Monday, March 25, 2019

पू. तुकामाई चिंतन

🌸📿🌸 *"चिंतन ही तुझी सेवा"* 🌸🌿🌸

*तुकामाई माझ्या गुरूंची माऊली ।।*
*अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली ।।*

*श्रीराम!*
भगवंत हा करुणासिंधु आहे असे आपण म्हणतो. परंतु, समुद्र हा कितीही मोठा असला तरी त्याला मर्यादा असते. समुद्रापेक्षा विशाल आणि सर्वव्यापक आकाश असते. भगवंताच्या करुणेपेक्षा व्यापक संतांची करुणा असते. ‘तुका झाला आकाशाएवढा’ अशी संतांची करुणा असते. अशा संतांचे आणि समर्थ सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत, याची आपल्याला कल्पना येणे कठीण आहे. आपल्या परंपरेचा विचार केला तर आपल्या सद्गुरुंपेक्षा त्यांच्या सद्गुरूंचे तुकामाईचे यांचा आपल्यावर एक विशेष उपकार आहे. आपल्याला तो उपकार वाटत नाही हा आपला दोष आहे. हा विशेष उपकार चिंतनाच्या शेवटपर्यंत कळून जाईल.

*उपकाराच्या तीन तऱ्हा आहेत: प्रतीउपकार, परोपकार आणि उपकार!*

व्यवहारी मनुष्य मला कुणी मदत केली म्हणून मीपण त्याला करायला पाहिजे असे वागतो म्हणजे प्रतीउपकार करतो; भगवंत आपण त्याला मदत केली म्हणून तो आपल्याला सांभाळतो असं नाही, पण सदाचरण राखले तर आपल्यावर तो परोपकार करतो. संत किंवा सद्गुरूंचे तसे नसते. आपल्यासारखे बद्ध विषयात बुडालेले त्यांना बघवत नाही आणि आपलं कल्याण व्हावं याच तळमळीने आपल्याला सतत निरनिराळ्या निमित्ताने सन्मार्ग दाखवत असतात. हा संतांचा निरपेक्ष, निःस्वार्थ उपकार आहे.

असे अनंत उपकार करणारे सद्गुरु लाभूनही आपण त्यांच्यावर प्रतीउपकार तर करूच शकत नाही. मात्र आपला अहं प्रबळ करून आपण त्यांच्यावर अपकार मात्र रात्रंदिवस करत असतो. माझे सद्गुरु माझ्यासाठी सर्व काही आहेत, असं म्हणणारा अनेकदा घरातील आपल्या लाडक्या व्यक्तीला जरासा ताप आला तरी त्याला उपासनेला जाववत नाही की नामाला बसवत नाही. वस्तू, व्यक्तीमध्ये आसक्त असलेला मनुष्य वाणीने जरी गुरुः साक्षात परब्रम्ह म्हणत असेल तरी सद्गुरूंच्या तुलनेत नेमकं घरच्या मंडळींना प्राधान्य देतांना दिसतो. बरं याहीपुढे जाऊन आपलं घरच्यांवरदेखील खरं प्रेम नाही असं दिसतं. घरातील मंडळींवर तथाकथित प्रेम असूनही त्यांनी काही कमीजास्त बोललं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला ते सहन होत नाही. याचा अर्थ माझं सद्गुरुंपेक्षा माझ्या लौकिक माणसांवर आणि त्या माणसांपेक्षा माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे. यालाच अहंपणा म्हणतात. आणि संतांचा उपकार याच ठिकाणी भगवंताच्या परोपकारापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

कसं ते पहा: आपण कसंही वागलो तरी आपल्या घरच्या लोकांनी आपल्याशी चांगलंच वागावं ही आपली सुप्त अपेक्षा असते. आणि तसं झालं नाही तर आपला अहं दुखावतो. समोरच्या व्यक्तीचा अहं किती मजबूत आहे हे त्याची चूक नसतांना त्याचा अपमान, निंदा केल्यावर खऱ्या अर्थाने दिसून येते. तुकामाईंनी त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांचा विनाकारण अपमान, शिवीगाळ करून त्यांच्या अहंची खोली आणि व्यापकता तपासली. जे त्यात अनुत्तीर्ण झाले, त्यांचा बद्ध जीव म्हणून धिक्कार केला. परंतु, गणूसारखा एक समर्पित मुलगा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच्यातील ब्रम्हतत्व चेतन करून त्याला “ब्रम्हचैतन्य” म्हणून गौरविले. गणुबुवा हे मुळातच परब्रम्हाचं चेतन रूप होतं. तरीसुद्धा मुमुक्षू म्हणून आलेल्याला साधक आणि शिष्य बनण्यासाठी सर्वप्रथम निरहंकारी बनणे जरूर आहे. याचा धडा तुम्हाआम्हाला देण्यासाठी तुकामाईंनी गणू कितीही मनोभावे आज्ञापालन करत असला तरी त्याच्याशी विक्षिप्त वागले.

