





शंका- आज श्री .प पु . आनंदसागर यांची पुण्यतिथी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!! कृपया यावर थोडं चिंतन मांडावं!
➡
श्रीराम!
🌺 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 🌺
श्रीराम! आजचा
दिवस आनंदाचा आहे! त्यावर चिंतन करणे जरूर वाटते. आमच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मठ पिंपळगांव
येथें १९व्या शतकांत एका कुलकर्णी कुटुंबात अनंतराव यांना एक दिव्य पुत्ररत्न
प्राप्त झालं. नाव ठेवण्यात आलं, गोविंद! या गोविंदाला बालपणीच वडिलांमुळे दासबोधाची अत्यंत गोडी
लागली. ६-७ वर्षाचा गोविंदा वडील दासबोध वाचू लागलें की कानाचे प्राण करून ऐकायचा. परंतु, वयाच्या आठव्या
वर्षी मौंज झाल्यानंतर दोनच वर्षांत गोविंदाचं पितृछत्र हरवलं. भाऊबंधांनी सगळी
संपत्ति लुबाडल्यावर इंदौरला येऊन गोविंद स्वतःचं आणि आईचं पोट भरण्यासाठी
लहानपणीच थोडं काम करू लागला. प्रापंचिक तापाने पोळलेला गोविंद सतत दासबोधात रमू लागला
आणि त्यातून आत्मचिंतन वाढू लागलं.
साधारण पंधरा
वर्षाचा झाला असतांना एके दिवशी हा नवतरुण इंदौर येथे दासबोधात आकंठ बुडालेला होता
आणि विचार करू लागला की मला या साधनेत सिद्धाचा आशीर्वाद मिळेल का?
आणि त्याचवेळी एक
दिव्य महात्मा समोर येऊन हजर! भव्य शरीर, अंगात कफनी, डाव्या हातात कुबडी, उजव्या हातात तुळशीमाळ, कपाळावर केशरी त्रिपुंड. चेहऱ्यावर दया, क्षमा आणि करुणा असलेल्या या श्रीमुखातून आदेश आला, "मला येऊन भेट!"
श्रीमहाराज
इंदौरमध्ये ज्याठिकाणी वास्तव्यास होते, तिथें शोधत शोधत गोविंद गेला आणि त्याच महात्म्याला बघून
लोटांगण घातलें. परमानंद वाटला. दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सुद्धा श्रीचरणीं आणले. सतत नामांत राहिल्यास सद्गुरूच तुम्ही असाल तिथें येतील आणि
तुम्हाला अनुग्रहीत करतील! याचा प्रत्यय गोविंदाला आला. महाराजांनी गोविंदाला आईसह बडवाह येथे जाऊन साडेतीन कोटी
रामनामजप करण्यास सांगितले. आणि गुरूकृपेनें व गोविंदाच्या निष्ठेनें साडेचार वर्षात
हा जपसंकल्प पूर्ण झाला.
यादरम्यान
श्रीमहाराजांनी या सत्शिष्याला पत्र लिहिले, त्यात गोविंदला नवीन नामभिधान दिले. ते म्हणजे आनंदसागर! चि. गोविंद अनंत कुलकर्णी हा गुरूकृपेनें 'आनंदसागर' बनला!
या प.पु.
आनंदसागर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळांत आपण हे त्यांचं पुण्यस्मरण करत
आहोत. काय गंमत आहे बघा, आनंदसागर महाराजांचं नामतेज वाढलेलं बघून त्यांची आईसुद्धां
त्यांना नमस्कार करू लागली. यांवर वाद होऊन दोघांनी श्रीमहाराजचरणीं आपलं गाऱ्हाणं
मांडलं. श्रीमहाराज म्हंटलें, दोघांनी
एकमेकांना नमस्कार करू नका!
शिष्यत्वाची
दासबोधात सांगितलेली लक्षणं आनंदसागर महाराजांमध्यें कशी ठासून भरली होती, त्याचा एक छोटासा प्रसंग.... एकदां एकादशीला सकाळच्या वेळी श्रीमहाराज म्हंटलें, "आनंदसागर, तू भजन करत बस.
मी जरा जाऊन येतो, मग आपण आरती
करुया!" श्रीमहाराज जे
बाहेर गेले ते दुसऱ्याच दिवशी आले आणि पाहतात तर यांचं भजन सुरूच! श्रीमहाराज म्हंटलें, 'शिष्य असावा तर असा!' प्रत्यक्ष सद्गुरूंकडून अशी पोचपावती मिळालेलें सत्शिष्य
मोजकेच!
पुढे
श्रीमहाराजांच्या आज्ञेनें आनंदसागर महाराजांनी १८९३ साली अंबड येथें तर १८९७ साली
जालना येथे श्रीराम मंदीराची स्थापना केली. जालना श्रीराम मंदीराची पार्श्वभुमी ऐकण्यासारखी आहे. आनंदसागर महाराज प्रवासांत असतांना जालना येथें १८९७ साली
आले होते. त्यावेळी, आजचा जो मंदीराचा
आनंदवाडी परिसर आहे, तो निर्जन दाट
झाडींचा गावाबाहेरचा परिसर होता. जवळचं रेल्वे
स्टेशन सोडलं तर या भागांत दिवसासुद्धां जाणं भितीदायक असें. आनंदसागर महाराज गावांत न उतरता या जंगली भागांत एक लहानसं
भैरवनाथाचं मंदीर होतं, तिथें उतरलें. सकाळी स्नान, संध्या, पुजादी कर्म
झाल्यावर बुवा गावांत भिक्षेला जात. जाण्यापुर्वी सोबतच्या राम, लक्ष्मण, सीतेच्या लहानशा
मुर्त्या भैरवनाथाच्या मुर्तीच्या खालच्या पायरीवर ठेवत....
