Wednesday, June 20, 2018

सध्या परीक्षा सुरु आहे!



🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷

तुकामाई माझ्या गुरूंची माऊली 
अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली 

श्रीराम!
भगवंत हा करुणासिंधु आहे असे आपण म्हणतो. परंतु, समुद्र हा कितीही मोठा असला तरी त्याला मर्यादा असते. समुद्रापेक्षा विशाल आणि सर्वव्यापक आकाश असते. भगवंताच्या करुणेपेक्षा व्यापक संतांची करुणा असते. ‘तुका झाला आकाशाएवढा’ अशी संतांची करुणा असते. अशा संतांचे आणि समर्थ सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत, याची आपल्याला कल्पना येणे कठीण आहे. आपल्या परंपरेचा विचार केला तर आपल्या सद्गुरुंपेक्षा त्यांच्या सद्गुरूंचे तुकामाईचे यांचा आपल्यावर एक विशेष उपकार आहे. आपल्याला तो उपकार वाटत नाही हा आपला दोष आहे. हा विशेष उपकार चिंतनाच्या शेवटपर्यंत कळून जाईल.

उपकाराच्या तीन तऱ्हा आहेत; प्रतीउपकार, परोपकार आणि उपकार!
व्यवहारी मनुष्य मला कुणी मदत केली म्हणून मीपण त्याला करायला पाहिजे असे वागतो म्हणजे प्रतीउपकार करतो; भगवंत आपण त्याला मदत केली म्हणून तो आपल्याला सांभाळतो असं नाही, पण सदाचरण राखले तर आपल्यावर तो परोपकार करतो. संत किंवा सद्गुरूंचे तसे नसते. आपल्यासारखे बद्ध विषयात बुडालेले त्यांना बघवत नाही आणि आपलं कल्याण व्हावं याच तळमळीने आपल्याला सतत निरनिराळ्या निमित्ताने सन्मार्ग दाखवत असतात. हा संतांचा निरपेक्ष, निःस्वार्थ उपकार आहे.
असे अनंत उपकार करणारे सद्गुरु लाभूनही आपण त्यांच्यावर प्रतीउपकार तर करूच शकत नाही. मात्र आपला अहं प्रबळ करून आपण त्यांच्यावर अपकार मात्र रात्रंदिवस करत असतो. माझे सद्गुरु माझ्यासाठी सर्व काही आहेत, असं म्हणणारा अनेकदा घरातील आपल्या लाडक्या व्यक्तीला जरासा ताप आला तरी त्याला उपासनेला जाववत नाही की नामाला बसवत नाही. वस्तू, व्यक्तीमध्ये आसक्त असलेला मनुष्य वाणीने जरी गुरुः साक्षात परब्रम्ह म्हणत असेल तरी सद्गुरूंच्या तुलनेत नेमकं घरच्या मंडळींना प्राधान्य देतांना दिसतो. बरं याहीपुढे जाऊन आपलं घरच्यांवरदेखील खरं प्रेम नाही असं दिसतं. घरातील मंडळींवर तथाकथित प्रेम असूनही त्यांनी काही कमीजास्त बोललं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला ते सहन होत नाही. याचा अर्थ माझं सद्गुरुंपेक्षा माझ्या लौकिक माणसांवर आणि त्या माणसांपेक्षा माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे. यालाच अहंपणा म्हणतात. आणि संतांचा उपकार याच ठिकाणी भगवंताच्या परोपकारापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