तुम्ही आम्ही आपल्या सद्गुरुंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेल्यावर सद्गुरूंनी आपल्याशी असे मानहानीकारक वागले असते तर आपण म्हटलो असतो, ‘त्यांचा अनुग्रह त्यांच्याजवळ. ज्यांना सर्व जगत भगवद्स्वरूप आहे हे न कळता दुसऱ्याचा असा अकारण अपमान करावासा वाटतो, तो कसला सद्गुरु!’

आपल्याला जर असं वाटत असेल की ‘खरंच, आपल्या सद्गुरूंनी आपली अशी कोणतीही परीक्षा बघितली नाही!’ तर ते चूक आहे. आपल्यालादेखील तुकामाईच्या या परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. किंबहुना सध्या परीक्षा सुरु आहे.

तुकामाई आपल्या विक्षिप्त वागण्यातून अगोदर समोरच्या व्यक्तीचा मीपणा जाळून टाकतात आणि मग पूर्ण कृपा करतात. भगवद्प्राप्तीची खरी तळमळ असलेल्याने आपल्या घरातील, बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या सकारण अकारण अपमान, निंदा, द्वेषयुक्त वागण्याला सहन करून आपला अहं हळूहळू नामशेष करणे अनिवार्य आहे, हा सुबोध तुकामाईंनी आपल्या विक्षिप्त वागण्यातून दिला.

अहं जाळण्याचे कार्य भगवंताच्या हातात नाही. “अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः” असं पवित्र अभिवचन देणाऱ्या भगवंताच्या मुखातदेखील अहं आहे. परंतु, सद्गुरु ‘रामराया कल्याण करील बरं बाळ!’ असं म्हणतात आणि मानतात. तेंव्हा अहंकृती, अभिमान जाळण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि अहंकृती जाळणे, हाच सद्गुरूंचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे.

आपला अहंकार दहादिशांनी पसरलेला आहे. असा दशाननी अहंकार जाळण्यासाठी आपल्याला अंतःकरणात तितिक्षा आणि मुखात भगवंताचे नाम ठेवून सदाचरण राखावे लागेल. जेंव्हा जेंव्हा आपलं काहीही चुकलं नसतांना आपल्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईकाकडून, किंवा समाजातून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे, तेंव्हा उद्विग्न न होता तुकामाईंच्या इच्छेने श्रीमहाराज आपल्यातील अहं जाळण्याचे काम करत आहेत, हे ध्यानांत ठेवावे. असं लक्षात ठेवलं तरच मनाचा त्रागा न होता नामाला, उपासनेला बसलो की अनुसंधान टिकण्यास मदत होईल. आपल्याला मानसिक इ. क्लेश देणारी घरातील, बाहेरील मंडळी स्वतः हे करत नसून खऱ्या अनुग्रहासाठी तुकामाई त्यांच्या निमित्ताने आपली परीक्षा घेत आहेत, हा भाव दृढ करावा. अशा अकल्पित पद्धतीने आपल्यातील अभिमान हा सर्वात मोठा शत्रु मारण्याची ही रचना म्हणजे तुकामाईंचा आपल्यावर विशेष उपकार आहे.

तेंव्हा, पूर्ण सावधानतेने आपण व्यवहार आणि साधना चालू ठेवली तर आपले सद्गुरु आणि त्यांचे सद्गुरु दोघांचा कृपाशीर्वाद लाभून आपला शेवटचा श्वास पुण्यतिथी होईल!
 
*।। नमन माझे येहळेगावी गुरूतुकामाईला ।।*

🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