एके दिवशी त्यांनी
पाहिलं की, रामरायाची मुर्ती
वरच्या पायरीवर आणि भैरवनाथाची मुर्ती खाली! त्यांना वाटलं आपलं चुकलं असेल. म्हणून त्यांनी मुर्त्या
आपापल्या जागेवर ठेवल्या. परंतु, दुसऱ्या दिवशी
तोच प्रकार घडला.
मग त्यांनी
गोंदवल्याला श्रीमहाराजांना पत्र लिहून सर्व वृत्तांत सांगितला. श्रीमहाराजांचं
उत्तर आलं, ही रामेच्छा दिसत
आहे. असं करूया त्याठिकाणी श्रीराम मंदीर स्थापनेची तयारी करावी. रामरायाची भव्य
मुर्ती घेऊन आम्ही जालन्याला येऊ आणि थाटांत श्रीरामस्थापना करू!
अशाप्रकारे, १८९७ साली रामराया नामावतारी श्रीमहाराजांच्या हस्ते जालना
येथे विराजमान झालें.
राघोबा उदारा ये
माझ्या मंदीरा ।
जानकीच्या वरा
रामराया ।।
आनंदसागर
महाराजांनी रामाचा, नामाचा सुरू
केलेला हा आनंदोत्सव आजपर्यंत सुरू आहे....
तर पुढे
ब्रम्हानंद महाराजांप्रमाणें आजन्म ब्रम्हचर्य पालन करून रामसेवा करावी, अशी आंतरिक इच्छा असतांना श्रीमहाराजांनी आनंदसागर
महाराजांना प्रपंच थाटण्याची आज्ञा दिली!
पत्नी, एक मुलगी, आई यांच्यासह
आनंदसागर महाराजांनी जालना श्रीराम मंदीर भिक्षेवर आणि नामप्रेमाने मोठं केलं.
त्यांना लोकांना अनुग्रह देऊन नामप्रसार करावा, अशी गुरूआज्ञा मिळाली होती. परंतु, त्यांनी फारच कमी लोकांना अनुग्रह दिला. कुणी अनुग्रहासाठी
आला तर ते म्हणत, 'माझा अनुग्रह
घेतला तर तुझ्या मुलाला वेड लागेल, तुझी पत्नी मरेल. चालेल का?' आणि फारच तयारीचा निघाला तर अनुग्रह देत नाही तर त्याला
गोंदवल्याला पाठवत!
त्यांच्याकडे असा
एक तयारीचा शिष्य अनुग्रहासाठी आला असता, त्यांनी त्याला स्वतः गोंदवले येथे श्रीमहाराजचरणीं आणलं
आणि त्यांच्याकडून अनुग्रह देवविला. हा सत्शिष्य म्हणजे प.पु. रामानंद महाराज उर्फ
पांडुरंगबुवा! आनंदसागर
महाराजांनी रामानंदांना अनुग्रह दिला नाही परंतु आपली कन्या देऊन त्यांना जावई
मात्र बनवलं! काय लीला असतात
भगवंताच्या! अनिर्वचनीय!
कालांतरानें, १९०५ मध्यें आनंदसागरांना गोंदवल्याहून श्रीमहाराजांचं
बोलावणं आलं. आणि मग बुवा २-३ महिने गोंदवले येथे सद्गुरूंच्या सेवेत राहिले...
१९०७ मध्यें
आनंदसागर महाराज जालन्याहून विदर्भातील नांदुरा नावाच्या गावाला निघाले. निघतांना
आईला नमस्कार केला, तर आईंना विचित्र
वाटलं, त्या म्हंटल्या, 'गोविंदा, आज काय हे असं?' त्यादिवशी नांदुरा येथें आनंदसागर महाराज भजनाला बसलें, बेंबीच्या देठापासून एक अभंग गायला, "स्वामी माझा पाहिला या माणगंगातिरी". हे पद म्हणतांना
तन, मन, जीव, प्राण गहिवरून
गेलं होतं. भजन झाल्यावर डोळे लावून ध्यानस्थ बसलें. चंद्रग्रहण होतं. ग्रहण सुटल्यावर जवळच्या लोकांना म्हंटलें, 'मी आता जातो. बोलावणं आलं आहे. महाराज तुमचें कल्याण करतील!'
एवढं सांगून 'महाराज, राम, महाराज' हे तीन शब्द
उच्चारून या आनंदाच्या सागरानें देह रामापायीं समर्पित केला....!
त्यांच्या आईंना
ही बातमी समजल्यावर त्या म्हंटल्या, 'रडता काय रे मेल्यांनो! भजन करा म्हणजे त्याचा आत्मा
संतुष्ट होईल!' आणि
श्रीमहाराजांना ही वार्ता कळली तेंव्हा ते म्हंटले, "माझा उजवा हात गेला!"
धन्य ते सद्गुरू, धन्य ती आनंदसागराची महामाता आणि धन्य तो अनन्य भक्तीचा 'आनंदसागर'!
आजच्या या पावन
पर्वकाळांत सद्गुरूंनी दिलेलं नाम घेत,
आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो!
("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!!