुक्ताबाईचाच! प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज सद्गुरुरूपाने त्याठिकाणी उपस्थित असूनही लौकिक वय लहान असणाऱ्या मुक्ताबाई जेंव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समजावतात, तेंव्हा मुक्ताई कोणत्या पदावर असतील, हे समजले पाहिजे. मुक्ताबाईचे इतर अभंग आणि ताटीचे अभंग यातील भाषाशैलीत आणि अध्यात्मिक अधिष्ठानात फार अंतर आहे. इतर अभंगात भक्त म्हणून बोलणारी बाळबोध मुक्ताबाई ताटीच्या अभंगात एक अधिकारी मार्गदर्शक वाटते.

मानसशास्त्र शिकत असतांना एक गोष्ट अभ्यासात आली होती की स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत मानसिकदृष्टीने श्रेष्ठ आहे. मानसशास्त्र असं सांगतं की स्त्रीच्या शारीरिक वयात पाच मिळवले की तिचे मानसिक, भावनिक वय मिळते. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मुक्ताबाई देहदृष्ट्या ४ वर्षांनी लहान असली तरी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ती ज्ञानोबांपेक्षा एक वर्षाने मोठी आहे. या भावबलाच्या आधारावर तिने आदेशात्मक सूचना केली की, “ताटी उघडा ज्ञानेश्वरा!” कदाचित आपल्याला देहरुपाने मुक्ताबाईसारखी बहिण नसेल; पण आपल्या संपर्कात आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने किंवा पत्नीच्या रूपाने मुक्ताबाई आपल्याला दिग्दर्शन, मार्गदर्शन करत असते.

ताटी म्हणजे दरवाजा. त्याला कवाड असा देखील शब्द आहे. परंतु, कवाड दोन पटांचे असते; तर ताटी एक पटाची. आपण दोन पटांमध्ये म्हणजे द्वैतात कोंडलेलो आहोत, तर संत हे अद्वैतात स्थिर असतात. तुम्हा आम्हा आड द्वैताचे कवाड । हे ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासारख्या द्वैतात अडकलेल्या बद्धांना संबोधून म्हटले आहे; तर ताटी उघडा हे मुक्ताबाईने अद्वैताचा अनुभव पुरेपूर भरून उरलेल्या ज्ञानराजासारख्या सिद्ध सत्पुरुषाला संबोधून म्हटले आहे. 

यांत एक अतिशय सूक्ष्म गोष्ट ध्यानांत घ्यावी की ताटी उघडणे मुक्ताईला शक्य होते, पण तिने आपल्या भावाला ती उघडायला सांगितले. यांत एका अंगाने बहिण म्हणून मर्यादा आहे; तर अध्यात्माच्या अंगाने विचार केला तर ताटी ज्याने लावली त्यानेच ती उघडली पाहिजे. कर्म हे बंधन आणि मुक्तीला कारण ठरते. ज्या कर्मामुळे आपण बंधनात आलो त्याच कर्माच्या आधाराने आपण मुक्त होऊ शकतो, असा सखोल बोध मुक्ताई देत आहे. आपला दरवाजा आपणच उघडायचा असतो. दुसऱ्याने ताटी उघडणे ही जबरदस्ती होऊ शकते. परमार्थात भगवंत, सद्गुरु, सद्ग्रंथ सर्वकाही मिळाले तरी स्वतः साधन केल्याशिवाय मुक्ति नाही, हे मर्म यांतून घेतले पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांना कार्यप्रवण करण्यासाठी मुक्ताबाईने मांडलेले चिंतन म्हणजे ताटीचे अभंग! मुक्ताबाईच्या एकेका शब्दात जबरदस्त सामर्थ्य आहे.
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।
विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।
शब्द शस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।
विश्वपट ब्रम्ह दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

तेंव्हा, मुक्ताबाईचे दिग्दर्शन लाभून आपण याच जन्मी मुक्त व्हावे वाटत असेल तर अगोदर तिने ज्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल. म्हणजेच सद्गुरु माझे कल्याणकर्ते आहेत, ही जाणीव ठेवून ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आणि नाम हाच देव आहे, या निष्ठेने नामात राहून नामदेव महाराजांची कृपा संपादन केली तरच मुक्ताबाई आपल्याला सच्चिदानंद स्वरुपाची ताटी उघडण्यासाठी प्रेरणा बनतील!


