🌹
🌷
।। नामसंध्या ।।
🌹
🌷
श्रीराम!
माझी एवढी अडचण दूर झाली की मी नाम घ्यायला मोकळा. एकदा मुलं व्यवस्थित शिक्षणाला, नोकरीला लागले की मी आणि माझा देव, बस्स! आमच्या ऑफिसमध्ये सध्या कामाचा फार ताण आहे, माझ्या घरी सध्या औषधपाणी, दवाखाना याच्यातच सगळा दिवस जातोय. महिना, पंधरा दिवसानंतर मला चांगलाच रिकामा वेळ मिळणार आहे. नंतर मी जास्तीत जास्त नामस्मरण करत बसणार. मुलीच्या लग्नाची फार काळजी लागली आहे. तिला चांगलं स्थळ मिळालं की आपली जबाबदारी संपली. आणि आपण प्रपंचाकडे दुर्लक्ष केलेलं महाराजांना तरी आवडेल का? त्यामुळे सगळी कर्तव्य पूर्ण केली मी आणि माझी माळ! अहो, सध्या पाठीच्या दुखण्यानं फार हैराण झालो आहे. डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरु आहे. त्यामुळे माळ घेऊन जरावेळ बसलो तरी उसण भरते. एकदा का या दुखण्यातून बरा झालो की दररोज १३,००० जप करायचं पक्कं केलंय. मला माझ्यासाठी कश्शाची अपेक्षा नाही. देवाच्या दयेनं सगळं छान आहे. एवढं या मुलाचं लग्न करून देऊन त्याला सगळं सोपवलं की आम्ही दोघांनी गुरूगृही सेवा द्यायचं ठरवलं आहे......... अपेक्षित नामस्मरण न होण्याची ही आणि अशी कितीतरी कारणं आपण कधी जड अंतःकरणाने तर कधी सहजपणे सांगत असतो.
ही कारणं जर खरी मानली तर याचा अर्थ ज्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण आहे, त्यांना कसलीही प्रापंचिक काळजी, त्रास नाही. परंतु, प्रपंच आहे आणि प्रापंचिक अडचणी नाही असं संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही. प्रत्यक्ष रामराया, श्रीकृष्ण यांच्या प्रपंचातसुद्धां उणीवा किंवा अडचणी होत्या. संत, सत्पुरुष यांना प्रापंचिक दुःख, दारिद्र्य काही कमी नव्हते. मग आजच्या सांसारिक लोकांना अडचणी आहेत, यात नवल ते काय? या अडचणी असूनही एकाला नामस्मरण साधतं आणि दुसऱ्याला नाही, असं का? यासंदर्भात ज्याचे त्याने आत्मचिंतन करून स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन घडवून आणणे साधकत्वाला जिवंत ठेवण्यासाठी जरूर आहे.
“नामापरते न सत्य मानावे” असं महाराजांचं वाक्य किंवा “नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्यशरीर” असं समर्थवचन आपण सिनेमाचा डायलॉग म्हणावा तसं अनेकदा म्हणत असतो. परंतु, नामाचे ‘सत्यत्व’ आणि ‘सातत्य’ हे वाणीपेक्षा मनाला चिकटून ते आचरणात आल्याशिवाय खरा परमार्थ नाही, नाही, नाही!
श्रीमहाराजांची दोनच बोधवचनं आपला प्रपंच आणि परमार्थ कल्पनेपेक्षा सुखाचा करण्यासाठी पुरेशी आहेत. त्यातलं एक नकारात्मक आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, ‘एवढी अडचण दूर झाली की मग भगवंताची उपासना करीन’, असे जो म्हणेल त्याला कायमचेच थांबावे लागेल!
तर दुसरं सकारात्मक बोधवचन आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, "संसारातील खटपट संपल्यावर रोज जे ३-४ तास मिळतात तो वेळ नामांत नको का जायला? खरोखर दिवसभरात जो रिकामा वेळ मिळतो तो नामासाठी दिलात तर नामाच्या राशी पडतील!"
या दोन्ही वचनांचं मर्म ज्याच्या हृदयाला भिडलं तो खरा साधक!
तर दुसरं सकारात्मक बोधवचन आहे. त्यात श्रीमहाराज म्हणतात, "संसारातील खटपट संपल्यावर रोज जे ३-४ तास मिळतात तो वेळ नामांत नको का जायला? खरोखर दिवसभरात जो रिकामा वेळ मिळतो तो नामासाठी दिलात तर नामाच्या राशी पडतील!"
या दोन्ही वचनांचं मर्म ज्याच्या हृदयाला भिडलं तो खरा साधक!