कसं ते पहा: आपण कसंही वागलो तरी आपल्या घरच्या लोकांनी आपल्याशी चांगलंच वागावं ही आपली सुप्त अपेक्षा असते. आणि तसं झालं नाही तर आपला अहं दुखावतो. समोरच्या व्यक्तीचा अहं किती मजबूत आहे हे त्याची चूक नसतांना त्याचा अपमान, निंदा केल्यावर खऱ्या अर्थाने दिसून येते. तुकामाईंनी त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांचा विनाकारण अपमान, शिवीगाळ करून त्यांच्या अहंची खोली आणि व्यापकता तपासली. जे त्यात अनुत्तीर्ण झाले, त्यांचा बद्ध जीव म्हणून धिक्कार केला. परंतु, गणूसारखा एक समर्पित मुलगा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच्यातील ब्रम्हतत्व चेतन करून त्याला “ब्रम्हचैतन्य” म्हणून गौरविले. गणुबुवा हे मुळातच परब्रम्हाचं चेतन रूप होतं. तरीसुद्धा मुमुक्षू म्हणून आलेल्याला साधक आणि शिष्य बनण्यासाठी सर्वप्रथम निरहंकारी बनणे जरूर आहे. याचा धडा तुम्हाआम्हाला देण्यासाठी तुकामाईंनी गणू कितीही मनोभावे आज्ञापालन करत असला तरी त्याच्याशी विक्षिप्त वागले.

तुम्ही आम्ही आपल्या सद्गुरुंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेल्यावर सद्गुरूंनी आपल्याशी असे मानहानीकारक वागले असते तर आपण म्हटलो असतो, ‘त्यांचा अनुग्रह त्यांच्याजवळ. ज्यांना सर्व जगत भगवद्स्वरूप आहे हे न कळता दुसऱ्याचा असा अकारण अपमान करावासा वाटतो, तो कसला सद्गुरु!’

आपल्याला जर असं वाटत असेल की ‘खरंच आपल्या सद्गुरूंनी आपली अशी कोणतीही परीक्षा बघितली नाही!’ तर ते चूक आहे. आपल्यालादेखील तुकामाईच्या या परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. किंबहुना सध्या परीक्षा सुरु आहे.
तुकामाई आपल्या विक्षिप्त वागण्यातून अगोदर समोरच्या व्यक्तीचा मीपणा जाळून टाकतात आणि मग पूर्ण कृपा करतात. भगवद्प्राप्तीची खरी तळमळ असलेल्याने आपल्या घरातील, बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या सकारण अकारण अपमान, निंदा, द्वेषयुक्त वागण्याला सहन करून आपला अहं हळूहळू नामशेष करणे अनिवार्य आहे, हा सुबोध तुकामाईंनी आपल्या विक्षिप्त वागण्यातून दिला.
अहं जाळण्याचे कार्य भगवंताच्या हातात नाही. “अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः  असं पवित्र अभिवचन देणाऱ्या भगवंताच्या मुखातदेखील अहं आहे. परंतु, सद्गुरु ‘रामराया कल्याण करील बरं बाळ!’ असं म्हणतात आणि मानतात. तेंव्हा अहंकृती, अभिमान जाळण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि अहंकृती जाळणे, हाच सद्गुरूंचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे.

आपला अहंकार दहादिशांनी पसरलेला आहे. असा दशाननी अहंकार जाळण्यासाठी आपल्याला अंतःकरणात तितिक्षा आणि मुखात भगवंताचे नाम ठेवून सदाचरण राखावे लागेल. जेंव्हा जेंव्हा आपलं काहीही चुकलं नसतांना आपल्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईकाकडून, किंवा समाजातून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे, तेंव्हा उद्विग्न न होता तुकामाईंच्या इच्छेने श्रीमहाराज आपल्यातील अहं जाळण्याचे काम करत आहेत, हे ध्यानांत ठेवावे. असं लक्षात ठेवलं तरच मनाचा त्रागा न होता नामाला, उपासनेला बसलो की अनुसंधान टिकण्यास मदत होईल. आपल्याला मानसिक इ. क्लेश देणारी घरातील, बाहेरील मंडळी स्वतः हे करत नसून खऱ्या अनुग्रहासाठी तुकामाई त्यांच्या निमित्ताने आपली परीक्षा घेत आहेत, हा भाव दृढ करावा.
या सावधानतेने आपण व्यवहार आणि साधना चालू ठेवली तर आपले सद्गुरु आणि त्यांचे सद्गुरु दोघांचा कृपाशीर्वाद लाभून आपला शेवटचा श्वास पुण्यतिथी होईल!

