🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : दिवाळीत फराळ अध्यात्मीक अंगाने कसा करावा / असावा / चाखावा? थोडक्यात दिवाळीतला आनंद खऱ्या समाधानात
परिवर्तीत होण्यासाठी या फराळात माझे महाराज कसे शोधावेत सांगाल का?
श्रीराम!
खरं सांगतो, खाण्याच्या बाबतीत मी जरा कमजोर आहे. त्यामुळे, हे फराळ वगैरे कसा करावा, असावा हे मी कसं सांगणार? तेंव्हा, चवीपेक्षा त्या पदार्थांमधून आपण काय बोध घ्यावा हे पाहण्याचा मी
प्रयत्न करेन. ज्ञानाग्नी
सर्व कर्मानि भस्मसात् कुरूते । असं अध्यात्मशास्त्रानें सांगितलं आहे. सच्चिदानंद
भगवंतानें निर्माण केलेल्या या विश्वातील प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीमध्ये
त्याचीच शक्ती भरून आहे. ती शक्ती प्रगट करण्यासाठी ते भावपूर्ण आवाहन आणि ते
प्रगटीकरण जाणवण्यासाठी अंतःकरण शुद्धी जरूर आहे. होळी या सणाच्या परिस्थितीमध्ये
आपण जो अग्नी बघतो, तो
विषयविकारांची होळी करणारा असतो, तर दिवाळीमध्ये जो पणतीवरील अग्नी बघतो तो भक्तीप्रेमज्ञान तेजाळणारा
अग्नी असतो.
होळीतील रंगांमधून आपण काही ना काही अध्यात्मिक
संदेश घेत असतो,
त्याप्रमाणें
दिवाळीतील फराळ असो, किंवा
घर सजावट इ. असो आपल्या सभोवती आनंदोत्सवच दिसावा, हा अट्टाहास असतो. याचे कारण म्हणजे प्रत्येक मनुष्य हा तत्वतः आनंदस्वरूपच
आहे.
एकदा दिवाळीच्या सणात अनेक भक्त गोंदवल्यात आले
होते. श्रीमहाराजांनी सर्वांसाठी फराळाची व्यवस्था केली होती. सकाळच्यावेळी एकदा
सर्वजण आणि महाराज मध्यभागी असे फराळाला बसले होते. अन् अचानक महाराजांच्या
डोळ्यांत पाणी आलं. जवळच्या साधकांनी कारण विचारल्यावर महाराज गहिवरून म्हंटले, "दुसऱ्या गावी स्थायिक झालेले मुलंमुली
दिवाळसणाला घरी आल्यावर त्या आईची जशी अवस्था होते, तशी माझी अवस्था झाली आहे. हे अश्रू त्या आत्यंतिक आनंदाचे
आहेत!" आपण जर हेंच प्रेम प्रत्येक माणसांत पाहू लागलो तर आपल्याला नित्य
दिवाळी, नित्यनुतन आनंद आहे. पहिला दिवा आज
लागे दारी म्हणत आपण ज्या औपचारिक शुभेच्छा एकमेकांना देतो, त्याबरोबर "सर्वांसोबतच्या"
जुन्या कटू आठवणींना जाळून आपुलकीचा पहिला दिवा लावला तर किती लख्ख प्रकाश पडेल!
दिवाळीच्या निमित्ताने आपण जे पदार्थ बनवतो, त्यात भगवंत पहायला शिकलं पाहिजे. बालक
प्रल्हादाने जड खांबांत नारायण पाहिला; आपली भावशक्ती जागृत झाली की लाडू, चकली, शंकरपाळ्यात
राम दिसणार नाही का? आणि
जर त्यात राम दिसत नसेल तर ते बनवण्यात काही राम नाही.
लाडू हा कणाकणांना दोन हातांनी एकत्र येऊन तयार
केलेला गोड गोल आहे. परमात्मा आणि प्रकृती या दोन तत्वांनी एकत्र येऊन तयार केलेला
गोड गोल म्हणजे हे विश्व! लाडवाच्या प्रत्येक कणांत गोडवा आहे, तसा विश्वातील चराचराला भगवंताचा
प्रेमस्पर्श झालेला असल्याने यातील कणाकणांतून क्षणाक्षणाला गोडवा जाणवला पाहिजे. या विश्वात जन्माला येणारा प्रत्येक
जीव हा वासनेतून आलेला असतो. परंतु, या सर्व जीवांपैकी
मनुष्य
देहाचेनी ज्ञाने । सच्चिदानंद पदवी घेणे ।
एवढा
अधिकार नारायणे । कृपावलोकने दिधला ।।
पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढा अधिकार मिळूनदेखील मनुष्य अहंकारामुळे, वासनेमुळे नियतीच्या साचात अडकतो. जसं
भाजणीचं पीठ साचात अडकून उकळत्या तेलाच्या कढईत गोल गोल फिरवलं जातं आणि चकली
रूपानें एखाद्याचं भोजन बनतं, तसंच मनुष्यजन्म मिळुनही आपण स्वकर्मानें त्रिविध तापानें उकळणाऱ्या
विश्वरुपी कढईत पुनरपी जननं पुनरपि मरणं असं गोल गोल फिरवले जातो व शेवटी काळाचे भोजन
बनतो. हा चकलीचा संदेश आहे. तर हीच चकली एक उपदेश देते की स्वतः होरपळले गेलो तरी
आपल्या प्रेमाचं वलय निर्माण करून दुसऱ्यांच्या जीवनाला खमंग चव आणायचा प्रयत्न
करावा!
प्रत्येक मनुष्य सुखासाठी जरी धडपडत असला तरी ते सुख त्याला अल्पकाळ
आनंद देऊन संपतं. आणि त्या अल्पशा सुखानंतर दुःख येतं. याचा अर्थ सुख आणि दुःख हे
जीवनाचे दोन अविभाज्य अंग आहेत. शंकरपाळे गोड आणि खारे दोन्ही प्रकारचे असतात. पण
आपण दोन्हीचा आस्वाद घेतो तसं जीवनातील सुख आणि दुःख दोन्हीचा आस्वाद घेता यायला
पाहिजे. मैद्याला भरपूर मळले गेले आणि व्यवस्थित तळले तर गोड असो की खारे शंकरपाळे
खुसखुशीत होतात. तसं देह सदाचरणानें भरपूर मळल्या गेला व केलेले सर्व कर्म
कृष्णार्पणमस्तु म्हणून प्रारब्धाच्या कढईत सोडले तर त्यातून निघणारे फळ गोड असो
किंवा खारे ते खुसखुशीत म्हणजे समाधान देणारेच होईल!
गोड, खारे, तिखट
सर्व पदार्थ जसे मनसोक्त हादडतो, तसे इतरांशी असलेली कडवट भावना विसरून, नात्यातील तिखटपणा सोडून आज
सर्वांशी प्रेमानें वागलो तर खऱ्या अर्थानें दिवाळी साजरी होईल. आपण
दिवाळीत जो आकाशदिवा लावतो, तो आपल्या अंगणातच नाही तर सभोवार आनंददायी प्रकाश पाडतो. श्रीमहाराज
म्हणत की,
"उंबरठ्यावरचा
दिवा जसा घर अंगण दोन्हीकडे प्रकाश पाडतो, तसें नामस्मरणाचा दिवा आपल्या प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे प्रकाश
पाडतो!" दिवाळीच्या आकाशदिव्याकडून आपण हाच बोध घ्यावा की मी नामस्मरणाच्या
शांत, सुखद प्रकाशानें केवळ माझ्याच नाही तर
सर्वांच्या जीवनात प्रेम प्रकाश पाडण्याचा यत्न कसून करीन. रामराया यात नक्कीच यश
देईल!
प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थात
देवत्व पाहून घराला देवालय बनवणं, ही दिवाळी! आपल्यातील विकारांना जाळून जिथें निरपेक्ष प्रेमाची पणती
सतत तेवत असते, त्या घरात समाधानाची लक्ष्मी सदा
सर्वकाळ वास करून प्रत्येकाच्या जीवनाला नित्यनुतन दिपावलीचा उत्सव बनवते! या
दिवाळीच्या निमित्ताने आपण हा नामप्रेमाचा नंदादीप अखंड तेवत ठेवुया; रामराया आपल्याला नित्यनुतन आनंदाचा
फराळ भरवेल!

