Monday, November 5, 2018

अध्यात्मिक अंगाने दिवाळीतील फराळ!


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : दिवाळीत फराळ अध्यात्मीक अंगाने कसा करावा / असावा / चाखावा? थोडक्यात दिवाळीतला आनंद खऱ्या समाधानात परिवर्तीत होण्यासाठी या फराळात माझे महाराज कसे शोधावेत सांगाल का?


श्रीराम!
खरं सांगतो, खाण्याच्या बाबतीत मी जरा कमजोर आहे. त्यामुळे, हे फराळ वगैरे कसा करावा, असावा हे मी कसं सांगणार? तेंव्हा, चवीपेक्षा त्या पदार्थांमधून आपण काय बोध घ्यावा हे पाहण्याचा मी प्रयत्न करेन. ज्ञानाग्नी सर्व कर्मानि भस्मसात् कुरूते । असं अध्यात्मशास्त्रानें सांगितलं आहे. सच्चिदानंद भगवंतानें निर्माण केलेल्या या विश्वातील प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीमध्ये त्याचीच शक्ती भरून आहे. ती शक्ती प्रगट करण्यासाठी ते भावपूर्ण आवाहन आणि ते प्रगटीकरण जाणवण्यासाठी अंतःकरण शुद्धी जरूर आहे. होळी या सणाच्या परिस्थितीमध्ये आपण जो अग्नी बघतो, तो विषयविकारांची होळी करणारा असतो, तर दिवाळीमध्ये जो पणतीवरील अग्नी बघतो तो भक्तीप्रेमज्ञान तेजाळणारा अग्नी असतो.

होळीतील रंगांमधून आपण काही ना काही अध्यात्मिक संदेश घेत असतो, त्याप्रमाणें दिवाळीतील फराळ असो, किंवा घर सजावट इ. असो आपल्या सभोवती आनंदोत्सवच दिसावा, हा अट्टाहास असतो. याचे कारण म्हणजे प्रत्येक मनुष्य हा तत्वतः आनंदस्वरूपच आहे.

एकदा दिवाळीच्या सणात अनेक भक्त गोंदवल्यात आले होते. श्रीमहाराजांनी सर्वांसाठी फराळाची व्यवस्था केली होती. सकाळच्यावेळी एकदा सर्वजण आणि महाराज मध्यभागी असे फराळाला बसले होते. अन् अचानक महाराजांच्या डोळ्यांत पाणी आलं. जवळच्या साधकांनी कारण विचारल्यावर महाराज गहिवरून म्हंटले, "दुसऱ्या गावी स्थायिक झालेले मुलंमुली दिवाळसणाला घरी आल्यावर त्या आईची जशी अवस्था होते, तशी माझी अवस्था झाली आहे. हे अश्रू त्या आत्यंतिक आनंदाचे आहेत!" आपण जर हेंच प्रेम प्रत्येक माणसांत पाहू लागलो तर आपल्याला नित्य दिवाळी, नित्यनुतन आनंद आहे. पहिला दिवा आज लागे दारी म्हणत आपण ज्या औपचारिक शुभेच्छा एकमेकांना देतो, त्याबरोबर "सर्वांसोबतच्या" जुन्या कटू आठवणींना जाळून आपुलकीचा पहिला दिवा लावला तर किती लख्ख प्रकाश पडेल!

दिवाळीच्या निमित्ताने आपण जे पदार्थ बनवतो, त्यात भगवंत पहायला शिकलं पाहिजे. बालक प्रल्हादाने जड खांबांत नारायण पाहिला; आपली भावशक्ती जागृत झाली की लाडू, चकली, शंकरपाळ्यात राम दिसणार नाही का? आणि जर त्यात राम दिसत नसेल तर ते बनवण्यात काही राम नाही.

लाडू हा कणाकणांना दोन हातांनी एकत्र येऊन तयार केलेला गोड गोल आहे. परमात्मा आणि प्रकृती या दोन तत्वांनी एकत्र येऊन तयार केलेला गोड गोल म्हणजे हे विश्व! लाडवाच्या प्रत्येक कणांत गोडवा आहे, तसा विश्वातील चराचराला भगवंताचा प्रेमस्पर्श झालेला असल्याने यातील कणाकणांतून क्षणाक्षणाला गोडवा जाणवला पाहिजे. या विश्वात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा वासनेतून आलेला असतो. परंतु, या सर्व जीवांपैकी
मनुष्य देहाचेनी ज्ञाने । सच्चिदानंद पदवी घेणे ।
एवढा अधिकार नारायणे । कृपावलोकने दिधला ।।
पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढा अधिकार मिळूनदेखील मनुष्य अहंकारामुळे, वासनेमुळे नियतीच्या साचात अडकतो. जसं भाजणीचं पीठ साचात अडकून उकळत्या तेलाच्या कढईत गोल गोल फिरवलं जातं आणि चकली रूपानें एखाद्याचं भोजन बनतं, तसंच मनुष्यजन्म मिळुनही आपण स्वकर्मानें त्रिविध तापानें उकळणाऱ्या विश्वरुपी कढईत पुनरपी जननं पुनरपि मरणं असं गोल गोल फिरवले जातो व शेवटी काळाचे भोजन बनतो. हा चकलीचा संदेश आहे. तर हीच चकली एक उपदेश देते की स्वतः होरपळले गेलो तरी आपल्या प्रेमाचं वलय निर्माण करून दुसऱ्यांच्या जीवनाला खमंग चव आणायचा प्रयत्न करावा!

प्रत्येक मनुष्य सुखासाठी जरी धडपडत असला तरी ते सुख त्याला अल्पकाळ आनंद देऊन संपतं. आणि त्या अल्पशा सुखानंतर दुःख येतं. याचा अर्थ सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन अविभाज्य अंग आहेत. शंकरपाळे गोड आणि खारे दोन्ही प्रकारचे असतात. पण आपण दोन्हीचा आस्वाद घेतो तसं जीवनातील सुख आणि दुःख दोन्हीचा आस्वाद घेता यायला पाहिजे. मैद्याला भरपूर मळले गेले आणि व्यवस्थित तळले तर गोड असो की खारे शंकरपाळे खुसखुशीत होतात. तसं देह सदाचरणानें भरपूर मळल्या गेला व केलेले सर्व कर्म कृष्णार्पणमस्तु म्हणून प्रारब्धाच्या कढईत सोडले तर त्यातून निघणारे फळ गोड असो किंवा खारे ते खुसखुशीत म्हणजे समाधान देणारेच होईल!

गोड, खारे, तिखट सर्व पदार्थ जसे मनसोक्त हादडतो, तसे इतरांशी असलेली कडवट भावना विसरून, नात्यातील तिखटपणा सोडून आज  सर्वांशी प्रेमानें वागलो तर खऱ्या अर्थानें दिवाळी साजरी होईल. आपण दिवाळीत जो आकाशदिवा लावतो, तो आपल्या अंगणातच नाही तर सभोवार आनंददायी प्रकाश पाडतो. श्रीमहाराज म्हणत की, "उंबरठ्यावरचा दिवा जसा घर अंगण दोन्हीकडे प्रकाश पाडतो, तसें नामस्मरणाचा दिवा आपल्या प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे प्रकाश पाडतो!" दिवाळीच्या आकाशदिव्याकडून आपण हाच बोध घ्यावा की मी नामस्मरणाच्या शांत, सुखद प्रकाशानें केवळ माझ्याच नाही तर सर्वांच्या जीवनात प्रेम प्रकाश पाडण्याचा यत्न कसून करीन. रामराया यात नक्कीच यश देईल!

प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थात देवत्व पाहून घराला देवालय बनवणं, ही दिवाळी! आपल्यातील विकारांना जाळून जिथें निरपेक्ष प्रेमाची पणती सतत तेवत असते, त्या घरात समाधानाची लक्ष्मी सदा सर्वकाळ वास करून प्रत्येकाच्या जीवनाला नित्यनुतन दिपावलीचा उत्सव बनवते! या दिवाळीच्या निमित्ताने आपण हा नामप्रेमाचा नंदादीप अखंड तेवत ठेवुया; रामराया आपल्याला नित्यनुतन आनंदाचा फराळ भरवेल!


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Wednesday, October 24, 2018

कोजागिरी पौर्णिमा संदर्भात थोडंसं सांगावे!


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : कोजागिरी पौर्णिमा संदर्भात थोडंसं सांगावे!


श्रीराम!
संपूर्ण लौकिक विश्व विषयनिद्रेत लोळत असतांना विश्वात्म्याच्या स्मरणांत कोण पूर्ण जागं आहेहे बघण्याचा पूर्णतम पर्वकाळ म्हणजे कोजागरी पौर्णिमा! परमार्थ म्हणजे अखंड सावधानता! या सावधानतेला एक अध्यात्मिक समकक्ष शब्द आहे "जागृती"! सदाचरणात्मक सावधानीसतत जागृत अवस्था हीच खरी साधना, याची शिकवण देणारी ही पौर्णिमा! गुरूपौर्णिमा उत्सवातील प्रवचनांत आपण संपूर्ण १२ नव्हें तर १३ पौर्णिमांचं अध्यात्मिक अधिष्ठान यांवर चिंतन केलं. या १२-१३ पौर्णिमांपैकी एक अतिदिव्यतम् पौर्णिमा म्हणजे आजची!

प्रत्येक मनुष्यात चार गोष्टी अंतर्भूत असतातज्यांच्या सदुपयाोगानें आपण आपलं जीवन कृतार्थ करू शकतो. त्या चार गोष्टी म्हणजे मनबुद्धीचित्त आणि अहंकार! या चारही लेव्हलवरून जेंव्हा आपली अखंड जागृत अवस्था राखली जातेतेंव्हा शरद पौर्णिमेसारखा पूर्णानंद अखंड अनुभवता येतो! 

आजचा सुखदुःखाच्या गर्तेत पुरता अडकलेला मनुष्य या पूर्णानंदाच्या जवळपाससुद्धां फिरकू शकत नाही. एखाद्या माणसाला चार दोरांनी घट्ट बांधून चार दिशांकडे एकाचवेळी ओढलं तर कसं होईलतसं काहीसं विषयी माणसाचं झालं आहे कीज्या मनबुद्धीचित्तअहंकाराला जागृत करायचं आहे त्याच चार बंधनात तो करकचून स्वतःहून अडकून बसला आहे. आणि या चार पाशातून अडकून त्यांच्यावर स्वामित्व गाजवण्यासाठी जागृतपूर्वक जी साधना करावी लागतेतिला म्हणतात साधनचतुष्ट्य!!! आपलं पूर्ण अंतःकरण पूर्णब्रम्ह परमात्म्याला समर्पित केल्यावर काय होतंयाची दोन महानतम् उदाहरणं म्हणजे महर्षी वाल्मिकी आणि भक्ती महाराणी शबरी! याच दोन दिव्य रामभक्तांचा जन्मदिन म्हणजे ही शरद पौर्णिमा, वाल्मिकी पौर्णिमा!

वाल्मिकींचं पूर्वायुष्य चोऱ्यालुटमार करण्याततर शबरीचं बालपण लौकिक अर्थानें कनिष्ठ वर्ग मानल्या जाणाऱ्या भिल्ल जमातीत. परंतुदोघांच्या आयुष्यात एक जागृतीचा क्षण आला आणि त्यांनी तो आजीवन धारण केला. याच सततं जागृतावस्था ची परिणती म्हणजे त्यांना रामभक्तांमध्ये अढळ स्थान प्राप्त झालं! अर्थात ही जागृत अवस्था येण्यासाठी कुणी समर्थ सद्गुरू भेटावा लागतो. वाल्याकोळीला वाटमारी करतांना नारदमुनींच्या रूपाने रामभक्तीचा वाटाड्या भेटला.
नारदानें त्याला जागं केलं आणि मतंग मुनींनी लहानशा शबरीला जागं केलं. शबरीला तिच्या सद्गुरूंनी रामदर्शन घडेल, त्यासाठी भक्तियुक्त नामस्मरण सुरु ठेव, असे सांगितले. यात रामदर्शन कधी घडेल, हे सांगितले नव्हते. तिने आयुष्यभर न थकता अव्याहत म्हणजे नामाचा जागर सुरु ठेवला. इतकी वर्षे झाली नाम घेऊन, काही उपयोग झाला नाही, असे म्हणून शबरी साधनेपासून परावृत्त झाली नाही. 'सतत जागृत राहून साधनस्थ' राहणे हे भगवद्कृपेसाठीची महत्वाची अट सांगणारी ही पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा! 

या दोन सद्गुरूंनी दोन महान अधिकारी भगवद्भक्तांना अखंड जागर शिकवला. 

यांतून बोध घेऊन आपण विचारावं 'को जागरी?' किंबहुना, आपले सद्गुरूच सतत कोणत्या ना कोणत्या मुखातून, प्रसंगातून आपल्या शिष्यांना विचारतात, 'कोण जागं आहे?. जो जागा होण्याची आंतरिक तळमळ दाखवतो, त्याच्या अंतःकरणातील मलीन जागा भगवंताच्या प्रगटीकरणासाठी पूर्णपणे शुध्द होते. आणि मग भगवंताची जागा वैकुंठात राहत नसून भक्ताच्या अंतःकरणात निर्माण होते. भगवंताची जागा भक्ताच्या ह्रदयकमली; तर भक्ताची जागा भगवंताच्या चरणकमली!

ही पौर्णिमेसारखी पूर्णावस्था साधण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी अनुग्रहाच्या रुपानें आपल्याला जी जागृती दिली आहे, त्या नामानुसंधानांत राहून कर्तव्य करावेंरामचरणी जागा नक्कीच मिळेल!

 ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, September 17, 2018

राधा हीच ती नवविधा भक्ती!




🌹🌹🌹 " नामप्रेमचिंतन "  🌹🌹🌹

!! जय श्रीराधेकृष्ण !!

श्रीराम!
आज राधा अष्टमी! 
या निमित्त 'नामप्रेम' या गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकातील चिंतनाचा काही भाग :

रामरायाचं भक्तप्रेम म्हंटलं की शबरीला दिलेलं नवविधा भक्तीचं तत्वज्ञान आठवतं. आणि कन्हैयाचं भक्तप्रेम म्हंटलं की गोपिकांसोबत केलेली रासलिला आठवते. ही रासलिला म्हणजे भगवंताच्या भक्ताप्रती असलेल्या भक्तीचा जिव्हाळा!
नवविधा भक्ती स्तवनानें शबरी मातेनं जे समाधीसुख अनुभवलं, तेच रासलिलेनं गोपिकांनी सुद्धां अनुभवलं! अध्यात्मशास्त्रात रासलिलेचं वर्णन समाधीस्थिती असं केलं आहे!

उद्धवाला श्रीकृष्णाचा सहवास लाभला, ज्ञान लाभलं. त्याचं कृष्णावर प्रेम होती, भक्ती होती. परंतु, त्या प्रेमाला, भक्तीला, ज्ञानाला पूर्णत्व नव्हतं. याचं कारण त्या भक्तीत थोडा कोरडेपणा होता, त्यात ओलावा म्हणजे जिव्हाळा नव्हता...
तो जिव्हाळा त्याला मिळावा म्हणूनच श्रीकृष्णानें त्याला भक्तीप्रेमाचा जिव्हाळा जिथें ओतप्रोत आहे, त्या गोपिकांकडे पाठवलं....
हा त्यांचं प्रबोधन करण्यासाठी गेला खरा, परंतु त्यांच्या दृढ भक्तीतील ओलावा पाहून त्यात उद्धवाचं ज्ञान वाहून गेलं आणि तोसुद्धां प्रेमानंद सागरांत बुडून आला, तेंव्हा त्याच्या कृष्णभक्तीला पूर्णत्व आलं!
तत्वज्ञानी उद्धव आला ।
प्रबोधन्या त्या गोपीबाला ।
पाहूनी त्यांच्या सगुण भक्तीला ।
हरले त्याचें समुळ अज्ञान ।।

या भक्तीच्या जिव्हाळ्याचा आदर्श म्हणजे राधा!
राधा ही कृष्णभक्तीचं, जिव्हाळ्याचं प्रतिक आहे. भगवंताची आराधना करण्यासाठी राधा बनलं पाहिजे. राधाशिवाय आराधना शक्य नाही!
राधेशिवाय कृष्ण रसस्वरूप आहे, पण तो रस थोडा निरस, कोरडा वाटेल. राधेच्या जिव्हाळ्यानें कृष्णभक्तीचा रस हा मधूर बनतो. आणि मग तोच कृष्ण मधुराधिपते बनतो!

भगवंतानें शबरीला नवविधा भक्ती सांगितली, लक्ष्मणाला सुद्धां सांगितली. पुढच्या अवतारांत अर्जुनाला कर्म, भक्ती, ज्ञान सांगितलं. परंतु, राधेला नाही सांगितलं. कारण, राधा हीच ती नवविधा भक्ती आहे!
नवविधा भक्ती जीवनांत उतरणं म्हणजेच राधास्वरूप बनणं. आणि राधा तिथें कृष्ण आलाच! हीच आत्मशुद्धी! आणि म्हणूनच वरील अभंगांत शेवटी तुकाराम महाराजांनी म्हटलं,
तुका म्हणे नवविध ।
भक्ती जाणे तोचिं शुद्ध ।।
तेंव्हा, राधा बनणं हे आराधनासारखं!
आणि
राधा न बनणं हे अपराधासारखं!
अपगता राधा यस्यात अपराध ।

आपण नामस्मरणभक्ती करतांना अंतःकरणात ओलावा नसेल ती कोरडी भक्ती असेल.
हा ओलावा जेंव्हा अंतःकरणात येतो, तेंव्हा तो अभिव्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि या अंतःकरणातील जिव्हाळ्याची अभिव्यक्ती होण्याची जागा म्हणजे डोळे!
अंतःकरणातील जिव्हाळा कंठापर्यंत येतो. आणि कंठात भक्तीप्रेम दाटून आलं की तो जिव्हाळा, ती भक्ती प्रेमाश्रूंच्या रुपानें डोळ्यातून बाहेर पडते!
कंठी प्रेम दाटे, नयनीं नीर लोटें ।
हृदयी प्रगटे नामरुप ।।
याला म्हणतात जिव्हाळ्याची अभिव्यक्ती! आणि भक्तीप्रेमाची अंतिम अवस्था म्हणजे डबडबलेले डोळे! बस्स!

🌺 !!! जाणें भक्तीचा जिव्हाळा !!!🌺


         ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Friday, September 14, 2018

सद्गुरु श्री गजानन महाराजांवरील चिंतन!

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : वृत्तीच्या मेदिनीठायी | फळझाडें ती लाविन पाही || या सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरित्रातील ओळीवर चिंतन मांडावे!

श्रीराम!
सत्ता, संपत्ती, सामर्थ्य असलेला मनुष्य अधूनमधून सुख उपभोगत असेल, पण भगवद्प्रेमाच्या अभावी अखंड समाधान मात्र त्याच्यापासून बरेच दूर असते. अवाढव्य लौकिक ऐश्वर्य परंतु सदाचरण आणि साधनेला विमुख असलेला मनुष्य हा एखाद्या अशा विहिरीसारखा असतो जी आकाराने मोठी आहे, परंतु त्यात पाण्याचा थेंबही नाही. अशा परिस्थितीत एखादा संत, सत्पुरुष किंवा समर्थ सद्गुरु आपल्या शुष्क जीवनात भक्तीचा ओलावा आणू पाहत असेल तर माणसाने त्या महात्म्याला ओळखून शरणागत झाले पाहिजे.

वरील प्रसंगात भास्कर पाटील या शेतकऱ्याने प.पु. गजानन महाराजांना ओळखण्यात चूक केली. किंबहुना, कुणीही तहानलेला व्यक्ती आला तरी त्याला भगवदस्वरूप मानून आपल्याला जमेल तेवढी त्याची तृष्णा कमी करावी. पाटील त्यात चुकला. तरी कृपाळू संत म्हणविती! त्यामुळे संतश्रेष्ठ गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला जलमय करून त्याला संतत्व दाखवले.

मग त्याने पूर्ण शरणागत भावाने जे वक्तव्य केले ते आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. तो म्हंटला की माझी योग्यता नसतांना आपण माझ्यासाठी या या कोरड्या विहिरीत पाणी प्रगट केले. परंतु, मला या लौकिक कृपेपेक्षा अलौकिक अनुग्रह हवा आहे.
या संपूर्ण प्रसंगातून आपण हा बोध घ्यावा की, आपल्या जीवनात सद्गुरु येण्याअगोदर आपले जीवन खडकाळ होते. परंतु, आपल्याला वासनारूपी खडकाला आपल्या सात्विक तेजाचा सुरुंग लावून संत तो फोडतात.
तेणें हा फुटला खडक | भावाचे लागले उदक |
अशावेळी आपल्यावर झालेल्या या अकारण कृपेने आपले अंतःकरण सद्गदित होऊन डोळ्यात जे पाणी येते ते आपल्याला गुरुसेवा आणि भगवद्भक्ती करायला प्रेरित करते. ज्या डोळ्यात अगोदर संसारातील आसक्तीमुळे पाणी येत होते आता त्याच डोळ्यात संतभेट झाल्यावर भक्तीप्रेमापोटी कृतकृत्यतेतून आनंदाश्रू येतात. अशा संतभेटीचा अमृतयोग आल्यावर त्याचा साधनेसाठी सदुपयोग करून घेणे हा विवेक फार महत्वाचा आहे. नाहीतर,
संतभेट झाली, संसार इच्छिला |
व्यर्थ व्यर्थ गेला, जन्म त्याचा |

भास्कर पाटलाने मात्र नेमका विवेक जागृत होऊन गजानन महाराजांना काही न मागता स्वतःच त्यांना एक अलौकिक अभिवचन दिले. हे अभिवचन म्हणजे
वृत्तीच्या मेदिनीठायी | फळझाडे ती लावीन पाही ||
सद्गुरूंनी केवळ लौकिकदृष्टीने विहिरीत पाणी प्रगट केले नसून एका अभक्त आणि विषयवृत्तीने गांजलेल्या व्यक्तीच्या खडकाळ वृत्तीत भक्तीचा ओलावा आणला आहे. मनुष्याचा जन्म सुफळ होण्यासाठी त्याची वृत्तीरुपी जमीन ओली असायला पाहिजे. पाटलाची मेदिनी म्हणजे जमीन ही संतभेटीने जलमय झाली. त्यामुळे पाटील म्हंटला,
आतां मळा निःशंक भक्तिपंथाचा लाविन मी ||

आता या नापीक जमिनीला पाणी मिळाल्यावर त्यात साधनेचे खतपाणी आणि सदाचरणाची नांगरणी झाली तर येणारे फळ हे फार स्वादिष्ट असेल. भास्कर पाटलाने हेच आश्वासन महाराजांना दिले की, या वृत्तीरुपी मेदिनीच्या ठायी मी फळझाडे आणि फुलझाडे लावीन. यातील फुलझाडे म्हणजे सत्कर्मे. सत्कर्माचा सुगंध वातावरणात दरवळू लागला की इतर लोकसुद्धा त्याकडे आकर्षित होऊन स्वतः सत्कर्माची फुलझाडे लावतील. म्हणून पाटील म्हंटला,
सत्कर्माची फुलझाडें | लावीन मी जिकडे तिकडे |

आणि फळ कोणते? तर भक्तीप्रेमाचे फळ. हे फळ येण्यासाठी जमिनीला वैराग्याचे कुंपण आणि साधनेची शिकस्त तर करावीच लागेल, पण त्यासाठी या वृत्तीरुपी मेदिनीत अनुरूप बीज लावले पाहिजे. हे बीज म्हणजे भगवंताचे स्मरण! ते बीज अखंड आणि अभंग असले पाहिजे. या बीजाला संत, सत्पुरुष नाम असे म्हणतात. जो आपल्या वृत्तीमध्ये हे नामाचे अखंड बीज लावेल, त्याला सत्कर्माची फुले आणि भक्तिप्रेमाचे मधुर फळ येईल! यासाठी पाटलाप्रमाणे आपणही सद्गुरूंना आश्वासन देऊया की,
वृत्तीच्या मेदिनीठायी | फळझाडे ती लावीन पाही ||


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Tuesday, August 21, 2018

मृत्यूचा उत्सव


🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : तुम्ही सद्गुरुजवळ मृत्यूचा उत्सव शिकू शकला नाहीत तर नदी समोर असूनही जीवनभर तुम्ही पाण्यापासून वंचित राहिलात असंच म्हणावं लागेल. मृत्यूचा उत्सव याचा अर्थ सांगाल का? 

श्रीराम! 

काही माणसं बऱ्याच वर्षांनी पंढरपूरला गेले. सकाळी गावाहून निघाल्यावर पंढरीला पोचायला रात्रीचे ९ वाजले. दिवसभराची भूक होती म्हणून अगोदर मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. नंतर विठ्ठल मंदिराबाहेर असलेली दुकानं पाहत राहिली, थोडीफार खरेदी करत राहिली. हे सगळं करण्यात शेजारती होऊन मंदिर बंद झालं. दुसऱ्या दिवशी ८ वाजताची बस पकडण्याअगोदर पहाटेच दर्शन करू असं ठरवलं. पण दिवसभरच्या प्रवासाने सकाळी साडे सात वाजता जाग आली. परिणामी, दर्शन न करता परत यावे लागले. 


जन्मासी येउनी पहा रे पंढरी
नाचा महाद्वारी देवापुढे || असं संतमंडळी वारंवार सांगत असुनही आपण लौकिक गोष्टींसाठी स्वार्थी लोकांपुढे नाक घासतो, परिस्थितीपुढे नाचतो. आणि शेवटी न्यायला गाडी आली की रिकाम्या हाताने परत जातो. हे टाळण्यासाठी वरील वचन आचरणात आणणे अनिवार्य आहे. 

विनोबा भावे म्हणत, ‘साधकाने देहाच्या मृत्यूपूर्वीचे मरण एकदा मरून पाहावे.तुकोबादेखील अभंगातून म्हणत की, मी माझ्या मृत्यूचा अनुपम्य सोहळा पहिला!
माणगंगेच्या काठी भलं, गांव वसलं हे गोंदवलं |
रूप अनुपम्य हे अवतरलं, चालतं बोलतं ब्रम्ह इथे आलं || 
हे परब्रम्हाचे चैतन्य अनुभवायचे असेल तर "गोंदावले वास" जरूर करावा, पण तिथे गेल्यावर "रामनामी श्वास" घ्यावा हे महत्वाचे आहे. आणि रामनामी श्वास घेण्यासाठी लौकिकाचा ध्यास सुटणे ही अट आहे. हा लौकिकाचा ध्यास सुटणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे होय.

