





शंका- दोष
जळून जाण्यासाठी अनेक साधक त्यांच्या त्यांच्या सद्गुरू आज्ञेप्रमाणे ते करतात.
काही असे करणे आवश्यक आहे असे वाचण्यातही आले आहे, त्यामुळे
माझ्या मनात असा प्रश्न आला की आपले सद्गुरू असे काही करायला सांगून गेलेत का?
त्यांनी काही नियम घालून दिलेत का?
आपण यावर मार्गदर्शन करावे ही विनंती.
➡
श्रीराम!
ज्याला
आपले कल्याण करून घ्यायचे आहे, त्याने
ज्याचे जीवन कल्याणकारी आहे, अशाचे
पाय धरले पाहिजे. असा कल्याणकारी सत्पुरूष म्हणजे अधिकारी संत! आपले कल्याण
साधण्यासाठी पहिली गोष्ट कोणती करावी लागत असेल तर,
संताचिये पायी हा
माझा विश्वास ।
सर्वभावे दास झालो
त्यांचा ।
सद्गुरु
देहात असतांना अनुग्रह देतेवेळी दररोज सकाळी शुचिर्भूत होऊन किमान एक माळ जप, सात्विक आचरण, रामनवमी, हनुमानजयंती, गोकुळाष्टमी उपवास, शक्य असल्यास एकादशी करावी, मुख्य उत्सवास गुरुगृही दर्शन इ. नियम घालून दिले होते. हे
नियम कल्याणकारी अध्यात्मसाधनेचे प्रवेशद्वार आहे.
परंतु, प्रवेशद्वारापर्यंत आलो म्हणजे गाभाऱ्यात श्रीचरणी पोचलो
असा नाही. आत जाण्यासाठी सद्गुरूंनी जे कठोर आणि सूक्ष्म नियम सांगितले आहेत ते
अंतरंग साधनेची तपश्चर्या आहे.
देहाने
बाह्यांगाने साधना करत असताना बाह्यशत्रूंवर कदाचित विजय मिळवला तरी अंतरंग
विकारांचा त्याग करणे, हा
मुलभूत नियम सद्गुरु खऱ्या साधकाला सांगतात. नारदभक्तिसूत्रामध्ये
निर्देशित केल्याप्रमाणे अभिमान
दंभादिकं त्याज्य | या सूक्ष्म नियमाचे पालन हे भक्तीच्या गाभाऱ्यात
पोचण्यासाठी अनिवार्य आहे.
साधनेत
एकेक पाऊल पुढे टाकत असतांना मान, दंभ, लोकांकडून स्तुती यातून एका अभक्ताचा जन्म होतो.
भगवंतापासून कधीही विभक्त न होणाऱ्या भक्तपणाचा नियम फार बारीक आहे.
ते भक्त म्हणावे
एकांति । लौकिकविषयी नाही प्रीति ।
सर्वकाळ आत्मरति ।
तृप्त होऊनि राहिले ।।
तेचि म्हणावे मुख्य
भक्त | जे कधी न होती विभक्त ।
देवावेगळे कधी न होत
। स्वये देव जाहले ।।
भक्त म्हणविता देव
झाले । परी देवासी न विसरले ।
देवभक्तपण राखिले ।
आजन्म मरणांती ।।
तमोगुणी वातावरणात वावरताना विषयापासून विभक्त राहणे हा
नंतरचा टप्पा. त्याअगोदर किमान सात्त्विक वातावरणात आल्यावर तरी विषयविभक्त होऊन
अनुसंधान टिकवणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे १९०६ मध्ये प.पू. रामानंद महाराजांनी
गोदावरी प्रदक्षिणा ठरवली. त्यावेळी सहावीत शिकत असलेला बाळ प्रल्हाद सुद्धा त्या
५०-६० सद्गुरुभक्तांमध्ये होता. या तीर्थयात्रेत सोबत एक बैलगाडी आणि दोन घोडे हे
सामान ठेवण्यासाठी होते. ‘सर्वांनी अनवाणी
पायांनी चालावे, स्नानाला
आणि प्यायला केवळ गोदावारीचेच पाणी घ्यावे आणि नामस्मरणाशिवाय इतर गप्पा मारता येणार
नाही.’ असे नियम रामानंद महाराजांनी ठरवून दिले. सर्वांनी विशेषतः
बालवयी भक्त प्रल्हादाने सर्व नियमांचे पालन करून नामानुसंधानात ही प्रदक्षिणा
पूर्ण केली. पर्वकाळ, अध्यात्मिक
उत्सव इ. मध्ये विषयचिंतन पूर्ण सोडून नामाला अखंड धरावे, हा नियम पू. प्रल्हाद महाराजांनी इ. सहावीत असतांना आचरून
दाखविला.
