Friday, May 3, 2019

कृष्ण नाकाला लोणी लावतो!

शंका :

📿🌿📿      !! श्रीराम !!     📿🌿📿

लोणी चोरल्यावर बाळकृष्ण थोडे लोणी एखाद्या वासराच्या नाकाला लावीत. त्यामुळे त्या वासराला चोप मिळे. तसे खरे परमात्माच सर्व करतो पण अहंकारी माणसाच्या नाकाला लोणी लावतो व त्यामुळे त्याला दुःख भोगावे लागते!

🙏🌷🙏 ।। श्रीराम समर्थ ।। 🙏🌷🙏

याचा अर्थ नाही समजला☝🏻😒


🍚🌿   "नाकाला लोणी नको"   🌿🍚

श्रीराम!

श्रीमहाराजांच्या वरील बोधवचनात जे आलंय ना, की 'भगवंत वासराच्या तोंडाला लोणी लावतो' ते एक फार बोधप्रद रूपक आहे.
वासरू म्हणजे लेकरू. आपण सर्वजण भगवंताची लेकरं आहोत. त्या लेकरावर भक्तीमाता निरपेक्ष, निर्व्याज प्रेम करते. परंतु, भगवंत हा बापाच्या भूमिकेत असल्याने तो आपलं लेकरू जरी असलं तरी त्याने काही चूक केली, अपराध केला तर त्याला दंडित करायला मागेपुढे बघत नाही. जोपर्यंत लेकरू स्वतःला अज्ञानी लेकरू समजतं तोपर्यंत आई त्याला स्वतः जेवू घालते, बाप त्याला गर्दीच्या ठिकाणी खांद्यावर घेतो. तेच लेकरू स्वतःला शहाणं, ज्ञानी, गुणवान समजू लागलं की सद्गुरुरुपी आई कदाचित लाडाने आताही घास भरवेल, पण बाप म्हणतो आता मी तुला खांद्यावर घेणार नाही, तू तुझं पायी चाल. आणि बाप एवढ्यावर थांबत नाही. त्या लेकराला तो अजून खरा ज्ञानी झाला नाही, हे तथाकथीत ज्ञान म्हणजे त्या लेकराचा वृथा अभिमान आहे, याची त्याला जाणीव करून देतो.

लेकराने काही लहान मोठी चूक केली तर आई त्याला समजावून सांगते. परंतु, ‘मला कळतं’, माझ्याकडे इतरांपेक्षा श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान, कला, गुण आहेत असा अभिमान, अहंकार ही काही लहानशी चूक नाही. हे आत्मघातकी महापाप आहे. अशावेळी आईला वाईट वाटण्यापलीकडे काही करता येत नाही. ही आई म्हणजे भक्तीमाता म्हणजेच आपले सद्गुरु आपल्यातील अहंकार बघून आपल्याला वेगवेगळ्या निमित्ताने समजावण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जेंव्हा आपण त्याला जुमानत नाही, तेंव्हा मात्र भगवंत (आपला बाप) आपल्या नाकाला लोणी लावून आपल्या प्रारब्धाकरवी आपल्याला चोप देतो. आता हे लोणी लावतो म्हणजे काय? तर हे लोणी म्हणजे लोकांकडून येणारी कौतुक किंवा स्तुतीची थाप.

भगवंताने इंद्रदेवाकडे सजीवांना पर्जन्य, वायू इ. योग्यवेळी देण्याची शक्ती दिली. त्यामुळे गोकुळात सर्व लोक इंद्रदेवाची पूजा करीत, स्तुती करीत. परंतु, जेंव्हा इंद्राला वाटले की मीच त्यांचा पालनहार, तारणहार आहे आणि त्याच्या अहंकाराची परिसीमा झाली तेंव्हा, भगवंताने त्याच्या नाकाला लोणी लावलं. पुढे जेंव्हा कान्होबाच्या निर्देशाने गोकुळवासियांनी त्याची स्तुती थांबवली तेंव्हा, इंद्राच्या अभिमानाची परिणती क्रोध आणि अविचारात झाली. शेवटी भगवंताने त्याचा अहंकार एका करांगुलीच्या जोरावर संपवला.

