Saturday, March 18, 2023

"आणिक नका पडू गाबाळाचे भरी । तेथे आहे थोरी नागवण ।।"

शंका- "आणिक नका पडू गाबाळाचे भरी । तेथे आहे थोरी नागवण ।।" याचा अन्वयार्थ सांगाल का? ➡ श्रीराम! जगामध्ये तीन प्रकारची माणसे असतात. बहुतांश लोकांचा तमोगुण अतिशय प्रबळ असतो; त्यापेक्षा कमी लोकांचा रजोगुण प्रबळ असतो; तर फार कमी लोकांचा सत्वगुण प्रबळ असतो. आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे त्रिगुणातीत असलेला एक दुर्मिळ वर्ग असतो, ज्यांना आपण संत म्हणतो. ज्या सुखासाठी प्रत्येक जीव आसुसलेला असतो, त्या सुखाचे धनी केवळ आणि केवळ संतमहात्मेच असतात. त्यांना हे सुख मिळवण्यासाठी जे साधन करावे लागले त्यानंतर त्यांनी तुम्हाआम्हासाठी एक महत्वाचा धडा दिला. तो हा की अविनाशी सुख हवे असेल तर विनाशी गोष्टींच्या मागे लागू नका. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तर स्पष्टपणे, परखडपणे सांगितले: आणिक नका पडू गाबाळाचे भरी । ‘गाबाळ’ या एकाच शब्दात तुकाराम महाराज संसारातील सर्व त्याज्य वस्तूंचा उल्लेख करतात. गाबाळ म्हणजे घाण, गाबाळ म्हणजे कचरा. गाबाळ म्हणजे उकीर. आपण स्वतःचे सुंदर, प्रशस्त घर असावे यासाठी काबाडकष्ट करतो. अनेक वर्ष राबल्यानंतर आपण कमावलेला पैसा बिल्डरला देऊन घर खरेदी करतो. तेंव्हा जर त्या बिल्डरने आपल्याला घर म्हणून उकिरडा दिला तर आपण तिथे राहू का? याचे उत्तर स्वाभाविकपणे ‘नाही’ हेच असणार आहे. परंतु, आपण आयुष्यभरची कमाई देऊन उकिरड्यावरच राहत आहोत, याची आपल्याला जाणीव नाही. अनेक जन्मानंतर आपण कमावलेला लाखमोलाचा नरदेह आपण सुखी जीवनाच्या अपेक्षेने विकाररूपी बिल्डरकडे दिला आणि त्याने त्यामोबदल्यात आपल्याला तमोगुणांचा उकिरडा दिला. दुर्दैव हे की आपण त्या उकिरड्याला महाल समजून तिथे आनंदाने राहत आहोत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “आणिक नका पडू गाबाळाचे भरी ।” यातील ‘आणिक’ शब्द फार मार्मिक आहे. आणिक म्हणजे आणखी किंवा आता तरी. आता म्हणजे आजपर्यंतचे आयुष्य गाबाळाच्या कचाट्यात अडकण्यातच गेले आहे. त्यातून केवळ निराशा, दुःखच पदरी पडल्यावर आता तरी त्या घाणीत पडू नका, असा सल्ला तुकोबा देत आहेत. या संसारातील वस्तु, पदार्थ, संपत्ति, मान, प्रसिद्धी, स्वार्थाधिष्टित लोक या सर्वांनी मिळून जो एक मोठा ढीग तयार होतो, त्याबद्दल समर्थांना काय वाटते? तर, रामदास म्हणे अवघेची गाबाळी ।. मुक्ताबाईंना काय वाटते? तर उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।। याव्यतिरिक्त नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज सर्व संतांची प्रमाणं आपण बघितली तर लक्षात येईल की, भागवंतापासून दूर करणाऱ्या सर्व गोष्टींना संतांनी ‘गाबाळ’ म्हटले आहे. तुकोबांच्या गाथ्यामध्ये हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. एकूण काय तर अध्यात्मजगत भक्तिमार्गात अडसर ठरणाऱ्या गोष्टींमध्ये पडू नका असे वारंवार सांगत असते. थोडे बारकाईने चिंतन केले तर आपल्याला ध्यानात येईल की संतांनी संसारातील या वस्तूंना गाबाळ म्हटले नाही तर त्यात असलेल्या आसक्तीला गाबाळ अर्थात घाण म्हटले आहे. संसार गाबाळ नसून त्यातील सुखत्व बुद्धी, सत्यत्व बुद्धी आणि नित्यत्व बुद्धी ही गाबाळ आहे. तिचा त्याग करायचा आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की या गाबाळाच्या भरीस पडू नये, कारण तेथे आहे थोरी नागवण । संसारातील आसक्तीमध्ये आपल्या खऱ्या सुखाची थोरी म्हणजे कायमची नागवण आहे. जोपर्यंत नाशवंताला आपण आश्रय मानत राहू, तोपर्यंत अविनाशी भगवंत, अभंग समाधान कदापि मिळणार नाही. आजपर्यंतच्या वासनेच्या संस्कारांमुळे, विषयाच्या अखंड कुसंगामुळे आपल्या जीवनात अशांतीचा, अस्वस्थतेचा अंधकार पसरलेला आहे. तो अंधकार दूर होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत: सत्संगती आणि भगवंताचे अखंड अनुसंधान. हे लाभण्यासाठी अंतःकरणापासून प्रार्थना करूया, करी तिमिराचा नाश । दीप होऊनी प्रकाश । तोडी आशापाश । करी वास हृदयी ।। पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता । तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ।। अशी मनापासून विनवणी केली आणि सदाचरण व सदास्मरण राखले तर ‘याचि देहि, याचि डोळा, भोगीन मुक्तीचा सोहळा’ हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 🙏 !!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!! 🙏