खूप
जास्त व्यक्तींबरोबर – साधकांबरोबर
साधनेव्यतिरिक्त चर्चा करणं - यात वेळेचा अपव्यय तर आहेच पण यातच बुद्धिभेदाचं बीज
आहे. साधना ही मानसिक पातळीवर एकट्यानेच करण्याची गोष्ट आहे. या मार्गावर
सद्गुरूंखेरीज आणि त्यांच्या खऱ्या सत्शिष्यांखेरीज कुणीही मार्ग दाखवण्यास समर्थ
नाही, कारण इथे आत्मप्रचीतीने सांगणाराच उपयोगी पडतो. आणि जेव्हा
यांना सोडून आपण भलत्याच्या पाठी लागतो, तेव्हा पारमार्थिक आयुष्याचा सर्वनाश होण्यास वेळ लागत
नाही. तेंव्हा, प्रापंचिकच
काय तर अकारण, अनावश्यक
पारमार्थिक चर्चेत वाटणाऱ्या रसग्रहणाचा त्याग करणे, हादेखील साधकदशेतील एक नियम आहे.
विधी ते पाळिती, निषेधा ते गाळिती ।।
रिसोडला पू. सखाजीशास्त्रींकडे वेदोपनिषदे आणि श्रीमद्भागवत
ग्रंथाचा सखोल अभ्यास आणि गुरुसेवा करून त्याची परिणती अशी झाली की प्रल्हाद
महाराज नामात अधिकाधिक बुडू लागले. पुराण, पोथ्या, अध्यात्मग्रंथ
कितीही वाचले तरी शेवटी त्यातून भगवंताच्या अनुसंधानात रुपांतर झाले नाही तर ते
व्यर्थ. तेंव्हा, सद्ग्रंथ
वाचन, श्रवण हे अखंड स्मरणासाठी करावे, हा नियम वेदपाठशाळेत असल्यापासून श्रींनी पाळून दाखवला. आपण उत्सवात किंवा इतर निमित्ताने
जेंव्हा श्रवण, कीर्तन, निरुपण, वाचन, लेखन करतो त्यातील हा अनुसंधानाचा मुलभूत नियम आपण विसरता
कामा नये.
श्रीमहाराज म्हणत, "मी सांगतो त्यापेक्षा अधिक तरी करतात, नाहीतर कमी तरी करतात; मी सांगतो तेवढंच आणि तसंच कुणीच करत नाही."
बुद्धीला
खतपाणी मिळावं हा एक परमार्थाला विरोधक असा सात्त्विक रोग आहे. जी माहिती आपल्या
साधनेचं, नामाचं
दृढीकरण करत नाही, ती
आपल्याला उपयोगी नाही, एवढंच
लक्षात ठेवावं.
बुद्धिभेद
होईल अशा व्यक्ती, गोष्टी, पोस्ट्स यांपासून सावध राहणे नितांत आवश्यक आहे. आजच्या
तंत्रयुगात जग लहान झालंय आणि परिणामी अनेकविध माहिती सतत आपल्या “पारमार्थिक होऊ पाहणाऱ्या” मनावर आदळत राहते. हे होतं एका रोगापासून... आणि तो रोग
म्हणजे अकारण
अध्यात्मिक माहिती गोळा करण्याचा मोह!
आज
इंटरनेटच्या युगात अध्यात्मिक वाङमय, संतचरित्र हे केवळ अनेकानेक ठिकाणी पोस्ट करण्याचं साधन
करण्यात आलं आहे. त्याचं वाचन, चिंतन
आणि त्यानुसार आचरण करणं याची मानसिक तयारी आणि चिकाटी दुर्दैवाने फार फार कमी
दिसत आहे.
आपले हे उपद्व्याप
बघून आपल्या सद्गुरूंना काय वाटत असेल याचा विचार करून स्वतःला सुधारणं हा एक
महत्त्वाचा साधकीय नियम आहे.
१९१८ मध्ये इंफ्लूएंझाच्यासाथीने प्रल्हाद महाराजांच्या
कुटुंबातील चार कर्ती माणसं देवाघरी गेली. या लौकिक दुःखाच्या क्षणी महाराजांनी
आपल्या सद्गुरूंना हे मृत्यूचे तांडव थांबवा, अशी विनवणी किंवा मागणी केली नाही. परमार्थसाधना ही
प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही लौकिक सिद्धीसाठी करायची नसून
आत्मशुद्धीसाठी करायची असते, हा
नियम ज्याच्या रोमारोमात होता, अशा
सत्पुरुषाचे शिष्य म्हणवणारे आपण किती किती लौकिकात अडकतो! नामाचा नेम हा सकाम
व्यवहार न करता रामप्रेमासाठी करावा, हा नियम आपण पाळला तरच भक्तीला तेज येईल. नाहीतर, नाम घेतल्यामुळे आमच्या घरातील रुग्ण आजारमुक्त झाला, एखाद्याला नोकरी लागली, एखाद्याचे लग्न ठरले, अचानक कुणीतरी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी धावून आले, ही गुरुकृपा समजणे, हे गुरुकृपेचे अवमूल्यन केल्यासारखे होईल.
विषय तो त्यांचा
झाला नारायण ।।
जर
रामपदी रती हवी असेल, तर
या शाश्वत पंथावर चालताना नश्वर गोष्टींचा आधार घेऊन चालता येणार नाही. देहाने
अर्थातच प्रपंचासाठी प्रयत्न करावे लागतीलच; परंतु हे करत असताना मनातून मात्र केवळ राम चरणांचं ध्यान
असणं आणि त्यासाठी आजूबाजूच्या वस्तू, व्यक्ती यातली आसक्ती, ममत्त्व कमी होणं हे अपेक्षित आहे. नामाने हे साधणार नाही
का? असा प्रश्न विचारला जातो. नामाने सर्व साधतं हे त्रिवार
सत्य आहे; परंतु, आपली तशी इच्छा असेल तर! नाहीतर साधनेचं देखील आसक्ती
वाढवण्यातच पर्यवसान होतं हा धोक्याचा इशारा लक्षात ठेवावा. तेंव्हा, सद्गुरूंनी आचरणातून घालून दिलेला आणखी एक महत्त्वाचा नियम
म्हणजे नश्वर गोष्टींची आसक्ती कमी करणं!
साधनेतील अनुभव हे मैलाचे दगड आहेत, असं श्रीमहाराज म्हणत आणि जेव्हा विचारलं तुम्हाला काय
अनुभव आले, तेव्हा
म्हणाले, मला
कोणतेही अनुभव आले नाहीत, फक्त
अखंड समाधानाचा अनुभव आला. हे
फार महत्त्वाचं आहे. सर्व लौकिक विकार, वासना तशाच राहून केवळ नामाच्या शक्तीने आलेल्या भौतिक
अनुभवांना फारसं महत्त्व नाही. अंतरंग परिवर्तन होणं हाच अनुभव महत्त्वाचा आणि
त्याची परिणती म्हणजे शांती – आनंद – समाधान!
साधकदशेत
दुसऱ्याच्या साधनेतील अनुभव ऐकण्यासाठी नको तितकं आसुसलेलं राहणं आणि मग तुलना
करून आपल्या साधनेच्या श्रद्धेला तडा जाऊ देणं, हे आजच्या काळात अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहे. आपल्या
साधनेला बळकटी आणण्यासाठी उत्तम साधकांचे साधन कसे आहे हे समजून त्यानुसार आचरण
करणे हिताचे आहे हे खरे. परंतु त्यांच्या अनुभवांवरून आपली साधनेची पातळी जोखणे या
गोष्टी घातक आहेत. त्यामुळे आपल्या साधनेवरच्या श्रद्धेला तडा जातो आणि पुढे मार्ग
चालत असलेला साधक दोन पावलं पुढे चालून दहा पावलं मागे येतो.
