🌷🌿🌷 "मुक्ताई चिंतन" 🌷🌿🌷
श्रीराम!
जन्माला येतांनाच जीवन्मुक्त असलेल्या अधिकारी भगवद्भक्त मुक्ताईची आज पुण्यतिथी. मुक्ताबाईच्या समग्र चरित्रातील दोन उच्चकोटीचे प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात मुक्ताईने भागवत संप्रदायातील दोन अत्यंत महानतम संतसत्पुरुषांना दिग्दर्शन केले आहे. त्यातील एक संत म्हणजे ज्ञानियांचा राजा असलेले ज्ञानेश्वर महाराज; तर दुसरे संत म्हणजे ज्यांच्या हाताने प्रत्यक्ष भगवंत जेवतो असे पंढरीरायाचे प्रेमभांडारी असलेले नामदेव महाराज! नामदेव महाराजांना केलेले उद्बोधन नंतर कधी बघूया. आज ज्ञानोबा-मुक्ताई हितगुज!
एखादा कीर्तनकार किंवा प्रवचनकार जेंव्हा अध्यात्मिक प्रबोधन करतो, तेंव्हा ते प्रबोधन, ते अध्यात्म चिंतन श्रोत्यांच्या मनाला भिडणारे आहे की नाही, याचा विचार त्या प्रबोधनकाराने करणे जरूर आहे. परंतु, ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण अध्यात्मिक उद्बोधन केल्यानंतर आणखी एक आढावा घेतात, जो आजच्या प्रत्येक पारमार्थिक वक्त्याने घ्यायला हवा. तो आढावा म्हणजे जे चिंतन मांडले आहे, ते श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनाला केवळ तेवढ्यापुरतेच भिडले आहे की त्यातून त्यांचे आचरण किंवा एकूणच साधन यांत सुयोग्य बदल होत आहे का?
ज्ञानोबांनी हा आढावा घेतल्यानंतर जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की लोक अध्यात्म ऐकत नाही आणि ऐकले तरी त्यातून अपेक्षित मनोमंथन घडत नाहीये, तेंव्हा त्यातून आलेल्या उद्विग्नतेची परिणती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला कोंडून घेतले. अशावेळी ज्ञानेश्वर महाराजांना शांत करण्याचे, त्यांना पुन्हा जगत्कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे अद्भुत कार्य ज्यांनी केले त्या संत मुक्ताबाई!
ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्या कोट्यानुकोटी बद्धांना माऊली बनून समजावून सांगितले, त्या ज्ञानीयांच्या राजाला समजावून सांगणाऱ्या मुक्ताईचा अधिकार काय असेल, याचा सूक्ष्म विचार करायला हवा.
ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये क्रोध, उद्वेग, अशांती यांना जिंकण्यासाठी अत्युच्च कोटीचे उद्बोधन केले, त्या ज्ञानोबांना जेंव्हा समाजाची अधोगती बघून जी बाह्यांगाने उद्विग्नता आली, तिला शांत करण्याचा अधिकार त्रिभुवनात केवळ आणि केवळ मुक्ताबाईचाच! प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज सद्गुरुरूपाने त्याठिकाणी उपस्थित असूनही लौकिक वय लहान असणाऱ्या मुक्ताबाई जेंव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समजावतात, तेंव्हा मुक्ताई कोणत्या पदावर असतील, हे समजले पाहिजे. मुक्ताबाईचे इतर अभंग आणि ताटीचे अभंग यातील भाषाशैलीत आणि अध्यात्मिक अधिष्ठानात फार अंतर आहे. इतर अभंगात भक्त म्हणून बोलणारी बाळबोध मुक्ताबाई ताटीच्या अभंगात एक अधिकारी मार्गदर्शक वाटते.
मानसशास्त्र शिकत असतांना एक गोष्ट अभ्यासात आली होती की स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत मानसिकदृष्टीने श्रेष्ठ आहे. मानसशास्त्र असं सांगतं की स्त्रीच्या शारीरिक वयात पाच मिळवले की तिचे मानसिक, भावनिक वय मिळते. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मुक्ताबाई देहदृष्ट्या ४ वर्षांनी लहान असली तरी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ती ज्ञानोबांपेक्षा एक वर्षाने मोठी आहे. या भावबलाच्या आधारावर तिने आदेशात्मक सूचना केली की, “ताटी उघडा ज्ञानेश्वरा!” कदाचित आपल्याला देहरुपाने मुक्ताबाईसारखी बहिण नसेल; पण आपल्या संपर्कात आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने किंवा पत्नीच्या रूपाने मुक्ताबाई आपल्याला दिग्दर्शन, मार्गदर्शन करत असते.
ताटी म्हणजे दरवाजा. त्याला कवाड असा देखील शब्द आहे. परंतु, कवाड दोन पटांचे असते; तर ताटी एक पटाची. आपण दोन पटांमध्ये म्हणजे द्वैतात कोंडलेलो आहोत, तर संत हे अद्वैतात स्थिर असतात. तुम्हा आम्हा आड द्वैताचे कवाड । हे ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासारख्या द्वैतात अडकलेल्या बद्धांना संबोधून म्हटले आहे; तर ताटी उघडा हे मुक्ताबाईने अद्वैताचा अनुभव पुरेपूर भरून उरलेल्या ज्ञानराजासारख्या सिद्ध सत्पुरुषाला संबोधून म्हटले आहे.
यांत एक अतिशय सूक्ष्म गोष्ट ध्यानांत घ्यावी की ताटी उघडणे मुक्ताईला शक्य होते, पण तिने आपल्या भावाला ती उघडायला सांगितले. यांत एका अंगाने बहिण म्हणून मर्यादा आहे; तर अध्यात्माच्या अंगाने विचार केला तर ताटी ज्याने लावली त्यानेच ती उघडली पाहिजे. कर्म हे बंधन आणि मुक्तीला कारण ठरते. ज्या कर्मामुळे आपण बंधनात आलो त्याच कर्माच्या आधाराने आपण मुक्त होऊ शकतो, असा सखोल बोध मुक्ताई देत आहे. आपला दरवाजा आपणच उघडायचा असतो. दुसऱ्याने ताटी उघडणे ही जबरदस्ती होऊ शकते. परमार्थात भगवंत, सद्गुरु, सद्ग्रंथ सर्वकाही मिळाले तरी स्वतः साधन केल्याशिवाय मुक्ति नाही, हे मर्म यांतून घेतले पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांना कार्यप्रवण करण्यासाठी मुक्ताबाईने मांडलेले चिंतन म्हणजे ताटीचे अभंग! मुक्ताबाईच्या एकेका शब्दात जबरदस्त सामर्थ्य आहे.
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा ।
विश्वरागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी ।
शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश ।
विश्वपट ब्रम्ह दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
तेंव्हा, मुक्ताबाईचे दिग्दर्शन लाभून आपण याच जन्मी मुक्त व्हावे वाटत असेल तर अगोदर तिने ज्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल. म्हणजेच सद्गुरु माझे कल्याणकर्ते आहेत, ही जाणीव ठेवून ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आणि नाम हाच देव आहे, या निष्ठेने नामात राहून नामदेव महाराजांची कृपा संपादन केली तरच मुक्ताबाई आपल्याला सच्चिदानंद स्वरुपाची ताटी उघडण्यासाठी प्रेरणा बनतील!
🙏 !!जानकी जीवन स्मरण जय जय राम!! 🙏