असाच अहंकार गरुडाला, सुदर्शनाला झाला तेंव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्या नाकाला स्तुतीचे लोणी लावून त्यांना एक कामगिरी सोपवली. आणि पुढे हनुमंताकरवी त्यांचा गर्वपरिहार करून त्यांना त्यांची जागा दाखवली.

ज्ञान, कला, गुण हे सर्वथैव त्याज्य आहे असे नाही, परंतु त्या ज्ञानाला, कलेला लोकेषणेची झालर लागली की त्याच ज्ञानाची, गुणाची परिणती अहंकारात होते. लोकांनी मला ज्ञानी, गुणवान म्हणावं, लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझा आदर करावा, माझ्यासमोर आणि माझ्या माघारी मला सज्जन, सात्विक, सत्पुरुष म्हणावं ही आंतरिक सुप्त इच्छा म्हणजे लोकेषणा!

स्तुती, आदर, पूज्यभाव याचे लोणी केवळ भगवंतासाठीच असते. स्तुतिप्रियः विष्णुः | परंतु, थोड्याफार कलागुणांमुळे, तोकड्या ज्ञानामुळे जेंव्हा आपण अल्पज्ञानी स्वतःला सर्वज्ञ म्हणजे पूजनीय मानू लागतो, तेंव्हा भगवंत स्वतःकडे आलेले पूजनीय, स्तुतीवचनांचे लोणी या अभिमानी तथाकथित कलावंत, गुणवंत, ज्ञानी माणसाच्या नाकाला लावतो. आणि मग बहुतांश लोक त्या अभिमानी माणसाची स्तुती, कौतुक सुरु करतात. आणि हेच स्तुतीरुपी लोणी त्या तथाकथित विद्वान, तथाकथित सज्जन भक्ताच्या अधःपतनाचे कारण ठरते.

भक्तीचे एक महत्वाचे सूत्र म्हणजे अभिमान दंभादिकं त्याज्य |. जो अभिमानरहित होऊन, दंभरहित होऊन, लोकेषणारहित होऊन साधना करतो तोच आणि केवळ तोच भक्त या पदावर आरूढ होऊ शकतो.

त्यासाठी, लौकिक स्तुती, मान यांना बळी न पडता तुकोबा म्हणतात तसे, आम्ही घ्यावे तुमचे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम | हे जीवनाचे ब्रीद बनवावे.

श्रीमहाराज म्हणत, “मानाची हौस ही रक्तातली साखर आहे. ती त्या माणसाच्या जीव घेतल्याशिवाय सोडत नाही”. हे मान, कौतुकाचे लोणी अनुभवायला गोड वाटते. परंतु, हाच मधुमेह जीवघेणा आहे. ज्याच्यात थोडाही अभिमान आला, त्याच्या नाकाला भगवंत हे मधुमेहाचे लोणी लावतो. तेंव्हा, या स्तुती, मानरुपी बाहेरून गोड वाटणाऱ्या मधुमेहाला बळी न पडता मधुसूदनाचे नामरुपी लोण्याच्या मोहात पडण्याच्या अट्टाहास धरावा! कठीण वाटत असेल, पण ही सावधानता जो बाळगेल त्यालाच भगवंताचे नवनीत प्रेम मिळेल!

🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

Monday, March 25, 2019

पू. तुकामाई चिंतन

🌸📿🌸 *"चिंतन ही तुझी सेवा"* 🌸🌿🌸

*तुकामाई माझ्या गुरूंची माऊली ।।*
*अनन्यता ज्याच्या जवळी त्याला ती पावली ।।*

*श्रीराम!*
भगवंत हा करुणासिंधु आहे असे आपण म्हणतो. परंतु, समुद्र हा कितीही मोठा असला तरी त्याला मर्यादा असते. समुद्रापेक्षा विशाल आणि सर्वव्यापक आकाश असते. भगवंताच्या करुणेपेक्षा व्यापक संतांची करुणा असते. ‘तुका झाला आकाशाएवढा’ अशी संतांची करुणा असते. अशा संतांचे आणि समर्थ सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार आहेत, याची आपल्याला कल्पना येणे कठीण आहे. आपल्या परंपरेचा विचार केला तर आपल्या सद्गुरुंपेक्षा त्यांच्या सद्गुरूंचे तुकामाईचे यांचा आपल्यावर एक विशेष उपकार आहे. आपल्याला तो उपकार वाटत नाही हा आपला दोष आहे. हा विशेष उपकार चिंतनाच्या शेवटपर्यंत कळून जाईल.

*उपकाराच्या तीन तऱ्हा आहेत: प्रतीउपकार, परोपकार आणि उपकार!*

व्यवहारी मनुष्य मला कुणी मदत केली म्हणून मीपण त्याला करायला पाहिजे असे वागतो म्हणजे प्रतीउपकार करतो; भगवंत आपण त्याला मदत केली म्हणून तो आपल्याला सांभाळतो असं नाही, पण सदाचरण राखले तर आपल्यावर तो परोपकार करतो. संत किंवा सद्गुरूंचे तसे नसते. आपल्यासारखे बद्ध विषयात बुडालेले त्यांना बघवत नाही आणि आपलं कल्याण व्हावं याच तळमळीने आपल्याला सतत निरनिराळ्या निमित्ताने सन्मार्ग दाखवत असतात. हा संतांचा निरपेक्ष, निःस्वार्थ उपकार आहे.

असे अनंत उपकार करणारे सद्गुरु लाभूनही आपण त्यांच्यावर प्रतीउपकार तर करूच शकत नाही. मात्र आपला अहं प्रबळ करून आपण त्यांच्यावर अपकार मात्र रात्रंदिवस करत असतो. माझे सद्गुरु माझ्यासाठी सर्व काही आहेत, असं म्हणणारा अनेकदा घरातील आपल्या लाडक्या व्यक्तीला जरासा ताप आला तरी त्याला उपासनेला जाववत नाही की नामाला बसवत नाही. वस्तू, व्यक्तीमध्ये आसक्त असलेला मनुष्य वाणीने जरी गुरुः साक्षात परब्रम्ह म्हणत असेल तरी सद्गुरूंच्या तुलनेत नेमकं घरच्या मंडळींना प्राधान्य देतांना दिसतो. बरं याहीपुढे जाऊन आपलं घरच्यांवरदेखील खरं प्रेम नाही असं दिसतं. घरातील मंडळींवर तथाकथित प्रेम असूनही त्यांनी काही कमीजास्त बोललं किंवा आपल्या मनाविरुद्ध वागलं तर आपल्याला ते सहन होत नाही. याचा अर्थ माझं सद्गुरुंपेक्षा माझ्या लौकिक माणसांवर आणि त्या माणसांपेक्षा माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे. यालाच अहंपणा म्हणतात. आणि संतांचा उपकार याच ठिकाणी भगवंताच्या परोपकारापेक्षा श्रेष्ठ ठरतो.

