Friday, September 14, 2018

सद्गुरु श्री गजानन महाराजांवरील चिंतन!

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : वृत्तीच्या मेदिनीठायी | फळझाडें ती लाविन पाही || या सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरित्रातील ओळीवर चिंतन मांडावे!

श्रीराम!
सत्ता, संपत्ती, सामर्थ्य असलेला मनुष्य अधूनमधून सुख उपभोगत असेल, पण भगवद्प्रेमाच्या अभावी अखंड समाधान मात्र त्याच्यापासून बरेच दूर असते. अवाढव्य लौकिक ऐश्वर्य परंतु सदाचरण आणि साधनेला विमुख असलेला मनुष्य हा एखाद्या अशा विहिरीसारखा असतो जी आकाराने मोठी आहे, परंतु त्यात पाण्याचा थेंबही नाही. अशा परिस्थितीत एखादा संत, सत्पुरुष किंवा समर्थ सद्गुरु आपल्या शुष्क जीवनात भक्तीचा ओलावा आणू पाहत असेल तर माणसाने त्या महात्म्याला ओळखून शरणागत झाले पाहिजे.

वरील प्रसंगात भास्कर पाटील या शेतकऱ्याने प.पु. गजानन महाराजांना ओळखण्यात चूक केली. किंबहुना, कुणीही तहानलेला व्यक्ती आला तरी त्याला भगवदस्वरूप मानून आपल्याला जमेल तेवढी त्याची तृष्णा कमी करावी. पाटील त्यात चुकला. तरी कृपाळू संत म्हणविती! त्यामुळे संतश्रेष्ठ गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला जलमय करून त्याला संतत्व दाखवले.

मग त्याने पूर्ण शरणागत भावाने जे वक्तव्य केले ते आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. तो म्हंटला की माझी योग्यता नसतांना आपण माझ्यासाठी या या कोरड्या विहिरीत पाणी प्रगट केले. परंतु, मला या लौकिक कृपेपेक्षा अलौकिक अनुग्रह हवा आहे.
या संपूर्ण प्रसंगातून आपण हा बोध घ्यावा की, आपल्या जीवनात सद्गुरु येण्याअगोदर आपले जीवन खडकाळ होते. परंतु, आपल्याला वासनारूपी खडकाला आपल्या सात्विक तेजाचा सुरुंग लावून संत तो फोडतात.
तेणें हा फुटला खडक | भावाचे लागले उदक |
अशावेळी आपल्यावर झालेल्या या अकारण कृपेने आपले अंतःकरण सद्गदित होऊन डोळ्यात जे पाणी येते ते आपल्याला गुरुसेवा आणि भगवद्भक्ती करायला प्रेरित करते. ज्या डोळ्यात अगोदर संसारातील आसक्तीमुळे पाणी येत होते आता त्याच डोळ्यात संतभेट झाल्यावर भक्तीप्रेमापोटी कृतकृत्यतेतून आनंदाश्रू येतात. अशा संतभेटीचा अमृतयोग आल्यावर त्याचा साधनेसाठी सदुपयोग करून घेणे हा विवेक फार महत्वाचा आहे. नाहीतर,
संतभेट झाली, संसार इच्छिला |
व्यर्थ व्यर्थ गेला, जन्म त्याचा |

भास्कर पाटलाने मात्र नेमका विवेक जागृत होऊन गजानन महाराजांना काही न मागता स्वतःच त्यांना एक अलौकिक अभिवचन दिले. हे अभिवचन म्हणजे
वृत्तीच्या मेदिनीठायी | फळझाडे ती लावीन पाही ||
सद्गुरूंनी केवळ लौकिकदृष्टीने विहिरीत पाणी प्रगट केले नसून एका अभक्त आणि विषयवृत्तीने गांजलेल्या व्यक्तीच्या खडकाळ वृत्तीत भक्तीचा ओलावा आणला आहे. मनुष्याचा जन्म सुफळ होण्यासाठी त्याची वृत्तीरुपी जमीन ओली असायला पाहिजे. पाटलाची मेदिनी म्हणजे जमीन ही संतभेटीने जलमय झाली. त्यामुळे पाटील म्हंटला,
आतां मळा निःशंक भक्तिपंथाचा लाविन मी ||

आता या नापीक जमिनीला पाणी मिळाल्यावर त्यात साधनेचे खतपाणी आणि सदाचरणाची नांगरणी झाली तर येणारे फळ हे फार स्वादिष्ट असेल. भास्कर पाटलाने हेच आश्वासन महाराजांना दिले की, या वृत्तीरुपी मेदिनीच्या ठायी मी फळझाडे आणि फुलझाडे लावीन. यातील फुलझाडे म्हणजे सत्कर्मे. सत्कर्माचा सुगंध वातावरणात दरवळू लागला की इतर लोकसुद्धा त्याकडे आकर्षित होऊन स्वतः सत्कर्माची फुलझाडे लावतील. म्हणून पाटील म्हंटला,
सत्कर्माची फुलझाडें | लावीन मी जिकडे तिकडे |

आणि फळ कोणते? तर भक्तीप्रेमाचे फळ. हे फळ येण्यासाठी जमिनीला वैराग्याचे कुंपण आणि साधनेची शिकस्त तर करावीच लागेल, पण त्यासाठी या वृत्तीरुपी मेदिनीत अनुरूप बीज लावले पाहिजे. हे बीज म्हणजे भगवंताचे स्मरण! ते बीज अखंड आणि अभंग असले पाहिजे. या बीजाला संत, सत्पुरुष नाम असे म्हणतात. जो आपल्या वृत्तीमध्ये हे नामाचे अखंड बीज लावेल, त्याला सत्कर्माची फुले आणि भक्तिप्रेमाचे मधुर फळ येईल! यासाठी पाटलाप्रमाणे आपणही सद्गुरूंना आश्वासन देऊया की,
वृत्तीच्या मेदिनीठायी | फळझाडे ती लावीन पाही ||


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

No comments:

Post a Comment