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Thursday, May 3, 2018

दिसणारा आणि असणारा साधक!

🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
आर्थिक परिस्थिती बेताची असलेली बाई लग्नसमारंभात सोन्याचे दागिने नाही म्हणून बेन्टेक्सचे दागिने घालून जाते. कारण खरं खोटं सोनं कुणी तपासून बघणार नाही. आणि मुळात कमी किमतीचे परंतु अस्सल सोन्यासारखे लकाकणारे, आकर्षक दागिने घातले की दागिन्याची हौस भागते आणि चार लोकात छानही दिसतं. अशाप्रकारे, आजच्या मोहक आणि दार्शनिक जगात असण्यापेक्षा दिसण्यालाच महत्व दिले जाते. दुर्दैवाने, परमार्थातही अनेकदा आपण साधक दिसण्याला कळत नकळत महत्व देत असतो. 

पारमार्थिक दिसणे आणि पारमार्थिक असणे यांत फार अंतर आहे. दिसणारा पारमार्थिक बाह्यकृतीला महत्व देतो; असणारा पारमार्थिक अंतरंग स्थितीला महत्व देतो. मी गंध लावलेले आहे, गळ्यात माळ आहे, सात्विक वाटणारी वेशभूषा, भाषाशैली आहे. परंतु, आतमध्ये भगवंताचे अनुसंधान आहे की वस्तू, व्यक्ती, पदार्थ, पैसा, स्तुती-निंदा यांची गर्दी आहे, हे ज्याचे त्याने बघणे जरूर आहे. ही अंतरंग स्थितीची परीक्षा बाहेरचा माणूस कदाचित करू शकणार नाही. हे परीक्षण आपण त्रयस्थपणे, तेही दिवसरात्र करत राहिले पाहिजे. तरच आज परमार्थात मी एखादे पाउल पुढे टाकले आहे की घसरण होत आहे, याची जाणीव होईल. ही जाणीवच आपल्यातील विवेक जागृत करून पुढील दिग्दर्शन करेल. 

यासाठी, एक उत्तम उपाय म्हणजे प्रत्येक क्षणाला माझे सद्गुरु माझ्या बाह्य कृतीपेक्षा माझ्या अंतःकरणात डोकावून बघत आहेत, याचे भान ठेवणे!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Wednesday, May 2, 2018

नामसाधना


🌹🌷  ।। नामसंध्या ।। 🌹🌷



श्रीराम! 
आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाचा प्राण म्हणजे नामसाधना! नामसाधनेत उत्तीर्ण होण्यासाठी नाम आणि साधना दोन्ही जपले पाहिजे. एकीकडे मनाला नामाने उन्मन करत असतांना दुसऱ्या बाजूने देहाला साधनेने पवित्र करणे म्हणजे नाम साधना. आजच्या युगात मनावर नामाचे अखंड संस्कार करणे जेवढे जरूर आहे तेवढेच देहावर साधनेचे संस्कार अनिवार्य आहेत.

देहाचे चोचले पुरवून आपण नामसाधनेत बाधक गोष्टी आणतो. देहाने कुठे जावे, देहाने काय खावे, किती खावे, देहाने काय बघावे, काय वाचावे, काय बोलावे, किती बोलावे यावर जोपर्यंत अंकुश ठेवल्या जात नाही, तोपर्यंत ज्या देहाच्या माध्यमातून आपण नाम घेत आहोत, तोच देह साधनेत अडसर ठरत राहतो. तेंव्हा, नामजप ही साधना होण्यासाठी देहाला त्यासाठी साधक बनवणे अनिवार्य आहे, याचे साधकाने भान ठेवले पाहिजे!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