Monday, September 17, 2018

राधा हीच ती नवविधा भक्ती!




🌹🌹🌹 " नामप्रेमचिंतन "  🌹🌹🌹

!! जय श्रीराधेकृष्ण !!

श्रीराम!
आज राधा अष्टमी! 
या निमित्त 'नामप्रेम' या गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकातील चिंतनाचा काही भाग :

रामरायाचं भक्तप्रेम म्हंटलं की शबरीला दिलेलं नवविधा भक्तीचं तत्वज्ञान आठवतं. आणि कन्हैयाचं भक्तप्रेम म्हंटलं की गोपिकांसोबत केलेली रासलिला आठवते. ही रासलिला म्हणजे भगवंताच्या भक्ताप्रती असलेल्या भक्तीचा जिव्हाळा!
नवविधा भक्ती स्तवनानें शबरी मातेनं जे समाधीसुख अनुभवलं, तेच रासलिलेनं गोपिकांनी सुद्धां अनुभवलं! अध्यात्मशास्त्रात रासलिलेचं वर्णन समाधीस्थिती असं केलं आहे!

उद्धवाला श्रीकृष्णाचा सहवास लाभला, ज्ञान लाभलं. त्याचं कृष्णावर प्रेम होती, भक्ती होती. परंतु, त्या प्रेमाला, भक्तीला, ज्ञानाला पूर्णत्व नव्हतं. याचं कारण त्या भक्तीत थोडा कोरडेपणा होता, त्यात ओलावा म्हणजे जिव्हाळा नव्हता...
तो जिव्हाळा त्याला मिळावा म्हणूनच श्रीकृष्णानें त्याला भक्तीप्रेमाचा जिव्हाळा जिथें ओतप्रोत आहे, त्या गोपिकांकडे पाठवलं....
हा त्यांचं प्रबोधन करण्यासाठी गेला खरा, परंतु त्यांच्या दृढ भक्तीतील ओलावा पाहून त्यात उद्धवाचं ज्ञान वाहून गेलं आणि तोसुद्धां प्रेमानंद सागरांत बुडून आला, तेंव्हा त्याच्या कृष्णभक्तीला पूर्णत्व आलं!
तत्वज्ञानी उद्धव आला ।
प्रबोधन्या त्या गोपीबाला ।
पाहूनी त्यांच्या सगुण भक्तीला ।
हरले त्याचें समुळ अज्ञान ।।

या भक्तीच्या जिव्हाळ्याचा आदर्श म्हणजे राधा!
राधा ही कृष्णभक्तीचं, जिव्हाळ्याचं प्रतिक आहे. भगवंताची आराधना करण्यासाठी राधा बनलं पाहिजे. राधाशिवाय आराधना शक्य नाही!
राधेशिवाय कृष्ण रसस्वरूप आहे, पण तो रस थोडा निरस, कोरडा वाटेल. राधेच्या जिव्हाळ्यानें कृष्णभक्तीचा रस हा मधूर बनतो. आणि मग तोच कृष्ण मधुराधिपते बनतो!

भगवंतानें शबरीला नवविधा भक्ती सांगितली, लक्ष्मणाला सुद्धां सांगितली. पुढच्या अवतारांत अर्जुनाला कर्म, भक्ती, ज्ञान सांगितलं. परंतु, राधेला नाही सांगितलं. कारण, राधा हीच ती नवविधा भक्ती आहे!
नवविधा भक्ती जीवनांत उतरणं म्हणजेच राधास्वरूप बनणं. आणि राधा तिथें कृष्ण आलाच! हीच आत्मशुद्धी! आणि म्हणूनच वरील अभंगांत शेवटी तुकाराम महाराजांनी म्हटलं,
तुका म्हणे नवविध ।
भक्ती जाणे तोचिं शुद्ध ।।
तेंव्हा, राधा बनणं हे आराधनासारखं!
आणि
राधा न बनणं हे अपराधासारखं!
अपगता राधा यस्यात अपराध ।

आपण नामस्मरणभक्ती करतांना अंतःकरणात ओलावा नसेल ती कोरडी भक्ती असेल.
हा ओलावा जेंव्हा अंतःकरणात येतो, तेंव्हा तो अभिव्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि या अंतःकरणातील जिव्हाळ्याची अभिव्यक्ती होण्याची जागा म्हणजे डोळे!
अंतःकरणातील जिव्हाळा कंठापर्यंत येतो. आणि कंठात भक्तीप्रेम दाटून आलं की तो जिव्हाळा, ती भक्ती प्रेमाश्रूंच्या रुपानें डोळ्यातून बाहेर पडते!
कंठी प्रेम दाटे, नयनीं नीर लोटें ।
हृदयी प्रगटे नामरुप ।।
याला म्हणतात जिव्हाळ्याची अभिव्यक्ती! आणि भक्तीप्रेमाची अंतिम अवस्था म्हणजे डबडबलेले डोळे! बस्स!

🌺 !!! जाणें भक्तीचा जिव्हाळा !!!🌺


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment