🌹
🌷
" नामप्रेमचिंतन "
🌹
🌷
शंका : परमार्थातील स्वप्नं, साक्षात्कार, अनुभव हे कितपत खरे मानावे?
श्रीराम!
श्रीमहाराज म्हणत की अनुभवांच्या पाठीमागे लागू नये. साधनेतील सर्वात मोठा आणि एकमेव अनुभव म्हणजे निःस्वार्थपणे भगवंताच्या अखंड स्मरणात राहण्याची आवड निर्माण होणे. इतर सर्व अनुभव, दृष्टांत हे बऱ्याचदा साधनेला पूरक न ठरता मारक ठरत असतात.
श्रीमहाराज म्हणत की अनुभवांच्या पाठीमागे लागू नये. साधनेतील सर्वात मोठा आणि एकमेव अनुभव म्हणजे निःस्वार्थपणे भगवंताच्या अखंड स्मरणात राहण्याची आवड निर्माण होणे. इतर सर्व अनुभव, दृष्टांत हे बऱ्याचदा साधनेला पूरक न ठरता मारक ठरत असतात.
महाराजांची क्षमा मागून आपल्या स्वप्नाचा मी व्यक्तीशः असा अर्थ लावेन की, हरिकडे मनाने पाठ करून केवळ तोंडाने हरिपाठ म्हणणाऱ्याकडे हरि पाठ फिरवतो. गीता पाठ आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु, गीता वाचून अर्जुनत्व सिद्ध होत नसून गीता आचरून सिद्ध होते, हा नियम ध्यानांत घेणे जरूर आहे.
स्वप्नांत सद्गुरूंनी दर्शन दिले किंवा एखाद्यावेळी उपासनेत भगवद्प्रेमाने डोळ्यात आनंदाश्रू आले म्हणजे आपले शिष्यत्व सिद्ध झाले असे नाही. मला महाराजांनी किती सांभाळले आहे, महाराज मिळाले यासारखा आनंद नाही, नामात राहण्यासारखे सुख नाही अशा प्रकारच्या भावोत्पत्तीमुळे डोळे खरंच भरून आले, ह्रदय खरंच सद्गदित झाले असेल तर त्या क्षणानंतर देहात प्राण असेपर्यंत ‘कसलीही’ काळजी आणि ‘कसलीही’ इच्छा उरली नाही असे होते का? जर असं होत नसेल तर आनंदाश्रू, सद्गदित कंठ हे भक्तीयुक्त भाव नसून तो केवळ आणि केवळ भ्रम आहे.
काल मंदिरात महाराजांच्या पादुका बघून, भजन म्हणतांना मी देहभान हरपलो होतो आणि आज सकाळी उठायला उशीर झाल्याने पाणी भरता आले नाही, आता पाण्याची टंचाई या कारणाने जर मी थोडाही व्यथित होत असेल तर कालचं देहभान हरपणं हे स्मृतीभ्रंशाचा परिणाम समजावा. आणि तरीही मी याला महाराजांचा दिव्यानुभव किंवा साक्षात्कार समजत असेल तर पारमार्थिक दृष्टीने हा आत्मघात ठरेल.
परमार्थाचा पहिला सोपान, अधिष्ठान म्हणजे संदेहमुक्ति; तर परमार्थाचा अंतिम सोपान, कळस म्हणजे देहमुक्ती. देहमुक्ति होण्यासाठी अगोदर संदेहमुक्ति झाली पाहिजे. संदेहमुक्तिमध्ये निर्भयता आणि समर्पणभाव येतो. आपल्याला आपल्या सद्गुरूंचा, भगवंताचा जो काही तथाकथित अनुभव, साक्षात्कार किंवा दृष्टांत झाला आहे असे आपण म्हणतो, त्यानंतर जर आपण ‘सर्वार्थाने’ निर्भय आणि समर्पित झालेलो असू तर तो खरा अनुभव, तो खरा साक्षात्कार; नसता तो केवळ आभास!
जगाला उपदेश देण्याचा मला अधिकार नाही. परंतु, मी माझ्या साधनेबद्दल विचार करतो तेंव्हा मला असे वाटते की माझा व्यवहार, माझा प्रपंच हा माझ्या परमार्थाचा आरसा आहे. मी प्रपंचात, व्यवहारात, समाजात माझ्या आचरणात काय आहे, याला मी महत्व देतो. नामाचा फार लळा लागला आहे असं म्हणणारा मी जर फेसबुकवर अनावश्यक पोस्ट्स आणि फोटो इ. टाकून लोकांच्या प्रतिक्रियांना लाचावलेलो असेल तर याला भगवद्भक्ती कसे म्हणता येईल. मला महाराजांशिवाय दुसरं काही सुचतच नाही हो, असं म्हणणारा मी आणखी एक गाडी किंवा प्लॉट कसा घेता येईल किंवा आणखी जास्त पैसा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या विचारात असेल तर याला अनुसंधानाचं लेबल कसं काय लावता येईल?
माझी महाराजांवर निष्ठा आहे किंवा मला नामाची गोडी लागली आहे याची प्रचिती किंवा एकमात्र अनुभव म्हणजे “विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे जन धन माता पिता ।।”
नामदेव महाराज विठ्ठलाशी भांडत; जनाबाई तर भगवंताला शिव्या देत होती: अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या; तुझं गेलं मढं, तुला बघून काळ रडं, काळतोंड्या...... जनाबाई असं बोलायची मग मीही शिव्या देणार. तू जनाबाई झाली आहेस का? गजानन महाराज धुम्रपान करत होते, मग मी केले तर काय हरकत आहे? तू गजानन महाराज झाला आहेस का? उकीरड्यावरच्या उष्ट्या पत्रावळीवरचं खरकटं खाण्याची तयारी आहे का? असेल तर मग खुशाल विडी ओढ.
पू. बाबा बेलसरेंच्या नात्यातील एक वयस्कर महिला ओंकाराचा जप करीत. तर जेवायला बसल्या की ‘ये रे मेल्या ओंक्या’ असं म्हणून मग जेवत. यामागे त्यांचा भाव हा होता की प्रत्येक कर्म भगवंताच्या अनुसंधानात घडावं. सर्वसंगपरित्याग करून आपले प्रत्येक कर्म निरपेक्षपणे भगवंताला समर्पित अशी त्यांची दिनचर्या होती. तेंव्हा, संत भगवंताला कोणत्या नावाने हाक मारतात, भगवंताशी कोणतं नातं जोडतात ते आपणही जोडण्याअगोदर आपल्यातील संतत्व सिद्ध करावं. मला अजूनही पैसा, नोकरी, तब्येत, नातेवाईक, मान यांत कमीजास्त झालं तरी उद्विग्नता येत असेल तर आपण सद्गुरूंच्या पायाशी येण्याचा अगोदर प्रयत्न करावा. ते साधल्यावर मगच सद्गुरु माझी आई आहे, मी त्यांच्या मांडीवर बसणार किंवा भगवंताला मी माझं लेकरू समजते मी त्याला माझ्या मांडीवर घेऊन लाड करणार असं म्हणण्याचं आणि तसं वागण्याचं धारिष्ट्य करावं!
आपल्याला येणारे अनुभव, साक्षात्कार किंवा दृष्टांत यांतून गीतेच्या तेराव्या अध्यायात भगवंताने सत्पुरुषाची वीस लक्षणे सांगितली आहेत, त्यापैकी एकतरी सद्गुण माझ्या वृत्तीत स्थिरावला आहे का हे बघावे. त्या वीस सद्गुणांवर दोन वर्षांपूर्वी आपल्या ग्रुपमध्ये वीस दिवस चिंतन झाले. त्याचे सार असे सांगेन की, ज्या अनुभवाने माझ्या लौकिक जीवनात सदाचरणाच्या अंगाने कायमचा सुयोग्य बदल होईल, तोच अनुभव, तोच दृष्टांत खरा. याच संदर्भात आपण सुरुवातीला बघितले की प्रपंच हा परमार्थाचा आरसा आहे. माझी पारमार्थिक वाटचाल बरोबर चालू आहे की नाही हे आपण आपल्या व्यावहारिक जीवनातील स्थिर बुद्धी आणि शांत मनावरून ध्यानांत घ्यावे. स्थिरधी आणि प्रशांत मन ही परिणती असलेला अनुभव खरा!


No comments:
Post a Comment