कसं ते पहा: आपण कसंही वागलो तरी आपल्या घरच्या लोकांनी आपल्याशी चांगलंच वागावं ही आपली सुप्त अपेक्षा असते. आणि तसं झालं नाही तर आपला अहं दुखावतो. समोरच्या व्यक्तीचा अहं किती मजबूत आहे हे त्याची चूक नसतांना त्याचा अपमान, निंदा केल्यावर खऱ्या अर्थाने दिसून येते. तुकामाईंनी त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक लोकांचा विनाकारण अपमान, शिवीगाळ करून त्यांच्या अहंची खोली आणि व्यापकता तपासली. जे त्यात अनुत्तीर्ण झाले, त्यांचा बद्ध जीव म्हणून धिक्कार केला. परंतु, गणूसारखा एक समर्पित मुलगा या परीक्षेत उत्तीर्ण झाला तेंव्हा त्याच्यातील ब्रम्हतत्व चेतन करून त्याला “ब्रम्हचैतन्य” म्हणून गौरविले. गणुबुवा हे मुळातच परब्रम्हाचं चेतन रूप होतं. तरीसुद्धा मुमुक्षू म्हणून आलेल्याला साधक आणि शिष्य बनण्यासाठी सर्वप्रथम निरहंकारी बनणे जरूर आहे. याचा धडा तुम्हाआम्हाला देण्यासाठी तुकामाईंनी गणू कितीही मनोभावे आज्ञापालन करत असला तरी त्याच्याशी विक्षिप्त वागले.

तुम्ही आम्ही आपल्या सद्गुरुंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेल्यावर सद्गुरूंनी आपल्याशी असे मानहानीकारक वागले असते तर आपण म्हटलो असतो, ‘त्यांचा अनुग्रह त्यांच्याजवळ. ज्यांना सर्व जगत भगवद्स्वरूप आहे हे न कळता दुसऱ्याचा असा अकारण अपमान करावासा वाटतो, तो कसला सद्गुरु!’

आपल्याला जर असं वाटत असेल की ‘खरंच, आपल्या सद्गुरूंनी आपली अशी कोणतीही परीक्षा बघितली नाही!’ तर ते चूक आहे. आपल्यालादेखील तुकामाईच्या या परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे. किंबहुना सध्या परीक्षा सुरु आहे.

तुकामाई आपल्या विक्षिप्त वागण्यातून अगोदर समोरच्या व्यक्तीचा मीपणा जाळून टाकतात आणि मग पूर्ण कृपा करतात. भगवद्प्राप्तीची खरी तळमळ असलेल्याने आपल्या घरातील, बाहेरील व्यक्तींकडून होणाऱ्या सकारण अकारण अपमान, निंदा, द्वेषयुक्त वागण्याला सहन करून आपला अहं हळूहळू नामशेष करणे अनिवार्य आहे, हा सुबोध तुकामाईंनी आपल्या विक्षिप्त वागण्यातून दिला.

अहं जाळण्याचे कार्य भगवंताच्या हातात नाही. “अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः” असं पवित्र अभिवचन देणाऱ्या भगवंताच्या मुखातदेखील अहं आहे. परंतु, सद्गुरु ‘रामराया कल्याण करील बरं बाळ!’ असं म्हणतात आणि मानतात. तेंव्हा अहंकृती, अभिमान जाळण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि अहंकृती जाळणे, हाच सद्गुरूंचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार आहे.

आपला अहंकार दहादिशांनी पसरलेला आहे. असा दशाननी अहंकार जाळण्यासाठी आपल्याला अंतःकरणात तितिक्षा आणि मुखात भगवंताचे नाम ठेवून सदाचरण राखावे लागेल. जेंव्हा जेंव्हा आपलं काहीही चुकलं नसतांना आपल्या घरच्या मंडळींकडून, नातेवाईकाकडून, किंवा समाजातून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे, तेंव्हा उद्विग्न न होता तुकामाईंच्या इच्छेने श्रीमहाराज आपल्यातील अहं जाळण्याचे काम करत आहेत, हे ध्यानांत ठेवावे. असं लक्षात ठेवलं तरच मनाचा त्रागा न होता नामाला, उपासनेला बसलो की अनुसंधान टिकण्यास मदत होईल. आपल्याला मानसिक इ. क्लेश देणारी घरातील, बाहेरील मंडळी स्वतः हे करत नसून खऱ्या अनुग्रहासाठी तुकामाई त्यांच्या निमित्ताने आपली परीक्षा घेत आहेत, हा भाव दृढ करावा. अशा अकल्पित पद्धतीने आपल्यातील अभिमान हा सर्वात मोठा शत्रु मारण्याची ही रचना म्हणजे तुकामाईंचा आपल्यावर विशेष उपकार आहे.