त्यातही
दुसऱ्यांना उगीच आपले अनुभव ऐकवत राहणं, ही साधकांसाठी त्याज्य बाब आहे. श्रीमहाराजांनी साधनात
गुप्तता पाळावी हे यासाठीच सांगितले आहे. एक तर आपले अनुभव सांगण्याने आपण कुणीतरी मोठे असा अहंकार नकळत
आपल्या मनात येतो, आणि
दुसरे म्हणजे ज्याला आपण सांगतो, त्याच्या साधनेवर अनेकदा विपरीत परिणाम होण्याची शक्यता
असते. तेंव्हा, अनुभवांच्या मागे पळण्यापेक्षा सूक्ष्म आत्मप्रचितीसाठी
निष्काम साधना करणे, हा
एक महत्त्वाचा नियम आहे.
गुरुकृपेचा खरा अनुभव येण्यासाठी देहाने अनुसरण केलं पाहिजे
हे तर खरंच; परंतु
काही साधनेतील अलिखित परंतु अतिशय महत्त्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे. यातल्या
साधक-बाधक गोष्टी आपण बघितल्या. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे, नाम आणि उपासना “काहीही” झालं तरी न चुकवणं. आपण स्वतःलाच विचारावं, गेल्या काही वर्षांत जर आपण नामाला लागलेले असू, तर या दिवसात किती वेळा आपण रोजचं नाम चुकवलं आणि त्याचं
कारण काय होतं? बहुतेक
वेळा अतिशय क्षुल्लक कारणापायी नाम चुकलं हे लक्षात येईल. अजून एक विपर्यास म्हणजे घरात शुभकार्य असो वा अशुभ घटना, दोन्हीत आपलं नाम टिकतं का याचा विचार व्हावा. टिकत नाही हे सत्य आहे. यावेळेत इतर लौकिक गोष्टी थांबतात
का? तर नाही. नाम थांबतं, कारण लौकिक गोष्टींची किंमत नामापेक्षा अनंतपट अधिक आहे
अजूनही!
अशी
आत्मवंचना होऊ नयें यासाठीच संख्येच्या नियमाचं बंधन साधकाला असावं! नामालय उपक्रम
संख्येला आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती होण्याला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे
अगोदर देहाला नामाची सवय लागावी. परंतु, याचबरोबर प्रत्येक साधकाने अखंड सावधानता बाळगून लौकिक
अपेक्षा, मान, दंभ यांना संपवण्याचा विवेकयुक्त प्रयत्न करणे अनिवार्य
आहे.
१९२० साली जालन्याला श्रीरामनवमीच्या उत्सवात पू. रामानंद
महाराजांनी सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराजांकडून आलेले श्रीरामपंचायतन
निष्ठापूर्वक रामसेवेचा महाप्रसाद म्हणून प्रल्हादबुवांच्या स्वाधीन केले.
रामरायाची नित्यनियमाने अर्चनोपासना करावी, तीर्थ घेतल्याशिवाय पाणीदेखील प्यायचे नाही. साधनद्वादशी इ.
नियम सांगितले. त्याचे श्रद्धापूर्वक पालन प्रल्हाद महाराजांनी शेवट पर्यंत केले.
पुढे
हेच श्रीरामपंचायतन हरवल्यावर सात दिवस अन्नपाणी ग्रहण न करता रामशोधार्थ भोगलेला
त्रास आपणा सर्वांना ठाऊकच आहे. रामराया सापडल्यावर झालेला उत्सव आणि सद्गुरूंनी
सांगितलेल्या नियमांचे कठोरपणे परंतु प्रेमपूर्वक पालन करणे, हाच शिष्याचा धर्म आहे, हा आदर्श पू. प्रल्हाद महाराजांनी आचरणातून दाखवून दिला.
तेंव्हा, आपल्या सद्गुरूंना अपेक्षित साधना दंभासक्ती सोडून
निरहंकारी वृत्तीने, आत्मीयतेने
करणे हे
ज्याला साधले, त्याला
गुरुकृपा काय आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
रामरायाच्या
प्रेरणेने या चिंतनाच्या माध्यमातून बघितलेले साधनेचे नियम कसोशीने पालन करूयात, जेणेकरून हा मनुष्यजन्म सार्थकी लागेल!
!!! जानकी जीवन स्मरण जय
जय राम !!!