लौकिकाचा ध्यास सुटण्याची महत्वाची खुण म्हणजे मीपणामरून जाणे. माझे घर, माझी गाडी, माझी नोकरी, माझा पैसा, माझे कुटुंबीय, माझी प्रतिष्ठा या सर्व ममत्वाचा, देहबुद्धीचा कायमचा त्याग कसा करावा, हे सदगुरूंकडून शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!

माझ्या मनाला आवडेल तसं घडावं, मनाला बोचेल, त्रास होईल असं घडू नये असा मनाच्या आहारी गेलेला देह अविनाशी अखंड सुखाचा अनुभव कधीच घेऊ शकत नाही. त्या अद्वितीय अनुभवासाठी आसक्त मनाला जाळणे जरूर आहे. मन माझे मरोनी गेले l मज केले अमर || ही संतांची दिव्यानुभूती आपल्यालादेखील येण्यासाठी हट्टी, दुराग्रही मन पूर्णपणे नाहीसे करणे म्हणजे आसक्तीच्या मृत्यूचा उत्सव करणे होय.

साधू, संत, योगी, मुनी यांना याचे पूर्ण ज्ञान असते की या भौतिक जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देहबुद्धीचा मृत्यु असते. मृत्यु हे समाधीसुखाचे साधन आहे. खरे पहिले असता मृत्यु हे मोक्षप्राप्तीचे पहिले पाउल आहे. मृत्यु ही एक अशी तपस्या आहे की तिला कोणताही काम, कोणतीही अप्सरा, कोणताही मोह, कोणताही विकार विचलित किंवा भंग करू शकत नाही. कारण मृत्यु ही अशी सर्वश्रेष्ठ मोहिनी आहे की जिच्या अधीन झालेला मनुष्य भगवत्चरणी लीन झाल्यामुळे त्याला स्वर्गसुखादी मोहाकडे बघावे सुध्दा वाटत नाही.

ब्रम्हज्ञानी, भगवद्भक्त किंवा अधिकारी संत या मृत्युचे महत्व ओळखून तिच्यापासून पळण्याचा प्रयत्न न करता आनंदाने तिला आपल्याजवळ बोलावत असतात. आणि याहीनंतर देहाच्या पातळीवर जगत्कार्य पूर्ण झाल्यावर महात्मे दैहिक मृत्युला आलिंगन देऊन लौकिक कार्यापासून स्वेच्छेने निवृत्त होतात.

देहबुद्धी नेणो काही, दास अंकित रामापायी | यांत समर्थांनी देहबुद्धीचे, ममत्वाचे मरण झाल्यानंतर दास्यत्व आणि शरणागती ही अवस्था अनुभवता येते, हा स्वानुभव सांगितला आहे. सद्गुरु किंवा भगवंत कृपा करतो म्हणजे काय तर आपलं सर्वकाही काढून घेतो. असं सर्वकाही समर्पित करण्याची कुणाची तयारी आहे? कुणी वस्तुत, कुणी व्यक्तीत, कुणी प्रतिष्ठेत, प्रसिद्धीत तर कुणी सिद्धीत अडकला आहे. ही सगळी आस सोडून सेवाभावाने प्रपंच करायला शिकणे म्हणजे मृत्यूचा उत्सव शिकणे!

दीन ब्रम्हानंद प्रार्थितसे भावे, मन लय व्हावे रामरूपी | यामध्ये पू. ब्रम्हानंद महाराजांनी आपल्या सद्गुरुंकडे विकारी मनाच्या मृत्युचे साकडे घातले आहे. कारण आधी मरण, मग शरण आणि शेवटी स्मरण!

ज्याला खरा साधक व्हायचे आहे त्याने एक महत्त्वाचा अध्यात्मसिद्धांत ध्यानांत घ्यावा की, जोपर्यंत देहबुद्धीचे मरण साधणार नाही, तोपर्यंत खरी शरणागती नाही; आणि खऱ्या शरणागतीशिवाय खरे नामस्मरण नाहीच!

एका जनार्दनी शरण, करी माहेराची आठवण || यामध्ये नाथांनी स्पष्टपणे आठवण म्हणजे स्मरणाप्रत जाण्याचा अटळ टप्पा सांगितला आहे. स्मरणाअगोदर शरण सोहळा; आणि शरणागतीसाठी मीपणाचा मरणसोहळा!
स्मरण = मरणोत्तर शरण
आता आपल्यासारख्या विषयप्रपंचात पुरता अडकलेल्या माणसाला जर देहबुद्धीचे मरण साधता येत नसेल तर आपण तिला बेशुध्द तरी केले पाहिजे. ही बेशुद्धी म्हणजे किमान नामाला बसण्याअगोदर काही काळाकरिता आपल्या देहाचे विचार आणि देहासंबंधीच्या व्यक्ती, वस्तूंचे विचार सोडून देणे. हे साधले नाही तर शरण जाता येणार नाही. आणि शरणागतीशिवाय घेतलेले नाम हे नामोच्चारण ठरते, नामस्मरण नाही.
वर सांगितलेली लौकिक बेशुद्धी दिवसभरातून जेवढा जास्त वेळ साधता येईल, तेवढा वेळ आपल्याला नामस्मरण साधेल.

काही साधकांनी मागे एकदोन वेळा विचारले होते की, ‘एखाद्या वेळी नामस्मरण झाल्यावर किंवा नाम घेतांना आत्यंतिक आनंदाने मन भरून येतं, कंठ सद्गदित होतो. पण असं नेहमी होत नाही, कारण काय?’
याचं कारण हेच की ज्या ज्या वेळी आपण देहबुद्धीला बेशुध्द करून नाम घेतलं त्या त्या वेळी त्या नामाला शरणागतीची जोड मिळाली. परिणामी ते खरं नामस्मरण झालं. आणि खऱ्या नामस्मरणाची फलश्रुती म्हणजे प्रेमाश्रू!

संत, सत्पुरुषांना नाम आठविता सद्गदित कंठ हा अनुभव सतत येत असतो, याचे कारण त्यांनी त्यांच्या देहबुद्धीला आपल्यासारखं तात्पुरतं बेशुध्द केलेले नसून तिचे मरण साधलेले असते. आपल्याला या अनुभवाप्रत पोचण्यासाठी अगोदर देहबुद्धीला मधूनमधून बेशुध्द करून शेवटी तिचा मरणसोहळा साधावा लागेल. मी पण माझे नेले हिरोनिया ।' अशा अवस्थेपर्यंत जाण्याची सुरुवात आपली वस्तू, व्यक्ती, पदार्थ आणि मान, लौकिकाची हौस याला सोडण्यानेच होणार. अन्यथा देहाचा मरणसोहळा होईल, पण मीपण मात्र वासनेच्यारूपाने जिवंतच राहील. याची चाड बाळगून आपण सदगुरूंकडून हा मरणोत्सव शिकण्याचा मनापासूनआचरणात्मक प्रयत्न करूया! 
मरणा भीणे भीती जीव । - बद्ध मनुष्य
आम्हा मरण्याचा उत्सव ।। - सिद्ध महात्मा
कधी मरु कधी मरु। कधी देहाते विसरू ।। - उत्कंठा लागलेला मुमुक्षु



🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Sunday, July 8, 2018

काकड आरती ब्रम्हचैतन्यनाथा ||

🌹🌿🌹 चिंतन ही तुझी सेवा 🌹🌿🌹

श्रीराम!
रामरायाच्या इच्छेने आणि श्रीमहाराजांच्या सत्तेने श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथे सद्गुरूचरणी आज घडलेली प्रवचन सेवा:

चिंतन विषय -

काकड आरती ब्रम्हचैतन्यनाथा, स्वामी चैतन्यनाथा ।
पूर्णानंदे सद्गुरुचरणी, प्रेमानंदे सद्गुरुचरणी ठेविला माथा ।। धृ ।।

सत्व, रज, तमोगुणाचा काकडा केला ।
माया, ममता, स्नेहामाजी समूळ भिजविला ।।१।।

नित्य ज्ञानानंद ज्योती लावूनिया त्याला ।
सप्रेमे आरती करू स्वयंप्रकाशाला ।। २ ।।

सबाह्य अभ्यंतरी स्वरूप पाहुनिया रंगला ।
श्रीरामी आराम जपे नाम मंगला ।। ३ ।।

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

Wednesday, June 20, 2018

सध्या परीक्षा सुरु आहे!



🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷

तुकामाई माझ्या गुरूंची माऊली 
अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली 

श्रीराम!
भगवंत हा करुणासिंधु आहे असे आपण म्हणतो. परंतु, समुद्र हा कितीही मोठा असला तरी त्याला मर्यादा असते. समुद्रापेक्षा विशाल आणि सर्वव्यापक आकाश असते. भगवंताच्या करुणेपेक्षा व्यापक संतांची करुणा असते. ‘तुका झाला आकाशाएवढा’ अशी संतांची करुणा असते. अशा संतांचे आणि समर्थ सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत, याची आपल्याला कल्पना येणे कठीण आहे. आपल्या परंपरेचा विचार केला तर आपल्या सद्गुरुंपेक्षा त्यांच्या सद्गुरूंचे तुकामाईचे यांचा आपल्यावर एक विशेष उपकार आहे. आपल्याला तो उपकार वाटत नाही हा आपला दोष आहे. हा विशेष उपकार चिंतनाच्या शेवटपर्यंत कळून जाईल.

उपकाराच्या तीन तऱ्हा आहेत; प्रतीउपकार, परोपकार आणि उपकार!
व्यवहारी मनुष्य मला कुणी मदत केली म्हणून मीपण त्याला करायला पाहिजे असे वागतो म्हणजे प्रतीउपकार करतो; भगवंत आपण त्याला मदत केली म्हणून तो आपल्याला सांभाळतो असं नाही, पण सदाचरण राखले तर आपल्यावर तो परोपकार करतो. संत किंवा सद्गुरूंचे तसे नसते. आपल्यासारखे बद्ध विषयात बुडालेले त्यांना बघवत नाही आणि आपलं कल्याण व्हावं याच तळमळीने आपल्याला सतत निरनिराळ्या निमित्ताने सन्मार्ग दाखवत असतात. हा संतांचा निरपेक्ष, निःस्वार्थ उपकार आहे.
असे अनंत उपकार करणारे सद्गुरु लाभूनही आपण त्यांच्यावर प्रतीउपकार तर करूच शकत नाही. मात्र आपला अहं प्रबळ करून आपण त्यांच्यावर अपकार मात्र रात्रंदिवस करत असतो. माझे सद्गुरु माझ्यासाठी सर्व काही आहेत, असं म्हणणारा अनेकदा घरातील आपल्या लाडक्या व्यक्तीला जरासा ताप आला तरी त्याला उपासनेला जाववत नाही की नामाला बसवत नाही. वस्तू, व्यक्तीमध्ये आसक्त असलेला मनुष्य वाणीने जरी गुरुः साक्षात परब्रम्ह म्हणत असेल तरी सद्गुरूंच्या तुलनेत नेमकं घरच्या मंडळींना प्राधान्य देतांना दिसतो. बरं याहीपुढे जाऊन आपलं घरच्यांवरदेखील खरं प्रेम नाही असं दिसतं. घरातील मंडळींवर तथाकथित प्रेम असूनही त्यांनी काही कमीजास्त बोललं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला ते सहन होत नाही. याचा अर्थ माझं सद्गुरुंपेक्षा माझ्या लौकिक माणसांवर आणि त्या माणसांपेक्षा माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे. यालाच अहंपणा म्हणतात. आणि संतांचा उपकार याच ठिकाणी भगवंताच्या परोपकारापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