तेंव्हा, पूर्ण सावधानतेने आपण व्यवहार आणि साधना चालू ठेवली तर आपले सद्गुरु आणि त्यांचे सद्गुरु दोघांचा कृपाशीर्वाद लाभून आपला शेवटचा श्वास पुण्यतिथी होईल!
 
*।। नमन माझे येहळेगावी गुरूतुकामाईला ।।*

🙏 *जानकी जीवन स्मरण जय जय राम* 🙏

Wednesday, February 20, 2019

पू. आनंदसागर महाराज पुण्यतिथी पर्वकाळ चिंतन


🌹🌷" नामप्रेमचिंतन " 🌹🌷

शंका- आज श्री .प पु . आनंदसागर यांची पुण्यतिथी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!! कृपया यावर थोडं चिंतन मांडावं!


श्रीराम! 
🌺 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 🌺

श्रीराम! आजचा दिवस आनंदाचा आहे! त्यावर चिंतन करणे जरूर वाटते. आमच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मठ पिंपळगांव येथें १९व्या शतकांत एका कुलकर्णी कुटुंबात अनंतराव यांना एक दिव्य पुत्ररत्न प्राप्त झालं. नाव ठेवण्यात आलं, गोविंद! या गोविंदाला बालपणीच वडिलांमुळे दासबोधाची अत्यंत गोडी लागली. ६-७ वर्षाचा गोविंदा वडील दासबोध वाचू लागलें की कानाचे प्राण करून ऐकायचा. परंतु, वयाच्या आठव्या वर्षी मौंज झाल्यानंतर दोनच वर्षांत गोविंदाचं पितृछत्र हरवलं. भाऊबंधांनी सगळी संपत्ति लुबाडल्यावर इंदौरला येऊन गोविंद स्वतःचं आणि आईचं पोट भरण्यासाठी लहानपणीच थोडं काम करू लागला. प्रापंचिक तापाने पोळलेला गोविंद सतत दासबोधात रमू लागला आणि त्यातून आत्मचिंतन वाढू लागलं.

साधारण पंधरा वर्षाचा झाला असतांना एके दिवशी हा नवतरुण इंदौर येथे दासबोधात आकंठ बुडालेला होता आणि विचार करू लागला की मला या साधनेत सिद्धाचा आशीर्वाद मिळेल का?

आणि त्याचवेळी एक दिव्य महात्मा समोर येऊन हजर! भव्य शरीर, अंगात कफनी, डाव्या हातात कुबडी, उजव्या हातात तुळशीमाळ, कपाळावर केशरी त्रिपुंड. चेहऱ्यावर दया, क्षमा आणि करुणा असलेल्या या श्रीमुखातून आदेश आला, "मला येऊन भेट!"

श्रीमहाराज इंदौरमध्ये ज्याठिकाणी वास्तव्यास होते, तिथें शोधत शोधत गोविंद गेला आणि त्याच महात्म्याला बघून लोटांगण घातलें. परमानंद वाटला. दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सुद्धा श्रीचरणीं आणले. सतत नामांत राहिल्यास सद्गुरूच तुम्ही असाल तिथें येतील आणि तुम्हाला अनुग्रहीत करतील! याचा प्रत्यय गोविंदाला आला. महाराजांनी गोविंदाला आईसह बडवाह येथे जाऊन साडेतीन कोटी रामनामजप करण्यास सांगितले. आणि गुरूकृपेनें व गोविंदाच्या निष्ठेनें साडेचार वर्षात हा जपसंकल्प पूर्ण झाला.
यादरम्यान श्रीमहाराजांनी या सत्शिष्याला पत्र लिहिले, त्यात गोविंदला नवीन नामभिधान दिले. ते म्हणजे आनंदसागर! चि. गोविंद अनंत कुलकर्णी हा गुरूकृपेनें 'आनंदसागर' बनला!

या प.पु. आनंदसागर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळांत आपण हे त्यांचं पुण्यस्मरण करत आहोत. काय गंमत आहे बघा, आनंदसागर महाराजांचं नामतेज वाढलेलं बघून त्यांची आईसुद्धां त्यांना नमस्कार करू लागली. यांवर वाद होऊन दोघांनी श्रीमहाराजचरणीं आपलं गाऱ्हाणं मांडलं. श्रीमहाराज म्हंटलें, दोघांनी एकमेकांना नमस्कार करू नका!
शिष्यत्वाची दासबोधात सांगितलेली लक्षणं आनंदसागर महाराजांमध्यें कशी ठासून भरली होती, त्याचा एक छोटासा प्रसंग.... एकदां एकादशीला सकाळच्या वेळी श्रीमहाराज म्हंटलें, "आनंदसागर, तू भजन करत बस. मी जरा जाऊन येतो, मग आपण आरती करुया!" श्रीमहाराज जे बाहेर गेले ते दुसऱ्याच दिवशी आले आणि पाहतात तर यांचं भजन सुरूच! श्रीमहाराज म्हंटलें, 'शिष्य असावा तर असा!' प्रत्यक्ष सद्गुरूंकडून अशी पोचपावती मिळालेलें सत्शिष्य मोजकेच!

पुढे श्रीमहाराजांच्या आज्ञेनें आनंदसागर महाराजांनी १८९३ साली अंबड येथें तर १८९७ साली जालना येथे श्रीराम मंदीराची स्थापना केली. जालना श्रीराम मंदीराची पार्श्वभुमी ऐकण्यासारखी आहे. आनंदसागर महाराज प्रवासांत असतांना जालना येथें १८९७ साली आले होते. त्यावेळी, आजचा जो मंदीराचा आनंदवाडी परिसर आहे, तो निर्जन दाट झाडींचा गावाबाहेरचा परिसर होता. जवळचं रेल्वे स्टेशन सोडलं तर या भागांत दिवसासुद्धां जाणं भितीदायक असें. आनंदसागर महाराज गावांत न उतरता या जंगली भागांत एक लहानसं भैरवनाथाचं मंदीर होतं, तिथें उतरलें. सकाळी स्नान, संध्या, पुजादी कर्म झाल्यावर बुवा गावांत भिक्षेला जात. जाण्यापुर्वी सोबतच्या राम, लक्ष्मण, सीतेच्या लहानशा मुर्त्या भैरवनाथाच्या मुर्तीच्या खालच्या पायरीवर ठेवत....
एके दिवशी त्यांनी पाहिलं की, रामरायाची मुर्ती वरच्या पायरीवर आणि भैरवनाथाची मुर्ती खाली! त्यांना वाटलं आपलं चुकलं असेल. म्हणून त्यांनी मुर्त्या आपापल्या जागेवर ठेवल्या. परंतु, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला.
मग त्यांनी गोंदवल्याला श्रीमहाराजांना पत्र लिहून सर्व वृत्तांत सांगितला. श्रीमहाराजांचं उत्तर आलं, ही रामेच्छा दिसत आहे. असं करूया त्याठिकाणी श्रीराम मंदीर स्थापनेची तयारी करावी. रामरायाची भव्य मुर्ती घेऊन आम्ही जालन्याला येऊ आणि थाटांत श्रीरामस्थापना करू!
अशाप्रकारे, १८९७ साली रामराया नामावतारी श्रीमहाराजांच्या हस्ते जालना येथे विराजमान झालें.
राघोबा उदारा ये माझ्या मंदीरा ।
जानकीच्या वरा रामराया ।।
आनंदसागर महाराजांनी रामाचा, नामाचा सुरू केलेला हा आनंदोत्सव आजपर्यंत सुरू आहे....