नमन माझे येहळेगावी गुरू तुकामाईला 


🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏

Monday, June 18, 2018

साक्षात्कारी अनुभव!!!

🌹🌷 " नामप्रेमचिंतन " 🌹🌷



शंका : परमार्थातील स्वप्नं, साक्षात्कार, अनुभव हे कितपत खरे मानावे?

श्रीराम!
श्रीमहाराज म्हणत की अनुभवांच्या पाठीमागे लागू नये. साधनेतील सर्वात मोठा आणि एकमेव अनुभव म्हणजे निःस्वार्थपणे भगवंताच्या अखंड स्मरणात राहण्याची आवड निर्माण होणे. इतर सर्व अनुभव, दृष्टांत हे बऱ्याचदा साधनेला पूरक न ठरता मारक ठरत असतात.

महाराजांची क्षमा मागून आपल्या स्वप्नाचा मी व्यक्तीशः असा अर्थ लावेन की, हरिकडे मनाने पाठ करून केवळ तोंडाने हरिपाठ म्हणणाऱ्याकडे हरि पाठ फिरवतो. गीता पाठ आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु, गीता वाचून अर्जुनत्व सिद्ध होत नसून गीता आचरून सिद्ध होते, हा नियम ध्यानांत घेणे जरूर आहे.

स्वप्नांत सद्गुरूंनी दर्शन दिले किंवा एखाद्यावेळी उपासनेत भगवद्प्रेमाने डोळ्यात आनंदाश्रू आले म्हणजे आपले शिष्यत्व सिद्ध झाले असे नाही. मला महाराजांनी किती सांभाळले आहे, महाराज मिळाले यासारखा आनंद नाही, नामात राहण्यासारखे सुख नाही अशा प्रकारच्या भावोत्पत्तीमुळे डोळे खरंच भरून आले, ह्रदय खरंच सद्गदित झाले असेल तर त्या क्षणानंतर देहात प्राण असेपर्यंत ‘कसलीही’ काळजी आणि ‘कसलीही’ इच्छा उरली नाही असे होते का? जर असं होत नसेल तर आनंदाश्रू, सद्गदित कंठ हे भक्तीयुक्त भाव नसून तो केवळ आणि केवळ भ्रम आहे.

काल मंदिरात महाराजांच्या पादुका बघून, भजन म्हणतांना मी देहभान हरपलो होतो आणि आज सकाळी उठायला उशीर झाल्याने पाणी भरता आले नाही, आता पाण्याची टंचाई या कारणाने जर मी थोडाही व्यथित होत असेल तर कालचं देहभान हरपणं हे स्मृतीभ्रंशाचा परिणाम समजावा. आणि तरीही मी याला महाराजांचा दिव्यानुभव किंवा साक्षात्कार समजत असेल तर पारमार्थिक दृष्टीने हा आत्मघात ठरेल.

परमार्थाचा पहिला सोपान, अधिष्ठान म्हणजे संदेहमुक्ति; तर परमार्थाचा अंतिम सोपान, कळस म्हणजे देहमुक्ती. देहमुक्ति होण्यासाठी अगोदर संदेहमुक्ति झाली पाहिजे. संदेहमुक्तिमध्ये निर्भयता आणि समर्पणभाव येतो. आपल्याला आपल्या सद्गुरूंचा, भगवंताचा जो काही तथाकथित अनुभव, साक्षात्कार किंवा दृष्टांत झाला आहे असे आपण म्हणतो, त्यानंतर जर आपण ‘सर्वार्थाने’ निर्भय आणि समर्पित झालेलो असू तर तो खरा अनुभव, तो खरा साक्षात्कार; नसता तो केवळ आभास!

जगाला उपदेश देण्याचा मला अधिकार नाही. परंतु, मी माझ्या साधनेबद्दल विचार करतो तेंव्हा मला असे वाटते की माझा व्यवहार, माझा प्रपंच हा माझ्या परमार्थाचा आरसा आहे. मी प्रपंचात, व्यवहारात, समाजात माझ्या आचरणात काय आहे, याला मी महत्व देतो. नामाचा फार लळा लागला आहे असं म्हणणारा मी जर फेसबुकवर अनावश्यक पोस्ट्स आणि फोटो इ. टाकून लोकांच्या प्रतिक्रियांना लाचावलेलो असेल तर याला भगवद्भक्ती कसे म्हणता येईल. मला महाराजांशिवाय दुसरं काही सुचतच नाही हो, असं म्हणणारा मी आणखी एक गाडी किंवा प्लॉट कसा घेता येईल किंवा आणखी जास्त पैसा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या विचारात असेल तर याला अनुसंधानाचं लेबल कसं काय लावता येईल?

माझी महाराजांवर निष्ठा आहे किंवा मला नामाची गोडी लागली आहे याची प्रचिती किंवा एकमात्र अनुभव म्हणजे “विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे जन धन माता पिता ।।”
नामदेव महाराज विठ्ठलाशी भांडत; जनाबाई तर भगवंताला शिव्या देत होती: अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या; तुझं गेलं मढं, तुला बघून काळ रडं, काळतोंड्या...... जनाबाई असं बोलायची मग मीही शिव्या देणार. तू जनाबाई झाली आहेस का? गजानन महाराज धुम्रपान करत होते, मग मी केले तर काय हरकत आहे? तू गजानन महाराज झाला आहेस का? उकीरड्यावरच्या उष्ट्या पत्रावळीवरचं खरकटं खाण्याची तयारी आहे का? असेल तर मग खुशाल विडी ओढ.

पू. बाबा बेलसरेंच्या नात्यातील एक वयस्कर महिला ओंकाराचा जप करीत. तर जेवायला बसल्या की ‘ये रे मेल्या ओंक्या’ असं म्हणून मग जेवत. यामागे त्यांचा भाव हा होता की प्रत्येक कर्म भगवंताच्या अनुसंधानात घडावं. सर्वसंगपरित्याग करून आपले प्रत्येक कर्म निरपेक्षपणे भगवंताला समर्पित अशी त्यांची दिनचर्या होती. तेंव्हा, संत भगवंताला कोणत्या नावाने हाक मारतात, भगवंताशी कोणतं नातं जोडतात ते आपणही जोडण्याअगोदर आपल्यातील संतत्व सिद्ध करावं. मला अजूनही पैसा, नोकरी, तब्येत, नातेवाईक, मान यांत कमीजास्त झालं तरी उद्विग्नता येत असेल तर आपण सद्गुरूंच्या पायाशी येण्याचा अगोदर प्रयत्न करावा. ते साधल्यावर मगच सद्गुरु माझी आई आहे, मी त्यांच्या मांडीवर बसणार किंवा भगवंताला मी माझं लेकरू समजते मी त्याला माझ्या मांडीवर घेऊन लाड करणार असं म्हणण्याचं आणि तसं वागण्याचं धारिष्ट्य करावं!

आपल्याला येणारे अनुभव, साक्षात्कार किंवा दृष्टांत यांतून गीतेच्या तेराव्या अध्यायात भगवंताने सत्पुरुषाची वीस लक्षणे सांगितली आहेत, त्यापैकी एकतरी सद्गुण माझ्या वृत्तीत स्थिरावला आहे का हे बघावे. त्या वीस सद्गुणांवर दोन वर्षांपूर्वी आपल्या ग्रुपमध्ये वीस दिवस चिंतन झाले. त्याचे सार असे सांगेन की, ज्या अनुभवाने माझ्या लौकिक जीवनात सदाचरणाच्या अंगाने कायमचा सुयोग्य बदल होईल, तोच अनुभव, तोच दृष्टांत खरा. याच संदर्भात आपण सुरुवातीला बघितले की प्रपंच हा परमार्थाचा आरसा आहे. माझी पारमार्थिक वाटचाल बरोबर चालू आहे की नाही हे आपण आपल्या व्यावहारिक जीवनातील स्थिर बुद्धी आणि शांत मनावरून ध्यानांत घ्यावे. स्थिरधी आणि प्रशांत मन ही परिणती असलेला अनुभव खरा!

🙏  !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