कसं ते पहा: आपण कसंही वागलो तरी आपल्या घरच्या लोकांनी आपल्याशी चांगलंच वागावं ही आपली सुप्त अपेक्षा असते. आणि तसं झालं नाही तर आपला अहं दुखावतो. समोरच्या व्यक्तीचा अहं किती मजबूत आहे हे त्याची चूक नसतांना त्याचा अपमान, निंदा केल्यावर खऱ्या अर्थाने दिसून येते. तुकामाईंनी त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांचा विनाकारण अपमान, शिवीगाळ करून त्यांच्या अहंची खोली आणि व्यापकता तपासली. जे त्यात अनुत्तीर्ण झाले, त्यांचा बद्ध जीव म्हणून धिक्कार केला. परंतु, गणूसारखा एक समर्पित मुलगा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच्यातील ब्रम्हतत्व चेतन करून त्याला “ब्रम्हचैतन्य” म्हणून गौरविले. गणुबुवा हे मुळातच परब्रम्हाचं चेतन रूप होतं. तरीसुद्धा मुमुक्षू म्हणून आलेल्याला साधक आणि शिष्य बनण्यासाठी सर्वप्रथम निरहंकारी बनणे जरूर आहे. याचा धडा तुम्हाआम्हाला देण्यासाठी तुकामाईंनी गणू कितीही मनोभावे आज्ञापालन करत असला तरी त्याच्याशी विक्षिप्त वागले.

तुम्ही आम्ही आपल्या सद्गुरुंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेल्यावर सद्गुरूंनी आपल्याशी असे मानहानीकारक वागले असते तर आपण म्हटलो असतो, ‘त्यांचा अनुग्रह त्यांच्याजवळ. ज्यांना सर्व जगत भगवद्स्वरूप आहे हे न कळता दुसऱ्याचा असा अकारण अपमान करावासा वाटतो, तो कसला सद्गुरु!’

आपल्याला जर असं वाटत असेल की ‘खरंच आपल्या सद्गुरूंनी आपली अशी कोणतीही परीक्षा बघितली नाही!’ तर ते चूक आहे. आपल्यालादेखील तुकामाईच्या या परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. किंबहुना सध्या परीक्षा सुरु आहे.
तुकामाई आपल्या विक्षिप्त वागण्यातून अगोदर समोरच्या व्यक्तीचा मीपणा जाळून टाकतात आणि मग पूर्ण कृपा करतात. भगवद्प्राप्तीची खरी तळमळ असलेल्याने आपल्या घरातील, बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या सकारण अकारण अपमान, निंदा, द्वेषयुक्त वागण्याला सहन करून आपला अहं हळूहळू नामशेष करणे अनिवार्य आहे, हा सुबोध तुकामाईंनी आपल्या विक्षिप्त वागण्यातून दिला.
अहं जाळण्याचे कार्य भगवंताच्या हातात नाही. “अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः  असं पवित्र अभिवचन देणाऱ्या भगवंताच्या मुखातदेखील अहं आहे. परंतु, सद्गुरु ‘रामराया कल्याण करील बरं बाळ!’ असं म्हणतात आणि मानतात. तेंव्हा अहंकृती, अभिमान जाळण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि अहंकृती जाळणे, हाच सद्गुरूंचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे.

आपला अहंकार दहादिशांनी पसरलेला आहे. असा दशाननी अहंकार जाळण्यासाठी आपल्याला अंतःकरणात तितिक्षा आणि मुखात भगवंताचे नाम ठेवून सदाचरण राखावे लागेल. जेंव्हा जेंव्हा आपलं काहीही चुकलं नसतांना आपल्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईकाकडून, किंवा समाजातून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे, तेंव्हा उद्विग्न न होता तुकामाईंच्या इच्छेने श्रीमहाराज आपल्यातील अहं जाळण्याचे काम करत आहेत, हे ध्यानांत ठेवावे. असं लक्षात ठेवलं तरच मनाचा त्रागा न होता नामाला, उपासनेला बसलो की अनुसंधान टिकण्यास मदत होईल. आपल्याला मानसिक इ. क्लेश देणारी घरातील, बाहेरील मंडळी स्वतः हे करत नसून खऱ्या अनुग्रहासाठी तुकामाई त्यांच्या निमित्ताने आपली परीक्षा घेत आहेत, हा भाव दृढ करावा.
या सावधानतेने आपण व्यवहार आणि साधना चालू ठेवली तर आपले सद्गुरु आणि त्यांचे सद्गुरु दोघांचा कृपाशीर्वाद लाभून आपला शेवटचा श्वास पुण्यतिथी होईल!

नमन माझे येहळेगावी गुरू तुकामाईला 


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