 तर पुढे ब्रम्हानंद महाराजांप्रमाणें आजन्म ब्रम्हचर्य पालन करून रामसेवा करावी, अशी आंतरिक इच्छा असतांना श्रीमहाराजांनी आनंदसागर महाराजांना प्रपंच थाटण्याची आज्ञा दिली!
पत्नी, एक मुलगी, आई यांच्यासह आनंदसागर महाराजांनी जालना श्रीराम मंदीर भिक्षेवर आणि नामप्रेमाने मोठं केलं. त्यांना लोकांना अनुग्रह देऊन नामप्रसार करावा, अशी गुरूआज्ञा मिळाली होती. परंतु, त्यांनी फारच कमी लोकांना अनुग्रह दिला. कुणी अनुग्रहासाठी आला तर ते म्हणत, 'माझा अनुग्रह घेतला तर तुझ्या मुलाला वेड लागेल, तुझी पत्नी मरेल. चालेल का?' आणि फारच तयारीचा निघाला तर अनुग्रह देत नाही तर त्याला गोंदवल्याला पाठवत!
त्यांच्याकडे असा एक तयारीचा शिष्य अनुग्रहासाठी आला असता, त्यांनी त्याला स्वतः गोंदवले येथे श्रीमहाराजचरणीं आणलं आणि त्यांच्याकडून अनुग्रह देवविला. हा सत्शिष्य म्हणजे प.पु. रामानंद महाराज उर्फ पांडुरंगबुवा! आनंदसागर महाराजांनी रामानंदांना अनुग्रह दिला नाही परंतु आपली कन्या देऊन त्यांना जावई मात्र बनवलं! काय लीला असतात भगवंताच्या! अनिर्वचनीय!

कालांतरानें, १९०५ मध्यें आनंदसागरांना गोंदवल्याहून श्रीमहाराजांचं बोलावणं आलं. आणि मग बुवा २-३ महिने गोंदवले येथे सद्गुरूंच्या सेवेत राहिले...
१९०७ मध्यें आनंदसागर महाराज जालन्याहून विदर्भातील नांदुरा नावाच्या गावाला निघाले. निघतांना आईला नमस्कार केला, तर आईंना विचित्र वाटलं, त्या म्हंटल्या, 'गोविंदा, आज काय हे असं?' त्यादिवशी नांदुरा येथें आनंदसागर महाराज भजनाला बसलें, बेंबीच्या देठापासून एक अभंग गायला, "स्वामी माझा पाहिला या माणगंगातिरी". हे पद म्हणतांना तन, मन, जीव, प्राण गहिवरून गेलं होतं. भजन झाल्यावर डोळे लावून ध्यानस्थ बसलें. चंद्रग्रहण होतं. ग्रहण सुटल्यावर जवळच्या लोकांना म्हंटलें, 'मी आता जातो. बोलावणं आलं आहे. महाराज तुमचें कल्याण करतील!'
एवढं सांगून 'महाराज, राम, महाराज' हे तीन शब्द उच्चारून या आनंदाच्या सागरानें देह रामापायीं समर्पित केला....!
त्यांच्या आईंना ही बातमी समजल्यावर त्या म्हंटल्या, 'रडता काय रे मेल्यांनो! भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल!' आणि श्रीमहाराजांना ही वार्ता कळली तेंव्हा ते म्हंटले, "माझा उजवा हात गेला!"
धन्य ते सद्गुरू, धन्य ती आनंदसागराची महामाता आणि धन्य तो अनन्य भक्तीचा 'आनंदसागर'!

आजच्या या पावन पर्वकाळांत सद्गुरूंनी दिलेलं नाम घेत,
 आनंदाचा सागर नयनी पहा रे गड्यांनो! 


    ("नामप्रेम" पुस्तकातून साभार)
!!! जानकी जीवन स्मरण जय जय राम !!!